Sunday, December 27, 2020

साहेब मी पशुपालक शेतकरी दुध उत्पादक व्यावसायिक मला वाचवा....मी उध्वस्त होतोय....माझ्या सहकारी दुध संस्थावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होतोय....!

     प्रश्न असा आहे की गोकुळ,महानंदा,कात्रज इत्यादी सहकारी दुध संस्थावर मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे कब्जा होतोय.असा कब्जा झाल्यास जो पशुपालक शेतकरी आहे.जो दुध उत्पादक शेतकरी आहे तो उध्वस्त होताना दिसत आहे.खरेच तो पशुपालक दुध उत्पादक व्यावसायिक उध्वस्त होतो काय...? हे या लेखात आपण समजून घेणार आहोत.

       गेल्या दोन लेखात आपण मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर भांडवलदार कंपनी “कुळ” म्हणून दाखल होणार असल्याबाबत समजून घेतलेले  आहे.त्यामुळे शेतकऱ्याची जमीन नंतरच्या काळात भांडवलदार कंपनीच्या घश्यात जाऊन तो शेतकरी त्या कंपनीचा “पोटार्थी” गुलाम होणार असल्याचे समजून घेतले.त्याच प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या  सहकारी साखर कारखान्यावर देखील भांडवलदार कंपनीचा कब्जा होऊन त्यांच्या दीडशे ते दोनशे एकर जमिनीवर भांडवलदार कंपनीचा कब्जा होणार आहे.त्यामुळे त्याचे भाग भांडवलावर कंपनीचा कब्जा होणार आहे.

      मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे पशुपालक शेतकरी हा पशुपालक व्यावसायिक राहणार आहे काय..? तर नक्कीच नाही.कारण शेतकऱ्याच्या जमिनीवर जर भांडवलदार कंपनीचा ताबा झाल्यास त्या शेतकऱ्याची बैल जोडी उपयोगात राहणार नाही.त्यामुळे शेतकऱ्याचा गोठा देखील राहणार नाही.जेव्हा गोठाच राहणार नाही तेव्हा गोठ्यात दुध देणारी जनावरे सुध्दा राहणार नाही.कारण शेतकऱ्याच्या जमिनी जर भांडवलदार कंपनीच्या ताब्यात गेल्यास जनावरांना “वैरण” मिळणार नाही.त्यामुळे गोठा उध्वस्त झाल्यास त्याला दुध उत्पादन करण्यास मिळणार नाही.दुध उत्पादन न झाल्यास ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यानी दुध संस्था उभ्या केल्या आहेत त्या संस्था उध्वस्त होऊन त्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होणार आहे.

     जनावरांचे गोठे उध्वस्त झाल्यास जनावर राहणार नाही त्यामुळे जनावरांचे बाजार इथून पुढे भरणार नाहीत.आणि येणाऱ्या काळात जनावरांचा बाजार आपल्याला पाहिला मिळणार नाही.म्हणजेच या तीन कृषी कायद्यामुळे “गाव संस्कृती” मधून उभे राहिलेल्या “जत्रा” आपल्याला पाहिला मिळणार नाही.जनावर राहिले नाही तर जनावरांचे दवाखाने बंद होणार आहेत.त्यामुळे जनावरांचा डॉक्टर पेशा सुध्दा बंद होणार आहे

    शासनाने पशुपालन खाते तयार करून त्यावर “आयुक्त” नेमणूक करून राज्यात पशुपालन कार्यलय उभे केले.त्यातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती करून रोजगार उपलब्ध केला गेला.आरक्षित समाजाला या कार्यलयात मोठ्या प्रमाणात जागा निर्माण झाल्या.इथला पशुपालक शेतकऱ्याच्या उद्योगाला मोठी चालना मिळाली.कृषी विद्यापीठ उभे राहिले.कृषी महाविद्यालय उभे राहिले.शेतकऱ्यांची पोर कृषी शिक्षण घेऊन आपला व आपल्या शेतीचा तसाच पशुपालन उद्योगाचा विकास करू लागले.त्यामुळे आपला देश व आपले राज्याची “आर्थिक व्यवस्था” मोठ्या प्रमाणात उभी राहण्यास मदत होऊ लागली.परंतु या तीन कृषी कायद्यामुळे हे सर्व तर उध्वस्त होणारच आहे.त्यामुळे इथला पशुपालक व्यावसायिक म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे.

