Pages - Menu

Saturday, March 31, 2012

सुरंगीचा गंध ... मन होई धुंद

ऑफिस कामामुळे प्रवास अपरिहार्य असतो. प्रवासात निसर्गाची किमया पहात बराच वेळ जातो. या सर्व प्रवासात अनेक नव्या गोष्टींची ओळख होते. कोकणात निसर्ग मानवी मनाला वेडावून टाकतो. असाच वेंगुर्ल्याला निघालो असतानाच वेंगुर्ल्याच्या अलीकडे एक सुगंध जाणवायला लागला. या वासाची चाहूल घेतली असता दिसले सुरंगी फुलाचे वळेसार. सहज थांबलो. चौकशी केली.

माहिती मिळाली की या भागात आरवलीच्या वेतोबाची सुरंगीच्या वळेसारांनी पूजा बांधण्याची प्रथा आहे. दरवर्षी श्री देव वेतोêबाची मूर्ती सुरंगीच्या वळेसारांनी सजवली जाते. शिरोêडा येथे होळीला सुरंगीचे वळेसार बांधण्याची प्रथा आहे. कितीही महाग असला तरी शिरोड्यातील ग्रामस्थ सुरंगीचा वळेसार खरेदी करुन होळीला बधंण्याची परंपरेचे आजही पालन करीत आहेत.

अणसूर, खानोली,दाभोली,आसोली भागातील महिला सायंकाळच्या वेळी सुरंग कळया काढून त्या दोऱ्यात गुंफून त्याचे वळेसार बनवितात. सध्या वेंगुर्ले,शिरोडा येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुरंगीचे वळेसार विक्रीसाठी येत आहेत.

वेंगुर्ले तालुक्यात दाभोली,खानोली,आरवली, टांक, अणसूर, आसोली, न्हैचीआड भागात सुरंगी कळीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरंगी कळयांना मागणी वाढत असल्याने चांगला दरही मिळत आहे.या वर्षी विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी खूष आहेत. मात्र कळी काढणीचे काम अत्यंत जोखमीचे असते.

पूर्वी मातीमोल दराने विक्री होणा-या या फुलांना आता चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या रानातील सुरंगीचे कळे फुल वाया जाऊ न देता कळया काढूüन विकण्यावर लक्ष देत आहेत. हे विशेष.

सुरंगीच्या झाडाखाली साड्या,चादरी,गोणपाट, सतरंजी वगैरेचे आच्छादन घालून झाडावर चढून कळया पाडण्यात येतात. नंतर या कळया एकत्र करुन वाळविल्या जातात व विक्रीसाठी पाठवल्या जातात. भारताप्रमाणे परदेशांतही सुरंगी कळीला मोठी मागणी आहे. सुवासिक तेल,साबण बनविण्यासाठी सुरंगी कळीचे तेल वापरले जाते.
या वर्षाच्या हंगामात सुरुंगीच्या कळीला चांगला दर मिळाला आहे. सध्या वेंगुर्ला तालुक्यात २६० रुपये किलो दराने सुरंगीची कळी खरेदी केली जाते. गेल्या काही वर्षात सुरंगीच्या कळीला मागणी वाढते आहे. आता सुरंगीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुरंगी लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल,असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. दोन वळेसार घेतले. अशा या वेडावून टाकणाऱ्या सुरंगीच्या गंधाने मन प्रसन्न झाले होते.गाडी वेंगुर्ल्याच्या दिशेने धावू लागली होती अन वाटले अरे ही तर चैत्रातल्या नव्या पर्वाची नांदीच असावी.


  • डॉ.ग.व.मुळे

  • तंटेखोर ते तंटामुक्त

    यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर स्टेशन अंतर्गतचे केवळ एक हजार २३२ लोकसंख्येचे पुरड (नेरड) हे गाव `तंटेखोर` म्हणून पोलीस दप्तरी नोंदलेले. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जाहीर केली, तेव्हाच पुरडवासियांनी निर्णय घेतला गाव तंटामुक्त करण्याचा. अखेर तीन वर्षाच्या परिश्रमानंतर ३३ जुने-नवे तंटे गावातच मिटवून गाव तंटामुक्त करण्याचा बहुमान पटकविला

    मिनी मंत्रालय होतेय हायटेक

    ग्रामीण भागाला न्याय देणारा पंचायत राजचा मुख्य घटक म्हणून जिल्हा परिषद काम पाहते. धुळे जिल्हा परिषद सद्य:स्थितीत हायटेक जिल्हा परिषद झाली आहे. ग्रामपंचायतींशी जिल्हा परिषदेचा कारभार ऑन लाईन सुरु झाला आहे. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि पारदर्शीपणा आणण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांनी जिल्हयाचाही चेहरामोहरा बदलत आहे..जिल्हा परिषद योजना थेट ग्रामीण पातळीपर्यंत पोहचल्या तरच विकासाचा परिघ पूर्ण होऊ शकतो. हायटेक जिल्हा परिषद केवळ नावाला असायला नको. म्हणून मिनी मंत्रालय थेट झोपडीपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेला मोठया प्रमाणात कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेने राबविलेल्या उपक्रमांबाबत थोडक्यात...

    शासनाने लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेस मिळावा म्हणून त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पनेचा अवलंब केला. १९६२ पासून त्रिस्तरीय पंचायतराज संस्था कार्यरत आहे. जिल्हा परिषद ही यामध्ये सर्वोच्च संस्था आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या वर्तमान व भविष्याचा आढावा घेताना आधुनिक तंत्रज्ञान व संगणकाच्या युगात वावरताना या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक उपयोग करणारी जिल्हा परिषद म्हणून धुळे जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.

    जिल्हा परिषद आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना प्रसन्न वातावरण, प्रशस्त व सुंदर विभाग जवळपास प्रत्येक कर्मचा-यांची संगणकीकृत स्वतंत्र बैठक व्यवस्था अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांच्या कामात सुधारणा दिसून येते. जिल्हा परिषदेमध्ये बायोमेट्रीक पध्दतीचा अवलंब करण्यात आला असून हीच पध्दती पंचायत समित्या, ग्रामीण पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी करणारी धुळे जिल्हा परिषद महाराष्ट्रात प्रथम व एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.

    कार्यालयीन बैठक व्यवस्थेत सुसूत्रता यावी यामागे क्युबिक पध्दत अवलंबण्यात आली. कर्मचा-यांना कामासाठी आवश्यक जागा, विद्युत जोडणी, संगणक जोडणी, पुरेशी हवा याबाबींचा विचार करुनच क्युबिकची रचना करण्यात आली आहे. जलद तक्रार निवारण कार्यप्रणाली अंमलात आल्यामुळे ग्रामीण जनतेच्या तक्रारी संदर्भात तात्काळ कार्यवाही होऊन पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनास सुरुवात झालेली आहे.

    धुळे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर ई तक्रार सुरु केल्याने कार्यालयीन काम सुलभ झाले आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभाग संगणक वाय-फाय या सुविधेने जोडणी सुरु झाली असून सर्व संगणकांवर इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्कायीपविझीट या कार्यप्रणालीव्दारे अधिकारी, कर्मचा-यांनी व अधिका-यांशी विनाखर्च एकाच वेळी जागेवरुन संपर्क करता येतो. जिल्हा परिषदेला कार्पोरेट लुक दिसून येत आहे. कार्यालयीन वातावरणात सुधारणा झालेल्या बदलामुळे मागील तीन वर्षापासून धुळे जिल्हा परिषद आय एस ओ गणुवत्ता टिकवून आहे.

    शिक्षणावर दृष्टीक्षेप :
    धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प (डी.पी.ई.पी.) योजनेत सन १९९७-९८ ते २००२-२००३ पर्यंत समाविष्ट होता. जागतिक बँकेच्या अर्थ्रसहाय्यातून महाराष्ट्रातील ९ जिल्हयांमध्ये या जिल्हयाचा महिला साक्षरतेचे प्रमाण (१९९१ च्या जनगणनेनुसार ) राष्ट्रीय साक्षरतेच्या प्रमाणाच्या तुलनेत ४० टक्के कमी असल्याने म्हणजेच ३८ टक्के असल्याने या जिल्हयाचा समावेश करण्यात आला होता. त्यात प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यांतर्गत नवीन शाळा उघडणे व भौतिक गरजा पूर्ण करण्यांवर तसेच दर्जेदार करण्यासाठी विविध उपक्रम राबविले गेले.

    परराज्यात व्यवसायानिमित्त ६ ते ७ महिन्याच्या कालावधीकरिता स्थलांतरण करणा-या पालकांच्या शालेय मुलांसाठी तालुका पातळीवर तात्पुरत्या स्वरुपाची हंगामी निवासी वसतीगृहे सुरु करुन मुलांचा शिक्षणातील अडसर दूर करुन गैरहजेरीचे प्रमाण कमी केले तसेच त्यांची शैक्षणिक पातळी उंचविण्याचे काम करण्यात आले आहे.

    राष्ट्रीय समविकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने ६३६ जिल्हा परिषद शाळांमध्ये ७५६ संगणक संच पुरविलेले आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १०० शाळांमध्ये संगणक लॅब सुरु केलेल्या असून उर्वरित सर्व शाळांमध्ये संगणक पुरविणे हा मानस डोळयासमोर ठेऊन संगणक प्रशिक्षण कार्यक्रमही हाती घेतलेला आहे.

    आतापर्यंत ७०० शिक्षकांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले असून भविष्यात उर्वरित सर्व शिक्षकांना संगणक प्रशिक्षण देणे, वर्गनिहाय संगणक शिक्षण पुस्तिका विकसीत करणे व भविष्यात सर्व शाळांमध्ये स्वतंत्र संगणक दालन निर्माण करुन इंटरनेट माध्यमातून सर्व शाळा तालुका व जिल्हा कार्यालयाशी जोडण्याचा मानस आहे.


  • जगन्नाथ पाटील

  • पाणी अडवा पाणी जिरवा

    नंदुरबार हा राज्यातील आदिवासी बहूल जिल्ह्यांपैकी एक. या जिल्ह्यामध्ये लोक प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात राहतात. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण मध्यम असून देखील येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी धडगाव तालुक्याच्या बोरवण गावातील बिजलाराणी बचत गटातील महिलांनी पाण्याचे नियोजन केले असून त्याद्वारे उदरनिर्वाहाचा नवा मार्ग शोधला आहे.

    पावसाळ्यात पडलेले बरेचसे पाणी वाहून जात असल्याने धडगाव तालुका परिसरात उन्हाळ्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यामुळे येथे प्रामुख्याने पावसाळ्यापुरतीच शेती केली जाते. इतर वेळी केवळ शेतीचाच नाही तर रोजगाराचाही प्रश्न लोकांसमोर उभा राहतो. पावसाळ्यातील पाणी वाहून गेल्याने ज्या ठिकाणी नदी नाले आहेत त्या ठिकाणी सुद्धा इतर दिवसात पाणी राहत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे. दिवसभर काबाडकष्ट करायचे, शेतीचेही काम करायचे आणि त्यानंतर दूरवरून पाणी आणायचे यामध्ये महिलांचे हाल होत असत.

    धडगाव परिसरातील या परिस्थितीतून गुरांचीही सुटका नव्हती. त्यांना प्यायला पाणी नसल्यामुळे बहुतेक लोक उन्हाळा आला की गुरे विकून टाकत असत. अशा परिस्थितीमुळे शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रासही सोसावा लागे. याचा परिणाम दैनंदिन आणि कौटुंबिक जीवनावरही होणे साहजिक होते. अशातच बोरवण गावात बचतगटांची स्थापना झाली आणि महिला एकत्र आल्याने सर्वांनी मिळून या समस्येवर मात करण्यासाठी विचार सुरू झाला.

    पाण्याचा प्रश्न हा इतर समस्यांच्या तुलनेत तसा महत्वाचाच. त्यामुळे त्यावर तातडीने उपाय शोधणे आवश्यक होते. हा सर्वांचाच प्रश्न असल्याने तो सोडविण्यासाठी एकमत व्हायला वेळ लागला नाही. बिजलाराणी बचत गटातील महिलांनी बँकेला पाणी व्यवस्थापन व रोजगाराचे महत्व पटवून देऊन बँकेकडून कर्ज मिळविले. त्या कर्जातून त्यांनी सर्वांना सोयीचे होईल अशा ठिकाणी बोअरवेल खोदला. तसेच बोअरवेल मधील पाणी एका ठिकाणी संकलित करुन शेतांमध्ये सोडले. बोअरवेल मुळे पिण्याच्या पाण्याचा आणि संकलित होत असलेल्या पाण्यामुळे शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. या पाण्यावर त्यांनी शेतात भाजीपाला लाऊन गावातच रोजगारही निर्माण केला आहे. या कामी गावकऱ्यांनी देखील त्यांना मोलाचे सहकार्य केले. पाण्याचा हा प्रश्न सोडविताना या महिलांनी पाण्याचे जतन किती महत्त्वाचे आहे, हेच जणू जगाला दाखवून दिले आहे.

    महिला बचतगटांची चळवळ राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात उभी राहिल्याने आणि त्या माध्यमातून महिला एकत्र आल्याने अनेक विधायक बाबी घडू लागल्या आहेत. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून बोरवणच्या गटाने सोडवलेल्या पाणी प्रश्नाकडे पाहता येईल. यातून त्यांनी पाण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेशही दिला आहे.


