Thursday, June 4, 2020

आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि साथ रोगातून निर्माण झालेली अस्पृश्यता तसेच वर्ण व्यवस्थेकडे घेऊन जाणारा कोरोना वायरस.....! राजेश खडके बहुजन मोर्चा



इतिहास काळापासून साथ रोगांचा आभ्यास केला तर असे लक्षात येते की.मोठ मोठे बदल या साथ रोगातून निर्माण झालेले आपणास दिसतील.याठिकाणी मला आवर्जून सांगावे वाटते की,काही ठिकाणी या साथ रोगांचा फायदा घेऊन मोठा धार्मिक,राजकीय आणि सामजिक बदल देखील घडलेले आपल्याला इतिहासात पाह्यला मिळतील.यातून आपला भारत देश देखील या सामजिक बदलापासून वाचलेला नाही हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटते.आजपर्यंत जगामध्ये बरेच साथ रोग आणि वायरस होऊन गेलेले आहेत.त्यामध्ये आपल्याला प्लेग,पटकी,कॉलेरा,कुष्ठरोग, एड्स, बर्ड फ्लू,स्वाईन फ्लू,इत्यादी वगैरे वगैरे आणि आज गाजत असलेला कोविड १९ (कोरोना वायरस) होय.
      यामध्ये जगात जर धार्मिक,सामजिक आणि राजकीय बदल जर कोणत्या रोगाने घडविले असतील तर त्या साथ रोगा मधील “प्लेग” या रोगाने घडविले असल्याचे दिसून येईल.सदर इतिहासाचे आपणास अवलोकन व्हावे यासाठी मी काही उदाहरण आपणास पुढील प्रमाणे देत आहे.प्लेग साथ रोगाची ओळख ही दुसऱ्या शतका मध्ये जगाला झालेली आहे.त्या नंतर तो सहाव्या शतकात रोमन साम्राज्यात उद्भवला होता रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतरच्या बायझान्टाईन साम्राज्याच्या सम्राट हा जस्टिनाईन होता.त्याने इजिप्त प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडलेला होता त्यामुळे इजिप्त मधून हा प्लेग बायझान्टाईनची राजधानी कॉन्स्टेटिनोपल (इस्तंबूल) या शहरात पोहचला होता.त्याचा प्रसार संपूर्ण युरोप,आशिया,उत्तर अमेरिका तसेच आरबेरीया पर्यंत पोहचला होता.त्यामुळे विभागलेले रोमन साम्राज्य जस्टिनाईनला एकत्र करता आले नाही.या साथ रोगाने जवळ जवळ पाच कोटी लोकांचा बळी घेतला होता.याचा फायदा ख्रिश्चन धर्म (कॅथेलिक) प्रसारासाठी ख्रिश्चन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात घेतला होता. त्यामुळे जगात या धर्माचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही.त्यामुळे प्लेगच्या साथ रोगाने मोठ्या प्रमाणात धार्मिक बदल होण्यास मदत केल्याचे दिसून येते.
   त्यानंतर चौदाव्या शतकामध्ये पुन्हा प्लेग साथ रोग उद्भवला होता.या काळात चार वर्षात तब्बल वीस कोटी लोकांचा बळी गेला त्यामुळे या प्लेगाला “ब्लॅक डेथ प्लेग” असे म्हटले गेलेले आहे.त्यामुळे संपूर्ण जग हादरले होते.त्यामुळे याचा काही तरी बंदोबस्त झाला पाहिजे या विचारतून व्हेनिस या राज्यातील “रागुसा” नावाच्या शहराने एक उपाय शोधून काढला आणि तो उपाय म्हणजे शहरात येणाऱ्या जहाजांना बंदरापासून काही अंतरावर ३० दिवस नांगरून ठेवावे लागत होते.यालाच “क्वारंटाईन” म्हटले गेले आहे.त्यांनंतर जहाजावर कोणी आजारी पडले नसेल तर त्या जहाजाला बंदरात प्रवेश देण्यात येत होता.या काळात फ्रान्स आणि इंग्लड मधील सुरु असलेले युध्द थांबले आणि ब्रिटनची साम्राज्यशाही कोलमडून पडली एवढा मोठा राजकीय बदल घडलेला आहे.
