Thursday, September 6, 2012

संत तुकाराम वनग्राम योजना


ग्रामीण जनतेमध्ये वनाच्या महत्वाविषयी जागृती निर्माण करणे यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे काम असून त्यात सतत सुधारण घडवून आणण्यासाठी समित्यामध्ये एक चुरस निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणा-या समित्यांना संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व वनव्यवस्थापन समिती पुरस्कार देवून गौरविण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना सुरु केली आहे.

वनसंरक्षण आणि वनविकासामध्ये स्थानिक लोकाच्या सहभागातून केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वनमंत्रालयाने मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल 2003 पासून ग्रामीणांच्या सहभागातून वनव्यवस्थापन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार वनक्षेत्रामध्ये वनक्षेत्राच्या सीमेवर असणा-या 15 हजार 500 गांवापैकी 11 हजार 799 एवढया गावामध्ये संयुक्त व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्ष्तोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण वनवणवा, अवैध चराई प्रतिबंध करणे व ग्रामीण जनतेमध्ये वनाचे महत्व यासबंधी जागृती निर्माण करणे आदि कामे या समित्याची आहेत.

ज्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्या वनग्राम योजनेत सहभागी होतील त्यामधून जिल्हास्तरावर गुणानुक्रमे पहिल्या 3 समित्यांना व राज्यस्तरावरील उत्कृष्ट ठरणा-या गुणानुक्रमे पहिल्या तीन समित्यांना रोख स्वरुपात पारितोषिक देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

वन परिक्षेत्रस्तरावरील मुल्यमापन समिती डिसेंबर महिन्यात वनक्षेत्रांना भेटी देवून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या कामाची तपासणी करुन तीन उत्कृष्ठ समित्यांची विभागीय वन अधिका-यामार्फत जिल्हास्तरावरील निवड समितीकडे प्रस्ताव करतील. प्रस्तावित समितीची आवश्यक ती तपासणी व आवश्यक असल्यास कामाची पाहाणी करुन जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्याकरीता प्रत्येक जिल्हयात तीन समित्यांची निवड करुन जाहीर करण्यात येतील.

राज्यस्तरीय मुल्यमापन समिती जिल्हास्तरावरील प्रथम बक्षीस प्राप्त समित्यापैकी तीन समित्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात पूणे करेल व त्यामधील प्रथम तीन समित्याची राज्यस्तरीय बक्षिसासाठी निवड केली जाईल.

मुल्यमापन समित्यांचे गठण- वन परिक्षेत्रस्तरावरील निवड समितीत वनपरिक्षेत्र ज्यांच्या कार्यक्षेत्रात येते महसूल विभागाचे उप विभागीय अधिकारी अध्यक्ष, सहाय्यक वनसंरक्षक उपाध्यक्ष तर गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वृक्ष लागवड अधिकारी, वा निकीशी निगडीत दोन सेवाभावी संस्थाचे सदस्य, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सदस्य म्हणून राहतील.
जिल्हास्तरीय निवड समितीमध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य सचिव उप वनसंरक्षक सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सहसंचालक सामाजिक वनीकरण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वानिकी क्षेत्राशी निगडीत एक सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य असतात.

राज्यस्तरावरील निवड समितीत वनमंत्री अध्यक्ष, उपाध्यक्ष वनराज्यमंत्री, सदस्य सचिव वनसंरक्षक (संयुक्त वनव्यवस्थापन), सदस्य वन विभाग प्रधान सचिव, मुख्य वनसंरक्षक, नागपूर, मुख्यसंरक्षक (वन्यजीव) नागपूर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य नागपूर आहेत.

जिल्हास्तरावरील बक्षिस- जिल्हास्तरीय बक्षिसपात्र संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचा निकाल जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. तीन उत्कृष्ट वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम ग्राम उत्कृष्ट जिल्हास्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येईल. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकचे बक्षीस 51 हजार, द्वितीय 31 हजार, तर तृतीय क्रमाकाचे बक्षीस 11 हजार आहे.

राज्यस्तरावरील गुणानुक्रमे तीन उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम वन ग्राम उत्कृष्ट राज्यस्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येईल. या प्रथम क्रमांकाचे 10 लाख, द्वितीय 5 लाख तर तृतीय 3 लाख अशी पारितोषिके देण्यात येतील.
नंदूरबार जिल्हयात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव बी.टी.वानखेडे जिल्हा निवड समित्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मूल्यमापन करुन त्या नंतर बक्षिसे जाहिर करण्यात येतात.

समितीस प्राप्त होणा-या बक्षिसाची रक्कम ही समतीच्या नावे असलेल्या बचत खात्यात जमा करण्यात येईल आणि त्याचा उपयोग मंजूर योजनेनुसार वनविकास कामासाठी केला जाईल. यामुळे जनतेमध्ये वनाच्या विषयी जागृती तर निर्माण होईल त्याचबरोबर वनांचे संरक्षण होईल हे मात्र निश्चित.

मेघश्याम महाले, माहिती सहाय्यक, नंदुरबार

No comments:

Post a Comment