Saturday, June 30, 2012

संयम आवश्यक !

मंत्रालयाला लागलेली आग दुर्दैवीच होती. आग लावली की लागली या वादात आताच पडण्याचे कारण नाही. जे काही घडले असेल ते तपासांती समोर येईलच. राज्य सरकारने तपासाचे काम गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविलेच आहे. त्यामुळे सध्याच आगीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आग कशी लागली, ती लवकर कोणाच्या लक्षात कशी आली नाही, लक्षात आल्यानंतर ती विझविण्यासाठी तातडीचे प्रयत्न का झाले नाहीत, चौथ्या मजल्यावरील आग पाचव्या मजल्यावर पोहोचलीच कशी, अग्निशमन दलाचे बंब पोचण्यास विलंब का लागला, मंत्रालयातील अग्निशमन यंत्रणा सक्षम नव्हती का, या व अशा सगळया प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतर मिळणारच आहेत. त्यामुळे आगीच्या मुद्यावर राजकारण करण्यापेक्षा राज्याचा कारभार ज्या इमारतीतून चालतो, ती मंत्रालयाची इमारत कारभार चालविण्याच्या दृष्टीने उपयोगात कशी येईल, याकामी सगळयांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

आगीचे राजकारण कोणीही करू नये. जी घटना घडायची होती, ती तर आता घडून गेली आहे. या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. स्वाभाविकही होते. कारण, राज्य कारभारासाठी आवश्यक ती सगळी कागदपत्रे आगीत जळून खाक झाली होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची आणि विभागांची कार्यालये जळाली होती. काय होणार, कसे होणार अशी चिंता जनतेला वाटणे स्वाभाविक होते. शिवाय, मीडियाने ज्या पद्धतीने बातम्या चालविल्या आणि आगीची दृश्ये दाखविली, त्यावरून घटना खूपच गंभीर असल्याचे दिसत होते. त्यामुळे आता सगळेच संपले असे सामान्य माणसाला त्याक्षणी वाटणे स्वाभाविक होते.

मंत्रालयाला आग लागते ही घटना खरोखरच गंभीर होती. या आगीत पाच जण मरण पावले. कारण नसताना त्यांचा मृत्यू ओढवला होता. राज्याच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही घटना वाईटच होती. जळत असलेले मंत्रालय संपूर्ण जगाने टीव्हीवर पाहिले. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटणेही स्वाभाविक होते. विरोधी पक्षांनीही सरकारवर आरोप केले. आरोप करणे आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे हे लोकशाहीत विरोधकांचे कर्तव्यच ठरते. राज्यात ज्या काही दुर्दैवी घटना घडतात, त्यासाठी नेहमी सत्ताधारी पक्षाला दोष दिला जातो. जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असतेच. परंतु, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची घटनात्मक जबाबदारी असलेले विरोधी पक्ष नेते काय करतात? घटना घडून गेल्यानंतर सरकारवर टीका करणे हा सगळयात सोपा मार्ग आहे. पण, सरकारवर अपयशाचा ठपका ठेवताना आपणही या अपयशाचे धनी आहोत, याचा विसर विरोधकांना पडता कामा नये. ज्या व्यवस्थेत विरोधक कमजोर पडतात, ती व्यवस्था उद्‌ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. मंत्रालयाची आग हे तर केवळ एक उदाहरण आहे. राज्यात अनेकदा नैसर्गिक संकटं येतात, काही संकटं मानवनिर्मित असतात, त्या संकटांतून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांचीच आहे. विरोधी पक्षांचीही आहे. सरकार नीट काम करते आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम विरोधकांचे आहे. सरकार चुकत असेल तिथे सरकारचा कान पकडण्याची हिंमत विरोधकांमध्ये नसेल तर राज्यात अशा घटना घडतच राहतील. सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा धाक असेल तर सत्ताधारी बेजबाबदार वागताना हजारदा विचार करतील. टीका करणे हा विरोधकांचा राजकीय अधिकार असला तरी वेळप्रसंगी सरकारला मदत करणे हेही विरोधकांचे कर्तव्य ठरते. विरोधकही वातानुकूलीत कक्षांच्या बाहेर निघणार नसतील अन् विरोधी पक्ष म्हणून मिळालेली अर्धी सत्ता उपभोगण्याच्या पलीकडे काहीच करणार नसतील तर जनतेच्या मनात ही आग धुमसतच राहणार.

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर 80 तासांच्या आत सरकारने मंत्रालयाचा कारभार सुरू केला, हे सरकारचे कौशल्यच म्हणावे लागेल. आग लागल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांनी ज्या संयमाने परिस्थिती हाताळली, त्याबद्दल प्रशंसा केलीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे मंत्रालयात जेवढया फाईल्स होत्या, त्या सगळया जळाल्या असल्या तरी नव्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या सर्व्हरच्या माध्यमातून त्या संगणकात सुरक्षित आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्‍वस्त केले हे बरे झाले. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर खचून न जाता जनतेला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारचे असते. ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोखपणे बजावले, यात शंका नाही. आता मंत्रालयाचे कामकाज सुरू झाले आहे. ते वेगवेगळया ठिकाणी सुरू झाले असले तरी सुरू झाले याला महत्त्व आहे. आगीनंतर आता सगळेच संपले अशी जी भावना जनमानसात निर्माण झाली होती, ती नष्ट करण्याचे काम सरकारने कृतीतून केले, हे चांगले झाले. मंत्रालयाला लागलेली आग ही आपत्ती न समजता इष्टापत्ती समजली तर राज्याचे कल्याणच होणार आहे. आगीच्या रूपाने राज्यावर संकट आले असताना आताच दोषारोपण करण्याच्या भानगडीत न पडता प्रत्येकाने राज्य सरकारला मदतीचा हात दिला तर ते राज्याच्या व जनतेच्याही हिताचे ठरेल, हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.


  • गजानन निमदेव, कार्यकारी संपादक, तरुण भारत, नागपूर.
  • महिलांनी स्‍वकर्तृत्‍वातून साधला विकास

    राज्‍यामध्‍ये महिला सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच क्षेत्रात महिला खंबीरपणे पुढे येऊन पुरुषांच्‍या बरोबरीने काम करु लागल्‍या आहेत. आपल्‍या कर्तृत्‍वाने कामात आगळावेगळा ठसा उमटवू लागल्‍या आहेत. महिलांना हा मान सन्‍मान शासनाच्‍या विविध योजना, निर्णय, उपक्रमांमुळे मिळू लागल्‍याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. बचत गट हे त्यापैकीच एक माध्यम आहे.

    दारिद्र्याच्‍या विळख्‍यात जीवन जगत असताना आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी कुणीतरी मदत करील काय? या अपेक्षेने समाजाकडे पाहून आपली वाटचाल करणारी अनेक कुटुंबे दिसून येतात. मेहनत, जिद्द व निष्‍ठेने काम करण्‍याची तयारी असणाऱ्‍या महिलांना योग्‍य मागदर्शन व मदतीची गरज असते. महिला बचत गटातून त्‍यांच्‍या उमेदीला समर्थपणे साथ मिळाली तर महिला स्‍वकर्तृत्‍वाने आपल्‍या पायावर उभ्‍या राहू शकतात. अहमदनगर जिल्‍ह्याच्‍या जामखेड येथील सामानामीर बाबा महिला बचत गटातील महिला हे याचेच एक उदाहरण आहे.

    जामखेड येथील इंदिरानगर वस्‍तीत राहणाऱ्‍या दारिद्र्य रेषेखालील 15 महिलांनी 15 मे 2009 रोजी सामानामीर बाबा महिला बचत गट स्‍थापन केला. श्रीमती ताराबाई शिवाजी माने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन झालेल्‍या या बचत गटाने आपल्या बचतीतून प्रारंभी पारंपरिक पद्धतीने चालणारा काथवट, बेलणे, पोळपाट आदी लाकडी वस्‍तू तयार करण्‍याचा व्‍यवसाय सुरू केला. दररोज काबाडकष्‍ट करुन स्‍वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्‍या या महिलांना स्‍वतःच्‍या पायावर उभे राहण्यास बचत गटाची मोलाची मदत झाली.

    या व्‍यवसायाला खेळते भांडवल म्हणून 25 हजार रूपये मिळाल्‍यानंतर व्‍यवसायात वाढ झाली. उत्‍पादनातही वाढ झाली. तयार केलेला माल खेडोपाडी जाऊन विक्री होऊ लागला. परिसरातील गावातील यात्रा-जत्रांमध्‍ये जाऊन मालाची विक्री करण्‍यास त्यांनी सुरुवात केली. त्‍यामुळे गटास चांगले उत्‍पन्‍न मिळू लागले. त्‍यातून त्यांची प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल सुरू झाली, महिलांमध्ये आत्‍मविश्‍वास निर्माण झाला. उत्‍साहाने त्‍या व्‍यवसायवृद्धीकडे लक्ष देऊ लागल्‍या.

    सन 2010 मध्‍ये अहमदनगरच्‍या जिल्‍हास्‍तरीय व नाशिक येथील विभागीय बचत गटाच्‍या प्रदर्शनात तसेच सन 2011 च्‍या व 2012 च्‍या अहमदनगर येथील विभागीय बचत गटाच्‍या प्रदर्शनात या गटाने सहभाग घेऊन मालाची विक्रमी विक्री केली.

    या बचत गटाच्‍या कार्याची दखल घेऊन या गटाचे व्दितीय मूल्‍यांकन झाले. गटाने लाकडी व्‍यवसाय, काथवट, पोळपट, रवी, लाकडी खेळणी, बेलणे, चाटू आदी उत्पादन सुरू केले. त्‍यासाठी जामखेड येथील स्‍टेट बँक ऑफ इंडियाकडे कर्ज प्रस्‍ताव सादर केला आहे. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्‍या या महिलांनी आपल्‍या कर्तृत्‍वावर या व्‍यवसायात बचत गटाच्‍या माध्‍यमातून गरुड झेप घेतली आहे.

    महिला आता ग्रामीण व शहरी विकासाच्‍या प्रक्रियेतही सहभागी होत आहेत. चूल आणि मूल एवढ्यापुरत्‍या मर्यादित न राहता महिला पुरुषांच्‍या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत.


  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • मानवी संस्‍कृतीचे ऐतिहासिक अवशेष

    भारतीय लोक एका महान संस्कृतीचे वाहक आहेत. आज असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायची असलेली व्यवस्था ही पुरातन आहे. ही संस्कृती मातृसत्ताक होती. या महान संस्कृतीचे अवशेष आजही मोहोजोंदाडो, हडप्पा याठिकाणी दिसतात.

    राजधानी दिल्लीत इंडिया गेटच्या जवळ राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे पाहिल्यावर महान भारतीय इतिहासाचा ठेवा जीवंत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दिल्लीतील माझे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय येथे आल्यावर मन हरपून जाते, ते इतिहासाच्या पानात !

    15 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय संग्रहालय स्थापित केले होते. नंतर संग्रहालयाकरिता नवीन इमारतीचे निर्माण करण्यात आली. याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने वास्तुंची मांडणी करण्यात आली. 18 डिसेंबर 1980 ला हे संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

    मध्य एशियाई पुरावशेष


    राष्ट्रीय संग्रहालयातील भारतीयेत्तर संकलनांमध्ये मध्य एशियाई कलांचे संकलन गुणवत्ता आणि परिणाम, दोन्ही दृष्टीने समृध्द आहे. या संकलामध्ये उत्कृष्ट भित्तीचित्र, रेशीम चित्रीत बैनर, काष्ठ आणि गच निर्मित मूर्ती तसेच मृण्मूर्ती, शिक्के, पोर्सीलेन, मृदभांड, सोने आणि चांदीचे मौल्यवान वस्तू, धार्मिक आणि लौकिक प्रकारचे दस्तावेज आहेत. या संकलनाला 20 व्या शतकातील अग्रण्य पुरातत्वक सर ऑरेल स्टाइनव्दारे 1900-1901, 1906-1908 आणि 1913-1916 च्या तीन प्रमुख अभियानामधील प्रमुख उत्खननात 800 वस्तु येथे ठेवल्या आहेत.

    तंजावर आणि म्हैसूरचे चित्र


    हे कक्ष तंजावर आणि म्हैसूर या जगप्रसिद्ध दोन शैलींकरिता आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. येथे पौराणिक कथा, महाकांव्याचे व्याख्यान विविध देवी-देवतांची 50 चित्र प्रदर्शित आहेत. जे दक्षिण भारतीय कलांचे पांरपारिक आणि अध्यात्मिकतेचे सुंदर समिश्रण प्रस्तुत करतात. सात वेगळया चित्रांनी तंजावूर शैलीची निर्मितीचे सुंदर चित्रणही येथे दिसते.

    काष्ठ उत्कीर्णन


    काष्ठ उत्कीर्ण कक्षात मुख्यत: इ.स. 17 ते 19 शतकातील भारतीय काष्ठ उत्कीर्ण पंरपरेला दाखविण्यात आले आहे. यामध्ये 16 कालाकृती आहेत. येथे राजस्थान, गुजरात, ओरिसा आणि दक्षिण भारताची अनेक काष्ठ उत्कीर्ण शैलींचे उदाहरण दिसते. सर्वाधिक महत्वपूर्ण कलाकृतींध्ये गुजरात मधील 17 वी शताब्दीचे सुक्ष्म उत्कीर्ण आणि चित्रित मंदिर मंडप आहे. येथे उत्कीर्णित रंगविलेले फलक, हस्तीदंताने जडलेला डबा, दैनिक उपयोगांच्या वस्तू, खिडक्या, दरवाजे, आणि कार्तिकेयचे वाहनाचे मोर येथे पाहण्यास मिळते. या कक्षातील प्राचीन कलाकृती म्हणजे 13 वी शताब्दीतील सुंदर उत्कीर्णित दरवाजा आणि स्तंभ जे कटरमल (जिल्हा अलमोड़ा उत्तराखंड) चे सूर्य मंदिर जे मध्यकालीन आहे.