     त्यांनंतर इंग्लडला या साथ रोग प्लेगचा सामना दर वीस वर्षाने करावा लागत होता.सोळाव्या शतकात मोठ्या प्रमाणात या रोगाचा परिणाम ब्रिटनला भोगावा लागला.त्यामुळे याकाळात त्यांनी प्लेग रुग्णांना समाजातून वेगळे ठेवण्यासाठीचा कायदा तयार केला आणि तो कायदा म्हणजे “विलगीकरण” होय.या प्लेगचा प्रसार रोखण्यासाठी प्लेगच्या रुग्णाला बळजबरीने त्याच्या घरात कोंडण्यात येत होते.आणि त्याच्या घरावर लाल फुली मारून त्याच्या घराच्या दरवाज्यावर “देवाची आमच्यावर दया आहे” असे लिहिले जात होते. त्यामुळे याठिकाणी मोठा सामाजिक बदल आपल्याला पाहिला मिळत आहे.त्यामुळे प्लेगच्या साथीने सहाव्या शतका पासून ते सोळाव्या शतका पर्यंत धार्मिक,राजकीय आणि सामजिक बदल घडविलेले आहेत.या साथ रोगाने भारतात असे बरेच सामाजिक बदल घडविलेले आहेत असे समाजशास्त्री विद्वानांचे म्हणणे आहे.मग असे कोणते बदल या प्लेगच्या साथ रोगाने घडविलेले आहेत याचे संशोधन देखील झाले पाहिजे असे मला वाटते.
    विषय असा आहे की,आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची कोरोनाच्या पार्शभूमीवर “जय महाराष्ट्र” या टीव्ही मिडीयाने मुलाखत घेतली होती.या मुलाखतीमध्ये संपादक प्रसाद काथे यांनी प्रकाश आंबेडकर यांना असा प्रश्न केला होता की, कोरोनाच्या माध्यमातून पुन्हा वर्ण व्यवस्था प्रस्थापित होताना आपल्याला दिसत आहे काय...? या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वी आलेल्या महारोगाचे उदाहरण देऊन सदरचा विषय पुढे नेला आहे.यावरून स्पष्ट होते की,जर जगात प्लेग साथ रोगाने जर धार्मिक,राजकीय आणि सामजिक बदल जर घडविले असतील तर नक्कीच भारतात असा बदल घडलेला आहे हे नाकारता येत नाही.मग असा बदल कोणता असेल याचा विचार केला तर इतिहास आपल्याला बऱ्याच प्रश्नाची उत्तरे देताना दिसत असतो.पूर्वीपासून भारतात मनुच्या मनुस्मृतीच्या कायद्याचा अंमल होता आणि त्याला नेहमी इथल्या महापुरुषांनी विरोध करून तो  कायदा मोडीत काढण्याचे कार्य केलेले आहे.....परंतु मनुची चातुर्वर्ण व्यवस्था होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.......म्हणजे ब्राह्मण-वैश्य-क्षत्रिय-शुद्र असे चार वर्ण होते.इतिहास साक्षीला आहे की मनूच्या शूद्राला इतिहास काळापासून नेहमी वंचित रहावे लागले आहे. इथली ”वर्ण व्यावस्था” ही “जात व्यवस्था” कशी झाली आणि केव्हा झाली याचे आकलन येथील शूद्रांना कधी झालेच नाही....मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्रांची ओळख “शुद्र पूर्वी कोण होते” या लिखाणातून दिलेली आहे...त्यामध्ये “अस्पृश्य पूर्वी कोण होते” असे आशयाचे लिखाण दिसून येत नाही.इतिहास लेखनात नेहमी “शुद्र” या शब्दाचे लेखन केल्याचे दिसून येते.गोलमेज परिषदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या शूद्रांना प्रतिनिधित्व मिळावे असेच होते.त्यामुळे वर्गवारी नुसार “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” नावाची संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली असल्याचे दिसून येते.
     महात्मा ज्योतिबा फुले यांनी शुद्रासाठी आपल्या वाड्यातील पाण्याची विहीर खुली करून दिली असल्याचे म्हटले आहे.एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यात “अस्पृश्य महार” या शब्दाचा उल्लेख कुठेही आढळत नाही...तसेच पेशवाईमध्ये सुध्दा “अस्पृश्य महार” हा शब्द आढळ होत नाही.मात्र इतिहास काळापासून “महार” हा शब्द आढळ होताना आपल्याला दिसत आहे.भीमा कोरेगावचे युध्द जरी पाहिले तरी तिथे “अस्पृश्य महार” ह्या शब्दाचा उच्चार देखील दिसत नाही.एकंदरीत सैन्या मध्ये सुध्दा आपल्याला “महार बटालियन” असेच वाचायला मिळते. असे असताना ब्रिटीश वतन अॅक्ट १८७४-१८८४ मध्ये देखील “महार वतन” असे आढळते मात्र “अस्पृश्य महार” असे कुठेही आढळ होताना दिसत नाही.
        शेड्युल्ड कास्टमध्ये ५९ जाती असताना केवळ अस्पृश्य शब्दाचा प्रयोग फक्त “महार” या जमातीलाच केल्याचे दिसून येते.याचा उहापोह केल्याशिवाय जय महाराष्ट्र टीव्ही मिडियाचे संपादक प्रसाद काथे यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना केलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही असे मला वाटते......म्हणून काही गोष्टी या लेखाच्या माध्यमातून मी चर्चेमध्ये आणीत आहे. भीमा कोरेगावच्या १८१८ च्या युध्दानंतर महार योध्यांचे पुढे काय झाले याचे उत्तर आजपर्यंत कोणी इतिहासाला विचारलेला नाही. मात्र त्यानंतर राजे उमाजी नाईक यांनी १८२२ मध्ये पुरंधर किल्ल्यावर स्वत:चा राज्याभिषेक करून “प्रतिशिवाजी” म्हणून ओळख करून घेतेली होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यानंतर मामलेदार कचेरी पुणे येथे त्यांचा १८३४ मध्ये मृत्यू झालेला आहे.मामलेदार कचेरी जवळच “फुले वाडा” आहे.राजे उमाजी नाईक यांच्या मृत्यू समयी महात्मा ज्योतिबा फुले यांचे वय वर्षे ७ होते.त्यानंतर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात १८५७ चा “स्वतंत्र लढा” उभारण्यात आलेला होता...परंतु या लढ्यात महार योध्यानी सहभाग घेतलेला दिसून येत नाही.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच महार समाजाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची १८६९ मध्ये पहिली शिवजयंती साजरा केली.त्यापूर्वी शिवजयंती साजरा होत असल्याचे कोठेही पुरावे उपलब्ध होत नाही.त्यानंतर याच महार समाजाला बरोबर घेऊन १८७४ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी “सत्यशोधक समाजाची” स्थापना केली असल्याचे इतिहास आपल्याला दाखले देत आहे.त्यामुळे १८९० पर्यंत “महार” या जमातीला “शुद्र” म्हटलेले आहे....परंतु अस्पृश्य म्हटले असल्याची नोंद इतिहासात सापडत नाही.त्यानंतर स्वराज्याच्या  इतिहासाचे पुर्नवलोकन करण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते.
     महार या जमातीचा नेहमी इतिहासात परिवर्तनाकडे कल राहिला असल्याचे दिसून येते.टिळक-गोखले-आगरकर यांनी १८८४ मध्ये पहिली हिंदू महासभा आयोजित करून त्याचे रुपांतर “कॉंग्रेस” मध्ये केले होते.....म्हणून यांना कॉंग्रेसचे संस्थापक म्हटले गेले आहे.परंतु तशी नोंद कॉंग्रेसमध्ये आढळून येत नाही.समाजात एकसूत्रीपणा आणून कॉंग्रेसला बळकटी मिळावी.......यासाठी टिळकांचे कर्टर समर्थक असणारे भाऊ रंगारी यांच्या माध्यमातून १८९२ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव सुरु करण्यात आला होता.त्यानंतर टिळकांनी १८९४ मध्ये सदरचा गणेश उत्सव आपल्या हातात घेऊन पुढे त्याला भगवे निशाण देऊन त्याचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढविले आहे.पुढे काय काय झाले हे सर्व आपल्याला माहित आहेत.परंतु टिळकांनी कॉंग्रेसचे नेतृत्व हातात घेतले....याच दरम्यान १८९७ मध्ये प्लेग या साथ रोगाने भारतावर मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला होता.त्याकाळी पुण्यामध्ये या साथ रोगाचा मोठा परिणाम आपल्याला पुण्यात दिसतो आहे.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुत्र यशवंत फुले हे डॉक्टर होते.....त्यांनी हडपसर येथील ससाणे नगर येथे दवाखाना सुरु केला होता.महात्मा फुले यांचे बरोबर असणारा महार समाज सावित्रीबाई यांच्या सोबत प्लेग साथ रोग रुग्णांची सेवा करू लागला होता......ब्रिटीशांना या रोगाचा चौदाव्या शतकात आलेला अनुभव माहित होता.त्यामुळे याठिकाणी हा साथ रोग निपटून काढण्यासाठी त्यानी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला.या साथ रोगाची एवढी दहशत झालेली होती की ब्रिटीश यांचे बरोबर मदतीला कोण उभे रहात नव्हते.......त्याकाळी महार समाज तो साथ रोग रोखण्यासाठी पुढे आलेला होता.पुणे शहरातील प्रत्येक घरात जबरदस्तीने बळजबरीने ब्रिटीश शिरत होते आणि तिथली साफ सफाई हा महार योध्दा करीत होता.मुंढवा येथील एका दहा वर्षाच्या मुलाला प्लेग झालेला होता त्याला औषध उपचार व्हावे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्या मुलाला बैलगाडीत घालून ससाणे नगर येथील आपल्या मुलाच्या दवाखान्यात आणलेले होते...त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने तो वाचला गेला परंतु त्याचा संसर्ग सावित्रीबाई यांना झाल्याने त्या प्लेग साथ रोगाने त्यांचा बळी घेतला आहे.
    ब्रिटीश आणि सावित्रीबाई फुले यांचे बरोबर प्लेग रुग्णांची सेवा करण्यासाठी महार समाज त्याकाळी “प्लेग योध्दा” झालेला होता.त्यामुळे हा रोग आपल्याला होईल ही भीती इतर समाजातील लोकांना होवू लागली.त्यामुळे या प्लेग योध्या पासून इतर समाज दूर होऊ लागला म्हणजेच सोशल डीस्टटिंग पाळू लागला.....पुढे त्याची तो सावली देखील घ्यायला घाबरू लागला.यातूनच या समाजाला “अस्पृश्य महार” असे संबोधण्यात येऊ लागली.याचा प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की जेवढ्या प्रमाणात आजचा कोरोना पोहचला नसेल.त्यामुळे मनुस्मृतीमध्ये “अस्पृश्यता” हा शब्द दिसत नाही...मात्र “शुद्र” हा शब्द दिसून येतो.त्यामुळे महार ही जात नसताना त्याला जातीवाचक शब्द प्रयोग सुरु झाला असल्याचे काही समाजशास्त्री सांगत आहेत.
     एकंदरीत पहाता सहाव्या शतकातील प्लेगची साथ रोगाने धार्मिक बदल घडवून कॅथेलिक धर्माचा प्रचार होण्यास मदत केली.तर चौदाव्या शतकातील प्लेगची साथ रोगाने राजकीय बदल घडवून सरंजामशाही कोलमडून टाकण्यास मदत केली तर सोळाव्या शतकातील प्लेगची साथ रोगाने समाजातील लोकांना वेगळे करून सामजिक बदल घडविण्यास मदत केली...तर भारतात एकोणीसाव्या शतकात सामाजिक बदल म्हणून अस्पृश्यता निर्माण केली असल्याचे जाणकार सांगत आहेत.त्यामुळे कोरोना वायरसमुळे पुन्हा एकदा वर्ण व्यवस्था उभी राहणार काय...? असा प्रश्न जय महाराष्ट्र टीव्ही मिडीयाचे संपादक प्रसाद काथे यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना विचारलेला तो प्रश्न मला महत्वाचा वाटतो.