Wednesday, January 4, 2012

मा.राजेश खडके

ग्रंथोत्सव धुळेकरांसाठी ठरली एक पर्वणी !

गतिमान युगात आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीमुळे जी गती निर्माण झाली आहे.त्यात आपण स्वत: कुठे आहोत याबाबत माणूस स्वत:ला विसरत चालला आहे.अशा परिस्थितीत ग्रंथ हाच गुरु ही चळवळ नव्यानं उभी राहत असून वाचनाची आवड अनेकांना असते, मात्र काय वाचावं, कसं वाचावं, किती वाचावं हे प्रश्न अनेक वाचकांना नेहमीच सतावत असतात आणि त्यातच वाचन संस्कृतीचा वाचक कुठे तरी भरकटतो.

अशा भरकटलेल्या आणि गोंधळात सापडलेल्यांसाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथोत्सव २०११ हा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय, धुळे या कार्यालयाने दि. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर, २०११ या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाटयमंदिरात आयोजित केला होता. या ग्रंथोत्सवास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला . 

वाचाल तर वाचाल हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, आजच्या युगात माहिती आणि त्यातून मिळणारा नवा संदेश आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे.याबाबत माणूस वाचन करताना विरंगुळा म्हणून वाचन करतो तो भाग वेगळा आणि स्वत:ला अद्यावत ठेवण्यासाठी आणि आजच्या युगात स्पर्धेत टिकून राहतो तो भाग वेगळा. वाचनातून मिळणारी माहिती, विचार, माणसाला प्रगल्भता देतात हे सांगणे नवं नाही. कारण जी माणसं सर्व अर्थानं मोठी झाली त्यांच्या चरित्रात वाचनातून मिळालेला विचारच त्यांना मोठं करण्यात समर्थपणे कामी आला असं त्यांच्या शब्दात त्यांनी लिहून ठेवलं.

वाचणारा माणूस अनेक महत्वाचे संदर्भ बोलू शकतो, लिहू शकतो आणि नवा विचार मांडून साहित्यातून समाजाला दिशा देण्याचं काम करू शकतो. साहित्य निर्मिती ही स्‍वत:ची कधीही नसते ती लोकांची होत असते. कोणी काय लिहीलं ती उत्सुकता वाचकांना असते. आणि घरटयात पिलांनी वाट पहावी तशी वाचक मंडळी साहित्यीकानं नवं काय लिहीलं यासाठी आसुसलेली असते. त्यातूनच वाचन संस्कृती निकोप तर होत जाते पुन्हा समृध्द होत जाते.

व्यक्तीसापेक्ष साहित्यिकांची विचारधारा स्विकारणे, नाकारणे हे वाचकांवर अवलंबून असते. म्हणून साहित्य कोणतेही असो त्याचा वाचक त्या-त्या पातळीवर स्वत:ला जे हवे ते घेवून समृध्द होण्यासाठी झपाटलेला असतो. कोणत्याही देशाची, त्याचप्रमाणे राज्य असेल, शहर असेल किंवा गाव असेल त्या गावाची समृध्दी तिथे असलेली माणसं कोणते ग्रंथ वाचतात, वाचनालय किती समृध्द आहे यावरुन मानली जाते कारण ग्रंथ हे समाजसुधारण्याचे ,समाजाला दिशा देण्याचे काम त्या-त्या विषयातून करत असतात.गावागावात पारायण ही संस्कृती जरी अध्यात्मिक असली तरी सार्वजनिक वाचन ही संकल्पना वाचन संस्कृतीशी जोडलेली आढळते. अशा विविधांगी विषयातून माणसं समृध्द होतात. ती ग्रंथ वाचनातून हे सांगणे न लगे. 

