Friday, November 18, 2011

मसाला पिके यांची लागवड

केंद्रात एक एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेली 'लाखी' बाग हे केंद्रातील प्रमुख आकर्षण आहे. केंद्रात आतापर्यंत झालेल्या पिक संशोधनावर आधाfरित ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. नारळ, मसालापिके आणि फळपिके यांची एकत्रित लागवड केल्यास प्रति हेक्टरी एक लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल विकसित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मसाला आंतरपिकांची लागवड केल्यानंतर नारळाच्या उत्पादनात गेल्या २७ वर्षात सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नारळ आणि जायफळ गटातून सर्वाधिक लाभ होत असल्याचे निष्कर्षही संशोधनाअंती मांडण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकारात नारळाच्या मध्यभागी एक जायफळ, दोन नारळांच्या मध्ये एक दालचिनी आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरीची रोपे लागवड केली असता एकरी ७० नारळ, ५४ जायफळ, १२३ दालचिनी आणि १४० काळीमिरी रोपे बसतात व त्यापासून १० वर्षानंतर सरासरी एक लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. दुसऱ्या प्रकारात चार नारळाच्या मध्यभागी जायफळ व त्याचे सभोवती अननस, दोन नारळांच्या मध्ये साडेसहा फुटावर केळी आणि दोन केळींच्या मध्ये ४ फुटावर २ दालचिनी, प्रत्येक नारळाच्या कोमऱ्यावर १ सुरण आणि प्रत्येक नारळावर दोन काळीमिरी लागवड केली असता एका एकरात ७० नारळ, ५४ जायफळ, २८० केळी, २४६ दालचिनी, १४० काळीमिरी, २१६ सुरण, आणि १३५० अननस एवढी लागवड करता येते. अशाच पद्धतीने इतरही पद्धतीचे संशोधन या लाखी बागेत सातत्याने करण्यात येत आहे. विशेषत: एका ठिकाणी लावलेल्या रोपाची जागा दुसऱ्या वर्षी रिक्त ठेवण्यात येते आणि आदल्या वर्षी रिक्त असलेल्या जागेवर लागवड करण्यात येते. त्यामुळे जमिनीचा कस चांगल्या प्रकारे राहतो.

कोकणात सरासरी दहा गुंठे नारळाचे क्षेत्र धारण करणाऱ्या बागायतदारांची संख्या जास्त आहे. या बागायतदारांचा विचार करून दहा गुंठे क्षेत्रावर उत्पन्न कसे वाढविता येईल याचा प्रात्यक्षिक प्लॉट केंद्रपरिसरात १९९८ पासून सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पपई अननस, वांगी, मिरची, शेवगा, वेलवर्गीय भाजीपाला, मसाला पिके यांची लागवड करण्यात येत आहे. दरवर्षी या प्लॉटपासून १५ ते २० हजार उत्पन्न मिळते आहे.

नारळासोबत बागायतदारांनी मिश्र पिकांची लागवड केल्यास त्यांना कसा लाभ होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक या केंद्रात दाखविले जाते. त्याअंतर्गत मिरचीच्या ज्वाला आणि कोकणी किर्ती जातींची लागवड, घेवडा, टोमॅटो, ढोबळी मिरची, नवलकोल, वांगी, शिराळी, काकडी, पडवळ अदी आंतरपिकांच्या लागवडींची शिफारसही केंद्राने केली आहे. दालचीनीची 'कोकण तेज' जात विककरण्यात केंद्रातील संशोधक यशस्वी ठरले आहेत. या जातीची चव उत्कृष्ट असून ३.२ टक्के तेल त्यात आहे. जायफळाची 'कोकण स्वाद' ही जातदेखील इथे विकसित करण्यात आली आहे. एका वर्षात प्रति झाड १५० किलो उत्पादन असणारी कोकमची 'कोंकण हातीस' जातदेखील केंद्रात विकसित करण्यात आली आहे.

केंद्रात दरवर्षी नारळापासून सुमारे ५ टन कचरा आणि मसाला पिकांपासून प्रति हेक्टरी सुमारे ४ हजार किलो कचरा उपलब्ध होतो. या कचऱ्यापासून गांडूळखत तयार करण्यासाठी केंद्राच्या परिसरातच दोन युनिट उभारण्यात आले आहेत. प्रति हेक्टर २ ते ३ टन गांडुळखत उपलब्ध होते. या खताचा वापर बागेतील झाडांसाठी करण्यात येतो. तसेच याच ठिकाणी तयार होणारे व्हर्मीवॉशही रोपांसाठी उपयुक्त असते.

केंद्रातर्फे कीड रोग नियंत्रणाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले आहे. या ठिकाणी गेंड्या भुंग्यांच्या उपद्रवापासून रक्षणासाठी महत्वाच्या उपायांबाबत बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पाने खाणारी अळी आणि काळ्या डोक्याच्या अळीच्या जैव किड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केंद्राने शोधली आहे.

मसाला पिकांच्या कलमांना कोकणातील शेतकरी वर्गातून मोठी मागणी येऊ लागली आहे. या वर्गातील पिकांची कलमेदेखील केंद्रात केली जातात. दालचीनीची गुटी कलम पद्धत, जायफळाची कोय कलम आणि मृदकाष्ट पद्धत, जायफळासाठी मायफळाचा खुट अशा विविध पद्धती विकसीत करून केंद्राने कोकणातील शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखविला आहे. 

संशोधन केंद्रामधील डॉ.नागवेकर यांच्यासह प्रा.विशाल सावंत आणि प्रा. संदीप गुरव अशा प्रकारच्या संशोधनात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात व्यस्त असतात. केंद्राच्या महसूली उत्पन्नातही वाढ होत असून ते गतवर्षी ३६ लाखापर्यंत पोहचले आहे. परिसरातील नागरिकांना येथील विक्री केंद्रात या ठिकाणचे उत्पादन अल्पदरात उपलब्ध करून दिले जाते. संशोधनाला नियोजनाची जोड देऊन इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केलेल्या परिश्रमामुळेच केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे. हा सन्मान निश्चितपणे इथल्या संशोधन कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरेल!

  • डॉ.किरण मोघे
  • No comments:

    Post a Comment