    भारतीय वस्त्र


    दुस-या मजल्यावरील वस्त्र कक्षात मुगल काळातील भारतीय पारंपरिक वस्त्राचे सुंदर संकलन प्रदर्शित आहेत. इथे एकूण 134 रंगविलेले, हातकाम असलेले सुती, रेशमी, ऊनी वस्त्र ठेवलेली आहेत. यांना अलंकार पद्धतीने व्यवस्थीत प्रदर्शित ठेवलेले आहे. हातमांगानी तयार केलेले उत्कृष्ट चंदेरी, मध्य प्रदेशातील 17 वी शताब्दी चे कलात्मक डिजाइन ने छपील चित्रीत सूती आवरण आणि विभिन्न वस्त्रांना त्यांच्या विविध उपयोगांसह कक्षात ठेवण्यात आले आहे.

    पूर्व कोलंबियाई आणि पश्चिमी कला


    पूर्व कोलंबियाई आणि पश्चिमी कलांच्या संकलीत कलाकृतीमधील बहुतेक कला संयुक्त राज्य अमेरीकेतील श्रीमती आणि श्री नस्ली हीरामानेक यांनी उपहारस्वरूप दिली आहेत. या वास्तू इ.स़. 1492 च्या जवळपासच्या आहेत. जेव्हा भारत आणि दक्षिणी पूर्व एशियामध्ये समुद्र मार्गाने क्रिस्टोफर कोलंबस अजानता या क्षेत्रात पोहोचले. त्याकाळातील हे वास्तू आहेत. बहुतेक वास्तू मेक्सिको, पेरू, माया, इंका, अमेरिकच्या उत्तर-पश्चिमी किनारा, पनामा, कॉस्टारिका आणि अल सल्वाडोर ची आहे. या व्यतिरीक्त इंडोनेशिया, इराण, इराक, मिस्त्र, जर्मनी आणि फ्रांसचीही काही कलाकृती याठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. असे एकूण 252 कलाकृती येथे प्रदर्शित आहेत.

    वाद्ययंत्र


    संग्रहालयामध्ये वाद्ययंत्रांचे विशाल संग्रह आहे. यामध्ये जनजातीय आणि शास्त्रीय समूहाचे वाद्ययंत्र येथे आहेत. या प्रदर्शनीत ठेवलेली वाद्ययंत्रांमध्ये पद्यश्री शरण राणी बाकलीवाल यांच्याव्दारे 1980,1982, व 2003 मध्ये संग्रहालयात दानस्वरूपात दिली गेलेली वाद्य आहेत. 19 व्या शतकातील पश्चिम शैलीचे वाद्ययंत्रदेखील येथे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. येथे ठेवलेल्या तार वाद्ययंत्रांमध्ये विणा, सितार, संतूर थाप देऊन वाजविणा-या वाद्ययंत्रामध्ये तबला, ढोलक, फुंकुण देऊन वाजविणा-या वाद्ययंत्रामध्ये बासरी, तुरही असे वर्गीकृत करून ठेवण्यात आली आहे. यामध्ये एकूण 207 वाद्ययंत्र प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत.

    अस्त्र-शस्त्र आणि कवच


    संग्रहालयात भारतीय अस्त्र-शस्त्रांचे उत्कृष्ट संकलन आहे. यामध्ये अणकुचीदार शस्त्र, प्रक्षेपास्त्र, मानव आणि पशुंचे कवच, अलंकृत शस्त्र, आग्नेयस्त्र आणि युध्द संबंधी आतिरिक्त सामग्री प्रदर्शनार्थ ठेवलेली आहे. यामध्ये मुख्य रूपे मुगल अस्त्र-शस्त्र प्रदर्शित आहे. या व्यतीरीक्त मराठा, शिख, राजपूत आणि हिंदू राजे वापरीत असलेले अस्त्र-शस्त्र मांडण्यात आली आहेत. येथे दमिश्की काम, मीनाकारी, जाळीदारकाम, अथवा मौल्यवान रत्नांनी कोरलेले अंलकार असे एकून 500 कलाकृती प्रदर्शनात ठेवलेली आहेत.

    भारतीयांकरिता रूपये 10/- प्रति व्यक्ती तिकीट तर विदेशी पर्यटकांकरिता रूपये 300/- लागतात. छायाचित्र कॅमेरा असेल तर भारतीयांकरिता प्रतिव्यक्ती 20/- रूपये लागतात. आणि विदेशी पर्यटकांरिता रूपये 300 /- लागतात. याठिकाणी व्हिडियो कॅमे-याला अनुमती नाही. मंगळवार ते रविवारपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतची वेळ आहे.

    असे हे संग्राहालय इतिहासाची साक्ष देत भविष्याची बांधणी करण्यासाठी सर्वसामान्याकरिता उपलब्ध आहे. दिल्लीत आल्यावर या संग्रहालयाला जरूर भेट दयावी.

  • - अंजू निमसरकर कांबळे उपसंपादक, मपकें, नवी दिल्ली
  • Friday, June 29, 2012

    प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान


    चला,चालूया नवी वाट.......

    प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान - एक नवं माध्यम,नवा विचार,नवी दिशा,नवी आशा.

    हे स्पिरिट असेल कदाचित तुमच्यातही ! तेच शोधू या ! एकदा पाहा स्वत:च्या ’आत’ तिथे असेल कुणी एरवी सचिन असणारा सायना किंवा अमीर असणारा तुमच्या मनातला ’हिरो’ तुम्ही स्वत:च ! मान उंच करुन पाहावी अशी मोजकी माणसं दिसतील लांबवर.उचला त्यांच्या आयुष्याचं ’सार’ आणि व्हा पुढे .....
    गंज चढलाय जगण्यावर? सुचत नाहीये काही? सापडत नाहीये उत्तर? वैताग आलाय? राग आलाय? कशाचंच काहीच वाटत नाहीये? ढ गोळ्यासारख नुस्तं सडून चाललंय आयुष्य? , भिरकवा एक उंच दगड आकाशात, उठू देत नव्या लाटा, जाऊ दे वाहून सारा केरकचरा, काहीतरी करुया मस्त, भेटूया जिंदगीला पुन्हा नव्याने...येणार आमच्याबरोबर?

    प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान


    चला,चालूया नवी वाट.......

    प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान - एक नवं माध्यम,नवा विचार,नवी दिशा,नवी आशा.

    हे स्पिरिट असेल कदाचित तुमच्यातही ! तेच शोधू या ! एकदा पाहा स्वत:च्या ’आत’ तिथे असेल कुणी एरवी सचिन असणारा सायना किंवा अमीर असणारा तुमच्या मनातला ’हिरो’ तुम्ही स्वत:च ! मान उंच करुन पाहावी अशी मोजकी माणसं दिसतील लांबवर.उचला त्यांच्या आयुष्याचं ’सार’ आणि व्हा पुढे .....
    गंज चढलाय जगण्यावर? सुचत नाहीये काही? सापडत नाहीये उत्तर? वैताग आलाय? राग आलाय? कशाचंच काहीच वाटत नाहीये? ढ गोळ्यासारख नुस्तं सडून चाललंय आयुष्य? , भिरकवा एक उंच दगड आकाशात, उठू देत नव्या लाटा, जाऊ दे वाहून सारा केरकचरा, काहीतरी करुया मस्त, भेटूया जिंदगीला पुन्हा नव्याने...येणार आमच्याबरोबर?

    Thursday, June 28, 2012

    Wednesday, June 27, 2012

    नवी उभारी प्रशासनाची!

    मंत्रालयातील आग आता थंड झाली... कामकाजात हळूहळू वेग येवू लागला. आपत्ती नंतरचे व्यवस्थापन सुरु झाले. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्री नेहमीप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जोमाने सज्ज झाले, तसेच क्षेत्रीय स्तरावर देखील नव्याने संचिका तयार करण्याचे काम सुरु झाले.

    कोकण विभागात काल काही ठिकाणी मुद्दाम फेरफटका मारला. कोकण विभागाचे महसूल आयुक्त विजय नाहटा यांनी केलेल्या सूचना डोक्यात ठेवून तटस्थपणे पाहणी केली, आणि लक्षात आलं की, संचिका तयार करण्यासाठी तहसिल पातळीवर कसं गांभीर्याने काम सुरु आहे. पनवेल तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडण्‍यात आला आहे. त्याच पध्दतीने सर्व तालुक्यात व्यवस्था झाली आहे. रायगड जिल्हाधिकारी श्री.एच.के.जावळे आणि महसूल आयुक्त विजय नाहटा यांनी दिलेल्या सूचनेनुसार काम सुरु असल्याचं तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

    सर्वसाधारणपणे प्रशासनाला आपत्तीनंतर कराव्या लागणाऱ्या तातडीच्या कार्यवाहीचा सरावच झालेला असतो. लातूर भूकंपानंतर सारं प्रशासन लातूरला धावून गेलं. 26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबई एकवटली. आता मंत्रालयातल्या आगीनंतर जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणाच कामाला लागली. शासन पातळीवर करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात पुन्हा जुळवाजुळव करण्यासाठी जी पध्दत अवलंबिली जाते, त्यात शेवटचा घटक म्हणजे अर्जदार. त्याने अर्ज केला असेल तर त्याकडे असणारी पोच अथवा अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा तहसिल कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. तहसिल कार्यालयातून ही कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात येतील त्यानंतर विभागीय आयुक्त स्तरावर त्या त्या विभागांकडे सदरच्या संचिका पाठविल्या जातील. 23 जून,2012 रोजी शासनाने तातडीने आदेश काढला आणि संचिका कशा तऱ्हेने तयार कराव्या याविषयी स्वयं स्पष्ट सूचनादेखील केल्या. याच परिपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या विभागाच्या संचिका आगीत नुकसानग्रस्त झाल्या त्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय व इतर मंत्र्यांच्या कार्यालयात आदिवासी विकास, पर्यावरण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, राज्य उत्पादनशुल्क, अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री कार्यालयात गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम , सांस्कृतिक कार्य, उच्च व तंत्र शिक्षण, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन विभाग, मुख्य सचिवांचे कार्यालय यांचा समावेश आहे. केवळ याच विभागातील कार्यालयांनी संचिका नव्याने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाकडे पाठविलेली आणि अद्याप निर्णय न झालेली प्रकरणे यांची पुर्नबांधणी केवळ शासकीय स्तरावर नव्हे तर जनतेकडूनही केली जाणार आहे. या निमित्ताने शासन प्रशासन आणि जनतेमधला समन्वय मोठया प्रमाणावर दिसून येतोय हे विशेष.

    कोकण विभागात आयुक्त कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करुन रोज आढावा घेतला जातोय. उपायुक्त गोविंद बोडके यांच्याकडे तहसिल कार्यालयाकडून रोज ‘फिडबॅक’ येतोय. कोकण विभागाने फिडबॅकसाठी स्वतंत्र आकृतीबंध तयार केला आहे. यासाठी स्वतंत्र कक्षातून सुरु असलेल्या कामांची लगबग सहज जाणवते. आपत्ती आली परंतु तेवढयावर न थांबता प्रशासनाचं काम जनतेसाठी सुरु असल्याचं चित्र तालुका पातळीवर दिसतंय हे विशेष होय.

    संचिका सादर करताना नागरिकांना आर्थिक भुर्दंड होवू नये याची देखील काळजी शासनाने घेतली. 31 ऑगस्ट 2012 पर्यंत संचिका पुनर्बाधणीच्या अर्जासाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क घेवू नये असे आदेश काढले. नंतर मात्र 10 रुपये प्रती अर्जाप्रमाणे सेतू केंद्राला जमा करावे लागणार आहेत. एकूणच मंत्रालयात नष्ट झालेल्या संचिकांची पुनर्बाधणी तालुका स्तरावर अत्यंत शिस्तबध्द रितीने सुरु आहे.

    प्रशासकीय यंत्रणा केवळ चांगल्या वातावरणातच नव्हे तर आपत्ती काळातही जनतेसाठी काम करते हे यावरुन सहज दिसून येते आहे. कोकण विभागात संचिका पुनर्बांधणीचे काम ज्या गतीने आणि शिस्तबध्द रितीने सुरु आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावर शासनाप्रती असणारा जनतेचा विश्वासही दिसून येतो... नव्याने भरारी घेण्याचं आव्हान यंत्रणेनं स्विकारलंच आहे . जनताही साथ देतेय एवढंच या निमित्ताने......

  • डॉ.गणेश मुळे, उपसंचालक (माहिती), कोकण विभाग
  • शिस्त व संयमाचे दर्शन

    मुंबईतील मंत्रालय म्हणजे महाराष्ट्राचे सत्ता केंद्र.. तसेच देशाची आर्थिक राजधानी... पण मंत्रालयात गुरुवारी आगीची मोठी दुर्घटना घडली अन् साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे लागले. परंतु मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धैर्य, संयम आणि समयसुचकता व एकमेकांना सांभाळून घेण्याच्या वृत्तीने या आगीमध्ये कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही. मंत्रालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून हे वारंवार जाणवत तर होतेच.. त्याचबरोबर या संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्याची जिद्दही दिसून आली.

    आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महान्यूज टीमने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळेस पोलीसांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे कौतुक आणि सहकाऱ्यांच्या शिस्तीचे दर्शन घडल्याचे प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवले.

    पोलीसांच्या समयसूचकतेला सॅल्यूट


    आगीच्या वेळेस मंत्रालयातील पोलीसांनी केलेल्या कामाला माझा सॅल्यूट असे सांगून मंत्रालयात विद्युत विभागात काम करणारे शाखा अभियंता महेंद्रकुमार नेमा म्हणाले की, मंत्रालयात आग लागल्यानंतर सर्वप्रथम पोलीसांनीच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांना बाहेर काढण्याचे काम केले. वरच्या तीनही मजल्यावर पोलीस उपस्थित होते. त्यांच्यामुळेच अनेकजण सुखरुपपणे बाहेर पडले. आग लागल्याचे कळाल्यानंतर मी तातडीने आजूबाजूला पाहिले व प्रथम धावत जावून विजेचे कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळसही पोलीसांनी तातडीने मला मदत करून स्विच बंद केले. खरे तर त्यांच्यामुळेच मोठी हानी टळली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

    या घटनेबद्दल सांगताना मुख्य सचिवांच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात काम करणारे चोपदार दत्तात्रय गवळी व शिपाई विलास खाडे यांच्या डोळ्यासमोर ती घटना तरळून गेली. ते म्हणाले की, पावणे तीनच्या सुमारास खालच्या चौथ्या मजल्यावरून धूर येणास सुरूवात झाली. आम्ही कार्यालयातच होतो. स्वत: मुख्य सचिवसाहेबही कार्यालयात उपस्थित होते. धूर येत असल्याचे बघून आम्ही कार्यालयातील इतरांनाही त्याबद्दल सांगितले अन् धुराच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने धावू लागलो. या दरम्यान मुख्य सचिव साहेबांना दुर्घटनेची जाणीव झाली व तेही कार्यालयातून बाहेर पडले अन् आजूबाजूच्या कार्यालयातील लोकांना स्वतः बाहेर पडण्यास सांगत होते. आम्हीही लोकांना बाहेर पडण्यास सांगितले. वेळेवर सगळ्यांना सांगितल्याने त्या मजल्यावरील बहुतेकजण आग वाढण्याच्या आधीच मंत्रालयाच्या बाहेर पडले होते.

    मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गृहनिर्माण विभागातील कक्ष अधिकारी मोहन आरसेवाड हे त्या वेळेस पाचव्या मजल्यावर एका कामानिमित्त गेले होते. त्यांनाही तेथील पोलीसांनी `अरे आग लागली आहे इथे का बसलात बाहेर पडा` असे रागावून त्यांना बाहेर काढले. श्री. आरसेवाड म्हणाले की, पोलीसांनी एकदा सांगितल्यावर आम्ही दुर्लक्ष केले. परंतु जेव्हा त्यांनी रागावून बाहेर काढले अन् आम्ही समोरचे दृष्य बघितल्यावर मनोमन त्या पोलीसांचे आभार मानले. त्यांनी जर बाहेर काढले नसते तर काय झाले असते ते सांगता येत नाही.

    तिसऱ्या मजल्यावर विधी व न्याय विभागातील अवर सचिव वसुधा पत्की याही कामात व्यस्त होत्या. त्यावेळेस त्यांना त्यांचे सहकारी विवेक कांबळे यांनी मंत्रालयाला आग लागल्याचे सांगून बाहेर पडण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की, आग लागल्याचे समजल्यावर काय झाले ते बघण्यासाठी कक्षातून बाहेर पडले तर बाजूच्या जिन्यातून धूर येत होता. जवळ जाऊन पाहावे म्हणून गेले तर तेथील पोलीसांनी लगेच तेथून खाली जाण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही बाहेर पडलो तर त्या मजल्यावर इतरही सहकारी गडबडीने बाहेर पडत होते. संपूर्ण तिसरा मजला रिकामा झाला तरी तेथील पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य नीट बजावित होते. सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते पोलीस खाली आले.

    यंत्रणा असूनही प्रचंड धुरामुळे मालमत्तेचे नुकसान वाचवू शकलो नाही अशी खंत सार्वजनिक बांधकाम विभागातील मेशन भारत पालवी यांनी व्यक्त केली. मालमत्ता वाचवू शकलो नाही तरी लोकांना तातडीने बाहेर पडण्यास सांगून मोठ्या प्रमाणात होणारी जिवित हानी कमी करू शकलो याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

    आठशे खिडक्या... नऊशे दारे...


    खरे तर मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्या आगीत पाच जण मृत्युमुखी पडले, हे वाईटच झाले. तरी केवळ मंत्रालयाच्या रचनेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी जिवित हानी टळल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मंत्रालयाच्या इमारतीला सर्व बाजूनी मोठ्या आकारातील जिने आहेत. तसेच दरवाजे व खिडक्याही मोठ्या प्रमाणात आहेत. आग लागल्यानंतर मुख्य इमारतीतील सहाही मजल्यावरील सुमारे चार ते पाच हजार लोक हे वेगवेगळ्या जिन्यांनी एकाच वेळेस बाहेर पडत होते. जिने रुंद असल्यामुळे कोणतीही चेंगरा चेंगरी न होता एवढ्या प्रमाणात लोकांना बाहेर पडता आले. जुन्या इमारतीच्या या रचनेमुळे आगीत अथवा धुरामध्ये लोक अडकण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण अनेक कर्मचाऱ्यांनी आवर्जून नोंदविले. मंत्रालयाच्या या रचनेमुळे येथील कर्मचारी नेहमी मंत्रालयाचा उल्लेख आठशे खिडक्या.. नऊशे दारे.. असा करतात. हे विश्लेषण सार्थ असल्याचे या दुर्घटनेतून दिसून आले.

    जिन्याच्या रुंदपणामुळेच अनेकांची सुटका झाल्याचे नमूद करून पाचव्या मजल्यावरील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागातील सहायक रजनी रेणुसे म्हणाल्या, आग लागल्यानंतर सर्वच मजल्यावरील कर्मचारी एकाच वेळेस जिन्याने बाहेर पडत होते. कोणतीही धक्काबुक्की अथवा गर्दी न होता लोक एकमेकांना सहकार्य करत बाहेर पडत होते. त्या सर्वांना पोलीसांनी मार्गदर्शन केले. जिने रुंद असल्यामुळे एकाच वेळेस सर्वांना बाहेर पडता आले. या घटनेबद्दल सांगताना श्रीमती रेणुसे म्हणाल्या की, दुपारी काम सुरू असतानाच आमच्या कक्षाबाजूकडील फायर अलार्म वाजू लागला. काय झाले ते पहायला बाहेर आले तर धूर येत असल्याचे दिसले. त्याच वेळेस सामान्य प्रशासन विभागातील एक महिला कर्मचारी धुराच्या दिशेकडून धावत आमच्या दिशेने आल्या अन् आमच्या समोर येऊन बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ पाणी देऊन शुद्धीवर आणले आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्यांच्यासह कार्यालयातील सर्वजणांना सांगून लगेच बाहेर पडलो.

    आग लागल्यानंतर मंत्रालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवून पोलीसांना सहकार्य केल्यामुळे कोणतीही चेंगरा चेंगरी झाली नाही. अशा प्रसंगी चेंगराचेंगरी होऊ शकते. पण कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या संयमामुळे पोलीसांचे काम सोपे झाले व सर्व लोकांना बाहेर काढण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया मंत्रालयातील महिला पोलीस शिपायांनी दिली.

    पुन्हा नव्या जोमाने सुरूवात..


    मंत्रालय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. या दुर्घटनेमुळे संकट आले असले तरी आम्ही परत नव्या जोमाने अवघ्या तीन दिवसात कामाला सुरूवात केली आहे. कसलेही संकट आले तरी डगमगून न जाता आम्ही काम सुरू केले आहे. अडचणी आहेतच, परंतु त्यातूनही आम्ही मार्ग काढत आहोत. परत पहिल्याप्रमाणे काम सुरू होईल असा दुर्दम्य विश्वास श्रीमती पत्की आणि श्रीमती रेणुसे यांनी व्यक्त केला.

    सर्वच कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून या दुर्घटनेचे शल्य असले तरी या संकटाला तोंड देण्याचा आत्मविश्वास व्यक्त होत होता. त्यांच्या कामातूनही ते दिसून येत होते. कर्मचाऱ्यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि त्यांच्यातील शिस्त, संयमाला सलाम...

  • शब्दांकन - नंदकुमार वाघमारे

  • विश्वासाचे सामर्थ्य

    मंत्रालयातील अग्निप्रलयानंतर मंत्रालयाच्या जनताजनार्दन प्रवेशद्वारावर सुरु करण्यात आलेल्या विविध विभागांच्या संपर्क कक्षात नागरिकांची वर्दळ सुरु होती. शासनाने नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यास जनतेने सुरूवात केली आहे. राज्याच्या विविध भागांमधून लोक येथे येत आहेत.

    ठाणे जिल्हयातील एक 69 वर्षीय वयोवृध्द महिला पाय ओढत ओढत्‍ा शोधत होती सहकार विभागाचा संपर्क कक्ष. आपला अर्ज येथे नव्याने दिल्यानंतर आपल्याला लवकर न्याय मिळेल या आशेसह. बीड जिल्हयातील ऊसतोड कामगार संघटनेचा कार्यकर्ताही आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपले निवेदन घेवून सर्वांना भेटत होता.

    नंदुरबार जिल्हयातील एक आदिवासी कुटुंब. आपल्या जमिनीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससह नव्याने अर्ज दाखल करावयास आलेला. जमिनीची गेली 10 वर्ष सुरु असलेली फाईल आता अंतिम टप्प्यात होती. शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. लवकरच न्याय मिळेल अशी ग्वाही खुद मंत्री महोदयांनी दिलेली होती. पण या आगीत सगळं संपलं. आता काय? विचारानं घाबरलो होतो. समोर सगळा अंधार असतानाही शासनानं केलेल्‍या आवाहनाचं समजलं अन एक उमेद जाणवली. कुठलीही काळजी न करता थेट मंत्रालयात पोहोचलो. एकदा मंत्रालय सुरळीत सुरू झाले की आम्हाला ही न्याय मिळेल हा आशावाद श्री. गावित यांच्या बोलण्यात जाणवत होता. येथे येणारा प्रत्येकजण विवंचनेत होता. खरंच मंत्रालय पूर्ववत सुरू झाले आहे का? या अर्जाचे पुढे काय करणार? किती कालावधी लागेल असे नाना प्रश्न संबंधित संपर्क अधिका-यांना विचारले जात होते. हे अधिकारीही अतिशय शांतपणे या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यामुळे अर्ज जमा करेपर्यंत साशंक असणारा प्रत्येकजण ते दिल्यानंतर आपले काम होईल अशा खात्रीने परतत होता.

    या आगीच्या तांडवांनंतरही शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना न्याय देण्यासाठी कटिबध्द आहे. ही जमेची बाजूच आमचा शासनावरील विश्वास दृढ करीत आहे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया मंत्रालयात आलेल्या नागरिकांची आहे.

    शासनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शासनाला नियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करून सहकार्य केले तरच आपल्याला न्याय मिळू शकतो याची जाणीव सर्वसामान्यांना आहे. याची साक्षच या संपर्क कार्यालयांत जमा झालेल्या अर्ज, निवेदनांच्या माध्यमातून जाणवत होती. अवघ्या दीड दिवसात या कार्यालयांमध्ये चारहजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत

    आपली कर्मभूमी जळत असल्याचे बघताना अतोनात दु:ख झाले. पण या संकटातून आपल्याला बाहेर निघायचे आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे. हे लक्षात घेवून कक्षाची ही पर्वा न करता आम्ही काम करणारच आहोत असे कक्ष अधिकारी कापडणीस यांनी सांगितले. या घटनेनंतर तीन दिवसांत पूर्ववत सुरु झालेले मंत्रालय हे शासन, जनता आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांप्रती दाखविलेल्या दृढ विश्वासाचेच यश आहे. कोणत्याही आपत्तीला न डगमगता राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेली शपथ लक्षात ठेवूनच सुरु झालेली ही वाटचाल आणि त्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद नक्कीच प्रेरणादायी आहे.


  • मनीषा पिंगळे
  • पदवीधर मतदारांनो… असे करा मतदान

    महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक दि. 2 जुलै, 2012 रोजी होत आहे. सकाळी 8 ते 4 या वेळात मतदान करता येईल. सर्वसाधारणपणे या निवडणूकीसाठी मतदारांची ओळख पटावी यासाठी ग्राह्य पुरावे काय असावेत असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठीच ग्राह्य कागदपत्रांची माहिती येथे देत आहे.

    पासपोर्ट, वाहन चालविण्याचा पुरावा, आयकर विभागाकडील ओळखपत्र (पॅनकार्ड), केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था/सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्रे असलेली ओळखपत्रे, छायाचित्र असलेले बँकेचे/पोस्टाचे/किसान पासबुक, छायाचित्र असलेले स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र, सक्षम प्राधिका-याने अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्ग इत्यादींना दिलेले छायाचित्र असलेले जातीचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले छायाचित्र असलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शस्त्रास्त्र परवाना, एनआरईजीएस राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिलेले छायाचित्र असलेले जॉब कार्ड, छायाचित्र असलेले मालमत्ताबाबतचे कागदपत्रे तसेंच नोंदणीकृत करारपत्र इत्यादी, निवृत्त कर्मचा-यांचे छायाचित्र असलेले पेन्शन पासबुक/पेन्शन पेमेंट ऑर्डर/माजी सैनिक पेन्शन पासबुक/माजी सैनिक पत्नी, आरोग्य विमा योजने अंतर्गत छायाचित्र असलेले स्मार्टकार्ड, शिधापत्रिका इत्यादी वरील 14 पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा असणे आवश्यक आहे. यापैकी एक ग्राह्य पुरावा असल्यानंतर प्रत्यक्ष मतदान कसे करावे हा प्रश्न उभा राहतो, यासाठीच खालील काही सूचना...

    1. मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने पुरविलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. मतपत्रिकेबरोबर हे स्केच पेन तुम्हाला देण्यात येईल. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल,बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नका कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.

    2. उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीच्या उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर 1 असा आकडा लिहून मतदान करा. हा 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घाला.

    3. एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरी देखील 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घाला.

    4. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता, जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील. उदाहरणार्थ, दोन उमेदवार निवडणूक लढवत असतील आणि फक्त एकच उमेदवार निवडून द्यावयाचा असला तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर 1 ते 2 असे आकडे घालता येतील.

    5. उर्वरित उमेदवाराबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम अशा उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रम या स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार 2 इत्यादी आकडे घालून दर्शवा.

    6. कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा तुम्ही घातलेला आहे. याची खात्री करुन घ्या. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची देखील खात्री करुन घ्या.

    7. हा पसंतीक्रम फक्त 1,2 ..... इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नका.

    8. हे आकडे भारतीय अंकांच्या 1,2 ... इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II… इत्यादी सारख्या रोमन रुपात किंवा 1,2 अशा देवनारी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणा-या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.

    9. मतपत्रिकेवर तुमचे नांव लिहू नका किंवा अन्य शब्द लिहू नका, किंवा तुमची स्वाक्षरी या आद्याक्षरे करु नका. तसेच तुमच्या अंगठयाचा ठसा देखील उमटवू नका. यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल.

    10. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर  अशी किंवा X अशी खूण करणे पुरेसे होणार नाही. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. वर स्पष्ट केल्याप्रमाणे तुमचा पसंतीक्रम फक्त 1, 2 इत्यादी आकडयांमध्ये दर्शवा. आपला मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्यच आहे हे लक्षात ठेवा.

    11. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी तुम्ही उमेदवारांपैकी एका उमेदवारांसमोर 1 हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच तुम्ही तुमची दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवा अथवा दर्शवू नका.