वाचन संस्कृतीची जोपासना, वाचनाची समृध्दी, वाचक घडवण्याची प्रक्रिया, वाचनातून व्यापक जीवनदर्शन निर्माण झालेल्या महान कलाकृती, सर्वंकष वाचन, आत्मशोध, ज्ञानविश्व, संत साहित्य, स्त्री-स्वातंत्र्य, समग्र परिवर्तन, ग्रामीण जीवन, पुराणकथा, बालवाड़मय, कथा, कविता, कादंबरी, नाटक, वेब विश्व, विज्ञान, इतिहास या सार्‍या गोतावळयात ग्रंथ आमच्यासाठी आम्ही ग्रंथासाठी अशी नाती भक्कमपणे निर्माण करण्याची प्रक्रिया समर्थ करण्यासाठी हा ग्रंथ महोत्सव झाला.

तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, वृध्दांनी, महिलांनी आणि समर्थ वाचन संस्कृतीच्या प्रक्रियेत राहणार्‍यांनी या ग्रंथोत्सवात यशस्वी सहभाग नोंदविला. प्रत्येक गोष्ट माणूस विसरत चालला आहे. तेव्हा मातृदिन, बंधुदिन, प्रेमदिन असे अनेक दिवस साजरे होवू लागले आहेत. ग्रंथ हा शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत निर्माण होत राहणार आणि पुढचा येणारा वाचत रहाणार म्हणून ही संस्कृती कधीही नष्ट होणार नसली तरी नवनवीन आव्हानं समोर असताना घरात एक हक्काचं आपलं कोणीतरी असावं, जे सर्वकाळ साथ देतं आणि जीवनात अनेक वेळा मार्गदर्शक ठरतं ते एकमेव साधन म्हणजे आपला ग्रंथ होयं. या ग्रंथाशी नव्यानं नातं जोडावं. अशी भावना ! माणसाला समृध्द करण्यासाठी ग्रंथांनी जे दिलं त्याचा विसर कोणालाही पडू नये त्यासाठी धुळे येथील ग्रंथमहोत्सव पर्वणी ठरली ! 

ग्रंथोत्सवाच्या दि. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ग्रंथदिंडी, ग्रंथोत्सव कार्यक्रम, शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील आणि मंडळी यांचा रंग शाहिरी कलेचा कार्यक्रम, कवी सम्मेलन तसेच प्रथितयश लेखकाची प्रकट मुलाखतीत प्रा.अनिल सोनार, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद,धुळे जिल्हा यांची श्री. चंद्रशेखर पाटील, संचालक, मी महाराष्ट्र वाहिनी, धुळे यांनी साहित्य क्षेत्रावर आधारित घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आदि बहारदार कार्यक्रमांचा साहित्य प्रेमी, कवी-कवयित्री, रसिक, नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला. 

धुळे येथील ग्रंथोत्सवात जिल्हयातील साहित्य प्रेमी, रसिकांनी शासकीय ग्रंथालय आणि खाजगी ग्रंथालय धारकांकडून संत, वाड.मय, ललित लेखकांची पुस्तकांची मोठया प्रमाणात खरेदी करुन ग्रंथस्टॉल धारकांना मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला हे विशेष. 

  • जगन्नाथ पाटील 
  • बहु सामाजिक उपक्रम गट !

    देवळी पासून २५ किलोमीटर असलेले गुंजखेड हे गाव, या गावामध्ये बचत गटाचा लवलेश नसतानासुध्दा ग्रामपंचायतच्या मदतीने १५ महिला एकत्र येवून बचत गट स्थापन केला. बचत गटाचे नाव रमाबाई महिला बचत गट ठेवण्यात आले. बचत गट सुरु करण्यामागचा उद्देश विचारला असता सावकाराच्या जाचातून सुटका व्हावी व महिलांच्या गरजा महिलांनीच भागवाव्यात व बचत गटातून जमा झालेला पैसा महिलांच्याच कामात यावा असे त्यांनी सांगितले.

    सुरूवातीला त्यांनी पैसे जमा करुन अंतर्गत व्यवहार सुरु केला. त्यानंतर त्यांना खेळते भांडवल मिळाले. खेळत्या भांडवल मधून त्यांनी अंतर्गत कर्ज वाटप केले व त्या माध्यमातून महिलांच्या गरजा भागत होत्या. त्यानंतर त्यांना कपडा व्यवसायासाठी २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. त्यामधून त्यांनी कपडा व्यवसाय सुरु केला. कपडा व्यवसायामधून त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती. 

