Wednesday, January 23, 2013

माझ मत, माझ भविष्य


माझ मत, माझा निर्धार, माझ भविष्य या त्रिसुत्रीवरच भारताची लोकशाही खंबीरपणे उभी आहे. या लोकशाहीचे मूलतत्व म्हणजे निवडणूका आहेत. निवडणुका ह्या मतदारांच्या मतांवर अवलंबून आहेत. त्यामुळे बलशाली लोकशाहीकरिता मतदारांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय निवडणूक आयोग देखिल 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी मतदान करावे यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध अभियान राबवले जातात. भारत निवडणूक आयोगाकडून 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी तर आयोगाच्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त संपुर्ण देशभर आज राष्ट्रीय मतदार दिवस मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

'मतदार' हा मतदारसंघातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो व त्या अनुषंगानेच त्याला मतदानामध्ये महत्त्व दिले जाते. मतदारांना लोकशाहीमार्फत स्थानिक पातळीवर प्रतिनिधी निवडताना उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन सहजपणे करता येते. जबाबदारीने मतदानाचा अधिकार बजावून योग्य व्यक्तीची निवड करण्याचे शिक्षण मतदाराला स्थानिक शासन संस्थाच्या निवडणूकीमुळेच मिळत आलेले आहे. मतदार हा एक मतदानाचा पाया आहे.भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून लोकशाही प्रणाली अवलंबली गेली आणि तेव्हापासून ग्रामपंचायतींपासून ते विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुका जनतेच्या अनमोल मताने होतात. मतदाराला स्वत:च्या हक्काची माहिती करुन घेण्यासाठी स्थानिक शासनसंस्था मदत करतात. मतदार हा एक गुप्तधारी नागरिक असतो आणि यामुळेच मतदानाला अधिकाधिक मदत होते आणि मतदान यशस्वीरित्या सफल होते.

आज भारताच्या लोकसंख्येचा विचार करता, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. तेव्‍हा या लोकशाहीला आणखी बलवान करण्यासाठी मतदारांचे महत्त्व ही तितकेच आहे. मतदारांनी दुरदृष्टी बाळगुन हक्काने आणि जागरुक राहून मतदान करणे गरजेचे आहे. मतदार ही एक प्रकारची मतदानाची शक्‍तीच म्हणता येईल. हा तोच महाराष्ट्र आहे ही तीच माती आहे ज्यात शिवराय, डॉ.आंबेडकर, स्वामी विवेकानंद जन्मले. मग का हाच स्वाभिमानपर महाराष्ट्र मतदानाच्या बाबतीत मागे का सरकतोय याचा गांभिर्याने विचार करण्याची आज आवश्यकता आहे.

आपल्या देशात 18 वर्ष पूर्ण केलेलया सर्व स्त्री - पुरुषांना, नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, अशा लोकांनाच प्रामुख्याने मतदार असे संबोधले जाते. शिक्षण, जात, धर्म असा भेदभाव न करता सर्व प्रौढ नागरिकांना मताधिकार असावा हेच तत्व आपल्या 'मतदार' या संकल्पनेतून मांडले गेले आहे. मतदाराचे कर्तव्य म्हणजे उमेदवाराची निवड करुन कारभार पाहण्यास समर्थक बनविणे होय. प्रत्येक मतदारांने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व उमेदवाराची नेमणूक केली पाहीजे हे मतदारावर असलेले एक प्रकारचे बंधनच आहे. हे कायदेशीर बंधन प्रत्येक मतदार बंधु भगिनींनी पाळणे गरजेचे आहे.
मतदान ही सौर उर्जेप्रमाणे कधीही न संपणारी शक्ती आहे. मतदान उभारले की उमेदवाराच्या डोळयापुढे फक्त मतदारच उभा राहिला पाहीजे कारण मतदार ही एक अदभुत शक्तीच आहे. ती जपली पाहीजे इतकेच नव्हे तर आजच्या काळात वाढीस लावली पाहिजे. हीच या मतदार दिवसानिमित्त अपेक्षा.

रुपाली गोरे,
जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

No comments:

Post a Comment