  • मेघ:श्याम महाले

  • नंदुरबार जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सौर उर्जेवर

    वाढते भार नियमन व विजेचे वाढते दर लक्षात घेता नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मधील विजेची उपकरणे सौर ऊर्जेवर चालविण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने सौर ऊर्जेची उपकरणे बसविण्यात आली आहेत. साधारणत: एक कोटी ८४ लाखांचा खर्च यासाठी येणार आहे. शासकीय कार्यालय सौर ऊर्जेवर चालविण्याचा जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग ठरणार आहे.

    वीजेची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम सर्व घटकांवर होत आहे. प्रशासकीय यंत्रणादेखील त्यातून सुटलेली नाही. जिल्हा प्रशासनाची मध्यवर्ती इमारत असलेल्या भागात देखील भारनियमनामुळे दिवसभरातून सात तास वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम होतो.

    प्रशासनाने उच्च क्षमतेच्या डिझेल जनरेटरची व्यवस्था केली असली तरी त्यालाही मर्यादा येतात. शिवाय डिझेलचा खर्चही वाढतोच. त्यामुळे पर्यावरणप्रेमी असलेले नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.ए.टी.कुंभार यांनी जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर सौर पॅनेल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करुन घेता येईल काय याची चाचपणी केली. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करुन अवघ्या दोन कोटी रूपयांच्या आत ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.

    वर्षभरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे वीज बील व जनरेटरसाठी लागणारे डिझेल याचा विचार करता ही रक्कम अल्प होती. त्यामुळे डॉ.कुंभार यांनी सौर पॅनल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा घेण्याचे ठरविले. जिल्हा नियोजन समितीत नाविन्यपूर्ण योजनेसाठीच्या खर्चातून एक कोटी ८३ लाख ७९ हजार रुपये मंजूर करुन घेण्यात आले. ही योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नुकतेच सौर पॅनेल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

    मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तळमजल्यासह दोन मजले आहेत. यात एकूण २३० खोल्या असून त्यात जवळपास ४० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. यातील २० पेक्षा अधिक महत्वाच्या कार्यालयांना सौर ऊर्जेवरील वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अर्थात या कार्यालयामध्ये दोन किंवा तीन ट्युब लाईटस्, तेवढेच पंखे व आवश्यक असलेले संगणक संच चालणार आहेत. सौर पॅनेलच्या माध्यमातून साठविलेली वीज ही दिवसभर वापरणे शक्य होणार आहे. पावसाळ्यात अर्थात ढगाळ वातावरणातदेखील ही यंत्रणा काम करणार आहे.

    सौर ऊर्जेचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. सहज मिळणारी ऊर्जा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात या ऊर्जेचा उपयोग करण्याकडे कल वाढत आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, एन.आय.सी.चे प्रमुख संजय कोतकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भिमराज दराडे, उपजिल्हाधिकारी पी.ए.गायकवाड, प्रकाश थवील, कर्डक, सुरेश चौधरी याकामी प्रयत्नशील आहेत.

    वीज समस्येवर प्रभावी उपाय म्हणूनही सौर ऊर्जेकडे पाहिले जात आहे. शासनातर्फे सौर ऊर्जेचा वापर करण्यासंबधी जनजागृती करण्यात येते. आता नंदुरबार जिल्हा प्रशासनाने स्वत:पासून सुरुवात केल्याने जनजागृतीत निश्चितच भर पडेल हे मात्र निश्चित.


  • मेघश्याम महाले

  • Friday, March 30, 2012

    मागोवा स्त्रीच्या जगण्याचा

    नुकत्याच झालेल्या आठ मार्चच्या निमित्ताने स्त्रीजीवनाला भिडणारं, तिच्या जगण्याचा वेध घेणारं लेखन मांडावं असं मनात आलं. स्त्रीजीवनाबद्दल, स्त्रीचळवळीबद्दल तशी बरीच पुस्तकं आजवर लिहिली गेलीत. बाईच्या जगण्याचे प्रश्न मांडणारं लेखन या पुस्तकांनी समोर आणलं आहे. पण थेट स्त्रीच्या आजवरच्या जगण्याशी संबंधित असलेलं एक पुस्तक म्हणजे ‘स्त्रीपर्व’. मंगला सामंत यांनी लिहिलेल हे पुस्तक प्रकाशित केलं आहे ते पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने. आदिम स्त्रीपासून ते थेट आजच्या सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या ग्लॅमरस स्त्रीपर्यंतचे स्त्रीच्या आयुष्यातले विविध पदर यात त्यांनी उलगडून दाखवले आहेत. स्त्रीचा, स्त्रीमुक्तीचा इतिहास शोधून काढण्याच्या प्रेरणेने त्यांनी केलेलं हे लेखन आहे.

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि विवेचक पद्धतीने केलेल्या या लिखाणात मानवी उत्क्रांतीतील मातृवंशीय व्यवस्थेपासून लेखिकेने सुरुवात केली आहे. त्यानंतर विवाहसंस्था, पुरुषप्रधानता, पुरुषवादी सुधारणा ते स्त्रीमुक्तीच्या वेगवेगळ्या चळवळी असा विस्तृत पट मनात धरून पुस्तकाची आखणी केली आहे. स्त्रीजीवनाच्या या वाटचालीत लेखिकेने एकूणच मनावी जीवनातले टप्पे व बदल टिपले आहेत.

    निसर्गाशी जवळकीच्या नात्याने जोडली गेलेली मानवी संस्कृती सुरुवातीला मातृवंशाच्या प्रभावाखाली होती. वंशाचा विस्तार करण्याचं काम हे तेव्हा सर्वस्वी स्त्रीच्या निर्णयावर अवलंबून होतं. तिच्या कर्तृत्वावरच मानवी जीवन फुलत होतं. स्त्रीप्रधानता ही त्यातली अपरिहार्य बाब होती. मुळात निसर्गामध्ये ‘पिता’ ही संकल्पना नाही. तिथे माता हीच आपल्या अपत्याच्या अस्तित्वाची खूण आहे. इतर सर्व प्राण्यांप्रमाणे मानवातही तेच तत्त्व स्वाभाविकपणे जोपासलं गेलं. पण पुढे नांगराचा शोध लागला, क्षेत्र-बीजाचं तत्त्व उघड झालं आणि पुरुषाच्या हातात नांगराच्या रूपाने सारी सत्ताच गेली. या सर्व वाटचालीचं चिकित्सक विवेचन लेखिकेने सुरुवातीच्या प्रकरणांमधून केलं आहे.

    स्त्रीजीवनाच्या वाटचालीतले अनेक टप्पे, वेगवेगळे स्तर तिने पुस्तकाच्या ओघात समोर आणले आहेत. विवाहसंस्थेमागील उद्देश आणि त्यामागची कारणं, जीवनाकडे बघण्याची स्त्री-पुरुषांची विभिन्न नजर याबरोबरच लेखिका साहित्यादि कलांमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या पुरुषकेंद्री दृष्टिकोनाबद्दलही मांडणी करताना दिसते. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे भोगवाद वाढला आणि लैंगिकतेपासून ते उत्पादनं व सांस्कृतिक बाबींपर्यंत भोगवादाची पाळंमुळं पसरलेली दिसतात ती याचमुळे. पंडिता रमाबाई, रखमाबाई, कर्वे, आगरकर अशांच्या स्त्रीमुक्तीला प्रेरक व पूरक कार्याचा यथोचित उल्लेखही या पुस्तकात आहे. कायदा, सामाजिक सुरक्षितता अशाही विषयांबद्दलचं विवेचन लेखिका करते. रूढ नैतिक चौकटींपलीकडची स्त्रीमुक्ती लेखिकेला अपेक्षित आहे. पण म्हणूनच यातली लेखिकेची मतं अनेकांना वादग्रस्त वाटू शकतील.

    स्त्रीच्या नजरेने स्त्रियांकडे पाहा आणि शेवटी मनातली माणूसपणाची नजर कधीही मिटून घेऊ नका, हाच या पुस्तकाचा गाभ्याचा संदेश आहे. स्त्री जीवनाचा शतकांचा प्रवास मांडणं हे एक आव्हानच होतं आणि ते पेलताना मंगला सामंत यांनी सतत निरोगी दृष्टी बाळगलेली दिसते. स्त्रीबद्दल, तिच्या धारणांबद्दल मनमोकळं विवेचन करणारं हे लेखन म्हणून तर महत्त्वाचं आहे. आजच्या स्त्रीसमोर धरलेला हा एक आरसाच आहे.

    नंदिनी आत्मसिध्द

    कैरीचं पन्हं

    निसर्गाने कात टाकायला सुरुवात केली की चैत्राची चाहूल लागते. शिशिर ऋतुतल्या पानगळीनं तर वसंतात निसर्ग पुन्हा रंग – गंधाची उधळण करायला लागतो. या रंग-गंधात आंब्याच्या हिरव्यागार पानांना लटकणाऱ्या हिरव्याकंच कैऱ्यांचा वाटाही मोठा असतो. कारण या कैऱ्यांचा आंबटपणा वासासहित वातावरणात मिसळलेला असतो. या आंबटपणाची चव घ्यायला प्रत्येकजण उत्सुक असतो. लहान मुलं तिखट-मीठाबरोबर कैरीचे तुकडे खावून या आंबटपणाची चव घेतात. तरी या कैरीचा गोडवा खऱ्या अर्थाने मुरलेला असतो, तो पन्ह्यातचं. कैरी आणि गुळाची आंबटगोड चव म्हणजे क्या बात है ! म्हणूनच चैत्र लागला आणि कैरीचं पन्ह केलं नाही, असं सहसा होत नाही. जणू चैत्रात एकीकडे उन्हाची तल्खली वाढत असताना दुसरीकडे शांततेचा-सावलीचा-गारव्याचा अनुभव पन्‍ह देतं.

    हे पन्ह करण्याची पध्दत एकदम सोपी आहे. हिरव्यागार कैऱ्या घ्यायच्या. त्या कुकरमधून वाफ वून किंवा पाण्यात शिजवून घ्यायच्या. शिजल्यावर सालं काढून त्याचा गर एका भांड्यात जमा करायचा. हा गर चांगला घोटून घ्यायचा, मिक्सरमध्ये बारीक करायचा किंवा गाळणीतून चांगला. गाळून घ्यायचा. नंतर जमलेल्या गराच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून हे मिश्रण पुन्हा चांगलं घोटायचं. घोटतानाच त्यात वेलचीपूड टाकायची. हे सर्व मस्त एकजीव झालं की चवीपुरतं मीठ टाकून, आवश्यक तेवढं पाणी टाकून ढवळायचं.

    असं थंडगार पन्हं प्यायल्यावर त्याची गुळमट चव जिभेवर रेंगाळली पाहिजे, तर ते खरं पन्हं.

    पूर्वी उन्हाळ्यात किंवा कैऱ्यांचा सिझन असेपर्यंत रोज घरोघरी पन्हं केलं जायचं. कारण ताज्या कैऱ्यांपासून केलेल्या ताज्या पन्ह्याची लज्जत न्यारीच असते. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत रोज पन्ह्याचा घाट घालणं शक्य नाही. तेव्हा एकदाच भरपूर कैऱ्या आणून त्या शिजवून त्यांचा गर काढून त्यात योग्य प्रमाणात गूळ किंवा साखर टाकून त्याचं मिश्रण गरम करुन बाटलीत भरुन ठेवायचं. नंतर जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा गर, पाणी आणि चवीला मीठ टाकून हवं तेव्हा पन्ह तयार करु शकतो.

    विशेष म्हणजे नुसती कैरी खाल्ली तर ती बाधू शकते. परंतु कैऱ्या उकडून केलेलं पन्हं बाधत नाही, उलट प्रकृतीसाठी हितकारक ठरतं.


  • मुकुंद कुळे

  • धानासोबतच उसाचा पेरा घेणारा गोंदिया जिल्हा

    ऊस पिकासाठी विदर्भ वगळता सामान्यत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, काही अंशी खानदेश भाग येतो हे माहीत आहे. पण अलिकडे पूर्व विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील कास्तकारांची मानसिकता देखील बदलत असून तेथेही ऊस पिकाचा पेरा घेण्याकडे कल दिसून येत आहे.

    पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे विशेषत: धानासाठी प्रसिद्ध आहेत. धानपिकाची खाचरे ह्या भागात आपल्याला विपुल प्रमाणात आढळतात. सिंचनाच्या मर्यादित सुविधेमुळे हिरव्यागार पिकाचे पट्टे कमी प्रमाणात पाहायला मिळायचे. पण धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या ह्या जिल्ह्यात धान पिकाला लागवड खर्च जास्त आणि तुलनेत उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या धान उत्पादक कास्तकारांनी पारंपरिक धान पिकाऐवजी ‘नगदी पिकाची लागवड करा’ या शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे सुरु केले आहे.

    या भागातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याला कारणही असे घडले की, भंडारा जिल्ह्यात लाखांदूर येथे नॅचरल ग्रोव्हर प्रायव्हेट लिमिटेड आणि भंडारा जिल्ह्यातच देव्हाडा येथे पूर्ती उद्योग समूहाचा वैनगंगा सहकारी साखर कारखाना सुरु झाला. धान उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादित केला तर या दोन्ही साखर कारखान्यांनी तो खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धान उत्पादक कास्तकारांनी आपल्या धान पेऱ्याच्या क्षेत्रात किंचित कपात करत ऊस उत्पादनासाठी उसाचे बेणे लावले. उसाचा पेरा केला आणि आजमितीस ७०० हेक्टर पेक्षा जास्त शेतजमिनीवर उसाची लागवड करण्यात आली आहे.

