Wednesday, November 21, 2012

सिंचनातून समृध्दीकडे वाटचाल

महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य असल्याने आणि बहुतांश शेतकरी कृषिवर आधारीत असल्याने शासनाचा सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर आहे. यवतमाळ कापूस उत्पादक जिल्हा असून बहुतांश शेतकऱ्यांचे हेच मुख्य पिक आहे. त्यामुळे या पिकाला पुरसे सिंचन उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक सिंचन प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आल्याने जिल्ह्यात आजमितीस 1 लाख 92 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

जिल्हा विस्ताराने मोठा असून काही भाग अतिदुर्गम आणि आदीवासीबहुल आहे. कापूस हे मुख्य पीक असल्याने त्यादृष्टिने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक लहान मोठे प्रकल्प हाती घेवून ते पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 13 लाख 58 हजार हेक्टर असून त्यापैकी शेतीलायक क्षेत्र 8 लाख 86 हजार इतके आहे. या शेतीलायक बहुतांश क्षेत्राच्या टप्प्यात अनेक लहान मोठे सिंचन प्रकल्प घेण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात 5 मोठे, 10 मध्यम, 85 लघू व 855 स्थानिक स्तरीय असे एकूण 955 प्रकल्प आहेत. निम्न पैनगंगा वगळता या सर्व प्रकल्पांची प्रकल्पीय सिंचन क्षमता 3 लाख 41 हजार हेक्टर इतकी आहे.

यापैकी जुन 2011 पर्यत बांधकाम पूर्ण झालेल्या प्रकल्पातून 96 हजार हेक्टर तर उर्वरीत बांधकामाधीन असलेल्या प्रकल्पातून 96 हजार असे एकूण 1 लाख 92 हजार हेक्टरची क्षमता निर्माण झाली आहे. निम्न पैनगंगा हा महाराष्ट्र व आंध्रप्रदेशचा आंतरराज्यीय मोठा सिंचन प्रकल्प बांधकामाधीन आहे. केवळ या एकाच प्रकल्पातून 2 लाख 27 हजार इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार हेक्टर क्षेत्राला प्रकल्पाचा लाभ होणार आहे. लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकल्पातून 58 हजार हेक्टर तर आंध्रप्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यातील 27 हजार हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येईल.

या प्रकल्पाचा एकूण पाणी वापर 41.14 टीएमसी इतका राहणार असून प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या महाराष्ट्र शासन 48 टक्के तर आंध्र प्रदेश 12 टक्के इतका खर्च प्रकल्पावर करणार आहे. तसेच याच प्रमाणात दोन्ही राज्याकडून पाण्याचा वापर होणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ, चंद्रपूर व अदिलाबाद या जिल्ह्यातील मागास व नक्षलग्रस्त क्षेत्रास सिंचनाचा फायदा होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, औद्योगिकीकरण, मत्स्य व्यवसाय, दळणवळण, कृषि उत्पादन आदींसाठीही हा प्रकल्प जिल्ह्यासाठी मौलाचा ठरणार आहे.

जिल्ह्यात बेंबळा व अरुणावती या दोन मोठ्या प्रकल्पाची बहुतांश कामे पूर्ण झाली आहे. अरुणावती प्रकल्पाची भूविकासाची किरकोळ कामे वगळता सर्व कामे पूर्ण झाल्याने या प्रकल्पातून 24 हजार 3 इतकी तर बेंबळा प्रकल्पातून 34 हजार 519 हेक्टर अशी एकूण 58 हजार 522 हेक्टर इतकी सिंचन क्षमता जुन 2012 अखेर निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिकीकरणासाठी सिंचन प्रकल्प अतिशय महत्वाचे आहे. याच उद्देशाने जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे मोठे जाळे निर्माण करण्यात आल्याने आगामी काळात हे प्रकल्प संपूर्ण जिल्ह्याला आर्थिकदृष्ट्या समृध्द करणार आहे.

मंगेश वरकड, प्र.जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ

No comments:

Post a Comment