    अवैध मतपत्रिका :-
    1. 1 हा आकडा घातलेला नसेल.
    2. 1 हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल.
    3. 1 हा आकडा तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे. याबाबत संदेह निर्माण
    होईल अशा प्रकारे घातलेला आहे.
    4. एकाच उमेदवाराच्या नावासमोर 1 आणि त्याबरोबर 2.. इत्यादी आकडे देखील घातलेले
    असतील.
    5. पसंतीक्रम आकडयांऐवजी शब्दांमध्ये दर्शविलेला असेल.
    6. मतदारांची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असेल.
    7. असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिका-याने दिलेल्या पेन व्यतिक्ति अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल तर अशी मतपत्रिका बाद ठरेल.

    निवडणूक भले कोणतीही असो मतदारांनी जागृत राहून मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे...



  • विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई
  • Monday, June 25, 2012

    कृष्णेचे पाणी... जतच्या शिवारात (भाग- पहिला)

    सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील डोर्ली या गावाजवळील बोगद्यामध्ये म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या आलेल्या पाण्याचे पूजन दिनांक १९ जून २०१२ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यास शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    या कार्यक्रमानंतर सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ - ताकारी प्रकल्प महाराष्ट्रात सर्वदूर ओळखला जावू लागला. जत तालुक्याच्या वेशीवर आज पाणी आल्यामुळे अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील अनेक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. अशा या लोकोपयोगी प्रकल्पाबद्दलची माहिती देत आहोत खास महान्यूजच्या वाचकांसाठी ...

    म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग आणि तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागाचा कायापालट होत असल्याचे चित्र या परिसरात दिसू लागले आहे. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यामुळे यंदा १६ हजार एकर क्षेत्रास लाभ झाला आहे. त्यातून ६५० कोटी रुपयांचे उत्पादन निघाले आहे. द्राक्ष व इतर पिकांमुळे दुष्काळी दैन्य हटल्याचे चित्र दिसत आहे.

    कायम टंचाईग्रस्त असलेल्या कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग आणि तासगाव पूर्व भागासाठी म्हैसाळ पाणी योजना जीवनदायी ठरली आहे. यंदाच्या भीषण टंचाई परिस्थितीत माणसांना जगणे मुश्किल झालेले असताना 'म्हैसाळ' चा लाभ क्षेत्रातील पाणी पोहचलेली गावे नदीकाठचे जीवन जगत असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांमध्ये शेती हिरवी दिसत आहे. पावसाळ्यापेक्षा जास्त क्षेत्र उन्हाळ्याच्या आणि टंचाईच्या काळात हिरवे झाले आहे.

    द्राक्षबागा जगल्या... उत्पन्न वाढले

    या टंचाईग्रस्त पट्‌ट्यात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठे आहे.तीन तालुक्यात म्हैसाळ योजनेचा लाभ झाल्यामुळे १६ हजार १५७ एकरातील द्राक्षबागा जगल्या आहेत. यामुळे सुमारे २ लाख ४२ हजार २५५ टन द्राक्षांचे उत्पादन निघाले आहे. दरवर्षी द्राक्षबागा जगविण्यासाठी कोट्यावधी रुपये टँकरवर खर्च होतात. यंदा हे पैसे वाचले आहेत. द्राक्षबागेतून ६०५ कोटी रुपयांचे उत्पादन निघाले आहे. टॅंकरचा खर्च वाचल्यामुळे निव्वळ उत्पन्नात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुष्काळ पडला की, द्राक्षबागा काढून टाकल्या जातात. म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये बागा काढल्याचे यंदा ऐकीवात नाही. यंदा बागा वाचल्या आहेतच. शिवाय पुढील वर्षीच्या खरड छाटणीसाठी या पाण्याचा उपयोग अत्यंत चांगल्या प्रकारे होणार आहे.

    द्राक्षाबरोबर हळद, डाळिंब, ऊस आणि भाजीपाला पिकासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. सुमारे १० हजार एकर क्षेत्रावरील या पिकांसाठी म्हैसाळच्या पाण्याचा लाभ झाला आहे. त्यातून सुमारे ४० कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.

    चारा मिळाला... जनावरे जगली

    टंचाई परिस्थितीत या तीनही तालुक्यात पशूधन जगविणे सर्वात मोठा प्रश्न झाला होता. दुष्काळी काळात जनावरे जगविण्यासाठी आवश्यक असलेला चारा म्हैसाळच्या पाण्यातून उपलब्ध झाला आहे. तीनही तालुक्यात सुमारे ६ हजार एकर क्षेत्रावर चारा लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारातील पशुधन वाचले आहे.

    मका, शाळू पिकाचा कडबा, कडवळ, हत्तीग्रास आदी चारा पिकांची लागवण करण्यात आली आहे. त्यामुळे तीन तालुक्यातील सुमारे ७५ हजार मोठी आणि सुमारे एक लाख छोट्या जनावरांच्या चाऱ्याची सोय झाली आहे. त्यामुळे चारा डेपोवरील ताण कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

    म्हैसाळ योजनेमुळे तलाव, बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातून वाहणाऱ्या अग्रणी नदीमध्ये पाणी वाहत असल्याचे चित्र बहुतांशी ठिकाणी दिसते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा तसेच नाले, ओढ्यातून पाणी असल्यामुळे त्या त्या भागातील शेतीस फायदा झाला आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी कालव्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत पंप, जनरेटर बसवून आणि सायफाव्दारे पाणी उचलून शेतीस नेले आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुहिक पध्दतीने पंप बसवून पाच किलोमीटरपर्यंत पाणी नेले आहे.

    म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेमुळे या तीनही तालुक्यातील जवळपास ५० पाझर तलाव, २५ लघु पाटबंधारे तलाव, व १५ मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडून सर्व तलाव भरुन घेण्यात आले. त्याशिवाय या तालुक्यातून वाहणाऱ्या अग्रणी नदीतही पाणी सोडल्यामुळे या नदीवरील १२ बंधारेही पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र दिसत आहेत.

    ताकारी - म्हैसाळ प्रकल्पाबाबतची अधिक सविस्तर माहिती वाचा पुढील भागात ...

    (क्रमशः)

  • दिलीप घाटगे, माहिती अधिकारी, सांगली
  • सेंद्रीय शेतीची नवलाई… कमी खर्च मोठी कमाई !

    आपल्या शेतात व परिसरात कचरा म्हणून जे-जे फेकले जाते त्या कचऱ्यातून खत निर्मिती करता येते. या सेंद्रीय खताद्वारे शेतीला नवसंजीवनी देता येते हे सिद्ध केले आहे बीड जिल्ह्यातील लोळदगावचे तरुण, जिद्दी शेतकरी शिवराम घोडके यांनी. या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने 'कृषी भूषण सेंद्रीय शेती' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

    श्री.घोडके यांना 'कृषी भूषण सेंद्रीय शेती' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथमत: त्यांचे अभिनंदन करुन त्यांना अगदी साधा प्रश्न केला, आपलं कुटुंब व शिक्षणाविषयी काय सांगाल ?

    आमचे कुटुंब तसे एकत्र पद्धतीने गुण्या-गोविंदाने नांदणारे. मी बीएसस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर मला न्युझीलंडच्या एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी प्राप्त झाली होती. परंतु ती मी नाकारली. कारण मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची इच्छा होती. वाढता खर्च, कमी उत्पादनामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहे. त्यामुळे या गरीब शेतकऱ्यांची सेवा करावी हीच माझी इच्छा असून या सर्व शेतकरी बांधवांना मी माझे कुटुंबीय मानतो.

    नोकरी न करता या क्षेत्राकडे का वळलात ? असा प्रश्न विचारला असता क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, रासायनिक खताचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते दिलेल्या धान्यापासून मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची मला माहिती होत गेली. त्याच वेळी शेतीत होणारे बदल सूक्ष्मपणे टिपण्याची मला सवय लागली. गेल्या १५-२० वर्षात आपली शेती किती बदलली हे पाहत असताना, शेतजमिनीचे झालेले नुकसान लक्षात आले. रासायनिक शेतजमिनीच्या पोतावरच परिणाम झाला असे नाही तर, जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत असल्याचे लक्षात आले. ट्रायकोडर्मासारखे बॅक्टेरिया शेतीतून हद्दपार होत आहेत आणि कीटकनाशकांमुळे मित्रकिड देखील संपुष्टात येत असल्याचे भीषण चित्र पाहून मला विचार करावयास भाग पडले. खऱ्या अर्थाने शेतीमध्ये बदल करावयाचे असतील तर सेंद्रीय व जैविक शेतीशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले. त्यातून पहिला प्रयोग २००३-०४ या वर्षात मी स्वत:च्या शेतात कापूस, गहू व उसासाठी केला.

    २००५ मध्ये मी ही पिके १०० टक्के सेंद्रीय खतावर घेणे सुरू केले. याचा परिणाम उत्साह वाढविण्यात झाला. उत्पादनाचा खर्च कमी होत असताना शेतीचे उत्पन्न वाढले. म्हणजेच 'कमी खर्च व मोठी कमाई, हीच सेंद्रीय शेतीची नवलाई' असे म्हणावे लागेल आणि सेंद्रीय शेतीचा हा विषय आपल्याबरोबरच साऱ्या परिसरात रुजला पाहिजे यासाठी काम सुरू केले. बायोडायनॅमीक डेपो तयार करण्यासाठी लागणारे सीपीपी (कामधेनु-सिद्धी ३) हे मी स्वत: तयार करुन बळीराजा कृषी विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना पुरवितो. याची माहिती आता राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील शेतकऱ्यांनाही झाली आहे. गेल्या ५-६ वर्षात परिसरात व राज्यात तब्बल २०-२५ हजार बायोडायनामिक डेपो उभारले गेले आहेत व त्याचा फायदाही चांगला होत आहे. त्यामुळे मी नोकरी न करण्याचा निर्णय पक्का केला.

    या सेंद्रीय खत प्रकल्पाबाबत आपला भविष्यातील कार्यक्रम काय असेल? या प्रश्नावर आपल्या शेतावर नजर टाकून ते परत बोलावयास लागले. आमच्या या सेंद्रीय खत डेपोला दररोज विविध भागातील किमान ५० ते १०० लोक भेट देतात. यामध्ये सामान्य शेतकऱ्यापासून अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. आजपर्यंत जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी सेंद्रीय खत बनविण्याचे मार्गदर्शन घेतले आहे.

    न्युझिलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी येथील अनेक संशोधक येथे येऊन गेले आहेत. भविष्यात कृषी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देऊन दरमहा २० हजार रुपये पगार देण्याचा संकल्प करून ते म्हणाले, हे खत मिळविण्यासाठी कोठे रांगा लावाव्या लागत नाहीत. सेंद्रीय खत म्हणजे काळ्या आईचं निरसं दूध. आपल्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या डोलणाऱ्या पिकाला ताकद देणारे. त्यामुळे सेंद्रीय शेतीला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. परंतु त्यासाठी गरज आहे ती या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार होण्याची...

  • राजू धोत्रे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, बीड
  • Friday, June 22, 2012

    आदिवासीबहुल यवतमाळला रोहयोचा आधार

    यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी विकासाच्या बाबतीत मात्र झपाट्याने अग्रेसर होत आहे. अनेक बाबींमध्ये जिल्ह्याने उल्लेखनिय कामे करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कुपोषणाच्या बाबतीत जिल्ह्याची प्रगती नेत्रदीपक आहे. उद्योगाच्या बाबतीतही जिल्ह्याने दहा हजारावर कोटींची गुंतवणूक प्राप्त करून उद्योग उभारणीसाठी जिल्हा अतिशय फायदेशीर असल्याचे दाखवून दिले आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विकास विषयक कामांमध्येही दखल घ्यावी इतकी चांगली कामगिरी जिल्ह्याने केली आहे. आता जिल्ह्याने रोजगार हमीच्या कामाने वेगळा ठसा निर्माण केला आहे.

    रोजगार हमी योजना ही राज्याने देशाला दिलेली योजना आहे. या योजनेचे महत्व आणि व्यापकता लक्षात घेता केंद्र शासनाने अतिशय मोठ्या प्रमाणावर ही योजना संपूर्ण देशभर लागू केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सध्या देशभर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची सोबतच विकासाची कामे होत आहे. देशात कुणीही रोजगाराविना राहू नये, प्रत्येकाला रोजगार मिळविण्याचा अधिकार असल्यानेच कल्याणकारी राज्याने प्रत्येकाच्या रोजगाराची व्यवस्था केली आहे. त्यामुळेच या योजनेने प्रत्येकाला रोजगाराची हमी दिलेली आहे. त्यानुसार देशासह संपुर्ण राज्यात गाव-खेड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मीतीच्या अनुषंगाने विकासाची कामे होत आहे.

    यवतमाळ हा आदिवासीबहुल, आत्महत्याग्रस्त जिल्हा असला तरी, या योजनेच्या अंमलबजावणीत मात्र जिल्ह्याने उच्चांक गाठला आहे. २०१०-११ मध्ये या योजनेतून जिल्ह्याने १० कोटींची रोजगार निर्मीतीची कामे केली होती. पुढल्यावर्षी म्हणजे २०११-१२ मध्ये या खर्चात तब्बल ७२ कोटीची भर पडली. यावर्षी जिल्ह्यात तब्बल ८३ कोटी रूपयांची कामे झाली. गेल्या वर्षातील मजुरांच्या उत्साहाने आणि प्रशासनाच्या योग्य नियोजनाचे चांगले काम झाल्याने यावर्षी यापेक्षाही चांगले काम करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्याचे चांगले परिणामही गेल्या दोन महिन्यातच पाहावयास मिळत आहे.

    सन२०१२-१३ या वर्षातील गेल्या दोन महिन्यात जिल्ह्याला रोजगार हमीच्या कामासाठी १६ कोटी ७५ लाख रूपये मिळाले. यापैकी केवळ दोनच महिन्यात जिल्ह्याने १२ कोटी ७५ लाख ५० हजार रूपये इतक मोठी रक्कम खर्च केली आहे. जिल्ह्यात मजुरांचे प्रमाण जास्त आहे. मजुरांची होणारी मागणी पाहता तब्बल ४ हजार ३९ इतकी विविध प्रकारची कामे जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या कामांमधून ४६ हजार ४२३ इतक्या मजुरांना मजुरी उपलब्ध होऊ शकते. प्रत्यक्षात ३४ हजार ६७० मजुर प्रत्यक्षात विविध कामांवर उपस्थित आहे. उर्वरित रक्कमही या महिन्याच्या मध्यातच खर्च होणार आहे.