    अर्जुनी मोरगाव तालुक्यात ईटियाडोह धरणाच्या कालव्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत वैनगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव गटात ७५ हेक्टर क्षेत्रात, महागाव गटात १०२ हेक्टर, तर नवेगावबांध गटात १८८ हेक्टर अशी मिळून एकूण ३६५ हेक्टर शेतजमिनीत उसाचा पेरा घेतला आहे. याशिवाय नॅचरल ग्रोव्हर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव गटात ९६ हेक्टरवर, अर्जुनी मोरगाव गटात ९१ हेक्टरवर तर सडक अर्जुनी गटात ७५ हेक्टरवर असे मिळून एकूण २६२ हेक्टरमध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे.

    ऊस पिकाच्या पेऱ्यामुळे अर्जुनी मोरगाव भागातील धान उत्पादकांच्या हाती यावर्षी नगदी हाती पैसा येणार आहे. त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकू लागला आहे. या जिल्ह्यात पूर्वी तुरळक प्रमाणात उसाचा पेरा घेऊन, गुऱ्हाळ चालवून गुळ तयार करण्याची कुटीरोद्योगाची कामे चालू होतीच, पण साखर कारखान्यांना ऊस देऊन नगदी रक्कम हाती येण्याचा मणिकांचन योग आता ह्या भागातील धान उत्पादकांच्या हाती आला आहे. ही खरोखरच त्यांच्या आयुष्यात आनंदाची बाब बनून आली आहे.

    पारंपरिक पिकाला पर्याय काकडीचा

    जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश लाभते. त्यातही शेतक्षेत्रातील आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते. पारंपरिक आणि अति खर्चिक ऊस पिकाला फाटा देऊन नव-नवीन पिकांची लागवड केल्यावर देखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

    शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी आवड असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील मुकुंद साठे या प्रयोगशील शेतकऱ्याने ऊस पिकाला पर्याय म्हणून अवघ्या २५ गुंठ्यात काकडीचे अडीच लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या लाख मोलाच्या काकडीने त्यांना चक्क लखपती केले आहे.

    मुकुंद साठे हे विद्युत वितरण कंपनीत रोजंदारीत कामावर होते. मात्र शेतीची आवड असल्याने व शेती पाहण्यास दुसरे कुणी नसल्याने त्यांनी दोन वर्षांपूर्वी रोजंदारीचे काम सोडून शेती करण्यास सुरवात केली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना गेल्या वर्षी मल्चींग पेपरचा वापर करुन अर्धा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. त्यातून त्यांना एक लाख ८० हजाराचे उत्पन्न मिळाले.

    त्यानंतर त्यांनी आपल्या शेतामध्ये आणखी विविध प्रयोग करावयाचे ठरविले आणि ऑक्टोबरमध्ये काकडीची रोपे स्वत: तयार केली. १२ दिवसांनंतर नोव्हेंबरमध्ये २५ गुंठे क्षेत्रात मल्चींग पेपरचा वापर करुन काकडीची रोपे लावली. मल्चींगमुळे खुरपणीचा खर्च वाचला तसेच पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाल्याने पाण्याची बचत झाली. योग्य नियोजन केल्याने अवघ्या २५ गुंठ्यात २७ टन काकडीपासून सुमारे अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी तीन टन म्हणजे एकूण २५ गुंठ्यात ३० टन काकडी निघणे अपेक्षित असल्याचे साठे यांनी सांगितले.

    गेल्या वर्षी अर्धा एकर टोमॅटोतून १ लाख ८० हजार रुपये उत्पन्न निघाले म्हणजे उसापेक्षा इतर पिके जास्तीत जास्त फायद्याची ठरू शकतात, हे टोमॅटो प्रयोगातून पटल्यामुळेच त्यानंतर काकडीचा प्रयोग केला. काकडीचे उत्पन्न अडीच लाख रुपये निघाले. त्यासाठी खर्च ५० हजार रुपये झाला. खर्च वजा जाता काकडीतून २५ गुंठ्यात दोन लाखांचा निव्वळ नफा मिळाल्यानचेही त्यांनी सांगितले. साठे यांची काकडी पुणे येथे मार्केटला पाठवली जात असून त्याला चांगला भावही मिळाला आहे.

    साठे यांनी या प्रयोगाबाबत सांगितले की, शेतकऱ्याने पारंपरिक पिकांपेक्षा शेतात कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग केल्यास निश्चितच फायदा होतो. त्यांचा काकडीचा प्लॉट पाहण्यासाठी बार्शी, मोहोळ, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली असून त्यांच्या प्रयोगशीलतेचे अनेकांनी कौतुक केले आहे. तसेच पुणे येथील एका अग्रोटेक कंपनीने त्यांच्या शेतावर शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना साठे यांचा काकडी लागवडीचा यशस्वी प्रयोग दाखविला आहे.


  • रुपाली गोरे

  • Thursday, March 29, 2012

    अकरावी विज्ञान शाखा सामायिक प्रवेश पूर्वतयारी

    मार्च २०१२ मध्ये इ. १० ची परीक्षा दिलेल्या व इ.११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या / घेतलेल्या अनुसूचित जाती/नवबौध्द विद्यार्थ्यांना IIT,JEE,AIEEE व तत्सम अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुवर्ण संधी असून IIT-ian's PACE या संस्थेमार्फत IIT,JEE,AIEEE व तत्सम अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी करुन घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

    अर्जामध्ये खालील बाबींचा समावेश करावा.

    १अर्जदाराचे नाव व पत्ता २ अर्जदाराची जन्मतारीख व वय, ३) दहावीची परीक्षा कोणत्या शाळेतून दिली त्या शाळेचे नाव ४) जात/पोटजात (सक्षम अधिकारी यांचा जातीचा दाखला जोडावा) ५) कुटुंबाचे सर्वमार्गांनी मिळणारे सन २०१०-११ चे वार्षिक उत्पन्न (सक्षम अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा) ६) इयत्ता ८ वी मध्ये विषयवार मिळालेले गुण व टक्केवारी (गुणपत्रिका जोडावी) ७) इयत्ता ९ वी मध्ये मिळालेले विषयवार गुण व टक्केवारी (गुणपत्रिका जोडावी) ८) दुरध्वनी क्रमांक/मोबाईल क्रमांक, ई-मेल आय.डी.

    विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमार्फत करण्यात येणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुंबई येथे निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य पुरविण्याची व्यवस्था सामाजिक न्याय विभागामार्फत विनामुल्य करण्यात येईल. तसेच इयत्ता ११ वी मध्ये मुंबई येथील महाविद्यालयात प्रवेश देण्याची व प्रशिाक्षणाची व्यवस्था IIT-ian's PACE या संस्थेमार्फत करण्यात येईल.

    पात्रतेचे निकष :

    • मार्च २०१२ मध्ये इ.१० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले व इ.८वी ९ वी मध्ये गणित व विज्ञान या विषयांमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेकरीता अर्ज करु शकतील.

    • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

    • विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द असावा.

    • एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये सर्वसाधारणपणे ३० मुले आणि २० मुलींचा समावेश असेल. या संख्येमध्ये निवड चाचणी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणानुसार बदलही होऊ शकतो.

    निवड प्रक्रिया :

    संपूर्ण महाराष्ट्रात रविवार दिनांक ८ एप्रील २०१२ रोजी IIT-ian's PACE संस्थेमार्फत प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येईल.

    • सदर परीक्षेस कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन शुल्क घेण्यात येणार नाही.

    • परीक्षेचे केंद्र/ठिकाण खालीलप्रमाणे आहे. प्रवेश परीक्षा इ.१० वी च्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.

    • प्रवेश परीक्षेतील निकालास ५० टक्के व ८ वी व ९ वीच्या टक्केवारीस प्रत्येकी २५ टक्के (वेटेज)गुण देऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

    परीक्षेचे केंद्र /ठिकाण :
    • ४०१, ४था माळा, शॉपर्स पॉईंट, एस.व्ही.रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८ संपर्क : २६२४५२२३/०९/३५७/६५७
    • ६०१, ६ वा माळा, अगोरा बिझनेस प्लाझा, मॅकडोनाल्डसच्या वर, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०००९२
    • ३ रा माळा, राधाकृष्ण अपार्टमेंट, वाचनालय मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ संपर्क : २४३६३७१३/९२२३९०१५८३
    • पहिला माळा, अमृता सदन, सेक्टर-२२, नेरुळ (पश्चिम), मुंबई ४००७०६ संपर्क : २७७२०१५२/९००४३१२५५७
    • ३ रा माळा, कच्छीभवन, जैन मंदिराजवळ, आय.आय.टी.समोर, पवई, मुंबई-४०००७६ संपर्क : २५७९८४७१
    • दत्तात्रय टॉवर, मॅकडोनॉल्डसच्या बाजुला, नाईकवाडीसमोर, गोखलेरोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२ संपर्क : ६७९५५५६२/९८१९७९४७२८

    विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या दाखल्यांच्या साक्षांकित प्रतीसह खालील पत्त्यावर दिनांक ७ एप्रिल २०१२ पूर्वी पाठवावेत.

    अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    श्री.प्रवीण त्यागी, व्यवस्थापकीय संचालक, IIT-ian's PACE EDUCATION PVT LTD ४०१,४ था माळा, शॉपर्स पॉईंट, एस.व्ही.रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८

    अधिक माहिती करीता ०२२-६१७७९७७७ वर फोन करावा किंवा info@iitanspace.com येथे ई-मेल करा किंवा www.iitanspace.com या वेबसाईटला भेट द्या.

    बचतगटातील महिलांनी केली पाणीपट्टी वसुली

    परभणी जिल्‍ह्यातील खांबेगावच्‍या महिला बचतगटानं पाणीपट्टी वसुलीचा उपक्रम यशस्‍वीपणे राबवला. या उपक्रमाचं राज्‍यस्‍तरावर कौतुक झालं. महाराष्‍ट्र शासनानं पाणीपट्टी वसुली महिला बचतगटाकडं देण्‍याचा निर्णय घेऊन त्‍यावर शिक्‍कामोर्तब केलं. त्‍यानुसार परभणी जिल्‍ह्यातील मुळी या गावातील महिला बचतगटानं पाणीपट्टी वसुलीचा आदर्श निर्माण केलाय.

    मुळी हे गाव गंगाखेडपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या बचतगट चळवळीमुळं या गावात परिवर्तनाचं वारं वाहत आहे. या विषयी परिवर्तन गाव समितीच्‍या अध्‍यक्षा वंदना भोसले यांनी माहिती दिली. त्‍या म्‍हणाल्‍या, साधारण २००५-२००६ ची गोष्‍ट. आमच्‍या गावात माविमंच्‍या सहयोगीनी आल्‍या. त्‍यांनी बचतगटाविषयी माहिती दिली. महिलांनी एकत्र यायचं, दरमहा पैसे गोळा करायचे, एकमेकींना कर्ज म्‍हणून द्यायचे. असं बरंच काही सांगितलं. आम्‍हाला बचतगटाविषयी काही रस वाटत नव्‍हता. पण नियमित एकत्र येण्‍यामुळं, चर्चेमुळं बचतगटाच्‍या चळवळीविषयी आपुलकी निर्माण होत गेली. आम्‍ही २७ जानेवारी २००६ ला सरस्‍वती महिला बचतगट स्‍थापन केला. १२ जणी सभासद होत्‍या. नियमित बचत करु लागलो. तशी मला नेतृत्‍व करण्‍याची आवड होतीच. बचतगटाच्‍या रुपानं मला ती संधी मिळाली.

    एकमेकींच्‍या सहकार्यानं गावात १८ गट तयार केले. महिलांनी परिवर्तन गावस्‍तरीय समितीची अध्‍यक्षा म्‍हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. या समितीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान राबविलं. समितीतील सदस्‍य व इतर अनुभवी महिलांच्‍या सहकार्यानं हे अभियान यशस्‍वी झालं. गावाला आमच्‍या कामाची ओळख झाली.

    सन २००८ च्‍या दरम्‍यान जलस्‍वराज्‍य प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याची देखभाल चांगली होण्‍याच्‍या दृष्‍टीनं जबाबदारी कुणाला द्यायची याविषयी सरपंचांनी गटातील महिलांसोबत चर्चा केली. खांबेगाव पॅटर्ननुसार महाराष्‍ट्र शासनानं पाणीपट्टी वसुली महिला बचतगटाकडं देण्‍याचा निर्णय घेतला होताच. त्‍यानुसार पाणी पुरवठा व प्रकल्‍प देखभाल दुरुस्‍तीचं काम आमच्‍या परिवर्तन गाव समितीनं स्‍वीकारावं, असा निर्णय सर्व महिलांच्‍या साक्षीनं झाला.