     वतन बचाओ आंदोलन संघटनेने या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे की यां तीन कृषी कायद्यामुळे इथली “गाव संस्कृती” उध्वस्त होणार आहे.इथला पशुपालन व्यावसायिक उध्वस्त झाल्यास सहकारी दुध संस्था उध्वस्त होणार आहे.पशुपालन आयुक्त कार्यालय उध्वस्त होणार आहे.त्यामुळे इथल्या सरकारी नोकऱ्या संपणार आहेत.सरकारी नोकऱ्या संपल्यास इथले आरक्षण देखील संपणार आहे.त्यामुळे कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय देखील बंद होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची पोर आपल्याला कृषी शिक्षण घेताना दिसणार नाहीत.भांडवलशाही मजबूत होऊन इथली लोकशाही उध्वस्त होणार आहे.या संदर्भात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी संघर्ष उभा केलेला आहे.आपण त्या संघर्षात त्यांचे सोबत उभे राहुयात.(क्रमशJ

 

साहेब मला वाचवा....मी ऊस उत्पादक शेतकरी उध्वस्त होतोय....माझ्या सहकारी साखर कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होतोय....!


       

      तीन कृषी कायदे मोदी सरकारने मंजूर केले आणि “बहुजन हिताय...बहुजन सुखाय” या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या ब्रीद वाक्यावर हल्ला झाला.सहकार क्षेत्राची पेरणी याच सत्यशोधक चळवळीतून उभी राहिलेली आहे.तसेच हे वाक्य गौतमी पुत्र सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांनी बहुजनांच्या कल्याणासाठी तयार केलेल्या ब्रीद वाक्यातून आलेले वाक्य आहे.आणि ते वाक्य म्हणजे “चरथ भिक्कवे चारिकम...! बहुजन हिताय,बहुजन बहुजन सुखाय...! आत्तानु हिताय,लोकानू कंपाय..! अध्य कल्याणम्,मध्य कल्यानम्,अंत कल्यानम्” हे होय.तसेच हे सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत.त्या संबधीचे कायदे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आहेत.

        गेल्या लेखात या तीन कृषी कायद्या संदर्भातील दुष्परिणाम आपण समजून घेतले आहेत....आज आपण  “बहुजन हिताय,बहुजन सुखाय” या वाक्यावर मोदी सरकारने कसा हल्ला केलाय याची चाचपणी करून ऊस उत्पादक शेतकरी कसा उध्वस्त होणार आहे आणि तो उध्वस्त झाल्यास कोण कोण कसे.....? उध्वस्त होणार आहेत हे आपण समजून घेणार आहोत.ऊस उत्पादक शेतकरी यांनी घाम गाळून ऊस पिकविला त्यातून त्याने एकत्र येऊन कष्टाने आपले भाग भांडवल जमा करून सहकारी साखर कारखाना उभा केला आणि साखर उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली.सदर साखरेची देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली.त्यामुळे शेतकऱ्यानी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साखर कारखाने उभे केल.आणि ऊस उत्पादक शेतकरी हा सदन शेतकरी म्हणून पुढे आला.या सहकार साखर कारखान्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने सहकार मंत्रालय उभे करून साखर आयुक्त कार्यालय स्थापन केले.त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उभा राहिला.यामुळे आरक्षित समाजाला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या.तसेच कृषी विद्यापीठ उभे राहिले,महाविद्यालय उभे राहिली यातून कृषी संशोधक पुढे आले.विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेऊन आपली शेती विकास करू लागले.

     मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हा ऊस उत्पादक म्हणून राहणार नाही.कारण या तीन कायद्यामुळे भांडवलदार कंपन्यांचा शिरकाव होऊन तो  ऊस उत्पादक कंपनी म्हणून पुढे येणार आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर भांडवलदार कंपनीचे “कुळ” म्हणून नाव दाखल होणार आहे.ऊस उत्पादक कंपनी झाल्यामुळे त्या कंपनीचे सहकारी साखर कारखान्यावर कब्जा होऊन त्याची साखर निर्मितीचवर कंपनीची मालकी तयार होणार आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याची सहकारी साखर कारखान्या मधील भाग भांडवलाची लुबाडणूक होऊन चोरी होणार आहे.त्यामुळे त्याची सहकार साखर कारखान्या मधील भागीदारी संपणार आहे.त्याची भागीदारी आणि शेती संपल्यामुळे त्याच्या पाठीमागे असलेला “शेतकरी” हा शब्द निघून जाणार आहे.आणि फक्त कंपनीला भाड्याने जमीन देणारा “जमीन मालक” म्हणून त्याची नवीन ओळख निर्माण होणार आहे आणि ती ओळख कंपनी जास्त काळ ठेवणार नाही.नंतर “जमीन मालक” हा शब्द निघून जाणार आहे त्यामुळे तो ऊस उत्पादक शेतकरी त्या कंपनीचा पोटार्थी “गुलाम” होणार आहे.त्यामुळे तो ऊस उत्पादक शेतकरी म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवा...मी उध्वस्त होतोय...! माझ्या सहकारी साखर कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होतोय...!