    सुरू कामांध्ये जलसंवर्धनाची २ हजार ३४१, वनीकरण १ हजार २७०, रोपवाटीका १४९, पाटबंधारे १६, रस्ते १७२ तर इतर ९१ कामांचा समावेश आहे. रोहयोच्या कामांवर मजुरांची फारच कमी उपस्थिती राहत असल्याची नेहमीच तक्रार असते मात्र यवतमाळ जिल्ह्याने या सर्वच अडचणींवर मात करत योग्य नियोजन आणि अंमलबजावणीने रोहयोच्या कामांत हा उच्चांक गाठला आहे. इतकेच नव्हे तर मजुरांची उपस्थिती आणि त्यांच्याकडून होणारी संभाव्य मागणी पाहता तब्बल ९ हजार ६०० पेक्षा जास्त कामे शेल्फवरही ठेवण्यात आली आहे. या कामांमधून १६ हजारावर मजुरांना मजुरी उपलब्ध होणार आहे.

    रोहयोतून केवळ मजुरी उपलब्ध करून देणे हा एवढा एकच उद्देश नसून ठिकठिकाणी ग्रामीण भागात रोजगारासोबतच विकासाची छोटी-मोठी कामे करण्यावरही भर देण्यात येत आहे. त्यामुळेच जलसंवर्धनासारखा महत्वाचा विषयही या योजनेतून हाताळला जात आहे. यावर्षी आजमितीस जिल्ह्यात जलसंवर्धनाची ९७ कामे सुरू आहे. कृषी आणि वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर या योजनेतून होत असल्याने पाणी समस्येवर मात करण्यासाठी फार मोठे कार्य यातून होत आहे.

    पर्यावरणाच्या संतुलनासाठी झाडे जगवीणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड होणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळेच यावर्षात वनीकरण व रोपवाटीकेची कामेही मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली आहे. सन २०१२-२०१७ या पंचवार्षिक योजने दरम्यान राज्यात ५०० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्ठानुसार जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात रोजगार हमी योजनेतून ६.२० कोटी वृक्षांच्या लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मीती करावी लागणार असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ७३१ नर्सरी सुरू करण्यात आल्या आहे. नर्सरीच्या या कामांमधूनही ग्रामीणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे.

    रोजगार हमी योजना ही ग्रामीणांच्या हक्काची, हक्काने काम मिळवून देणारी योजना ठरली आहे. यी योजना जिल्ह्याच्या गाव-खेड्यात मोठ्या प्रमाणावर मजूर, रोजंदारी कामगार तसेच शेतकऱ्यांना आर्थीक पाठबळ देणारी ठरली आहे.

  • मंगेश वरकड प्र.जिल्हा माहिती अधिकारी जि. मा. का.,यवतमाळ
  • Thursday, June 21, 2012

    पुनर्वसनामुळे मेळघाटामध्ये उगवली सोनेरी पहाट

    जंगल वाचवायचे असेल तर मानव, वन्यजीव संघर्ष टाळणे गरजेचे आहे. जंगलावर वाढणारा अधिभार कमी होण्यासाठी जंगलातील गावांचे पुनर्वसन आवश्यक ठरते. यासाठी विदर्भाचाच नव्हे तर राज्याचा गौरव ठरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने पुढाकार घेत आजवर सात गावांचे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसनानंतर आदिवासींच्या आयुष्यासह जंगलातही झालेले बदल सकारात्मक असून गावांच्या पुनर्वसनाबाबत निसर्गप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे.

    घाटांचा मेळ, अद्वितीय निसर्गसौंदर्य, जैवविविधता लाभलेल्या मेळघाटात जळणासाठी लाकूडतोड, जनावरांची चराई व्हायची. अधूनमधून वन्यजीव व मानव यांचा संघर्षही घडायचा. जंगलांचे संवर्धन व आदिवासींना विकासधारेशी जोडण्यासाठी राज्य शासनाने मेळघाटातील बोरी गावाचे प्रायोगिक तत्वावर पुनर्वसन करुन मग टप्याटप्याने इतरही गावांचे पुनर्वसन सुरू केले. त्यासाठी पुनर्वसन समितीचे गठण केले. या समितीने सभा घेऊन पुनर्वसनासाठी आदिवासींचे मत परिवर्तन केले. मेळघाटातील वान अभयारण्यात सात गावे अतिसंरक्षित क्षेत्रांतर्गत येतात. पूर्वी बोरी, कोहा, कुंड गावांचे यापूर्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. आता अमोना, नागरतास, बारुखेडा या गावाच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

    अमोनातून ७९, नागरतासमधील ६६ तर बारुखेड्यातील २३६ कोरकू, गवळी, राठीया कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. या मोहिमेतून सातपुड्याच्या दक्षिण पायथ्याची २०० हेक्टर शेतजमीन मुक्त झाली. आज पुनर्वसनानंतर बारुखेडा व नागरतास आदर्श ठरत आहेत. वारी धरणाच्या निर्मितीसाठी अभियंता, कामगार व मजूरांच्या वास्तव्यासाठी ८५ घरांची वसाहत निर्माण केली होती. धरण निर्मितीच्या सहा वर्षात येथे निवासानंतर सर्व गावी परतले. अनेक वर्ष ही घरे रिकामीच होती. नागरतासचे याच वसाहतीत पुनर्वसन केले. रिकाम्या घरांचा पुनर्वापर होऊन अत्यल्प किंमतीत आदिवासींना पक्की घरे मिळाली. अकोट तालुक्यातील वारी भैरवगडजवळ नागरतास व बारुखेडा हे गाव आज दिमाखात उभे आहे. वन विभाग आणि प्रशासन टप्याटप्याने शाळा, मंदिर, दिवे, स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्था, स्मशानभूमी, पिण्याचे पाणी, बाजारहाट आदी सुविधा पुरवित आहे.

    शासनाकडून मिळालेल्या दहा लाखाच्या रकमेतून अनेकांनी शेतजमीन घेऊन शेतीला सुरूवात केली आहे. अगदी किरकोळ कारणांसाठी पायपीट करणाऱ्या आदिवासींची मुले ऑटोरिक्षाने कॉन्व्हेंटमध्ये जात आहेत. या पुनर्वसनासाठी क्षेत्र संचालक ए.के.मिश्रा, तत्कालीन उपवनसंरक्षक एम.एस.रेड्डी, सध्याचे उपवनसंरक्षक विजय गोडबोले, सहायक उपवनसंरक्षक श्री.गोस्वामी, वनपरिक्षेत्र अधिकारी जी.डी.देशमुख, एस.एन.सुरजुसे, वनरक्षक के.डी.देशमुख, तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी, महसूल अधिकाऱ्यांसह सुधीर राठोड, सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे यांचा पाठपुरावा, पदाधिकारी विशाल बनसोड, अमोल सावंत आदींनी पुढाकार घेतला.

    पुनर्वसनानंतर पूर्वीच्या नागरतास, बारुखेडा व अमोना परिसरात वन विभागाने विविध गवत प्रजातीची लागवड केल्याने तृणभक्षींना आकर्षित करणाऱ्या गवताळ मैदानांची निर्मिती झाली असून, या भागात वन्यजीवांची वर्दळ वाढली आहे. पुनर्वसनानंतर आदिवासी आणि जंगल दोघांनाही लाभ झाला आहे. पुनर्वसित गावांमध्ये मुलांचे बे एक बे चे पाढे तर जंगलात पक्ष्यांचा कलरव सुरू झाला आहे. भयाचा काळा अंधार दूर सारुन मेळघाटात सोनेरी पहाट उगवते आहे.

    पुनर्वसनानंतर काही आदिवासींशी संवाद साधला असता नागरतासच्या सरिता अनिल गवते यांनी आज आम्हाला वीज, रस्ते आणि पाणी मिळाल्याने आमचे जीवनमान बदल्याचे सांगितले. दानापूर येथील कॉन्व्हेंटमध्ये माझी मुले शिकत आहेत, त्यांचे भविष्य आता सुधारेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

    जंगलात राहत असताना हाताला फारसे काम मिळत नव्हते, मात्र पुनर्वसनानंतर मी चार एकर शेत मक्त्याने घेतले असून, मला रोजगार उपलब्ध झाला आहे. यासह अनेक सकारात्मक बदल आयुष्यात घडल्याचे अनिल गवते सांगतात.

    दळणासाठी १५ ते २० किलोमीटरची पायपीट आज थांबली असून, अनेक सुविधा घरापर्यंत पोचल्याने आमचे जीवन खूप सुधारल्याचे मत नमाय बळीराम गवते या महिलेने व्यक्त केले. आज प्रवासासाठी बस, ऑटोरिक्षा सहज उपलब्ध होतात. मुलांसाठी शाळा, हाताला काम मिळाले आहे. आम्ही चार एकर शेत घेतले असून, त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तुरीचे चांगले पीक येत असल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होतो.

    सेंद्रीय शेतीची नवलाई… कमी खर्च मोठी कमाई !

    आपल्या शेतात व परिसरात कचरा म्हणून जे-जे फेकले जाते त्या कचऱ्यातून खत निर्मिती करता येते. या सेंद्रीय खताद्वारे शेतीला नवसंजीवनी देता येते हे सिद्ध केले आहे बीड जिल्ह्यातील लोळदगावचे तरुण, जिद्दी शेतकरी शिवराम घोडके यांनी. या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने 'कृषी भूषण सेंद्रीय शेती' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

    श्री.घोडके यांना 'कृषी भूषण सेंद्रीय शेती' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथमत: त्यांचे अभिनंदन करुन त्यांना अगदी साधा प्रश्न केला, आपलं कुटुंब व शिक्षणाविषयी काय सांगाल ?

    आमचे कुटुंब तसे एकत्र पद्धतीने गुण्या-गोविंदाने नांदणारे. मी बीएसस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर मला न्युझीलंडच्या एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी प्राप्त झाली होती. परंतु ती मी नाकारली. कारण मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची इच्छा होती. वाढता खर्च, कमी उत्पादनामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहे. त्यामुळे या गरीब शेतकऱ्यांची सेवा करावी हीच माझी इच्छा असून या सर्व शेतकरी बांधवांना मी माझे कुटुंबीय मानतो.

    नोकरी न करता या क्षेत्राकडे का वळलात ? असा प्रश्न विचारला असता क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, रासायनिक खताचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते दिलेल्या धान्यापासून मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची मला माहिती होत गेली. त्याच वेळी शेतीत होणारे बदल सूक्ष्मपणे टिपण्याची मला सवय लागली. गेल्या १५-२० वर्षात आपली शेती किती बदलली हे पाहत असताना, शेतजमिनीचे झालेले नुकसान लक्षात आले. रासायनिक शेतजमिनीच्या पोतावरच परिणाम झाला असे नाही तर, जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत असल्याचे लक्षात आले. ट्रायकोडर्मासारखे बॅक्टेरिया शेतीतून हद्दपार होत आहेत आणि कीटकनाशकांमुळे मित्रकिड देखील संपुष्टात येत असल्याचे भीषण चित्र पाहून मला विचार करावयास भाग पडले. खऱ्या अर्थाने शेतीमध्ये बदल करावयाचे असतील तर सेंद्रीय व जैविक शेतीशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले. त्यातून पहिला प्रयोग २००३-०४ या वर्षात मी स्वत:च्या शेतात कापूस, गहू व उसासाठी केला.

    २००५ मध्ये मी ही पिके १०० टक्के सेंद्रीय खतावर घेणे सुरू केले. याचा परिणाम उत्साह वाढविण्यात झाला. उत्पादनाचा खर्च कमी होत असताना शेतीचे उत्पन्न वाढले. म्हणजेच 'कमी खर्च व मोठी कमाई, हीच सेंद्रीय शेतीची नवलाई' असे म्हणावे लागेल आणि सेंद्रीय शेतीचा हा विषय आपल्याबरोबरच साऱ्या परिसरात रुजला पाहिजे यासाठी काम सुरू केले. बायोडायनॅमीक डेपो तयार करण्यासाठी लागणारे सीपीपी (कामधेनु-सिद्धी ३) हे मी स्वत: तयार करुन बळीराजा कृषी विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना पुरवितो. याची माहिती आता राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील शेतकऱ्यांनाही झाली आहे. गेल्या ५-६ वर्षात परिसरात व राज्यात तब्बल २०-२५ हजार बायोडायनामिक डेपो उभारले गेले आहेत व त्याचा फायदाही चांगला होत आहे. त्यामुळे मी नोकरी न करण्याचा निर्णय पक्का केला.

    या सेंद्रीय खत प्रकल्पाबाबत आपला भविष्यातील कार्यक्रम काय असेल? या प्रश्नावर आपल्या शेतावर नजर टाकून ते परत बोलावयास लागले. आमच्या या सेंद्रीय खत डेपोला दररोज विविध भागातील किमान ५० ते १०० लोक भेट देतात. यामध्ये सामान्य शेतकऱ्यापासून अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. आजपर्यंत जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी सेंद्रीय खत बनविण्याचे मार्गदर्शन घेतले आहे.

    न्युझिलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी येथील अनेक संशोधक येथे येऊन गेले आहेत. भविष्यात कृषी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देऊन दरमहा २० हजार रुपये पगार देण्याचा संकल्प करून ते म्हणाले, हे खत मिळविण्यासाठी कोठे रांगा लावाव्या लागत नाहीत. सेंद्रीय खत म्हणजे काळ्या आईचं निरसं दूध. आपल्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या डोलणाऱ्या पिकाला ताकद देणारे. त्यामुळे सेंद्रीय शेतीला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. परंतु त्यासाठी गरज आहे ती या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार होण्याची...

  • राजू धोत्रे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, बीड
  • गायींच्या योग्य संगोपनातून मिळतेय प्रतिदिनी १०० लिटर दूध

    सांगली जिल्ह्यातील डोंगर कपारीत असलेल्या सुरूल गावातील श्रीमती शारदा माणिक पाटील या नववी शिकलेल्या शेतकरी महिलेने शासनाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादनात आदर्श निर्माण केला आहे. शेतमजुरी करून प्रसंगी पोटाला चिमटा काढून, रात्रीचा दिवस करून त्यांनी ८१ गुंठे डोंगर उताराची जमीनही खरेदी केली असून तीही बहरली आहे.