    मे २००८ मध्‍ये प्रकल्‍पाच्‍या देखभाल दुरुस्‍तीचं काम तर मिळालं. पण अनेक अडचणी उभ्‍या राहिल्‍या. गावकरी नळपट्टी भरत नव्‍हते, परंतु नळाला पाणी आलं नाही तर भांडायला यायचे. अशा भांडणांमुळं जीव वैतागून जायचा. कुठून हे काम स्‍वीकारलं, असं वाटायचं. पण आम्‍ही धीर सोडला नाही. बचतगटामुळे परिस्‍थितीवर मात करायचा आत्‍मविश्‍वास निर्माण झाला होता. गावातील ३ वॉर्डांमध्‍ये ३ गावसमिती सदस्‍यांवर पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी पार पाडतानाच पाणी पुरवठा करताना येणाऱ्या अडचणी जाणून त्‍या दूर करण्‍यास सांगितल्या. एक नंबर वॉर्डात मी, दोन नंबर वॉर्डात मैदाबी सय्यद अन् तीन नंबर वॉर्डात गोदावरी हनवते अशा आम्‍ही तिघींनी कामास प्रारंभ केला. नळावर महिला पाणी भरतात, परंतु पाणीपट्टी पुरुषांकडं मागावी लागते, हा विरोधाभास लक्षात आला. यावर उपाय म्‍हणून नळ कनेक्‍शन महिलांच्‍या नावावर करण्‍याचा धोरणात्‍मक निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने सहकार्य केले. महिलांच्‍या नावावर नळ असल्‍याने नळपट्टी महिलांकडेच मागण्‍यात येऊ लागली. आपण घरासाठीच पाणी भरतो, मग दर दिवसाला दीड रुपयाप्रमाणे महिन्‍याला ४५ रुपये देणे अवघड नाही, अशा शब्‍दात त्‍यांना साद घातली. घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुलीचे महत्व पटवून देण्‍यात आले. पैसे देणाऱ्या महिलेला लगेच पावती दिली जायची. पैसे नसतील तर पुढच्‍या महिन्‍यात भरण्‍याची सवलत दिली जायची. महिलांची मानसिकता बदलवण्‍याच्‍या कामात पद्मिनीबाई भोसले यांचीही खूप मदत झाली.

    आमच्‍या समितीमार्फत गावात नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. सर्व वॉर्डात एकाच वेळी पाणी सोडणं शक्‍य नसल्‍यानं एका वॉर्डात सायंकाळी पाणी सोडलं जातं. महिला नळपट्टी नियमित भरत असून १ लक्ष ६१ हजार ९१० रुपये वसुली झालेली आहे. आज गावात ३७५ नळ कनेक्‍शन्स आहेत. या कामातून पाणी पुरवठा करणारी व्‍यक्‍ती तसंच विद्युत पंपाचं वीज बील व दुरुस्‍ती यासाठी मिळकतीचा ८० टक्के भाग गावसमितीकडं वेगळा ठेवलेला आहे. पाणीपट्टी वसुलीच्‍या २ टक्‍के रक्‍कम आम्‍हा तिघींना मिळत आहे. त्‍याचबरोबर गावसमितीस व ग्रामपंचायतीस प्रत्‍येकी १० टक्‍के रक्‍कम देण्‍याचे ठरवलं आहे. पाण्‍यासाठी महिलेलाच कष्‍ट करावे लागतात. आज आम्‍ही प्रत्‍येक घरात सुरळीत पाणीपुरवठा सुरु करुन आमच्‍या बहिणींचे कष्‍ट कमी करण्‍याचा प्रयत्‍न केलाय, याचा आम्‍हाला सार्थ अभिमान आहे.


  • राजेंद्र सरग

  • घर तेथे झाड

    कुठल्याही योजनेचे, उपक्रमाचे यश जनजागृतीवर अवलंबुन असते. असाच एक उपक्रम यशस्वी करण्याची संकल्पना दारव्हा येथील गटशिक्षणाधिकारी सलीम शेख यांना सुचली अन् ती त्यानी पूर्णत्वासही नेली. आज बिजोरी पोडावर घर तेथे झाड ही संकल्पना रुजली आहे. लोकांनाही पर्यावरणाविषयीची आवड निर्माण झाली आहे. तसेच स्वच्छतेवरही भर कसा द्यायचा, याची सवय सर्वांनी लावून घेतली आहे.

    यवतमाळ मधील दारव्हा तालुक्यातील दहा किलोमिटर अंतरावर बिजोरा पोड आहे. गावात ३० घरे असून २८० इतकी लोकसंख्या आहे. पूर्णत: पारधी समाज असलेल्या या पोडावर फारसा विकास झालेला नाही. मात्र गावातील नागरिकांमध्ये प्रचंड जागरुकता आहे. हातावर पोट असणाऱ्या येथील गावकऱ्यांना मात्र दारव्हा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अभिनव उपक्रमाने ऊर्जा मिळाली आहे.

    श्री. शेख यांनी शाळांच्या भेटीदरम्यान या पोडावर भेट दिली. त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे गावकरी चांगलेच हुरळून गेले. अनेक गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. हाच उत्साह व्दिगुणित करण्यासाठी येथे घर तेथे झाड ही अभिनव संकल्पना यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटनही पार पडले. पाहता-पाहता ग्रामस्थांसह मुला-मुलींचे व परिसरातील शाळा व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य लाभले.

    डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात नव्यानेच वस्तीशाळेचे रूपांतर नवीन शाळेत झाले आहे. नवीन इमारत तयार झाल्‍याने विद्यार्थीही शाळेत येऊ लागले आहेत. शाळेचे मुख्‍याध्‍यापक नरेंद्र वनवे, निमशिक्षक यू. डब्‍ल्‍यू. राठोड या शिक्षक मुलांना पहिली ते चौथीपर्यंत शिकवतात. शाळेची झालेली नवीन इमारत, सोबतच सर्वशिक्षा अभियानातून शाळेत निर्माण झालेले शैक्षणिक वातावरण, या जोडीला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्‍या भेटीमुळे गुणवत्‍तेचा दर्जाही सुधारला आहे.

    गटशिक्षणाधिकाऱ्यांनी येथे भेटीदरम्यान शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रबोधन केले. शाळेसह गावात स्वच्छता उपक्रम राबविणे, घर तेथे झाड ही संकल्पना यशस्वी करणे, यावर भर दिला. आज अनेक घरांसमोर झाडे लावण्याचा उपक्रम सुरु झाला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी अतिकुर रहेमान, ग्रामपंचायत सदस्य शांताबाई पवार, मुख्याध्यापक नरेंद्र वनवे, यू.के.राठोड यांच्यासह गावातील विलास राठोड, विलायती चव्हाण, उमेश चव्हाण, केंद्रप्रमुख पुष्पा भगत, प्रभु चव्हाण, नरेंद्र चव्हाण, चंद्रशेखर पवार, रामभाऊ सोळंके, कान्हु पवार, मांडवाबाई पवार, कविता पवार आदींची या उपक्रमासाठी महत्वाचे योगदान लाभत आहे.

    उपक्रमानिमित्त गटशिक्षणाधिकारी शेख म्हणाले, गावात संपूर्ण अनुसूचित जमातीचे लोक आहेत. शिक्षणाप्रती त्यांचा उत्साह पाहता मी या गावासाठी निवासी शाळेचा प्रस्ताव सरकारकडे पाठविणार आहे. याच सोबत शासनाच्या प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या काही योजना असतील तर त्याची पूर्णपणे या गावात अंमलबजावणी अपेक्षित आहे

    अनिल आलुरकर

    अविस्मरणीय ठरला मा.राष्ट्रपतींचा पदवी प्रदान सोहळा

    महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तीन दिवसीय जळगाव दौरा कार्यक्रमासाठी नाशिक येथून वृत्तसंकलनासाठी मी जळगाव येथे गेलो आणि एक महत्वपूर्ण दौरा करण्याची संधी आयुष्यात मला या निमित्ताने अनुभवास मिळाली . निमित्त होतं जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने आयोजित केलेल्या विशेष पदवी प्रदान समारंभाचं .....

    उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहासातील हा एक सोनेरी क्षण .भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना विद्यापीठातर्फे सर्वोच्च अशा डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. खानदेश हे प्रतिभाताईंचे माहेर त्यामुळे माहेरच्या मंडळीनी आयोजित केलेला आपल्या कर्तुत्ववान लेकीचा हा गौरव सोहळा होता. याच मातीत ताईचा जन्म झाला व गगनाला गवसणी देणार बळ त्यांना हयाच मातीतून मिळालं आमदार, मंत्री , खासदार, राज्यसभेच्या उपसभापती, राज्यपाल व पुढे राष्ट्रपती असा दैदिप्यमान जीवन प्रवास विशेषत: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान प्रतिभाताईच्या रुपाने खानदेशाला मिळाला तो दिवस खानदेशवासीयांसाठी अविस्मरणीय व परमोच्च आनंदाचा क्षण ठरला.

    शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या हिरवळीवर असलेल्या या विद्यापीठात प्रशस्त भव्य अशा असंख्य इमारती आहेत. सर्व शाखांच्या अभ्यासक्रमाची सोय असणारे आय एस ओ ९००१-२००८ हे मानांकन प्राप्त झालेल्या विद्यापीठात ५१ मीटर X ४३.८० मीटर एवढया आकाराचे ३ कोटी रु. खर्च करुन नवीन दीक्षांत सभागृह तयार केले आहे. नवा शालू परिधान करुन जशी नववधू सजते त्याप्रमाणे हे दीक्षांत सभागृह सजले होते.

    सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त जागोजागी महाराष्ट्र पोलीस उभे होते रणरणत्या उन्हात व उकाडयात असंख्य जळगावकर राष्ट्रपतींची आतुरतेने वाट पाहत होते. काही सभामंडपात बसले होते. काही बाहेर राष्ट्रपती महोदयांचा वाहनाचा ताफा पाहण्यासाठी उत्सुक होते. परंतु थोडयाच वेळात राष्ट्रपती महोदयाचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले व सर्व परिसर उल्हसित झाला मा. राष्ट्रपतीं महोदयांचे आनंदाने सर्वांनी उभे राहून टाळयांच्या गजरात स्वागत केले.

    दीक्षांत मिरवणुक

    राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे दीक्षांत मिरवणुकीव्दारे प्रथम दीक्षांत सभागृहात आगमन झाले या मिरवणुकीत विद्यापीठाचे अधिष्ठता, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य सहभागी झाले होते. राष्ट्रपती महोदय व्यासपीठावर आल्यानंतर आकर्षक गणवेशातील पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले . विद्यापीठाच्या गायकवृंदाने विद्यापीठ गीत सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन् व उ म वि चे कुलगुरु प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना डी.लिट या सर्वोच्च पदवी ने सन्मानित करण्यात आले

    .उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट या पदवीने सन्मानीत केल्याबद्दल मा. राष्ट्रपती आपल्या मनोगत म्हणाल्या की, या सन्मानाचे मला अधिक महत्व आहे. कारण माझा जन्म, शिक्षण आणि आयुष्याची सूरुवात खानदेशातूनच झाली आहे. माझे शिक्षण हीच माझ्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासात शिक्षकांचे महत्व अधिक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानोपासक होण्यासोबतच देशाच्या प्रती आपली जबाबदारी ओळखून समाजाच्या कल्याणासाठी झटावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.

    अत्यंत मनमोहक व शिस्तबध्द अशा वातावरणात हा समारंभ सुरु असतांना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन या सोहळयाची शोभा वाढविली

    प्रारंभी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यापीठाच्या नूतन दीक्षांत सभागृहाचे उदघाटन तसेच आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह आणि बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलींचे वसतीगृहाच्या कोनाशिलेचे अनावरण रिमोट व्दारे केले. यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल के शंकरनारायण उच्चव तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री नितिन राहुत पालकमंत्री तथा कृर्षी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आदि मान्यवर उपस्थित होते. हा रंगारंग सोहळा तमाम मान्यवर व जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरला.


  • रविंद्र ठाकूर

  • बचपन हर गम से बेगाना होता है ।


    गीत गाता चल या चित्रपटातील उपरोक्त गीताचा प्रयत्य आज विधानभवनात आला.
    प्रसंग होता विधान भवन परिसरातील…

    राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अत्यंत प्रसन्न मूड मध्ये विधानभवन प्रांगणात उपस्थित होते. शालेय गणवेशातील ८ वी , ९ वी ची मुले, मुली आपल्या राज्याच्या सर्वोच्च कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी विधान सभेच्या गॅलरीत उपस्थित होती. गॅलरीत बसून खाली सभेचे कामकाज पाहत असताना त्यांच्या नजरा मा. अध्यक्ष , मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री तसेच आपल्या भागातील लाडके आमदार विधानसभेत कोठे बसले आहेत ते शोधत होते. चाललेले कामकाज, प्रश्नोत्तरे आणि मा. अध्यक्षांची हेडमास्तरसारखी शिस्त या सगळया बाबी गंभीर चेहऱ्यांनी ही शाळकरी मुले पाहत होती. वर्गात अगदी परिक्षेच्या दालनात देखील शांत न बसणारी ही मुले अत्यंत शांततेने एकदम चिडीचूप होऊन विधानसभेचे कामकाज मोठया उत्सुकतेने पाहून त्याचे आकलन करत होते.