    मग सर्व महिलांनी मिळून चर्चा केली की कपडा व्यवसाय हा आपण सर्वजणी मिळून करतो त्यापैकी काही महिला बचतगटामधे काम करतात तर काही महिला शेतीच्या कामावर जातात.त्यामुळे जर असे केले तर आपण सर्व महिलांनी वैयक्तिक व्यवसाय करायचा व कर्ज गटामधून घ्यायचे हा विचार सुरूवातीला नवीन होता ‍की गट हा सुध्दा बहुव्यवसायी होऊ शकतो.सर्व महिलांनी ठरवून शेती, किराणा, हॉटेल, स्टेशनरी, शिलाई मशीन, पापड उद्योग इत्यादी व्यवसायासाठी कर्ज घेतले. हा गट बहुव्यवसायी म्हणून नावारुपास आला. वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्या व त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्या सक्षम बनल्या. व कर्ज व्याजासहित गटामध्ये परत करु लागल्या.

    एका गटामधील हॉटेल चालविण्यार्‍या महिलेचे घर सर्वसाधारण होते. परंतु या व्यवसायामुळे त्या महिलेचे आज दुमजली घर आहे व हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्यामुळे झाले हे ती महिला अभिमानाने सांगते. त्याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसांपासून पडिक होती. त्या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली व आज त्या महिलेला चांगले उत्पन्न मिळत आहे.

    महिलांना कर्ज देणे व परत करणे हे आपले कर्तव्य वाटू लागले. त्यामुळे पैसा खेळता राहिला. त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी गटाचे रहस्य म्हणजे त्यांच्या मासिक बैठका वेळेवर होत आहेत तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्या गटातील अडीअडचणी भागविण्यास नेहमी तत्पर असतात. बचत आपल्या गरजा भागविण्यात कामात येत आहे. त्याचप्रमाणे गटामध्ये महिलांच्या गरजा भागणे महत्वाचे असल्यामुळे महिलांनी वेगवेगळया व्यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्याही सदस्यांनी आडकाठी आणली नाही.

    गटामध्ये फक्त आर्थिक देवाणघेवाण होत नाही तर महिलांच्या सु:ख दु:खावरही चर्चा करण्यात येते. त्यासोबत आरोग्यविषयक शिबीर घेण्यात येते त्याचप्रमाणे अंगणवाडीला देण्यात येणारा पूरक पोषक आहार रमाबाई महिला बचत गटाकडे आहे.स्वच्छता अभियान, तंटामुक्त ग्राम अभियानामध्ये सुध्दा गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

    रमाबाई महिला बचत गट हा फक्त बहुव्यवसायी गट नसून बहु सामाजिक उपक्रम गट आहे. त्यामुळे त्यावरुन असे लक्षात येते की, रमाबाई महिला बचत गट हा महिला धनव्यवहारासोबतच मनव्यवहार सुध्दा करतात म्हणून हा गट यशस्वी दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

    Tuesday, January 3, 2012

    शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !

    लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे. 

    श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. 

    झाडांची लागवड ऑगस्‍ट २०११ मध्ये करण्यात आली. मात्र फुलांच्या उत्पादनाला २ नोव्हेंबर २०११ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत २७ हजार १६० उत्पादित फुलांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीपासून श्री. अवचट यांना १ लक्ष ५१ हजार ९२ रुपये एवढी रक्कम मिळाली. आतापर्यंत फुलाच्या उत्पादनावर ६२ हजार रुपये खर्च झाला असून निव्वळ नफा ८९ हजार ९२ रुपये झाला आहे. येत्या काळात प्रत्येक महिन्याला सरासरी ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित असून प्रत्येक फूल ३ रुपये प्रमाणे विकल्यास ९० हजार रुपये प्रत्यक्षात उत्पन्न होऊ शकते.