    शासनाच्या जवाहर योजनेतून विहीर मिळाली आणि आता शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेतून त्यांना कायमस्वरुपी हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी शारदा पाटील या महिलेची ही यशोगाथा.

    सुरूल हे एक डोंगराळ गाव. या परिसरात पाऊस पडला तरच चारा आणि धान्य उत्पादन होते. बहुतांशी जमिनी खडकाळच. सभोवती डोंगर असणारे हे गाव तुटपुंज्या उत्पन्नाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावापासून तीन किलोमीटर पश्चिमेला आणि मुख्य रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर आत शारदा पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेतून गायींचा गोठा विकसित केला आहे.

    सन २००६ पर्यंत श्रीमती पाटील व त्यांचे पती मोलमजुरी करीत होते. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचा मुलगा लष्करी सेवेत आहे. पै-पैची बचत करीत त्यांनी ८१ गुंठे जमीन खरेदी केली. माणिक पाटील यांच्या बरोबरीने शारदा त्यासाठी अव्याहतपणे राबल्या. प्रचंड कष्टानंतर शेतात फुललेले पीक त्यांच्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन देणारे ठरले. खरेदी केलेली जमीन गावात पहिल्यांदाच माणिक पाटील यांनी आपल्या पत्नीच्या नावे केली. हा निर्णय इतरांसमोर आदर्श ठरला. केवळ एवढ्यावरच न थांबता पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे विस्तार अधिकारी डॉ.व्ही.टी.देशमुख यांच्या प्रयत्नाने पशुसंवर्धन विभागाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेसाठी त्यांनी प्रस्ताव दिला. त्यासाठी ढीगभर प्रस्ताव होते. मग जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रॉ पद्धतीने लाभार्थी निवडले गेले. त्यातून श्रीमती पाटील यांना लागलेली लॉटरी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.

    या योजनेअंतर्गत गायी खरेदीसाठी तीन लाख ४३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यापैकी ५० टक्के अनुदान पशुसंवर्धन विभागामार्फत मिळते. विस्तार अधिकारी डॉ.देशमुख यांनी सातत्याने डोंगरकपारीचा रस्ता तुडवत पाटील यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. पाटील यांनी कर्नाटकातून सहा संकरित गायी खरेदी केल्या आहेत. त्यापैकी चौघींना कालवडी झाल्या आहेत. पाटील यांना लागलेली ही दुसरी लॉटरी ठरली. त्याद्वारे पाटील यांना सध्या प्रतिदिनी १०० लिटर दूध उपलब्ध होत आहे. शेतातील पिकाचा वापर प्रामुख्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जात आहे. डॉ.देशमुख यांनी त्यांना विशेष बाब म्हणून शंभर टक्के अनुदानावर आफ्रिकन टॉलचे बियाणे दिले आहे. तो प्लॉटही बहरला आहे.

    वैरण टंचाईच्या काळात हा चारा प्रमुख आधार ठरत आहे. २० फूट लांब व १० फूट रुंदीचे एक, २० फूट लांब व १४ फूट रुंदीचे दुसरे शेड या योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहे. स्वखर्चातून १४ फूट रुंद व ४० फूट लांबीचे शेड श्रीमती पाटील नव्याने उभारणार आहेत. दूध उत्पादनाचा पसारा वाढवण्याचा तसेच स्वतंत्र दूध संकलन केंद्र निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. पाटील दाम्पत्य कोणत्याही कष्टासाठी सज्ज आहे. रोजच्या रोज गायींना आंघोळ घातली जाते. गोठ्यालगतच असणाऱ्या शेतातून पाटील दाम्पत्य वैरण उपलब्ध करते. कापलेली वैरण चापकटरद्वारे श्रीमती पाटील स्वत: बारीक करतात. धष्टपुष्ट गायी आणि दर्जेदार दूध उत्पादनासाठी ओल्या-सुक्या चाऱ्याचा पुरेसा पुरवठा आणि पोषण आहाराची योग्य ती मात्रा गायींना दिली जाते. कालवडींना प्रत्येकी पाच लिटर दूध प्रतिदिनी दिले जाते. गायींची धार शारदा पाटील स्वत: काढतात. राजारामबापू दूध संघाची गाडी वाकडी वाट करून दूध नेण्यासाठी त्यांच्या गोठ्यावर पोहोचते.

    इस्लामपूर येथील 'आयडीबीआय' बँकेनेही श्रीमती पाटील यांना अर्थसहाय्य केले आहे. उत्पादनातून प्रतिदिनी सध्या सर्व खर्च जाता ही महिला सरासरी दोन हजार रूपये मिळवित आहे. एवढ्या सगळ्या उलाढालीत केवळ हे जोडपे पूर्ण क्षमतेने घाम गाळत आहे. डोंगरी भाग असूनही शारदा पाटील आणि त्यांच्या पतींनी फुलवलेली शेती आणि बहरलेला त्यांचा गायीचा गोठा संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरला आहे.

  • दिलीप घाटगे, सांगली
  • मानवी संस्‍कृतीचे ऐतिहासिक अवशेष

    भारतीय लोक एका महान संस्कृतीचे वाहक आहेत. आज असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायची असलेली व्यवस्था ही पुरातन आहे. ही संस्कृती मातृसत्ताक होती. या महान संस्कृतीचे अवशेष आजही मोहोजोंदाडो, हडप्पा याठिकाणी दिसतात.

    राजधानी दिल्लीत इंडिया गेटच्या जवळ राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे पाहिल्यावर महान भारतीय इतिहासाचा ठेवा जीवंत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दिल्लीतील माझे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय येथे आल्यावर मन हरपून जाते, ते इतिहासाच्या पानात !

    १५ ऑगस्ट १९४९ ला राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय संग्रहालय स्थापित केले होते. नंतर संग्रहालयाकरिता नवीन इमारतीचे निर्माण करण्यात आली. याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने वास्तुंची मांडणी करण्यात आली. १८ डिसेंबर १९८० ला हे संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

    भारतीय लघुचित्र

    लघु चित्राकरिता आरक्षित कक्ष बघतांना आजची जी विकसित झालेली चित्रकला, ज्याने भारताला एम.एफ.हुसेन सारखे महान चित्रकार दिले त्याचा इतिहासाशी कसा संबंध आहे हे लक्षात येते. या कक्षात ई.स. १००० पासून तर १९०० व्या शतकापर्यंतच्या उत्कृष्ठ लघुचित्रांचे प्रदर्शन येथे दिसते. त्यामध्ये मुगल, दख्खन, मध्य भारतीय, राजस्थानी, पहाड़ी तसेच उपशैलींचे चित्र आहेत.

    हे चित्र ताडपत्र, कापड, काष्ठ व चामडयावर चित्रित आहेत. या चित्रांमध्ये मुख्यत: जैन कल्पसूत्र, रामायण, महाभारत, महाकाव्य, भागवतपुराण, दुर्गासप्तशी, जयदेव रचित गीत-गोविंद, रागमाला, बारामासा, पंचतंत्र आणि विष्णूपूराण तसेच शाहनामा आणि बाबरनामा असे इस्लामिक पांडुलिपी देखील पाहायला मिळतात. या विशाल ठेव्यात मध्यकालीन राजांचे शासकांचे आणि संताची रूपचित्रही आहेत. येथे ३५२ चित्र प्रदर्शित करण्यात आली आहेत.

    भारतीय लिपी आणि शिक्क्यांचा विकास

    या भागात २६ मोठ्या-मोठ्या सुप्रकाशित काचेच्या पारदर्शक प्रदर्शनीत लिपी तसेच शिक्क्यांचा इतिहास दर्शविण्यात आला आहे. यामध्ये सुरूवातीच्या काळात कशा प्रकारची नाणी होती, काळाच्या ओघात त्यात होत गेलेला बदल, कश्या पद्धतीचा आहे, हे लक्षात येते. तसेच लिपीची तालिका बघते वेळी ‘ल’, ‘क’ ‘म’ या व इतर शब्दाचा झालेला जन्म आपल्या लक्षात येतो.

    सुसज्ज कला दर्शनी

    याकरिता दोन कक्ष आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामधील एका कक्षाचे सध्या नुतनीकरण सुरू असल्यामुळे ते बघता येत नाही. दुस-या कक्षात ३०४ दर्शनी सुसज्ज कला, जे मुगल काळापश्चातची १७ वी शताब्दीपासूनची भौतिक संस्कृती उद्कृत करते. विविध अंलकारणात्मकरितीने सुसज्जित हस्तनिर्मित कलाकृतींचे काष्ठ, कांच, सिरामिक, यशब, हस्तीदंत तसेच विविध धातुंनी ही बनलेली आहेत. बारकाईने उत्कीर्णित काष्ठनिर्मित रंगवेलेला मोर, पक्षीच्या आकाराचा चांदीचा हुक्का, चांदीचा इत्रदान, बिदरीचा काँडल स्टँड, संगमरमरने सजवलेली तश्तरी, रंगविलेल्या काचेचा कटोरा, हस्तदंतावर अंकित बुद्धांचे जीवन-दृश्य, हस्तदंत निर्मित मंदिर, यशबचे भांडे, सिरामिकच्या वस्तू, टाईल्स, हस्तीदंतांने आणि बहुमुल्य रत्नांनी निर्मित बुध्दीबळ त्यातील मोहरे, हे प्रदर्शित केली आहेत.

    पांडुलिपी (नवीनीकरणाधीन)

    राष्ट्रीय संग्रहालयात विविध भाषेतील आणि लिपीतील अनेक पांडुलिपी येथे उपलब्ध आहे. या पांडुलिपी चर्मपत्र, भूर्जपत्र, ताड़पत्र, कापड, कागद, धातू इत्यादीची आहेत. सुंदर चित्रे, आणि रोशनाईमुळे या पांडुलिपीचे सौदर्य आणखी उठून दिसते. दिनांकित पांडुलिपीमुळे भारतीय इतिहासाचे प्रमाणिक साक्ष मिळते.

    सर्व प्रकारचे रहस्यात्मक ज्ञानांने परिपूर्ण भारतीय मूळची असलेली ही पांडुलिपी जेथे विविध आकारांचे पट्टचित्र, ताडपत्रांवर विभिन्न शैलींचे लेखन, रंगीन कागदांची पृष्ठभूमीवर स्वर्णीम अक्षरांनी आणि भूर्जपत्रांच्या नैसर्गिक प्रकाशामुळे पाहणा-या दर्शकांना आकृष्ट करते. तसेच शाही राज नाण्यांनी मोहरांनी(स्टॅम्प) युक्त दिनांकित अरबी पांडुलीपी इस्लामी जगत आणि इतिहासकरांच्या आठवणी जाग्या करते. प्रदर्शित पवित्र कुराण, शाही फरमान आणि अन्य सचित्र पांडुलिपी दर्शनीय आहे.

    ही सर्व पांडुलिपी भारतीय उपमहाव्दीपातील विभिन्न धर्मांचे आणि संप्रदायांचे प्रतिनिधीत्व करतांना दिसते. यामध्ये ७ वी ते १९ वी शताब्दीपर्यंतची एकूण १५०० पांडुलिपि प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. ज्याचे कार्य सध्या नवीनीकरणाधीन आहे.

    (क्रमशः)


  • अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक,
    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
  • मानवी संस्‍कृतीचे ऐतिहासिक अवशेष

    भारतीय लोक एका महान संस्कृतीचे वाहक आहेत. आज असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाची असलेली व्यवस्था ही पुरातन आहे. ही संस्कृती मातृसत्ताक होती. या महान संस्कृतीचे अवशेष आजही मोहोजोंदाडो, हडप्पा याठिकाणी दिसतात.

    राजधानी दिल्लीत इंडिया गेटच्या जवळ राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे पाहिल्यावर महान भारतीय इतिहासाचा ठेवा जीवंत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दिल्लीतील माझे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय येथे आल्यावर मन हरपून जाते, ते इतिहासाच्या पानात !

    येथे वेगवेगळे भाग केले आहेत. तळ मजल्यावर अनेक कक्ष करण्यात आले असून यामधील एका कक्षात मोहोनजोदाडो, हडप्पा, मौर्य, शुंग, सातवाहन वंशाच्या कलांचे अवशेष आहेत. दुस-या कक्षात कुषाणकालीन अवशेष आहेत. ज्यामध्ये गांधार, मथुरा, कलांचे नमुने आहेत. गुप्त कालीन कला, गुप्त कालीन मृण्मूर्ती (दगडाला कोरून बनविलेली मुर्ती) तसेच प्रारंभिक मध्यकालीन कला, कांस्य प्रतिमा, बौध्द कला, भारतीय लघु चित्रकला, भारतीय लिपी व शिक्क्यांची प्रदर्शनी, सुसज्ज कला भाग एक व दोन हे तळमजल्यावर आहेत.

    दुस-या मजल्यावर सुसज्ज कला व वस्त्र, पूर्व कोलंबियाई कला, पश्चिमी कला, ताम्रपत्र, काष्ठ उत्कीर्णन (बारीक कोरीव काम) भाग एक व दोन वाद्ययंत्र, जनजातीय जीवन शैली, अस्त्र शस्त्र व कवच आदी प्रदर्शन येथे आहेत.

    १५ ऑगस्ट १९४९ ला राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय संग्रहालय स्थापित केले होते. नंतर संग्रहालयाकरिता नवीन इमारत निर्माण करण्यात आली. याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने वास्तूंची मांडणी करण्यात आली. १८ डिसेंबर १९८० ला हे संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

    राष्ट्रीय संग्रहालयातील संग्रहात भारतीय आणि विदेशी अशी एकूण २,०६,००० च्या पेक्षा अधिक उत्कृष्ट कलाकृतीपूर्ण वस्तू आहेत. ज्यामध्ये भारतीय सांस्कृतिक परंपरेचा ५००० वर्षापूर्वीपासूनच्या अधिक काळाचा इतिहास समाविष्ट आहे. विविध सृजनात्मक पंरपरेंचे तसेच शैलींचे प्रतिनिधीत्व करणा-या वस्तूंमध्ये विविधतेत एकतेचे प्रतिक दिसते. या कलाकृतींमध्ये इतिहास जीवंत झाला आहे. आज देशी-विदेशी पर्यटकांचे हे आवडीचे पर्यटन स्थळ झाले आहे.