    मात्र खरी मजा आणि गंमत त्यानंतर आली आणि पाहता पाहता या विद्यार्थ्यांच्या गंभीर चेहऱ्याचे रुपांतर त्याच्या स्थायी स्वभावानुसार हसऱ्या चेहऱ्यात झाले. विक्रोळीच्या संदेश विद्यालयाची ही मुले विधानसभेच्या विद्यार्थी गॅलरीतून बाहेर पडून शिस्तीत म्हणजे रांगेत विधानभवनाच्या प्रांगणात आली. विधानसभेच्या गंभीर वातावरणातून एकदम मोकळया मैदानात आल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. या विधानसभा भेटीची उत्सुकता तर संपली होती मात्र या भेटीच्या स्मृती कायम जपण्यासाठी या परिसरात सामूहिक फोटो काढणे बाकी होते. आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या आमदारांनी गोड भेट देतो असे सांगितले होते. त्या भेटीची उत्सुकतादेखील बाकी होती. फोटो सेशनसाठी सर्व मुले, मुली ग्रुप- ग्रुपने जमून फोटो काढू लागली. तोच त्यांचे आमदार राम कदम नामदार छगन भुजबळांना सोबत घेऊन आले. चेक्सचे ब्लेझर आणि त्यावर गळयाभोवती गुंडाळलेली मफलर अशा स्मार्ट वेशभूषेतील भुजबळांना पाहून मुलांना प्रचंड आनंद झाला. एरव्ही एखाद्या कार्यक्रमात वा समारंभात कमीत कमी १०० फूटांपेक्षाही लांब असलेले आपले आवडते नेते प्रत्यक्ष एका बोटाच्या अंतरावर पाहून त्या मुलांना आपला आनंद कसा व्यक्त करावा हे समजेनासे झाले.

    एखाद्या आवडत्या व्यक्तीला पाहून आपणांस जो आनंद होतो तसा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोणी विद्यार्थी ऑटोग्राफसाठी तर कोणी सोबत फोटो काढण्यासाठी तर कोणी शेकहॅण्ड करण्यासाठी तर कोणी केवळ स्पर्श करण्यासाठी धडपडत होता. मुख्य म्हणजे मुलांची ही धडपड नामदार छगन भुजबळ साहेब अत्यंत कौतुकाने पाहत होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद जसजसा ओसंडून वाहत होता तसा भुजबळांचा आनंदही वाढत होता. कौतुकाचे भाव द्विगुणीत होत होते. मुलांसोबत रमलेल्या मंत्री महोदयांस पाहून त्यांचा स्टाफ व अंगरक्षक हतबल होऊन थोडेसे बाजूला झाले.

    मुलांनी मनसोक्तपणे आपल्या आवडत्या नेत्यासोबत व लाडक्या आमदारासोबत फोटो सेशन केले. मंत्री महोदयांनी देखील मुलांना परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या मुलांमध्ये मंत्री महोदयांना उदयाचे भावी जबाबदार नागरिक निश्चितच दिसले असतील. पण त्याही पेक्षा त्यांची मुलं, पुतण्या पंकज,समीर वा नातवंड दिसली असतील. म्हणूनच कडक शिस्तीचे, धडाडी, धाडसी असे भुजबळ साहेब या मुलांसोबत एका पित्याच्या व पालकाच्या भूमिकेत विधानभवनाच्या प्रांगणात रमले होते.

    राजू पाटोदकर

    विकासाचे गाव पिंपळखुटा

    नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा तालुका तसा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील मोलगीपासून २१ कि.मी. अंतरावरील पिंपळखुटा गावाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाचा कायापालट घडवून आणला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या गावात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. ग्रामपंचायतअंतर्गत एक कोटी ३ लाख रुपयांची कामे सेल्फवर घेण्यात आली आहेत. या गावात होत असलेली विकासकामे पाहून जिल्हाधिकारी डॉ.ए.टी.कुंभार यांनी देखील या गावास भेट देऊन कौतुक केले आहे.

    पिंपळखुटाची लोकसंख्या ७ हजार १४० आहे. पिंपळखुटा, बर्डी, वेहगी, जुगलखेत, खुडसबार, सुरगस, बरी सुरगस या पाड्यांचा यामध्ये समावेश आहे. पिंपळखुटा गावच्या सरपंच निर्मलाताई सितारात राऊत सुशिक्षित महिला असून उपसरपंच दिलवर पाडवी तर ग्रामसेवक म्हणून रोहिदास दगा पवार कार्यरत आहेत. दुर्गम भागातील गावामध्ये काम करण्यास कर्मचारी सहसा तयार होत नसतात परंतु पवार मात्र दुर्गम भागात आदिवासी भाषेत शासनाच्या विविध योजना आदिवासी बांधवाना समजावून देत आहेत.

    या परिसरात वृक्ष लागवड व्हावी म्हणून दोन रोपवाटिका तयार करुन त्यात दीड लाख वृक्ष लागवड केली आहे. दोन गाव तलाव बांधले असून याद्वारे या परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने बागायती शेती निर्माण झाली आहे. दहा वैयक्तिक विहिरी या परिसरात खोदण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये यशस्वीरित्या कामे पूर्ण झाली आहेत. गावात सतत आनंदी व सलोख्याचे वातावरण असल्याने गाव तंटामुक्तही झाले आहे.

    गावाच्या विकासासाठी व गावातील लोकांना सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव वळवी विशेष लक्ष देतात. पिंपळखुटा हे सातपुड्यातील शेवटच्या टप्यातील गाव असून काही अंतरावर नदी वाहते. गावाच्या आजुबाजूला डोंगर तसेच सर्वत्र हिरवेगार जंगल आहे. या जंगलामध्ये राष्ट्रीय पक्षी मोराचेही वास्तव्य आहे. त्यांना कुणीही त्रास देत नाही हे ही विशेष. शहरी भागातील नागरिक या भागात आल्यास निसर्गरम्य चित्र पाहून भारावून जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला थेट मुक्कामीच भेट दिली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ.कुंभार यांनीही आदिवासी वाद्याच्या तालावर ताल धरला होता. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन जेवढा आनंद मला मिळाला तेव्हढा आनंद या भागात भेट दिल्यानंतर मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून येथील विकासामध्ये हातभार लावणाऱ्या सर्वांचे त्यांनी कौतुक केले.


  • मेघश्याम महाले

  • महिलांच्या पुढाकारानं सुटला पाण्याचा प्रश्न

    परभणी-गंगाखेड मार्गावर असलेलं सायाळा हे छोटंसं गांव. गावची लोकसंख्‍या सुमारे १५००. महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍यावतीनं (माविम) गावात बचतगटाची चळवळ सुरु करण्‍यात आली, ते वर्ष होतं २००४. ग्रामीण भाग असल्‍यानं मूलभूत सुविधांची स्‍थिती यथातथाच होती. महिलांमध्‍येही आपल्‍या हक्‍कांची जागृती नव्‍हती. बचतगट स्‍थापन करण्‍यास कोणीही महिला उत्‍सुक नव्‍हत्‍या, असं सायाळा मधील महिलांच्‍या बचतगट चळवळीविषयी बोलताना वंदना परतवाघ यांनी सांगितलं. त्‍या परिस्थितीत मोठ्या प्रयासानंतर जुलै २००४ मध्‍ये गौतमी महिला स्‍वयंसहायता बचतगटाची स्‍थापना झाली आणि त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर हळूहळू नवनवीन महिला बचतगट स्‍थापन करण्‍यास पुढं येऊ लागल्या.

    बचतगटाच्‍या माध्‍यमातून महिला एकत्र आल्‍या. दरमहा केलेल्‍या बचतीतून एकमेकींची आर्थिक गरज भागवू लागल्‍या. हे पाहून इतर महिलांनांही प्रेरणा मिळाली. याविषयी बोलताना माविमचे जिल्‍हा समन्‍वय अधिकारी संजय गायकवाड म्‍हणाले, एके काळी महिला मंदिरासमोरुन जायला घाबरत. पण आज त्‍याच महिला सामाजिक उपक्रमात उत्‍साहानं सहभागी होत आहेत. प्रजासत्‍ताक दिन, स्‍वातंत्र्यदिन, ग्रामसभेस उपस्‍थित राहून गावाच्‍या विकासात योगदान देत आहेत.

    माविमच्‍या वतीनं एकूण ७ बचतगट स्‍थापन झाले. ७ सप्‍टेंबर, २००७ ला रमाई गाव विकास समितीची स्‍थापना झाली. गावात महिलांचं अस्‍तित्‍व दाखविण्यासाठी सर्वप्रथम गाव समितीच्‍या फलकाचं अनावरण करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. याच कार्यक्रमात अमोल भास्‍कर पंडित या अनाथ विद्यार्थ्‍याच्‍या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी महिलांनी स्‍वीकारली. त्‍याला शैक्षणिक साहित्‍य, वही, पेन व पुस्‍तकं देण्‍यात आली. 'गावसमितीच्‍या रुपानं मला आई मिळाली', या शब्दांत त्‍यानं व्‍यक्‍त केलेली भावना अनेकांचे डोळे पाणावून गेली.

    याच गावातील यमुनाबाई सूर्यवंशी या महिलेनं आपल्‍या पतीच्‍या उपचारांसाठी राहतं घर गहाण टाकलं होतं. पतीच्‍या निधनानंतर तिनं हिवाळा व उन्‍हाळा दुसऱ्यांच्‍या अंगणात काढला. परंतु पावसाळ्यात राहण्‍याचा प्रश्‍न उद्भवला. तिनं आपली व्‍यथा गाव समितीसमोर मांडली. वेळ आणि अडचण लक्षात घेऊन महिलांनी ४० हजार रुपयांची मदत करुन तिची निवाऱ्याची समस्‍या सोडवली. गावातील महिलांच्‍या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविण्‍यासाठी बचतगटाची चळवळ साह्यभूत ठरु लागली.

    महिला असल्‍या तरी त्‍यांची कौटुंबिक जबाबदारीतून सुटका नव्‍हती. घरचं सांभाळून त्‍या गावाच्‍या विकासात योगदान देत होत्‍या. या महिलांना पाणी आणण्‍यासाठी दररोज अर्धा किलोमीटर जा-ये करावी लागायची. डोक्‍यावर पाण्‍याचे हंडे वाहून आणण्‍यात शारीरिक कष्‍ट तर होत होतेच पण मान आणि पाठदुखीमुळंही महिला हैराण होत. दूरवरुन पाणी आणण्‍यासाठी वेळही वाया जायचा. पाण्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍याचा निर्धार महिलांनी केला पण मार्ग सापडत नव्‍हता. त्‍याच वेळी माविमकडून महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी गरजू व समस्‍या असलेल्‍या गावातील गाव समितीद्वारे प्रस्‍ताव मागविण्‍यात आले.

    आवश्‍यक बाबींची पूर्तता केल्‍यावर माविम जिल्‍हा कार्यालयानं सायाळा चा प्रस्‍ताव मंजूर केला. त्‍यानुसार १२ हजार रुपये अनुदान व इतर निधी लोकसहभागातून जमा करणं आवश्‍यक होतं. ग्रामपंचायतीसमोर याबाबत प्रस्ताव मांडण्‍यात आला. ग्रामपंचायतीनं जागा दिली पण आर्थिक जबाबदारी स्‍वीकारली नाही. निधी उभा करण्‍याचं मोठ्ठं आव्‍हान महिलांसमोर होतं. महिला जिद्दीनं पुढं आल्‍या. प्रत्‍येक महिला बचतगटाकडून १ हजार रुपये व लोकसहभागातून ८ हजार रुपये असे एकूण २७ हजार ५०० जमा करुन हातपंपावर मोटर बसवून पाण्‍याची टाकी उभारली. अत्‍यंत प्रतिकूल परिस्‍थिती व लोकांचा विरोध असताना महिलांनी हा प्रकल्‍प पूर्णत्‍वास नेला. या हातपंपावरील विद्युत मोटारीची देखभाल दुरुस्‍ती व पाणी वितरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्‍यात आली आहे.

    महिलांच्‍या पुढाकारानं पाण्‍याचा प्रश्‍न सुटला व त्‍यांना स्‍वत:कडं, कुटुंबाकडं अन् गावाच्‍या विकासाकडं लक्ष देण्‍यासाठी पुरेसा वेळ उपलब्‍ध होऊ शकला. आज गावाच्‍या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला आहे, हे महिला शक्‍तीचं आणि बचतगटांच्या माध्यमातून त्या एकत्रित आल्याचं द्योतकच म्‍हणावं लागेल.


  • राजेंद्र सरग

  • धान्यकोष ठरला जीवनाला आधार

    सातपुडा लगतच असलेलं मौलीपाडा हे आदिवासी गाव. सातपुडा जवळच असल्यामुळे मुरमाड व खडकाची जमीन. येथे लोक केवळ पावसाळ्यापुरतीच शेती करतात. इतर कालावधीत त्यांच्याकडे धान्य नसल्यामुळे मुला-बाळांना पोटभर अन्न मिळत नाही, त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढते. गावात रोजगार नसल्यामुळे पावसाळा वगळता गावात इतर दिवसांमध्ये अनेक गावकऱ्यांवर साहजिकच उपासमारीची आणि स्थलांतराची वेळ येते. अशा परिस्थितीत या गावात माविमचे ५ बचत गट स्थापन झाले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे धान्यकोष तयार होऊन उपासमारीवर मात करणे शक्य होऊ लागले आहे.

    उन्हाळ्यात गावकऱ्यांकडे धान्य नसल्यामुळे ते सावकाराकडून धान्य घेत आणि धान्य आल्यावर सावकाराला मोठ्या प्रमाणावर धान्य व्याजाच्या स्वरुपात परत करीत असत. या बाबींवर बचतगटांच्या सभासदांमध्ये विचार विनिमय करण्यात आला. या समस्येवर काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा झाली. विविध पर्यायांचा विचार केल्यानंतर गटांनी एकत्र येऊन धान्यकोष तयार करावा, या उपायावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार गटातील महिलांनी एकत्र येऊन धान्यकोष सुरु केले आहे.