    सहकारी साखर कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी उध्वस्त होऊन तिथला कामगार उध्वस्त होऊन सहकारी साखर कारखान्याच्या दीडशे ते दोनशे एकरच्या जमिनी भांडवलदार कंपनीच्या घश्यात जाणार आहेत.असे झाल्यास इथले सहकार मंत्रालय बंद होणार आहे.सहकार मंत्रालय बंद झाल्यास इथले साखर आयुक्त कार्यलय बंद होणार बंद होणार आहे.या उस उत्पादकासाठी कृषी खात्यातील काम करणारे काही विभाग बंद होणार आहे.त्यामुळे ही सर्व सरकारी खाती बंद झाल्यामुळे तिथला कर्मचारी आणि अधिकारी वर्ग संपुष्ट येणार आहे.त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी होणार आहे.सरकारी नोकऱ्या कमी झाल्या की आरक्षण सुध्दा कमी होणार आहे.आणि ह्या सर्व घडामोडी झाल्यामुळे देशातील नागरिकांना रेशनिंग कार्डवर मिळणारी साखर सुध्दा बंद होणार आहे.कारण एफसीआय म्हणजे फूड कॉर्पोरेशन इंडिया बंद झाल्यास रेशनिंगच बंद होणार आहे.यात महत्वाचा मुद्दा असा आहे की,कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयातून तयार होणारे विद्यार्थी आणि संशोधक इथून पुढे तयार होणार नाही.कारण भांडवलदार कंपन्या स्वत:चे संशोधन केद्र उभारणार असून त्यातूनच ते त्यांना लागेल तसे लोक घेणार नाहेत.त्यामुळे कृषी विद्यार्थ्याला मिळणारे कृषी शिक्षण बंद होणार आहे.

      त्यामुळे आमचे वतन बचाओ आंदोलन संघटनेचे सर्व नागरिकांना आवाहन आहे की.या तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडी यांनी पाठींबा दिलेला आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी हितासाठी संघर्ष सुरु केला आहे.त्यांच्या पाठीशी आपण सर्व प्रामणिकपणे उभे राहुयात.(क्रमशJ

Tuesday, December 15, 2020

आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवा.....मी उध्वस्त होत आहे......!


 

                मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याचा हल्ला हा भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीवर झालेला हल्ला आहे म्हणून देशातील हरियाना,पंजाबचा मधील शेतकरी या कायद्या विरोधात उभा राहिलेला आहे.ज्या शेतकऱ्याने हा हल्ला ओळखला आहे तो या कायद्याच्या विरोधात उभा राहताना देशात आपल्याला दिसत आहे.परंतु हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार मागे घेईल असे वाटत नाही.परंतु या कायद्याचे दुष्परिणाम इतके भयानक आहेत की देशाची अर्थव्यवस्थेचा कणा हा इथला शेती व्यावसाय आहे आणि हे समजण्यासाठी “रुपयाची समस्या” हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ ज्यांनी वाचला आहे त्यालाच हे समजणार आहे.ज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले स्वराज्य समजून घेतले आहे त्यालाच हे समजणार आहे.आणि ज्याने महात्मा ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक चळवळ समजून घेतली आहे त्यालाच हे समजणार आहे.

      जगाला कृषीप्रधान संस्कृतीची उगम सिंधू संस्कृती मधून झाल्याचे माहित आहे म्हणून जगाचा पोशिंदा असणारा हा भारत देश आहे.आणि ह्या भारत देशाच्या कृषीप्रधान संस्कृतीवर भांडवलशाहीचा कब्जा या तीन कायद्याच्या माध्यमातून होणार आहे.हे सर्व माहित असताना महाराष्ट्रतील बळीराजा शांत कसा असा प्रश्न आता काही जाणकार यांना पडलेला आहे.परंतु तसे नाही इथल्या छत्रपती शिवरायांच्या कुणब्याला हे समजले आहे.परंतु त्याचे पुढारपण करणारा कोणी नेता आता या महाराष्ट्रात शिल्लक राहिलेला नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे.मनातून तो कोकाळतोय आणि किंचाळत सुध्दा आहे की “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.आणि त्याला हे माहित आहे की त्याला आता एकच माणूस वाचवू शकतो आणि तो माणूस म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब....पण त्याची मजबुरी आहे त्याला इथे समाज व्यवस्थेत आणि नात्या गोत्यात अडकवून ठेवलेले आहे म्हणून तो समोर येऊन बोंबलू शकत नाही.

      या तीन कृषी कायद्यामुळे गावाचे “गावपण” उध्वस्त होणार आहे आणि इथला गावगाडा सुध्दा उध्वस्त होणार आहे.कारण इथल्या कुणबी समाजावर इथला अलुतेदार आणि बलुतेदार उभा आहे.जेव्हा हा बळीराजाच जर उध्वस्त झाला तर इथला अलुतेदार व बलुतेदार यांना उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही याची जाणीव त्याला झाल्यामुळे तो सुध्दां कोकाळत आहे किंचाळत आहे की “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.अलुतेदार आणि  बलुतेदार तसेच कुणबी समाजाने ओळखले आहे की गावगाडा बंद झाला की पारंपारिक होणारे “आठवडा बाजार” बंद होणार आहे तसेच “जनावरांचे बाजार” सुध्दा बंद होणार आहे.गावगाडा उध्वस्त झाल्यामुळे गावच्या “जत्रा” सुध्दा बंद होणारा आहे त्यामुळे वर्षात होणारे पारंपारिक “उत्सव” बंद होणार आहे म्हणजेच “सिंधू संस्कृती” चे आणि बळीराजाचे होणारे वार्षिक पूजन बंद होणार आहे.म्हणून त्या गावगाड्यातील अलुतेदार आणि बलुतेदार म्हणतोय की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.

       या तीन कृषी कायद्यामुळे आम्हाला गावात कधीही “बुलेट किंवा फटफटी” चा आवाज ऐकू येणार नाहीये.कारण सकाळी त्या गाड्यावर दुध घेऊन येणारा दुधवाला गावकरी सुध्दा शिल्लक राहणार नाहीये.म्हणून जो शहरात आलेला गावकरी म्हणतोय आता गावात मी परत कसा जाऊ......? कारण गावात “आठवडे बाजार” राहिला नाही,गावात “जनावरांचा बाजार” सुध्दां राहिला नाही......आणि गावात होणाऱ्या पारंपारिक “जत्रा” सुध्दा राहिल्या नाहीत.म्हणून  तो शहरातील गावकरी सुध्दा म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.

        या सगळ्यांचा आवाज आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबा पर्यंत पोहचण्याची जबाबदारी आम्ही “वतन बचाओ आंदोलन” संघटनेने घेतली आहे.या सर्व बाबींचा उहापोह करीत असताना भविष्य काळातील बऱ्याच घटना आमच्या समोर येत आहे.या तीन कृषी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला तर देशातील “कृषी खाते” बंद होणार आहे,”पणन खाते” बंद होणार आहे,”पशुपालन खाते” बंद होणार आहे.”साखर आयुक्त कार्यालय” बंद होणार आहे.”नाबार्ड” बंद होणार आहे,”एफसीआय” बंद होणार आहे.त्यामुळे या माध्यमातून सहकार क्षेत्राचे जे जाळे उभे राहिलेले आहे ते जाळे उध्वस्त होणार आहे.म्हणजे इथला “ऊस उत्पादक शेतकरी” उध्वस्त होणार आहे. “ऊस उत्पादक शेतकरी” उध्वस्त झाल्यास साखर कारखाने उध्वस्त होणार आहे.”पशुपालन व्यवस्था” उध्वस्त झाल्यामुळे इथल्या “दुध संस्था” बंद होणार आहे.म्हणजेच सहकार क्षेत्र उध्वस्त झाल्यामुळे “जिल्हा मध्यवर्ती बँका” सुध्दा बंद होणार आहे.त्यामुळे ह्या सर्व खात्यातील अधिकारी वर्ग,कर्मचारी वर्ग,आणि गावगाड्यातील संपूर्ण वर्ग कोकाळतोय आणि किंचाळतोय आणि म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”. (क्रमशJ