    मग चला प्रवेशव्दारापासून राष्ट्रीय संग्रहालयाची सुरूवात करूया. प्रवेश व्दाराजवळ भगवान विष्णुला समर्पित शालच्या लाकडांचे अष्टपार्श्वीय रथ प्रदर्शनार्थ आहे. हे दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील आहे. १९ व्या शतकाच्या मध्य काळातील हे मंदिर असून मंदिराचा रथ सहा चाकांचा आहे. यामध्ये ४२५ उत्कीर्णित (बारीक नकाशी) फलक, ब्रैकेट, कोणांनी युक्त असा हा रथ आहे. याचे वजन जवळपास २,२०० कि.ग्रॅ. आहे. पाच तलातील या रथात बाहेरील भीतींवर सुक्ष्म उत्कीर्णित लघुफलकांनी सुसज्ज आहे. ज्यामध्ये भगवान विष्णुचे विविध रूपे आहेत. जसे लक्ष्मी-नारायण, राम, नृसिंह, कृष्ण अवतारांचे जीवन दृश्य अंकित आहे. याशिवाय काही प्रतिमा देखील प्रवेशव्दाच्याबाहेर सजवून ठेवलेली दिसतात.

    सभ्यतेचे दर्शन

    भारतीय पुरातत्व संर्वेक्षण आणि राष्ट्रीय संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोंजोदाडो-हडप्पा सभ्यतेचे दर्शन येथे घडते. या संस्कृतीचे जवळपास ३,८०० वस्तू येथे आहेत. त्‍यामध्येही पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे १,०२५ उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत. जेथे-जेथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष आहेत. त्या ठिकाणाहून सापडलेले शिल्प, मृदभांड, (मातीचे भांडे) मुद्रा, गुटिका, वजन व मापक, आभूषण, छोटी मृण्मूर्ती, खेळाचे भांडे, इत्यादी वस्तू येथे आहेत. याशिवाय हडप्पा स्थळातील कुल्हडिया(मातीचा ग्लास), छेनी, चाकू, हे ही दर्शनीय स्थळावर ठेवले आहेत. हे बघत असतांना हजारो वर्षापूवी आम्ही किती प्रगत होतो लक्षात येते.

    पुरातत्व

    तळमजल्यावर असणारे आणखी एक कक्ष हे पुरातत्वाशी संबंधित आहे. ते म्हणजे मुर्तीं ठेवण्यासाठी यामध्ये ८५० मूर्ती आहेत. मूर्ती या कक्षासह सर्व परिसरात लावल्या आहेत. यामध्ये प्रस्तर मुर्ती, कांस्य प्रतिमा, तसेच मृण्मूर्ती आहेत. या इ.पु. तीस-या शताब्दीपासून तर १९ व्या शताब्दीपर्यंतच्या आहेत. या सर्व मूर्ती भारतातील सर्व प्रमुख क्षेत्र, काला आणि शैलींचे प्रतिनिधीत्व करतात.

    बौध्द कला

    आणखी एक आकर्षणासह पुज्य वस्तु येथे आहे, ते म्हणजे भगवान बुध्द यांचे अस्थीकलश. त्याशिवाय उत्तर प्रदेशातील सिध्दार्थ नगर जिल्ह्यामध्ये उत्खननादरम्यान बरेच अवशेष आढळले. त्यापैकी ८४ मूर्ती येथे आहेत. यामध्ये प्रस्तर, कांस्य, मृण्मय, गच, काष्ठ या मुर्तीचां समावेश आहे. या मुर्ती हिनयान, महायान, आणि वज्रयान या पंथाचे प्रतिनिधीत्व करतात. यामध्ये कपर्दिन बुध्द (अहिच्छत्र), बुध्दपाद (नागार्जुनकोंडा, जनपद गुंटूर, आंधप्रदेश), बुध्दांचा जीवन-दृश्य (सारनाथ्, उत्तर प्रदेश) तसेच हिमालयकडील क्षेत्रातून प्राप्त आणखी काही वस्तू. येथे आहेत. या कलाकृती उपासना, समर्पण आणि मानवतेच्या प्रती प्रेम भावनेला जागृत करतात. हे बघत असतांना त्याकाळात बुध्द धम्म आपल्या सर्वोच्च शिखरावर असल्याचे जाणवते.

    (क्रमश:)

  • अंजू निमसरकर कांबळे उपसंपादक, मपकें, नवी दिल्ली
  • जयगड किल्ला

    रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष देण्याच्यादृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे.

    किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला.

    गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहिर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत.

    बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते.

    किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळमार्गे जयगडला जाता येते. हे अंतर ४६ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून निवळीमार्गे जयगडला भेट देता येते.

  • डॉ किरण मोघे,जि.मा.अ,रत्नागिरी
  • Monday, June 18, 2012

    बुलढाण्यातलं एक आगळं गाव


     गाव करील ते राव काय करील अशा आशयाची एक म्हण आहे. गावात असलेला एकतेची शक्ती गावाचा कसा विकास करते आणि त्यातून आदर्श कार्य समोर येतं अशाच स्वरुपाचं काम बुलढाणा जिल्हयातील माळविहीर या १५० उंबऱ्याच्या गावातील लोकांनी करुन दाखवलं आहे.

    गावच्या पारावर हनुमान मंदिर आहे त्याच्या मंडपात बसून विठ्ठलराव रामभाऊ आडवे माहिती देत होते की या गावाची ग्रामपंचायत १९७० साली स्थापन झाली.गावात असणाऱ्या एकीची साक्ष त्यापुढील काळातल्या वाटचालीतून दिसते. गेल्या ४२ वर्षांमध्ये या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. प्रत्येक वेळी अविरोध सदस्य निवड त्याचप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यांचीही अविरोध निवड करण्याची परंपरा या गावामध्ये आहे.

    लगतच बसलेला गावच्या सरपंच उषा सुनील खयवाल यांनी गावच्या लोकांबाबत सांगितलं की गावात सदस्यांची वा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याच्या वेळी सर्व ग्रामस्थ एकत्र बसून विचारणा करतात .ज्याला सदस्य व्हायची इच्छा आहे त्याने आपली इच्छा प्रगट करायची आणि इतरांनी संमती द्यायची इतक्या साध्या पध्दतीने सहजरित्या सदस्य व पदाधिकारी निवडले जातात.

    येथील पोलिस पाटील देवीदास संपतराव आडवे हे आहेत. तंटामुक्तीची चळवळ सुरु झाल्यानंतर गावातल्या या एकीचं बळ अधिकच वाढीला लागलं .गावकऱ्यांनी एकत्र बसून या तंटामुक्तीत सहभागी व्हावं असा निर्णय घेतला. तंटामुक्ती योजनेची घोषणा झाल्यापासून गावात वाद झाले नाही असं नाही परंतु हे वाद सर्वांनी एकत्र बसून मिटवले. आजवर या गावातून साधा अदखलपात्र गुन्हा घडल्याचीही नोंद नाही. योजना सुरु होण्यापूर्वी जी प्रकरणे न्यायालयात होती तितकीच काय ती जूनी वादाची नोंद. या गावाच्या कामाची नोंद घेऊन गावाला तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देवून नुकतच गौरविण्यात देखील आलं आहे.

    गावाच्या कामाची दखल घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे गाव विकासासाठी दत्तक घेण्यात आलं आहे. बँकेन गावाचा मुख्य रस्ता सिमेंटने बांधून दिला तसच ग्रामस्थांच्य सुविधेसाठी एक सुंदर अशी ग्रंथालयाची इमारत देखील बांधून दिली आहे.

    हनुमान मंदिरा समोरच एक मोठा पार बांधण्यात आला आहे. गावातलं प्रत्येक लग्न या एकाच ठिकाणी होतं. सगळं गाव लग्नात निमंत्रित असतं आणि काम करायलाही असतं हे विशेष घरालगत घर म्हटलं की शेजार आणि त्यात वादाचे प्रसंग येत असतात मात्र थोडं समंजसपणानं वागता आलं तर खूप मोठं कार्य उभं राहतं हेच या गावानं करुन दाखवल.

  • प्रशांत दैठणकर
  • Sunday, June 17, 2012

    श्रमदानातून २५ हजार रोपट्यांची निर्मिती

    आदर्श गाव संकल्पनेने झपाटलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मन्याळी या गावच्या नागरिकांनी श्रमदानातून २५ हजार रोपट्यांची निर्मिती केली आहे. पुरूषांच्या बरोबरीनेच महिलांचाही श्रमदानात मोठा सहभाग असून निसर्ग संवर्धनासाठी या रोपवाटीकेतील रोपे शेतकऱ्यांना नि:शुल्क देण्यात येत आहेत.

    राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या आदर्श गावासारखे मन्याळी गावही आदर्श करण्याच्या उद्देशाने गावातील संतोष गावळे हा तरूण प्रेरित झाला होता. गावाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले होते. त्याच्याच प्रयत्नाने संपूर्ण गावकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास साधण्याचे समाधानकारक चित्र उभे राहिले. उद्योगपती अंतिम डहाणूकर यांच्या सहकार्यातून पाच लाख रूपये किंमतीचे नेट शेड उभारण्यात आले. गावकऱ्यांच्या सहभागातून आंबा, चिंच, आवळा, बोर, सीताफळ, कडूनिंब, हातगा, निलगिरीसह विविध वृक्षांची रोपे तयार करण्यात आली. सध्या येथे २५ हजार रोपटी तयार झाली आहेत.

    गावकऱ्यांनी श्रमदानातून पिशव्या भरणे, बी रोपण करणे, रोपांना पाणी घालणे आदी कामे केली. विशेष म्हणजे ही सर्व रोपे मन्याळी व परिसरातील शेतकऱ्यांना नि:शुल्क दिली जात आहेत. रोपांची काळजीपूर्वक जोपासना हीच एक अट आहे. केवळ १२०० लोकसंख्येच्या मन्याळी गावाने निसर्ग संवर्धनाची चळवळ उभारली आहे. गावाला भेट दिल्यास रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याचे दिसून येते. प्रत्येक झाडाचे पालकत्व गावकऱ्यांकडे सोपविले असून यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे, हे विशेष. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने मन्याळीने इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

  • अनिल आलुरकर, यवतमाळ
  • Saturday, June 16, 2012

    जयगड किल्ला

    रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष देण्याच्यादृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे.

    किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला.

    गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहिर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत.

    बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते.

    किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळमार्गे जयगडला जाता येते. हे अंतर ४६ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून निवळीमार्गे जयगडला भेट देता येते.

  • डॉ किरण मोघे,जि.मा.अ,रत्नागिरी
  • आगोटची बेगमी

    रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा जोरदार असतो. गतवर्षी चार हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सह्याद्रीच्या रांगांमुळे पावसाच्या सरी अक्षरश: कोकणच्या डोंगरदऱ्यांमध्ये कोसळतात. अशावेळी दैनंदिन व्यवहाराला मर्यादा येते. जोरदार पावसात बाहेर फिरणे कठीण होत असल्याने शहरातील बाजारात येण्याचा विषय दूरचाच. म्हणूनच पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी संसाराला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव उन्हाळ्याच्या शेवटी करतो. या जीवनावश्यक वस्तूंनाच कोकणातील ग्रामीण भागात 'आगोट' असे म्हणतात.

    पावसाळ्यापूर्वी घराची कौले शाकारण्याचे काम सुरू होते. पावसाच्या सरी घरात येऊ नये म्हणून छताच्या पुढच्या बाजूस नारळीच्या पानापासून बनविलेली झापडे लावली जातात. पन्हाळी नीट केली जातात. पावसाळी सरपणासाठी परिसरातील झाडांपासून मिळणारे लाकूड वाळवून ठेवले जाते. घराच्या शेजारीच लाकडांकरिता गवत व पेंड्याने शाकारलेली छोटी खोपटी बांधली जाते आणि त्यामध्ये लाकडे व्यवस्थित रचून ठेवली जातात. मातीच्या चूली नीटपणे रचल्या जातात.

    आगोटचा महत्वाचा भाग असतो वाळवण. कुर्डया, पापड आणि शेवयांसोबतच धान्य कडधान्ये वाळविली जातात. यात ज्वारी आणि नाचणीचा प्रामुख्याने समावेश असतो. अलिकडे त्यात गव्हाचीदेखील भर पडली आहे. अन्न साठविण्यासाठी स्वतंत्र कणगी असते. साठवण्याच्या ठिकाणी ओलावा राहणार नाही याची काळजी घेतली जाते.

    सारभाताचा बेत कोकणातील घराघरात असतो. सारासाठी कोकमचा उपयोग करण्यात येतो. याशिवाय कोकमाचा वापर प्रामुख्याने मासळीचे पदार्थ बनविताना केला जातो. कोकम साठविण्यापूर्वी त्याला वाळविण्याची पद्धत काहीशी क्लिष्ट असते. कोकमाचे बी काढून उर्वरीत फळाचा रस काढला जातो. त्या रसात वरचे साल धुतले जाते. नंतर त्याला वाळवतात. अशी प्रक्रिया सहा ते सात वेळा करावी लागते. अन्यथा त्यास पावसाळ्यात कीड लागण्याची शक्यता असते. कोकम आणि साखर यांचे एकावर एक थर काचेच्या बरणीत रचतात. बरणीचे तोंड कापडाने बांधून ती उन्हात ठेवली जाते. त्यापासून तयार होणारा रस म्हणजे कोकम सरबत. साखरेचा उपयोग न करता केवळ उन्हात कापडावर कोकम वाळविण्याची पद्धतही उपयोगात आणली जाते.

    या बेगमीतील महत्वाचा भाग असतो सुक्या मासोळीची खरेदी. बाजारात न विकली गेलेली ताजी मासोळी उन्हाळ्यात वाळवून ठेवली जाते. बंदराजवळच्या भागात गेल्यावर तोरणाच्या रूपात मासोळी वाळविण्यासाठी लावलेली आढळते. रस्त्याच्या कडेला खराब झालेल्या जाळ्यांच्या खालीदेखील मासोळी वाळविली जाते. जाळ्यांमुळे पक्ष्यांचा त्रास कमी होतो. ही मासोळी आठवडा बाजारात विक्रीसाठी येते. याशिवाय पापलेट, संरमय आदी मोठी मच्छी मीठात खारविली जाते आणि तीही बाजारात विक्रीसाठी येते. ही खारी मच्छी खरेदी करून शेतकरी भात पिकापासून मिळणाऱ्या पेंड्यात बाहेरीची हवा मच्छिला लागणार नाही अशा तऱ्हेने व्यवस्थित बांधून कौलारू घरात माळ्यावर अड्याच्या पोटसराला बांधून ठेवतात आणि गरज पडेल तसा पावसाळ्यात त्याचा जेवणात वापर केला जातो.