    एका वर्षाचा ताळमेळ सांगताना अवचट म्हणाले, १० लक्ष ८० हजार रुपये फुलांची विक्री होणार असून ४ लक्ष ५६ हजार रुपये खर्च वजा जाता ६ लक्ष २४ हजार रुपये नफा मिळू शकतो. यावेळी त्यांनी स्वत:चे शेड्यूल, ड्रेनचीग व किटक नाशके व बुरशी नाशक फवारणीची महिती सांगितली.

    या फुलांची हैद्राबाद व बंगलुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या बाजारपेठांत फुले पोहचविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मात्र फुल उत्पादन मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यास वाहतुकीचा खर्च अल्प प्रमाणात येऊ शकेल. कदाचित फुलांचे व्यापारी सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुले खरेदी करु शकतील. त्यादृष्टीने आता या भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

    नागपूर बाजारपेठेत इव्हेंट, मॉल व सणासुदीच्या दिवसाचे महत्त्व ओळखून फुलांची विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविण्यपूर्ण शेती करुन आर्थिक समृध्दी साधावी, अशी वेळ आता आली आहे.

  • मिलिंद आवळे
  • बीडकरांनी साजरा केला ग्रंथोत्सव २०११

    राज्य निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वाचन संस्कृती जोपासली जावी व या संस्कृतीच्या क्षेत्रात नवचैतन्य यावे, जास्तीत जास्त ग्रंथ वाचकांना उपलब्ध व्हावेत म्हणून मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत बीड येथे संस्कार विद्यालयाच्या प्रांगणात दि. १५, १६ व १७ डिसेंबर २०११ या तीन दिवशी ग्रंथोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. फक्त पाठीवर शाबासकीची थाप देऊन लढं म्हणा, बीडकरांना ते कोणत्याही चांगल्या उपक्रमासाठी सदैव तयार असतात तोच अनुभव या उपक्रमात आला. या उत्साहात सामान्य बीडकरही आपल्या घरचे कार्य समजून सामील झाला होता. त्यामुळे या ग्रंथोत्सवास एक वेगळेपणा प्राप्त झाला. 

    ग्रंथोत्सवाच्या उदघाटन समारंभास जाताना संस्कार विद्यालयाच्या समोरच भाजीमंडीतील भाजी विकणाऱ्या एका बाईस सहज विचारले बाई समोरच्या शाळेत कसली गडबड आहे गं !

    मॅडम तिथे पुस्तकाची दुकाने आली असं म्हणत्यात या प्रातिनिधीक उदाहराणावरुन किमान त्या बाईला येथे ग्रंथोत्सव आहे हे माहित होते.ते तिने तिच्या भाषेत सांगितले एवढेच.

    दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता साहित्याची आवड असणारे जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन उत्साहात पार पडले व वेळेचे बंधन पाळत आयोजकांनी कवी संम्मेलनास प्रारंभ केला.

    सरस्वतीच्या दरबारी कवींची हजेरी ..…. 
    बीड जिल्हा तसा अनेक गोष्टीत नावाजलेला आहे. परंतु येथील स्थानिक कवींनी सादर केलेल्या कविता एवढ्या अप्रतिम सुंदर असतील असे खरचं कोणाला सांगूनही पटणार नाही. या कवींना श्रोत्यांमधून भरभरुन दाद मिळाली. काव्यसंध्येची वेळ दोन तासाची होती परंतु घडयाळाच्या काट्याकडे न बघता ही मैफल तब्बल अडीच ते तीन तास रंगली आणि खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या गावाकडे चला चा अर्थ उमगला व आपण माय मराठीच्या माहेरी आल्याचा आनंद झाला. काही कवींनी शोषित कष्टकरी वर्गाच्या भावनांची व्यथा कवितेतून मांडली तर काही कवींनी धर्म परंपरा, रुढी, चालीरिती यावर प्रकाश टाकणाऱ्या कविता सादर केल्या. काहींनी जगण्याची आशा व गरीब माणसाच्या समस्याचे चित्रण आपल्या कवितेतून प्रगट केले. आणि ग्रंथोत्सवाचा पहिला दिवस आनंदात पार पडला.

    प्रकाशकांची हजेरी
    या ग्रंथोत्सवाचे मुख्य अंग म्हणजे पुस्तकांची/ग्रंथाची विक्री संस्कार विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात नावाजलेल्या ८ प्रकाशकांनी आपले पुस्तकाचे स्टॉल लावले. वाचन संस्कृतीला संजीवनी देण्यासाठी लाख मोलाची पुस्तके/ग्रंथ या स्टॉल मध्ये ग्रंथप्रेमींसाठी विक्रीस ठेवले होते. त्यात बालसाहित्य, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, नाटके, शासकीय प्रकाशने, संत साहित्य, विज्ञान तंत्रज्ञान, कृषी, ऐतिहासिक तसेच स्पर्धा परीक्षाची पुस्तके उपलब्ध होती. पुस्तकाची विक्री बरी होती. लोकांमध्ये पुस्तके विकत घ्यावीत असा दांडगा उत्साह होता. परंतु पुस्तकांच्या किंमती सामान्य वाचकांच्या आवाक्यात असाव्यात असा सूर वाचकांचा दिसून येत होता. तरीही बालकांची पालकांकडे पुस्तके विकत घेण्याची मागणी प्रकर्षाने जाणवत होती.

    परिसंवाद 
    ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिसंवादाचा विषय होता दृकश्राव्य माध्यमांमुळे वाचन संस्कृती लोप पावते की काय ? या परिसंवादात साहित्याची जाण असणाऱ्या जिल्ह्यातील नामवंत मान्यवरांनी भाग घेतला. त्यात अमर हबीब, प्रा. एकनाथ आबुज, प्रा. हेमलता पाटील, प्रा. विद्यासागर पाटागणकर तसेच डॉ. सतिष साळुंके यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या परिसंवादाचा विषय पाहता व परिसंवादात भाग घेतलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा या विषयावरील गाढा अभ्यास पहाता परिसंवादाची चर्चा खूप रंगली.वाचक चांगलं वाचतीलही पण त्यासाठी चांगले लिहिले गेले पाहिजे असे मत मान्यवरांनी या परिसंवादात व्यक्त केले. व नंतर सौ. के.एस. के. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन दुसरा दिवस खेळी-मेळीच्या वातावरणात गेला.

    प्रकट मुलाखत
    कोणताही विषय वर्ज्य नसलेल्या व कोणत्याही विषयावर हक्काने बोलणारे परळीचे साहित्यिक प्रा. मधु जामकर यांची मराठी भाषा या विषयासंदर्भात घेतलेली मुलाखत ऐकण्यासाठी वाचक हजर होते. मुलाखतकारही अगदी तयारीनिशी आल्याचे त्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन जाणवत होते. परंतु मुलाखत् देण्यासाठी समोर बसलेल्या व्यक्ती तेवढयाच तोलाच्या व हजरजबाबी होत्या. एकंदरीत ही मुलाखत कायम स्मरणात राहिल अशी ठरली.

    या ग्रंथोत्सवात वाचनाची आवड असणार्‍या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती जाणवली. तर माय मराठीवर मनातून प्रेम करणारा सामान्य वाचक ग्रंथोत्सवात मोठया संख्येने सामील झाला होता. एक गोष्ट येथे जाणवली ती म्हणजे मराठीतील एखादे चांगले पुस्तक आले तर ते इतर भाषेत येत नाही व इतर भाषेतील चांगले पुस्तक मराठीत लवकर भाषांतर होऊन प्रकाशित होत नाही याची खंत वाटली.

    निरक्षर असूनही बहिणाबाई चौधरी मराठी माझी माय सरसोती-मला शिकविते बोली असे म्हणतात तर तीर्थामध्ये काशी –व्रत्तामध्ये एकादशी-भाषामध्ये तैशी- मऱ्हाटी शोभीवंत ज्ञानेश्वरांच्या या एका ओळीमधून मराठी भाषेचे स्थान किती मोठे व सर्वश्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर सुरेश भटाची लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी / जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी ही कविता मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करते. संत ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताई, एकनाथ, नामदेव,चोखामेळा अशा कितीतरी संतानी मराठीत अभंग रचना करुन मराठी जनमानसात रुजवली वाढविली त्यामुळे तिला कधीही लोप न पावणाऱ्या अजानवृक्षाचे आर्युमान लाभले आहे. कोणत्याही भाषेला बोली भाषा असते तशी ती मराठीतही आहे. त्यात पुणेरी, वऱ्हाडी, खानदेशी, मालवणी या बोली भाषा म्हणजे मराठीच्या अंगाखाद्यावर खेळणारी नातवंडेच म्हणावे लागतील.

    मराठी माणुस तसा उत्साहप्रिय आहे परंतु उत्साहात तंटा बखेडा झाला नाही असे सहसा घडत नाही परंतु या उत्सहामध्ये तसे काही झाले नाही. अख्या बीडकरांनी यात सहभाग घेतला. असे म्हणतात कोठे सोन्याच्या तर कोठे हिऱ्याच्या खाणी सापडतात परंतु महाराष्ट्राच्या या मातीत साहित्यिक जन्माला येतात. याच मातीत आपण जन्मलो याचा सार्थ अभिमान प्रत्येकामध्ये हवा या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाला वाचनाची आवड निर्माण व्हावी ही अपेक्षा.

    गोव्यातील चपातीच अर्थकारण

    गोवा हे जागतिक पर्यटन क्षेत्र. गोमंतकीय जनतेचे मुख्य अन्न भात व मासे. पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींना विविध खाद्य पदार्थ हवे असतात. पूर्वी गोव्यातील लोकांच्या मनावर पोर्तुगीज संस्कार होते. पाव हे नाश्त्याचे अन्न. चहापाव, भाजीपाव, मिरचीभजी पाव. उडपीवासीयांनी गोव्यातच हॉटेल व्यवसाय काबीज केल्यावर उत्तप्पा, वडे, दाळवडे, दहीवडे, इडली-सांबार, डोसा, कॉन्टीनेंटल खाणे सगळीकडे मिळू लागले. परंतु पोळी (चपाती) भाजी हे मुख्यत्वे सर्वांना आवडते. मात्र गोव्यात पावाशिवाय काही मिळत नाही. अशी परि‍स्थिती पंधराएक वर्षापूर्वी होती. 

    महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटकच्या काही भागातील लोकांना चपाती हवीच असते. यावर मार्ग काढण्यासाठी चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी चपातीचा व्यवसाय सुरु केला.त्यांनी २००० मध्ये फ्लॅट विकत घेतला, तेव्हा बँकेचे कर्ज घेतले. त्याची परतफेड त्यांच्या पतीच्या पगारातून होत होती. आणि हातात जेमतेम पगार येत होता. त्यात त्यांचं भागत नव्हतं. मग पर्याय शोधायला सुरुवात झाली.

    या व्यवसायातील त्यांच्या यशाविषयी त्या म्हणाल्या, आमच्या बिल्डींगच्या खाली किराणा मालाचे दुकान आहे. एके दिवशी मी दुकान मालकाला विचारले की, इथे कुठे आसपास चपात्या पुरवणारा माणूस आहे, तो दुकानातून गव्हाचे पीठ नेतो. त्याची ओळख मला करुन द्या मी असं म्हणत असतानाचा पाठीमागून आवाज आला 'वहिनी मागे वळून पहा तो मीच आहे.' मी त्याच्याकडे पाहताच त्याने त्याची ओळख करुन दिली. तो म्हणाला 'माझेनाव काटे मी नागपूरचा आहे. मी तुम्हाला शंभर चपात्यांचे पीठ देतो. तेल देतो ते घेऊन जा आणि उद्या शंभर चपात्या करुन द्या.' 

    त्या १०० चपात्या (पोळी) मी दुसऱ्या दिवशी करून दिल्या त्या दिवसापासून ते आजतागायत या चपात्यांचे अग्निहोत्र चालू आहे. मी सुरुवातीला शंभर नंतर दोनशे अस करत करत मीच माझ्या चपात्या करण्याची क्षमता वाढवत गेले. एका दिवसाला १००० ते १५०० चपाती करत गेले. कारण जेवढ्या मी चपात्या (पोळ्या) करेन तेवढी मला अर्थप्राप्ती होत असे. आठ वर्षापूर्वी १०० चपाती केल्या तर तो ३० रु. द्यायचा. तर अशा प्रकारे चपात्याचा प्रवास सुरु झाला. 

    नंतर माझ घर आर्थिक दृष्ट्या स्थिरावत चाललं होत. तेव्हा मला वाटायला लागला माझ्या सारख्या अनेक महिला आहेत आणि त्या चपात्यावाल्याला चपात्या करण्यासाठी महिलांची गरज होती. अल्पावधीतच १० ते १५ महिला चपात्या करण्यासाठी तयार झाल्या. आज ५० महिला या व्यवसायावर अवलंबून आहेत. स्वत:च घर सांभाळून त्या अर्थार्जन करत आहेत. स्वत:च्या कमावलेल्या पैशावर उज्वल भवितव्याचे स्वप्न पहात आहेत.

    रोज सकाळी ८:३० वाजता १५ हजार चपाती (पोळी) तालेगावातून बाहेर पडते. म्हणजे आमची सकाळ ही पहाटे ३:३० ला सुरु होते. प्रत्येक महिला आपआपल्या घरी चपात्या बनवितात. या चपात्या त्या त्या भागात नेऊन देण्यासाठी माणसे नेमली आहेत. आज हा व्यवसाय खूप फोफावला आहे की, अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील माझी चपाती जाते. 

    शंभर महिलांच्या साथीने संपूर्ण गोव्याला चपाती पुरविली जाते. महाराष्ट्रातून गोव्यात स्थिर व्हायला मला अशी चपाती कामी आली. तसा माझा बचतगटही कामी आला. दामिनी महिला स्वयंसहाय्यता बचतगट, तालेगांव (पणजी) अध्यक्ष म्हणून मला याचा अभिमान आहे. सौ. चित्रा प्रकाश क्षीरसागर त्यांच्या यशाची कहानी सांगत होत्या.. समोर चपातीचा ढीग वाढत होता. 

  • डॉ.ग.व.मुळे
  • शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !

    लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे. 

    श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. 

    झाडांची लागवड ऑगस्‍ट २०११ मध्ये करण्यात आली. मात्र फुलांच्या उत्पादनाला २ नोव्हेंबर २०११ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत २७ हजार १६० उत्पादित फुलांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीपासून श्री. अवचट यांना १ लक्ष ५१ हजार ९२ रुपये एवढी रक्कम मिळाली. आतापर्यंत फुलाच्या उत्पादनावर ६२ हजार रुपये खर्च झाला असून निव्वळ नफा ८९ हजार ९२ रुपये झाला आहे. येत्या काळात प्रत्येक महिन्याला सरासरी ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित असून प्रत्येक फूल ३ रुपये प्रमाणे विकल्यास ९० हजार रुपये प्रत्यक्षात उत्पन्न होऊ शकते.

    एका वर्षाचा ताळमेळ सांगताना अवचट म्हणाले, १० लक्ष ८० हजार रुपये फुलांची विक्री होणार असून ४ लक्ष ५६ हजार रुपये खर्च वजा जाता ६ लक्ष २४ हजार रुपये नफा मिळू शकतो. यावेळी त्यांनी स्वत:चे शेड्यूल, ड्रेनचीग व किटक नाशके व बुरशी नाशक फवारणीची महिती सांगितली.

    या फुलांची हैद्राबाद व बंगलुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या बाजारपेठांत फुले पोहचविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मात्र फुल उत्पादन मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यास वाहतुकीचा खर्च अल्प प्रमाणात येऊ शकेल. कदाचित फुलांचे व्यापारी सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुले खरेदी करु शकतील. त्यादृष्टीने आता या भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

    नागपूर बाजारपेठेत इव्हेंट, मॉल व सणासुदीच्या दिवसाचे महत्त्व ओळखून फुलांची विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविण्यपूर्ण शेती करुन आर्थिक समृध्दी साधावी, अशी वेळ आता आली आहे.

  • मिलिंद आवळे