Friday, July 6, 2012

मानव विकास मिशनमुळे मिळाला आधार

हाताला काम असेल तर पोटाला भाकर मिळेल, अशा मानसिकतेत असलेल्या बेरोजगारांना मानव विकास मिशनच्या माध्यमातून व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. शासनाच्या या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन हजार तरुणांना स्वयंरोजगार प्रशिक्षण मिळाले आहे. 

अन्न, वस्त्र , निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन यांनाही मुलभूत गरजां इतकेच महत्त्व आहे. मानव विकास निर्देशांकानुसार राज्यात परभणी जिल्ह्याचा क्रमांक बराच खाली आहे. हा जिल्हा औद्योगिक विकासात इतर जिल्ह्याच्या तुलनेत मागे असल्याने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध् आहेत. परभणी जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांकाची स्थिती सुधारावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांचा मानव विकास मिशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या मिशननुसार ग्रामीण भागातील तरुण, सुशिक्षीत बेरोजगार, महिला यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकणाऱ्‍या रोजगारानुसार प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

यामध्ये वाहन चालविणे, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स्, बांधकाम, संगणक, टेलरकाम इत्यादी दैनंदिन उपयोगी व्यवसायांशी संबंधित प्रशिक्षणाचा सहभाग होता. या प्रशिक्षणासाठी लाभार्थी निवडताना पारदर्शकता बाळगण्या्त आली. वृत्तपत्रांद्वारे तसेच विविध माध्यमांद्वारे या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली. गावा-गावात जाऊन लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल लाभार्थी प्रशिक्षणासाठी इतरत्र जाऊ शकत नव्हते, ही बाब लक्षात घेऊन त्यांना स्थानिक पातळीवरच प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची मदत घेण्यात आली. 

लाभार्थ्यांमध्ये या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण झाला असून हे प्रशिक्षण या तरुणांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरणार आहे. मानव विकास मिशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या व्यवसाय कौशल्य प्रशिक्षणामुळे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे दोन हजार तरुणांच्या कौशल्यात वाढ होण्यारस मदत झाली असून त्यांना व्यवसाय करण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.

No comments:

Post a Comment