    याविषयी सीएमआरसी कार्यालयामार्फत त्यांना सहयोगीनीकडून वेळोवेळी माहिती देण्यात आली. कुपोषण कमी करण्यासाठी काय उपाय करण्यात येतील यावरही नेहमी चर्चा होत असे. त्यांनी सुरुवातीला एकत्र येऊन आपल्या भागात पिकणारा मक्का जमा करण्याचे ठरविले आणि प्रत्यक्षात धान्यकोषाला सुरुवात केली. जमलेले धान्य एका महिलेच्या घरी ठेवण्यात आले.

    धान्यकोष सुरू झाल्यानंतर सर्वांनी मिळून त्याचे नियम तयार करुन घेतले. त्यामध्ये धान्य जमा करताना स्वच्छ केलेले व निवडलेले धान्य सभासदांनी द्यावे. गरजेच्या वेळी गरजू सभासदांना हे धान्य द्यावे. धान्य परत देताना जितके धान्य घेतले त्याच्या मोबदल्यात धान्यच द्यावे, जेणेकरुन जास्तीचे धान्य जमा होऊन इतर गरजू सभासदांना वाटप करणे शक्य होईल. असे ठरविण्यात आले.

    बचत गटांनी सुरू केलेल्या या कार्यामुळे लहान स्वरुपात का होईना गरजू कुटुंबाची गरज आज पूर्ण होत आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर धान्यकोष तयार करुन संपूर्ण गावाचे कुपोषण व उपासमार कशी कमी होईल, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प गावविकास समितीने केला आहे.


  • रजेसिंग वसावे

  • धानासोबतच उसाचा पेरा घेणारा गोंदिया जिल्हा

    ऊस पिकासाठी विदर्भ वगळता सामान्यत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, काही अंशी खानदेश भाग येतो हे माहीत आहे. पण अलिकडे पूर्व विदर्भातील गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील कास्तकारांची मानसिकता देखील बदलत असून तेथेही ऊस पिकाचा पेरा घेण्याकडे कल दिसून येत आहे.

    पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे विशेषत: धानासाठी प्रसिद्ध आहेत. धानपिकाची खाचरे ह्या भागात आपल्याला विपुल प्रमाणात आढळतात. सिंचनाच्या मर्यादित सुविधेमुळे हिरव्यागार पिकाचे पट्टे कमी प्रमाणात पाहायला मिळायचे. पण धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या ह्या जिल्ह्यात धान पिकाला लागवड खर्च जास्त आणि तुलनेत उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या धान उत्पादक कास्तकारांनी पारंपरिक धान पिकाऐवजी ‘नगदी पिकाची लागवड करा’ या शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणे सुरु केले आहे.

    या भागातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याला कारणही असे घडले की, भंडारा जिल्ह्यात लाखांदूर येथे नॅचरल ग्रोव्हर प्रायव्हेट लिमिटेड आणि भंडारा जिल्ह्यातच देव्हाडा येथे पूर्ती उद्योग समूहाचा वैनगंगा सहकारी साखर कारखाना सुरु झाला. धान उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादित केला तर या दोन्ही साखर कारखान्यांनी तो खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धान उत्पादक कास्तकारांनी आपल्या धान पेऱ्याच्या क्षेत्रात किंचित कपात करत ऊस उत्पादनासाठी उसाचे बेणे लावले. उसाचा पेरा केला आणि आजमितीस ७०० हेक्टर पेक्षा जास्त शेतजमिनीवर उसाची लागवड करण्यात आली आहे.

    अर्जुनी मोरगाव तालुक्यात ईटियाडोह धरणाच्या कालव्यामुळे सिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत वैनगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव गटात ७५ हेक्टर क्षेत्रात, महागाव गटात १०२ हेक्टर, तर नवेगावबांध गटात १८८ हेक्टर अशी मिळून एकूण ३६५ हेक्टर शेतजमिनीत उसाचा पेरा घेतला आहे. याशिवाय नॅचरल ग्रोव्हर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव गटात ९६ हेक्टरवर, अर्जुनी मोरगाव गटात ९१ हेक्टरवर तर सडक अर्जुनी गटात ७५ हेक्टरवर असे मिळून एकूण २६२ हेक्टरमध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे.

    ऊस पिकाच्या पेऱ्यामुळे अर्जुनी मोरगाव भागातील धान उत्पादकांच्या हाती यावर्षी नगदी हाती पैसा येणार आहे. त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकू लागला आहे. या जिल्ह्यात पूर्वी तुरळक प्रमाणात उसाचा पेरा घेऊन, गुऱ्हाळ चालवून गुळ तयार करण्याची कुटीरोद्योगाची कामे चालू होतीच, पण साखर कारखान्यांना ऊस देऊन नगदी रक्कम हाती येण्याचा मणिकांचन योग आता ह्या भागातील धान उत्पादकांच्या हाती आला आहे. ही खरोखरच त्यांच्या आयुष्यात आनंदाची बाब बनून आली आहे.

    तंत्रज्ञानाचा कणा – रोजगार हमी योजना

    रोजगार मिळविणे ही एक मूलभूत गरज आहे. मूलभूत अशासाठी की, पैसा मिळवून देणारे कोणते कौशल्य लोकांकडे नाही. ग्रामीण भागातील शेतीसंबंधी कौशल्य असेलच तर ते केवळ हंगामी स्वरुपाचेच पण पुढे काय ? मग नाईलाजाने शहराकडे स्थलांतर. यातच भर म्हणून महाराष्ट्रात १९७२ साली दुष्काळ पडला, ही परिस्थिती आणि पुढचा काळ या कल्पनेतूनच श्री. वि.स. पागे, यांनी ग्रामीण भागातील श्रमाचे काम करणाऱ्या अकुशल श्र‍मिकांची बेकारी दूर करण्याच्या हेतूने दिनांक २६ जानेवारी, १९७८ रोजी रोजगार हमी योजना हा क्रांतिकारी कायदा संमत केला. . .

    या योजनेचे महाराष्ट्रातील चांगले यश सर्वदूर गाजले आणि यातूनच देशाला महाराष्ट्राकडून मिळालेली देणगी म्हणून जिचे वर्णन करता येईल अशी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ हा स्वतंत्र असा कायदा केंद्र शासनाने पारित केला. ज्याला थोडक्यात मनरेगा असे संबोधल्या जाते. ग्रामीण अकुशल मजूराला त्याच्या गावातच रोजगाराची हमी मिळवून देणे आणि या रोजगारातून गावामध्ये संसाधनांची निर्मिती अशी दुहेरी दूरदृष्टी ठेवून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १०० दिवस रोजगाराची हमी या कायद्याने दिली.

    योजनेच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच मजूरांची दैनंदिन हजेरी आणि मोजपांच्या नोंदीपासून तंत्रज्ञानाचा वापर सुरु होतो. त्यामुळे कामाचे योग्य मोजमाप हे मजूरांसाठी महत्वाचे. आंध्रप्रदेश सरकारने या योजनेत असे सॉफ्टवेअर विकसित केले आहे की, ज्यात मोजमाप आणि मजूरांची रोजची हजेरी थेट इलेक्ट्रॉनिक मस्टर आणि मेजरमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये नोंदविली जाते. हे सॉफ्टवेअर कामाच्या जागी हजेरी व मोजमाप घेणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्या मोबाईलवर लोड केलेले असते. त्याने मोबाईलवर घेतलेल्या माहितीची नोंद पुढे सर्व्हरला पाठविली जाते. ही डिजीटल माहिती नोंदविल्यामुळे पुढच्या सगळ्या प्रक्रिया या डिजीटल होत जातात.

    या माहितीवर आधारित असलेल्या पुढच्या प्रक्रिया तहसिल किंवा जिल्हा पातळीवर घडतात आणि यामुळे पुढची प्रक्रिया म्हणजेच अधिकारी फिंगर स्कॅन आणि डिजीटल सहीव्दारे ऑनलाईन त्या मंजूर करतात. हजेरी आणि कामाच्या आधारावर मजूरांची संगणकीय पे ऑर्डर निघते. मजूरांच्या रकमेसहीत बँकेला ऑनलाईन यादी पाठवून पुढे बँक मजूराच्या खात्यात रक्कम जमा करते, एवढेच नव्हे तर मजूरांना पैसे वाटप करताना त्याची फिंगर प्रिंट स्कॅनव्दारे त्याची ओळख पटविली जाते.

    आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अहवालांच्या जंजाळातून या योजनेची आपाआपच सुटका झालेली आहे. कनिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना वेगवेगळे अहवाल पाठविण्याची गरज राहिलेली नाही, कारण तपशीलवार बारीकसारिक माहिती या यंत्रणेत दिसू शकते. रोहयोची प्रक्रिया ही शेवटच्या स्तरापर्यंत पारदर्शक असावी यासाठी सोशल ऑडिट, राज्य पातळीवरच्या सोसायटी फॉर सोशल ऑडिट अकाऊंन्टेबलीटी व ट्रान्सफरन्स या बिगर सरकारी संस्थाकडून केली जाते. माहितीचे उत्कृष्ट व्यवस्थापन, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, त्यातून मानवी गैरव्यवहाराची आणि मानवी चुकांची शक्यता कमी होणे़, यंत्रणा सोपी व वेगवान होणे ही या अंमलबजावणी यंत्रणेची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील.


  • अनिल गडेकर

  • स्टॉबेरीची जादू

    स्ट्रॉबेरी म्हटली की पूर्वी महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीच प्रसिध्द होती परंतु कालांतराने नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ येथेही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ लागले. आता नाशिक जिल्हयातील सुरगाणा व कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनीही स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या क्षेत्रात आपला चांगला जम बसवलाअसून त्यामध्यमातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे सतत चिंताग्रस्त असणा-या या शेतक-यांच्या जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत आहेत.

    सुरगाणा तालुक्यातील बोरगांव घाटमाथा परिसरातील धोंडाबे , मोरपाडा, शिंदे , पोहावी, बोरगाव, हिरडपाडा, चिखली, घागबारी, उंबरपाडा व कळवण तालुक्यातील सुकापुर, खिराड, पळसदर, लिंगामे, आमदार, बापखेडा, वीरशेत, वडपाडा परिसरातील डोंगर द-यामध्ये राहणारा आदिवासी शेतकरी पारंपारिक शेती बरोबरच शास्त्रशुध्द पध्दतीने स्ट्रॉबेरी पिक घेऊ लागला आहे.

    गेल्या पाच-सहा वर्षापासून स्ट्रॉबेरी शतीचा प्रयोग यशस्वीरीतीने केला जात आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी हे नगदी पिक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच स्ट्रॉबेरीला दरवर्षी प्रतिकिलो १०० ते ३०० रुपये किलो भाव मिळत असल्याने या परिसरातील आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळाला आहे. एक किंवा दोन किलोचे खोके भरुन गुजरात राज्यात सुरत, अहमदाबाद, भरुच येथ बोरगांव येथून पाठविल्या जातात काही शेतकरी नाशिक सापुतारा रस्त्यावर पाल ठोकून टोपल्यामध्ये स्टॉबेरी भरुन विक्री करतात. त्यामुळे शेतक-यांना दोन पैसे मिळू लागले आहेत.

    सुरगाणा तालुक्यातील धोडांबे येथील श्रीराम गायकवाड या आदिवासी शेतक-याने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की महाबळेश्वर येथून चार हजार स्ट्रॉबेरीची रोपे आणून लावले. सट्रॉबरी चार महिन्यात पीक देते. त्यामुळे स्टट्राबेरी पासून दरवर्षी तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

    कळवण तालुक्यातील सुकापूर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी महिला हिराबाई नामदेव दळवी यांनी स्ट्रॉबेरी उत्पादना संबंधी माहिती देतांना सांगितले की, चार ते पाच महिने पिकाची निगा राखावी लागते. दर पंधरा दिवसांनी शेणखत आणि रासायनिक खते पिकांना दयावी लागतात. तसेच नेहमी औषधे फवारणी करावी लागते.. या पिकाच्या उत्पादनातून ब-यापैकी उत्पादन मिळत आहे.

    कळवण तालुक्यातील सुकापुर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी तुकाराम भोये यांनी माहिती देतांना सांगीतले की, पोळा सणाच्या दरम्यान महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणून लागवड करतो, आणलेली सर्वच रोपे कामी येत नाही. एका रोपाला साधारणत: १० ते १५ फळे येतात.इतर पिकांपेक्षा या पिकाची जास्त निगराणी राखावी लागते. या पिकाच्या उत्पादनातून बरापैकी नफा मिळतो. या पिकापासून जेली व अन्य उत्पादन करणारे प्रक्रिया उदयोग येथे सुरु झाल्यास या पिकापासून चांगला फायदा मिळेल असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. अशा आशादायक परिस्थितीमुळे आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळाला असून आदिवासी भागात रोजगारांची संधी निर्माण झाली आहे.


  • देवेंद्र पाटील

  • Thursday, March 22, 2012

    नवी पहाट

    कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत बदल करून शेती उत्पादन वाढविले आहे. विशेष म्हणजे महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आधुनिक शेतीतंत्राचा वापर करून या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील शीर गावच्या महिलांनी भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल तीन लाखावर नेऊन गावातील इतर महिलांना प्रेरित केले आहे.