    रत्नागिरीला शनिवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात वाळलेल्या मासोळीचे जवळा,आंबाडी, सोडे, बोंबिल, बले, दांडी, मांदेली, बांगडा, असे विविध प्रकार मिळतात. सुकी मासोळी खरेदी करण्यासाठी बाजारात मे महिन्यात गर्दी दिसते. १५० ते ८०० रुपये प्रति किलो अशी किंमत असली तरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी खरेदी करीत असतात. या पदार्थांना पाण्याचा थेंब लागला तरी ते खराब होण्याची शक्यता असल्याने त्याची साठवण व्यवस्थितरित्या केली जाते. हे गृहिणीवर्ग खुबीने करतात आणि गडीमाणूस पावसाळ्याच्या सरी कोसळल्यावर निश्चिंतपणे शेताकडे पेरणी, चिखलणी आदी कामांसाठी जातो. वस्तू खरेदीसाठी बाजारात जायची चिंता नसते, पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहतात, घरत चुलीपाशी घरची लक्ष्मी स्वयंपाकात मग्न असते. दुपारी डोक्यावर डोक्यावर इरलं घेऊन पावसातून वाट काढीत आलेल्या कारभारणीने सोबत आणलेल्या गाठोड्यात मसालेदार कोळींबी आणि तांदळाची भाकरी असणारच याची गड्यालाही खात्री असते. आगोटची बेगमी त्याचसाठी तर असते...!

  • डॉ.किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
  • संगमेश्वरी नौका

    सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. याच आरमाराची शान असलेली 'संगमेश्वरी' नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या निढळेवाडी येथील सुतारांनी तयार केल्याचे सांगितले जाते. सुतारकलेची ही परंपरा जोपासत आजही या गावात नौका तयार करण्याचा व्यवसाय करण्यात येतो.

    संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर शास्त्री नदीच्या तटावर मुंबई-गोवा महामार्गाला लागूनच नारळाच्या झावळ्यांनी बनलेल्या मोठ्या छताखाली नौकांचा सांगाडा पाहायला मिळतो. अनेक कारागीर येथे रंधा, हातोडी, करवत आदी हत्यारांसह काम करण्यात गुंतलेले असतात. साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षांची नौका बांधणी व्यवसायाची परंपरा अनेक अडचणींचा सामना करीत निढळेवाडीच्या सुतार समाजाने जपली आहे.

    पूर्वी ओझरखोल आणि महाबळे या दोन गावांच्या सीमा लागून होत्या. मात्र सुतार समाजाच्या पुर्वजांना इनामात गावाची जमीन मिळाल्यावर या दोन्ही गावाच्या मधोमध 'वाडा निढळ' हे गाव वसले. याच गावाचे पुढे नामकरण निढळेवाडी असे झाले. साडेपाचशे लोकसंख्येच्या या गावात ९० टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह नौकाबांधणीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. गावातील मुलांचे बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण होते. तुरळक अपवाद वगळता इतर मुले याच व्यवसायाकडे वळतात, असे आनंद वाडकर यांनी सांगितले.५६ वर्षाचे वाडकर ३२ वर्षापासून या व्यवसायात आहेत.

    नदी किनारी झापाची कुड (छप्पर) बनवून त्याखाली नौका बांधणीला सुरूवात होते. नौका बांधणीसाठी कर्नाटकातील कारवार, मट्टी, आईन येथून लाकूड येते. नौका ज्या आधारावर उभी केली जाते त्या लाकडास पठाण (नौकेचा कणा) म्हणतात. त्याला जोडून नौकेचा इतर सांगाडा तयार केला जातो. एक सारख्या जाडीच्या फळ्या तयार करून त्या सांगाड्यात वापरल्या जातात. फळ्यांमधील भेगा बुजविण्यासाठी कडू तेलात चंद्रूस (झाडाचा चीक) शिजवून तो कापसासोबत वापरतात. या मिश्रणामुळे फळ्या एकमेकाला घट्ट चिकटतात. खिळे मारण्यापूर्वी कुठेही भेग राहू नये 'वाकं' बसवितांना 'कावर'ने दोरी घट्ट बांधली जाते. खिळे मारताना आधी दोरी सोडून नंतर कावर काढली जाते. हे काम अत्यंत कसबिचे असते. कामात जराशी चूक झाल्यास वर्षभराची मेहनत वाया जाण्याची शक्यता असते.

    एक नौका बांधण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागतो. पावसाळ्यातही हे काम सुरूच असते. नौकेचा मालक सर्व साहित्य पुरविण्याची व्यवस्था करतो. आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असलेला गावातील एखादा कारागीर कर्ज काढून स्वत: नौकाबांधणीचे धाडस करतो. सागवान लाकडाचा उपयोग केल्यास साधारण ६० फुटाच्या नौकेला ४० ते ५० लक्ष तर साधारण लाकडापासून बनविलेल्या नौकेसाठी २५ ते ३५ लक्ष रुपये खर्च येतो. कारागिराला नियमित काम मिळाल्यास महिन्याला साधारण सात-आठ हजार रुपये मिळतात. अत्यंत कष्ट आणि तेवढेच कौशल्य असलेले हे काम शास्त्री नदीच्या तटावर तन्मयतेने सुरू असते. विश्रांतीसाठी नौकेच्या बाजूलाच फळ्या टाकून त्यावर सोय केलेली असते. काही कारागीर फळ्यांचे कटींग करण्यासाठी जनरेटरवर चालणारे यंत्रही वापरतात. एकावेळी आठ ते दहा नौकांचे काम या ठिकाणी चालते.

    साडेतीनशे पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असणाऱ्या या व्यवसायाला अडचणीत असताना मत्स्य विभागातर्फे नौका बांधणीसाठी मच्छीमार सोसायट्यांना अनुदान मिळू लागल्याने थोडाफार आधार मिळाला आहे. गावातील बरीचशी मंडळी पूर्वी घराचे व शेती अवजारांचे कामही करायची. मात्र आता प्रामुख्याने नौका बांधणीतच बहुतेकांनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. कोकणातील अनेकांचे जीवन मच्छीमारीवर अवलंबून असल्याने त्यांच्या जीवनात नौकेलाही तेवढेच महत्वाचे स्थान आहे. दर्यावर आपल्या मालकाला विश्वासाने नेणारी ही नौका घडविणारे निढळेवाडीचे कलाकार इतिहासाच्या अनेक पाऊलखुणांचा मागोवा घेत त्या मार्गाने पुढे जात आहेत. त्यांच्या कलेची आणि कष्टाची जाण समाजाने ठेवावी एवढीच अपेक्षा त्यांची आहे.

  • डॉ.किरण मोघे जि.मा.अ.रत्नागिरी
  • अपंगत्वावर मात करीत निर्माण केला जीवनात प्रकाश

    वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओच्या आजाराने दोन्ही पाय हिरावून घेतले आणि अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर मधील सत्यनारायणची जीवनाशी झुंज सुरू झाली. केवळ पायावरच नव्हे तर काही दिवसात त्यांच्या उर्वरित शरीरावरसुद्धा अपंगत्व आले. असे असले तरी नियतीने मात्र त्यांचे दोन्ही हात शाबूत ठेवले होते. या दोन्ही हाताच्या भरवशावर त्यांनी जीवनाचा द्रोणागिरी उचलला. आपल्या अपंगत्वाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघून संघर्ष सुरू ठेवला. आज सत्यनारायण संगणक चालक म्हणून यशस्वी भूमिका बजावत आहे.

    सत्यनारायण प्रेमनारायण दीक्षित या ३३ वर्षाच्या युवकाचे अचलपूर शहरातील बुंदेलपूर भागात वास्तव्य आहे. सत्यनारायण यांचे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.

    वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अपंगत्व आल्यानंतर सत्यनारायण यांनी जीवनातील खडतरता अनुभवली. सुखापेक्षा दु:खाचेच क्षण वाट्याला जास्त आले. अपंगत्वामुळे शिक्षणामध्ये अडसर येऊ लागला, परंतु इतर मुलांच्या हातातली पाटी लेखन सत्यनारायण यांनाही स्वस्थ बसू देत नसे. आपणही शिकलेच पाहिजे, अशी जिद्द त्यांच्या मनात बालपणातच निर्माण झाली. बालपणी आई-वडील किंवा बहिणींच्या कडेवर जाऊन सत्यनारायणने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंत त्यांच्या वडिलांनी १०० रुपये प्रति महिना याप्रमाणे एका इसमाला कामावर ठेवले आणि त्याच्यावर सत्यनारायणच्या शाळेची जबाबदारी सोपविली. ११ वी १२ वी मध्ये असताना त्याच्या लहान भावाने सायकलच्या आधारे त्याची प्रवासाची अडचण दूर केली. १२ वी पास झाल्यानंतर सत्यनारायण यांनी जगदंब महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि अशाच पद्धतीने ५४ टक्के गुण घेऊन बीएची पदवी प्राप्त केली. दरम्यानच्या काळात त्यांनी संगणकाची एमएससीआयटी ही परीक्षाही पास केली.

    सत्यनारायण यांच्या जिद्द, झुंज आणि चिकाटीमुळे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत संगणक चालक म्हणून कार्य करण्यास संधी मिळाली. संचालक व्यास यांनी आपल्या संस्थेत सत्यनारायणला संधी देण्याबाबत प्रस्ताव ठेवला. कुठलेही आढेवेढे न घेता सत्यनारायण यांनी प्रस्तावाला होकार दिला. आज सत्यनारायण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगणक चालक म्हणून उत्कृष्ट काम करीत असून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभारही लावत आहे.

    अपंगांनीच नव्हे तर बेरोजगारीचे तुणतुणे वाजविणाऱ्यांनी सत्यनारायण यांच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

  • अनिल गडेकर
  • छकुली तुझ्याचसाठी !

    बीड जिल्हयातील परळी येथील स्त्रीभ्रृण हत्या प्रकरणाने सारा महाराष्ट्र हादरला आणि हळहळला. कोवळया जीवांची जीवनकळी उमलण्यापुर्वीच खुडण्याच्या या प्रकाराची राज्य शासनाने तातडीने दखल घेतली आणि राज्यभरातील शासकीय यंत्रणा सकारात्मक दिशेने कामाला लागली.

    उस्मानाबाद जिल्हयात आतापर्यंत अशी दुदैवी घटना उघडकीस आलेली नाही ही आशादायक बाब आहे. मात्र, यापुढेही अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पुढाकारातून एक कल्पना जन्मास आली. ती म्हणजे, गेल्या वर्षभरातील जिल्हयाच्या विविध आरोग्य केंद्र, दवाखाने येथे दाखल झालेल्या गरोदर मातांची माहिती संकलित करण्याची! यामुळे या वर्षभराच्या काळात गरोदर मातांपैकी कुणी गर्भपात केला आहे का, याची माहिती मिळणार असून तो का केला, याचेही कारण उलगडणार आहे.

    राज्यात दर हजारी मुलांमागे मुलींचे घटते प्रमाण ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. शासन आपल्या स्तरावरुन मुलींचे हे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपायोजना करत आहे. उस्मानाबाद जिल्हयातही मुलींचे हे प्रमाण दरहजारी ८५० इतके घटले आहे. ही चिंताजनक बाब हेरुनच जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी यासंदर्भात ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याचे ठरविले आणि त्यादृष्टीने कार्यवाहीस सुरुवात केली.

    जिल्हयातील गरोदर मातांची माहिती घेण्याच्या या उपक्रमात परिचारिका, दाया अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींचा सहभाग असणार आहे. विशेषत: यापूर्वी मुलींना जन्म दिलेल्या आणि आता गरोदर असणाऱ्या महिलांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. पत्ता, मोबाईल क्रमांकाबरोबरच उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांचे नाव आदीची माहिती यामध्ये असणार आहे. एक किंवा अधिक मुली असणाऱ्या गर्भवती मातांची नोंद ठेवून त्या महिलेची सर्व माहिती वारंवार भेटी देऊन संकलित केली जाणार असून ती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाणार आहे.

    यामुळे संबंधित गरोदर महिलेने उपचार कुठे घेतले, नियमितपणे तपासणी केली आहे का, वारंवार तपासणीस गैरहजर असेल तर तिच्या माहेरी-सासरी संपर्क साधून वास्तव जाणून घेणे, आदींची नोंद ठेवली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हयात परिचारिका, दाया, अंगणवाडी सेविका आणि सरकारी डॉक्टरांचा एक मेळावाही घेण्यात आला. यात ही माहिती संकलन कसे करायचे, ही मोहीम कशी राबवायची या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

    या मोहिमे अंतर्गत गर्भवती महिला तसेच तिच्या कुटुंबियांकडूनही माहिती भरुन घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हयाबाहेरील गर्भवती महिला येथे उपचार घेत असतील आणि नंतर वारंवार त्या नियमित तपासणीसाठी गैरहजर राहिल्या असतील तर त्यांच्या सासरच्या पत्यावर संपर्क साधून तसेच त्या कार्यक्षेत्रातील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला जाणार आहे. त्याठिकाणी ही महिला उपचारासाठी आली होती का, याचीही खतरजमा केली जाणार आहे. यामुळे त्या गर्भवती महिलांची सद्य:स्थिती समजणार असल्याने तिने गर्भपात केला किंवा कसे याची माहिती मिळणार आहे.

    या उपक्रमात एकाच दिवशी यश मिळणार नसले तरी अवैध गर्भपातांना निश्चितच आळा बसणार आहे., त्याबरोबर गर्भलिंग निदानासारखे प्रकार करण्याऱ्या डॉक्टरांनाही वचक बसणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उचललेले हे पाऊल म्हणजे जन्माला येणाऱ्या छकुलींसाठी स्वागताची पायघडीच म्हणायला हवी.

  • दीपक चव्हाण , जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद