Sunday, April 26, 2020

खरेच झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे काय...? त्यांना मुलभूत अधिकार मिळाले आहेत काय...?


       
               आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे....आणि स्वच्छत: गृह मिळणे हा त्यातीलच एक अधिकार आहे. प्रश्न असा आहे की एखाद्या माणसाला आठ दिवस अन्न मिळाले नाही तर तो मरत नाही मात्र त्याला लघवी आणि संडास अशा प्रात:विधी करायला मिळाली नाही तर नक्कीच त्याची मोठी हानी होत असते हे कोणीही नाकारणार नाही.त्यामुळे खरेच झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे काय...? असा माझा प्रश्न आहे.कारण मध्यम वर्गीय आणि उच्च वर्णीय लोकांना स्वत:चे असे स्वच्छत: गृह असते हे कोणाला सांगायची गरज नाही त्यामुळे त्याने लॉक डाऊन शंभर टक्के पाळला असेल यात माझे तर दुमत नाही.त्याच प्रमाणे या वर्गाकडे तसे मुबलक पैसेही असतात त्यामुळे तो स्वत:हाला लागणाऱ्या अत्यवश्यक वस्तू एकदाच खरेदी करून त्याचा तो साठा करून ठेऊ शकतो आणि तो साठा त्याने केला असल्याचे माझे मत आहे म्हणून त्याने लॉक डाऊन पाळला आहे.
        परंतु झोपडपट्टी वासियाकडे तेव्हा मुबलक साठा करून ठेवण्यासाठी पैसेही नाहीत आणि तेवढी मोठी जागाही नाही याची माहिती किती लोकांना आहे हे मला माहित नाही.जर याची माहिती त्याच्याकडे असती तर नक्कीच त्याने त्या झोपडपट्टी वासियाकडे बोट दाखविले नसते. झोपडपट्टीवासी हा शंभर स्केवर फुटाच्या घरात आपल्या कुटुंबां समवेत रहात असतो. शंभर स्केवर फुटातच त्याचे किचन, बेडरूम आणि हॉल सुध्दा असतो.मात्र त्यामध्ये त्याची संडासची सोय उपलब्ध नसते त्यामुळे प्रात:विधी करण्यासाठी त्याला सार्वजनिक ठिकाणी जावे लागते आणि हे सार्वजनिक ठिकाण कमीत कमी पाचशे लोकांसाठी एकच मात्र घरापासून दूर असते.त्यामुळे काही लोक २४ तासात प्रात:विधीसाठी एकदा जातात तर काही लोक २४ तासात दोनदा जात असतात.तसेच काही लोक लघवी करण्यासाठी चार तासात एकदा जातात...तर काही लोक दोन तासात एकदा जातात....परंतु मधुमेह रुग्ण तासा तासाला जात असतो.ज्याचे घर मोठे आहे आणि त्याच्या घरात ही सर्व सोय आहे त्याला तो किती वेळा जातो याचे काही बंधन नसते.या सर्व गोष्टींचा विचार केला तर झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे असे मला वाटत नाही.
     कोरोना साथ रोगासाठी केंद्रसरकारने पहिला लॉक डाऊन २१ दिवसांचा जाहीर केला तर दुसरा लॉक डाऊन हा १९ दिवसांचा जाहीर केला आहे म्हणजे हा ४० दिवसांचा लॉक डाऊन झोपडपट्टी वासियांना पाळायचा होता व आहे.....कोणताही कायदा तडजोडीचे समर्थन करीत नाही.त्यामुळे संचारबंदीच्या काळात तुम्ही घरातून बाहेर यायचे नाही असाच कायदा सांगत असतो.परंतु झोपडपट्टी वासियांना या आरोग्याच्या सर्व विधी करण्यासाठी बाहेरच यावे लागते त्यामुळे त्याने लॉक डाऊन पाळला नाही असे माझे मत आहे.लघवी आणि संडास करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकावर पोलिसांनी बंधन ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून बरेच संघर्ष झाले आणि नाहक झोपडपट्टीवासी लॉक डाऊन पाळत नाही अशी बोंबाबोंब मिडीया वाल्यांनी केली आहे.झोपडपट्टीमध्ये १०० स्केवर फुटाचे दोन दोन पाच पाच हजाराच्यावर घरे आहेत आणि प्रत्येक घरात त्याचे कुटुंब आहे.जीवनावश्यक वस्तूंचा तो साठा करून ठेऊ शकत नसल्यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी रोज बाहेर पडावे लागत असते.त्यामुळे खरेदीच्या ठिकाणी दोन पाच हजाराची गर्दी दिसून येते त्या गर्दीमुळे मिडीया म्हणते झोपडपट्टीवासी लॉक डाऊन पाळत नाही.
     आता माझे असे म्हणणे आहे की, जे लोक असे आरोप करतात त्यांनी त्या झोपडपट्टीमध्ये राहून २४ तासांचा लॉक डाऊन पाळून दाखवायचा आहे.त्यांनी जर असा लॉक डाऊन पाळून दाखविला तर नक्कीच आम्ही बेजबाबदार आहोत आणि आम्ही लॉक डाऊन पाळत नाही हे मान्य करण्यास तयार आहोत.म्हणून मी म्हणतो खरेच झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे काय...? त्यांना तो पाळण्यासाठी मुलभूत अधिकार मिळाले आहेत काय...?

No comments:

Post a Comment