    शीर गावात शिरल्यावर रस्त्याच्या कडेला आज हिरवीगार शेती दिसते. पूर्वी या भागात भातशेतीचा हंगाम संपल्यावर पुरुष मंडळींना किरकोळ भाजीपाला पिकविताना घर चालविण्यासाठी इतर कामांचा शोध घ्यावा लागे. मात्र कृषी विभागामार्फत शेतीशाळा उपक्रम सुरु करण्यात आल्यानंतर परिस्थितीत बदल घडला. विशेष म्हणजे या शेतीशाळेत पुरुषांच्या सोबतीने महिलादेखील सहभागी झाल्याने पावसाळ्यानंतर परिसरातील शेती बहरू लागली. शीर गावातील भाटले आंबेकरवाडी बचतगटाच्या १९ महिलांनी एकत्रित येऊन अवघ्या दोन वर्षातच यशस्वी शेती करून दाखविली.

    ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झालेल्या या बचतगटातील महिला भातशेतीचे काम करण्यासाठी जात असत. आपली स्वत:ची शेती करावी म्हणून या महिलांनी गटाच्या माध्यमातून भातशेतीने सुरुवात केली. प्रारंभीच १५ क्विंटल तांदळाचे उत्पादन त्यांनी घेतले. त्यानंतर मिरचीचे उत्पादन घेतले. अशातच कृषी सहायक आर.के.जाधव यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून त्यांना कलिंगड आणि भाजीपाला उत्पादनाची माहिती दिली. ग्राम विकास अधिकारी बी.बी.पाटील आणि सरपंच शिवराम अंबेकर यांनी देखील महिलांना शेतीसाठी प्रोत्साहन दिले.

    बचतगटाने २ एकर क्षेत्रात कलिंगड आणि अर्धा एकर क्षेत्रात भाजीपाला लागवड केली. गटाच्या अध्यक्षा अश्विनी अंबेकर आणि सचिव रोहिणी अंबेकर यांनी सोबतच्या १७ सदस्यांसह शेतीचे योग्य नियोजन केले. कृषी विभागामार्फत बियाणे आणि युरीया ब्रिकेट्स पुरविण्यात आले. तसेच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले. करारावर जमीन घेऊन या गटाने शेतीची कामे सुरु केली. घरच्या मंडळींनी सहकार्याची भूमिका घेतल्याने या कामात लक्ष घालता आल्याचे महिलांनी सांगितले. शेतीची योग्य देखभाल केल्याने शेतात पीक बहरले आहे. वांगी, घेवडा, मिरची, कोबी, कलिंगड आदी पिकांनी बहरलेल्या या शेतात पिकाची काळजी घेताना या महिला दिसतात.

    विशेष म्हणजे भाजीपाला व्यापाऱ्यांना न देता त्याची विक्री महिलाच करतात. गावाबाहेर असलेल्या या शेताच्या कडेला गवताने बनविलेल्या शेडखाली पाच-सहा पलंग रांगेने दिसतात. ते रखवालदारी करणाऱ्या गडी माणसांचे असतील असा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचा समज होतो. मात्र या महिला वानरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी दिवसा अणि रात्रीदेखील आळीपाळीने पहारा देतात. त्यांच्यातला आत्मविश्वास गटाच्या पुढच्या यशाची शाश्वती देणारा आहे. या वर्षी तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता सदस्यांनी बोलून दाखविली.

    गटाच्या महिलांचे विक्री व्यवस्थापनदेखील वाखाणण्याजोगे आहे. दररोजच्या मालाच्या सर्व नोंदी, विक्री, कापणी, शेतीकामे अशा सर्व कामांची विभागणी व्यवस्थितरित्या केली जाते. गटाच्या या यशामुळे गावातील बचतगट चळवळीला बळ मिळाले आहे. तसेच इतरही शेतात भाजीपाला दिसू लागला आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने या महिलांनी सुरुवातीलाच प्रगतीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. कलिंगडाच्या भरघोस उत्पादनामुळे मिळणारा आत्मविश्वास त्यांना नव्या पहाटेचे दर्शन घडविणारा आहे.


  • डॉ.किरण मोघे

  • पालच्या शिवारात .. झेंडू फुलला

    गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण. आजपासून हिंदू नववर्षाला सुरूवात होते. सर्वत्र गुढ्या-तोरणे उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या गुढी पाडव्यासह वर्षभरातील सर्वच सण, उत्सव आणि शुभकार्यात फुलांमध्ये सर्वाधिक महत्त्व असते ते झेंडूला. काळ कितीही झपाट्याने बदलत असला तरीही झेंडूच्या फुलांना आजही तितकाच मान आहे. परंपरा आणि नविनता यांचे नाते अधोरेखित करण्याचे महामंगल काम झेंडूमुळेच साकारले जात आहे.

    अशा या झेंडूफुलाच्या उत्पादनात सातारा जिल्हा राज्यातील एक आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. भगव्या आणि पिवळ्या झेंडू फुलांच्या टवटवीत आणि दर्जेदार उत्पादनासाठी येथील शेतकऱ्यांनी स्वयंसशोधनाद्वारे क्रांती घडविली आहे. म्हणूनच आज सातारा जिल्ह्यातील झेंडूफुलांना पुण्या-मुंबईच्या बाजारपेठांत मोठी मागणी लाभली आहे.

    सातारा जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडविली आहे. शेती क्षेत्रात तर येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी जिद्द आणि कष्टातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. आपापल्या परीने शेती विकासाचे नानाविध प्रयोग राबवून शास्त्रशुद्ध शेतीचा नवा विचार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित केला आहे. परंपरागत शेती पिकाबरोबरच फुलशेतीतही येथील शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढेच टाकले आहे. विशेष म्हणजे झेंडू फुलांच्या शेतीला राज्यस्तरावर लौकिक मिळवून देण्याचे काम येथील शेतकऱ्यांनी केले आहे. हरितगृहाच्या सर्वाधिक उभारणीमुळे हरितगृहाचा जिल्हा म्हणून सारा महाराष्ट्र सातारा जिल्ह्याला ओळखतो. याचाच एक भाग म्हणून झेंडू फूल शेतीमध्येही सातारा, कराड, पाटण, कोरेगाव तसेच माण-खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट आणि जिद्दीद्वारे क्रांती घडविली आहे. आजमितीस जिल्ह्यात झेंडूफुलांची सुमारे २० कोटींची वार्षिक उलाढाल होत आहे. पुण्या-मुंबईतील लोकांची झेंडूची भूक भागविण्याचे काम खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

    सातारा जिल्ह्यात जवळपास बाराशे हेक्टर क्षेत्रावर झेंडूचे उत्पादन होत आहे. यामध्ये पश्चिम भागातील शेतकरी आघाडीवर आहेत. झेंडू फुलशेतीची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करुन कराड तालुक्यातील पाल येथील शेतकरी जयवंत पाटील यांनी झेंडू फुलाच्या उत्पादनात घडविलेली क्रांती अन्य शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. जयवंत पाटील हे पाल आणि परिसरातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी गेली १५ वर्षे सातत्यपूर्वक झेंडूचे पीक घेतले आहे. झेंडूच्या दर्जेदार उत्पादनात त्यांचा हात धरणे तसे कठीणच. टवटवीत, आकर्षक आणि दर्जेदार झेंडू उत्पादनात त्यांनी निम्मी हयात घालविली. ग्राहकांना उत्तमोत्तम झेंडू देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांना आदर्श मानून आता अल्पकालावधीत नगदी पैसा देणाऱ्या या झेंडू फूल शेतीकडे अनेक तरुण शेतकरी आकर्षित झाले आहेत.

    कराड, पाटण, सातारा, कोरेगाव या प्रमुख तालुक्यांबरोबरच काही प्रमाणात माण-खटाव भागातही झेंडूचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात बाराशे हेक्टरच्या आसपास झेंडूची लागवड होत आहे. प्रति हेक्टरी १२ टन झेंडूचे उत्पादन घेण्याची क्रांती येथील बहाद्दर शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे सातारच्या झेंडूने पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात झेंडूच्या फुलांची २० कोटींची वार्षिक उलाढाल होत असून झेंडू उत्पादनातील फलश्रुतीमुळे झेंडूफुलांचे उत्पादन घेण्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. अल्पक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यापासून मोठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाही झेंडू फुलशेती लाभदायी ठरत असल्याचे मत जयवंत पाटील यांनी व्यक्त केले. झेंडू शेती ही अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाण्यामध्ये होत असून कष्टही तितकेच कमी लागतात. झेंडूच्या उत्पादनामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यासही मदत होते. याबरोबरच कलर निर्मितीसाठीही झेंडू फुलांचा वापर करण्यात काही कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. झेंडू पिकाची कीड, भुरी आणि करपा या रोगापासून योग्य काळजी घेतल्यास हे पीक शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे.

    पाल येथे झेंडूच्या शेतीद्वारे लाभ मिळविणारे उदाहरण म्हणून जयवंत पाटलांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांची वडिलोपार्जित २५ एकर जिरायत शेती होती. तारळी नदीच्या पाण्यामुळे मात्र गेल्या काही वर्षापासून बागायती शेती निर्माण करण्यास जयवंत पाटलांना यश आले. ऊस, आले, पपई, काकडी, हळद अशा शेती पिकांबरोबरच जयवंत पाटलांनी तीन एकर क्षेत्रात झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले. गेल्या पंधरा वर्षांपासून झेंडूच्या फुलशेतीत जयवंत पाटील राबत आहेत. आपले वडील कै.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फूलशेतीत लक्ष घातले. वडिलांच्या निधनानंतरही त्यांनी वडिलांनी घालून दिलेल्या वाटेनेच चालायचा यशस्वी प्रयत्न केला आहे. झेंडूच्या उत्तमोत्तम जातीची रोपे मिळवून झेंडूची शेती लाभदायी बनविण्यात जयवंत पाटील यांना यश लाभले आहे.

    जयवंत पाटील यांनी तीन एकर शेतीमध्ये भगव्या तसेच पिवळ्या रंगाच्या आकर्षक अशा ‘लाल कलकत्ता’ जातीच्या झेंडू फुलांच्या १५ हजार रोपांची लागवड केली. ४५ दिवसानंतर त्यांनी झेंडूचा पहिला तोड घेतला. आतापर्यत अवघ्या तीन महिन्यात त्यांनी ७ तोड घेतले असून एकंदरीत १२ ते १५ तोड घेण्याची क्रांती त्यांनी घडविली आहे. जयवंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी कष्ट आणि जिद्दीने झेंडूशेती विकसित केली. ही शेती कशी लाभदायी होईल यासाठी त्यांनी अनेक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन ज्ञान आत्मसात केले. झेंडू फूल शेतीबरोबरच जयवंत पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये स्वत: संशोधन करुन आले, हळद, पपई अशा अनेक पिकांच्या अधिक उत्पादनाची क्रांती घडविली आहे. झेंडू फुलांच्या उत्पादनाविषयी बोलतांना ते म्हणाले, लग्न, वास्तुशांती, विविध सण, उत्सव अशा वेळी आता मोठ्या प्रमाणात झेंडूची मागणी होत आहे. त्यामुळे झेंडू फुलशेतीला शाश्वत शेती म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नगदी पैसे देणारी ही शेती आता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे.

    झेंडू फुलांना १२ महिने २४ तास मागणी आहे. उत्तम, दर्जेदार, टवटवीत आणि टीकाऊ झेंडूच्या उत्पादनाला आता पुण्या-मुंबईच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ३ एकरात झेंडू उत्पादनातून वार्षिक उत्पादन ७ ते ८ लाखाच्या घरात जाते. मात्र यासाठी मजुरी व अन्य शेतीखर्च मिळून २ लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे याद्वारे आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्त्रोत निर्माण होत असल्याचे मतही जयवंत पाटील यांनी व्यक्त केले. पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत सातारा जिल्ह्यातील झेंडू फुलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी खर्चात, कमी पाण्यात, अल्प काळात पण शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची शेती करण्याकडे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांचा ओढा यामुळेच वाढला आहे.


  • एस.आर.माने

  • बावधनचं बगाड

    गुढीपाडवा म्हणजे संस्कृतीचा सोहळा. प्रत्येक प्रांतनिहाय या गुढी उभारण्याच्या पध्दती वेगवेगळया आहेत. सातारा जिल्हयात ही बावधन यात्रेची एक वेगळी परंपरा आहे. होळीपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव गुढीपाडवाच्या दिवशी संपतो. एकात्मता व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणा-या या यात्रोत्सवाचा एक साक्षीदार होण ही एक पर्वणीच आहे.

    नवस फेडण्याची बावधन यात्रेतील परंपरा पेशवेकालीन असून एकात्मतेचे प्रतिक असलेली ही यात्रा रंगपंचमीच्या दिवशी बगाडाच्या स्वरुपात वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरी होत असते. या यात्रेनिमित्त नोकरी- व्यवसायासाठी गावातून बाहेर असलेली शेकडो कुटुंब गावात येऊन एकात्मता व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवितात.

    या भैरवनाथाची नवसाला पावणारा म्हणून ख्याती असल्याचे जुनेजाणते सांगतात. नवसाची परतफेड करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व लोक होळी पौर्णिमेच्यादिवशी मंदिरात जमतात. रात्री बारा वाजता विधीपूर्वक पूजा करुन नवस केलेल्या व्यक्तींच्या नावाने देवापुढे कौल लावला जातो. उजवा कौल मिळाल्याचे ठराविक संकेत मिळाल्यावर त्या व्यक्तीस 'बगाड्या'चा मान मिळतो. यावर्षी ४२ वर्षीय रविंद्र सोपान कदम यांना हा मान मिळाला. रविंद्र कदम यांनी २२ वर्षापूर्वी आपल्या बहिणीस संततीप्राप्ती व्हावी म्हणून नवस केला होता. नवस केल्यावर पहिल्याच वर्षी त्यांच्या बहिणीस मूल झाले. यावर्षी बगाड्याचा मान मिळावा म्हणून ४७ नवसकर्ते बसले होते. त्यापैकी रविंद्र कदम यांच्या बाजून कौल लागल्याने त्यांना बगाड्याचा मान मिळाला.

    बगाड म्हणजे पूर्णत: लोखंडविरहीत असा लाकडी रथ असतो. त्याला दगडी चाके असतात. या रथाचे साहित्य म्हणजे लाकडी कणा, २ घडीव दगडी चाके, दांड्या, बैल जुपण्यासाठी जू असते. मध्यभागी आडवे मोठे चौकोनी खाचे असलेले लाकूड, त्यावर उभा खांब, बाहुली, शिड आदी संपूर्ण गाड्याची बांधणी झाल्यावर मध्यभागी वाघाचे आडवे लाकूड बसवतात. त्या लाकडास मध्यभागी गोल खाच केलेली असते. त्या खाचेमध्ये सुमारे २० फूट उंचीचा खांब उभा करुन त्याच्या वरच्या बाजूस शिड गोलाकार फिरण्यासाठी बाहुली बसवली जाते. त्यावर आडवे ५० ते ५५ फूट लांबीचे दोरखंडाचे गुंफलेले कळकाचे शिड बसवले जाते. बगाड्याला टांगण्यासाठी शिडाच्या पुढच्या टोकास झुल्यासारखी व्यवस्था केलेली असते. शिडावर तेल घालण्यासाठी एक व्यक्ती बसवलेली असते. शिड फिरते राहण्यासाठी, शिडाचे घर्षण कमी व्हावे व ते गोल फिरावे म्हणून खांबाच्या मध्यभागी दोन्ही बाजूस दोरखंडाच्या पिळकावण्या गुंफलेल्या असतात. त्यावर मानकरी म्हणून रामदास पिसाळ व विवेक भोसले उभे असतात. ते बगाडाचे मार्गदर्शक म्हणून संबोधले जातात.

    गाड्यावर सुमारे २० लोक बसतील एवढी जागा व गाड्यास एकावेळी ८ बैल जुंपता येतील अशी व्यवस्था असते. बगाडाला बैल जुंपणे ही नाथांची सेवा असल्याचे बावधनकर मानतात. त्यामुळे शेतकरी बगाडाआधी दोन महिन्यांपासून आपल्या बैलांची विशेष निगा राखून, त्यांना खुराक देऊन तयार करीत असतात. पंचमीच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत मंदिरासमोर बगाड जोडले जाते.

    पहिल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य चतुर्थीस दुपारपासूनच भाविक लोक भैरवनाथाला हार, नैवेद्य ते इच्छेप्रमाणे अर्पण करावयाच्या भेटवस्तू घेऊन वाजतगाजत मंदिरात येतात. याच दिवशी भैरवनाथाचा विवाहसोहळा पार पडतो. भैरवनाथ व ज्योतीबा यांची पालखीतून मिरवणूक रात्री सुरू होते. सर्व लोक गुलालाची उधळण करीत एकमेकांना भेटतात. पहाटे बगाडाचा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामस्थांची बैठक होते. नंतर छबिना जनीआईच्या मंदिरासमोर गेल्यावर त्याची सांगता होते.

    छबिना संपल्यावर मंदिरापासून बगाड हलवतात. गावच्या पूर्वेस ५ कि. मी. अंतरावर कृष्णातीरावरील श्री क्षेत्र सोनेश्वर येथे बगाड सकाळी पोहोचते. या वर्षी सकाळी ७ वाजता बगाड सोनेश्वर येथे पोहोचले. या ठिकाणी बगाड्या रविंद्र कदम यास कृष्णा नदीत विधीवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर शिडाला सजवून तोरणे बांधून देवदेवतांची विधीवत पूजा करण्यात आली. बगाड्याला पारंपरिक पद्धतीचा पोषाख घालून वाजतगाजत बगाडास झुल्यावर बांधून टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले.

    सकाळी साडेदहा वाजता बगाडाचा गाडा ओढण्यास सुरुवात झाली आणि भाविकांनी 'काशिनाथाचं चांगभलं' या गजराला सुरुवात केली. ठिकठिकाणी विसावा घेऊन बगाडाचे बैल बदलण्यात आले. बगाडाच्या मागे वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्याही होत्या. त्यांचेही भाविक दर्शन घेत होते. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या घालण्यात आल्या. बगाडाच्या मिरवणूकीप्रसंगी युवा ग्रामस्थ मंडळ, बावधन व सकल संप्रदाय मंडळ, बावधन यांनी सर्व भाविकांसाठी मोफत अल्पोपहाराची व्यवस्था तर मुंबईच्या जनता सहाय्यक मंडळाने पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते.

    सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बगाड बावधन गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा मोठा गजर करण्यात आला. बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बगाड गाड्याच्या पुढे आणि मागे ट्रॅक्टर ट्रॉलीवरुन ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिटी पदाधिकारी ध्वनीक्षेपकावरुन बगडाबाबत सूचना देत होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडत बगाड उत्साहात पार पडले जाते.

    हा रथ तसाच देवळाच्या आवारात ठेवला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी या रथाचे भाग वेगवेगळे करून ते विहिरीत टाकले जातात. अर्थातच रथविर्सजन केले जाते.

    बगाडाच्या निमित्ताने बावधन गावकऱ्यांनी जोपासलेली कित्येक वर्षांची परंपरा आजही जोपासली जात असून एकीचं दर्शन घडवून समाजात एकात्मता व बंधुभावाची जोपासना करुन गावाच्या विकासाचं सूत्र नव्या रुपात जोपासण्याचं ऐतिहासिक काम बावधनकरांच्या हातून घडत आहे हेही तितकेच महत्त्वाचे !


  • सचिन गाढवे

  • गुढी पाडवा, आनंद वाढवा

    आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी नववर्षाचा प्रारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. यालाच आता मराठी नववर्ष म्हणण्यात येऊ लागले आहे. आपली पंचाग तयार करण्याची अनेक कोष्टके शालिवाहन शकाबद्दल आपल्या विशेष जवळील वाटण्याचे कारण म्हणजे राजा शालिवाहन हा महाराष्ट्रीय होता.

    गुढीपाडव्याला म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदेला पहाटे ओवा, हिंग, मिरी आणि साखर किंवा गूळ-कडुलिंबाच्या पानाबरोबर खाण्याची प्रथा आहे. कडुलिंबाचे सेवन केल्यानंतरच पूजा-अर्चा करुन गुढी उभारावी असे पुराणशास्त्रात सांगितले आहे. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे स्मरण करावे, असेही म्हटले आहे. त्यानंतर वडिलधाऱ्या मंडळीना गुरुजनांना नमस्कार करुन फल श्रवण करावे, असेही सांगितले आहे.

    साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस

    महाराष्ट्रीय जनतेच्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो. चैत्र शुध्द पक्षाच्या प्रथम दिवशी प्रभू रामचंद्र सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला चौदा वर्षाचा वनवास संपवून परत आले होते. प्रभू रामचंद्र आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदित झालेल्या नगरजनांनी आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभारुन आनंदोत्सव व्यक्त केला, अशी आख्यायिका आहे.

    आयुर्वेदातील महत्व

    सकाळी मुखमार्जनानंतर कडुलिंबाची कोवळी पाने हिंग, चिंच, ओवा यासमवेत घ्यावीत हा प्रघात आहे. कडुलिंब हा औषधी आहे. या कडुलिंबाच्या रसासोबत आंबट, तुरट, तिखट यांचे सेवन आयुर्वेदात महत्वाचे मानले जाते.

    वर्षाच्या सुरुवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरु करावे, हा या मागचा हेतू आहे. एकीकडे गुढी उभारुन आपण त्याला साखरेची माळ लावायची याचा अर्थ आपल्या सुखाची मागणी करायची, कडुलिंब खायचा, याचा अर्थ जे काही दु:ख आहे, त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हा मंत्र आयुष्यभर जपला तर संपूर्ण जीवन सुखी होईल, असा संदेश या सणातून दिला जातो.
    `माझं सुख, माझु सुख हंडया झुंबर टांकलं,
    माझं दु:ख माझ दु:ख तळघरात कोंडलं`.

    हा या सणांचा अन्वयार्थ बहिणाबाईंनी आपल्याला नेमक्या शब्दात सांगितला आहे.

    रक्तदोषहारक कडुलिंब

    कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणता ना कोणत्या तरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारिरीक आजार नाहीसे होतात. कडुलिंबाच्या सेवनाने शरीरातील कफ, उष्णता कमी होते. उत्तम अग्नी प्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम आदी रोगांवर गुणकारी तर आहेच पण रक्तदोषहारक आणि कृमीनाशक म्हणून तो ओळखला जातो.
    आयुर्वेदातील एक प्रमुख घटक म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो. हा किटकनाशक, जंतुनाशक तसेच हवा शुद्धीकरणासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्या कडुनिंबाच्या काड्याचा वापर दात घासण्यासाठीही केला जातो. कडुलिंबापासून तयार केलेल्या तेलाने मालीश केल्यास गंभीर चर्मरोग नाहीसे होतात, असे आयुर्वेदात म्हटले आहे.

    गुढीच्या टोकाला आंब्याची पाने आणि कडुलिंबाचे सेवन हे गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य. आंबा आणि कडुलिंबाच्या पानात ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता सांगितली गेली असतील तरी या मागील उद्देश नीट समजावून घेण्याची गरज आहे.


  • सतीश पाटणकर

  • मांगल्य आणि विजयाचे प्रतिक म्हणजे गुढी पाडवा


    हिंदू धर्मातील एक वर्ष सरते म्हणजे एक शालिवाहन शक संपून दुसरे सुरु होते याच दिवसाला चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात ''गुढीपाडवा'' असे म्हणतात. हाच 'गुढीपाडवा' म्हणजे मांगल्य आणि विजयाचे प्रतिक असतो असे म्हटले जाते.

    हिंदू धर्मात साडेतीन मुहुर्त सांगितले आहेत. या साडेतीन मुहुर्तापैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. असाच एक पाडवा असतो तो कार्तिक वद्य प्रतिप्रदेला. परंतु या दिवशी हिंदुस्थानात गुढया उभारत नाहीत. गुढी उभारण्याची परंपरा आपल्या देशात तशी प्राचीन काळापासून म्हणजे रामायणापासून आहे. प्रभू रामचंद्रानी रावणासारख्या अघोरी शक्तीवर विजय मिळवून आपल्या राज्याच्या राजधानीत म्हणजे अयोध्येत सीतेसह प्रवेश केला आणि त्याचा झालेला आनंद सर्वसामान्य जनतेपासून ते राजेरजवाडयांनी आपल्या घरांवर गुढ्या उभारुन साजरा केला.

    आता ही गुढी म्हणजे काय ? ब्रह्मध्वज एका उंच बाबूला रेशमी कापड किंवा साडी, कडूनिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांब्याचा कलश ठेवून तो पाटावर ठेवून उभा केला जातो तिला गुढी असे म्हणतात आणि ती विजयाचे प्रतिक मानली जाते. सायंकाळी तिची विधीवत पूजा करुन उतरविली जाते आणि घरातील लहान मुले त्या साखरेच्या माळेच्या पात्यांसाठी अगदी तुटून पडताना दिसतात. पण ज्या कडूनिंब आणि गुळाचा नैवद्य गुढीला दाखवतात व तो खाल्याने आपल्या शरीरातील उष्णता आणि इतर अनावश्यक पदार्थ बाहेर जाऊन रोग प्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यास मदत होते.

    येत्या शुक्रवारी शालिवाहन शके १९३३ संपून नंदननाम संवत्सराचा म्हणजे १९३४ चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी युगाब्द ५११४ ची ही सुरुवात होत आहे. दरवर्षी चैत्रशुध्द प्रतिपदेला विश्वनिर्मितीचा वाढदिवसही साजरा केला जातो. प्रत्येक धर्मातील वर्षाचा प्रारंभ होतो. त्याचप्रमाणे हिंदू धर्माच्या वर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्याला होत असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याची प्रथा या दिवशी आहे. वाईट प्रथांचा त्याग करुन चांगल्या प्रथांची सुरुवात करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. या दिवशी पंचागाची पूजा करतात. यंदाचे नंदननाम संवत्सरात एका अधिक मासासह १३ महिने आले आहेत. या नवीन वर्षात १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०१२ दरम्यान अधिकमास आहे.

    या ऐतिहासिक दिवसाचा महत्वाचा संदर्भ आज आपण विसरलो आहोत. गुढीपाडव्याला आपण ब्रह्मध्वज उभा करुन गुढी उभारुन ही सुंदर सृष्टी निर्माण केल्याबद्दल ब्रह्मदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ही गुढीची पूजा करतो. या दिवशी शोभा यात्राही काढण्यात येतात. गुढीपाडवा म्हणजे देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी, समर्पणाचा, त्याग करण्याचा संकल्प करुन निरोगी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करु. तसा संकल्पच करु !


  • हेमंतकुमार खैरे