Thursday, January 17, 2013

स्वकष्टांच्या व्यवसायाकडे झेप

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडील 15दिवसीय शास्त्रशुध्द उद्योजकता प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासाठी प्रेरणा व दिशा श्री.तुकाराम नन्नावरे यांनी मिळाली. या प्रेरणा व दिशेची वाट आपल्या यशस्वी जीवनात त्यांनी स्वाभिमान जागृतीसह स्वकष्टांच्या व्यवसायाकडे झेप घेऊन ते आज यशस्वी उद्योजक बनले आहे. याकामी काही अंशी अर्थसहाय्याची साथ लाभली ती महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची.

श्री.तुकाराम बाबुराव नन्नावरे मुळ बीड जिल्ह्यातील पाडळी गांवचे रहिवाशी.वडिलांचा ग्रामीण भागातील चर्मकार व्यवसाय त्यांच्या बालपणाला खूप काही शिकविणारा ठरला. श्री.तुकाराम नन्नावरे यांनी आठवीपर्यतचे शिक्षण गांवात तर 10 वी पर्यतचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. बीएस्सी पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी बीड शहर गाठले. घरची गरिबीची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी चर्मकार व्यवसायातील बुट पॉलीश व्यवसाय पत्कारला. हॉटेलमध्ये वेटरकी केली. अनुभवासाठी शिक्षणसंस्थेत शिक्षकाची नोकरी आणि तदनंतर कंपनीत पर्यवेक्षकाची नोकरी केली परंतू अल्प आर्थिक मोबदल्यामुळे चरितार्थ चालविणे कठीण झाल्याने ते बेचैन असत. या बेचैनीतून त्यांना नकळत उद्योग व्यवसायाची सुप्त इच्छाशक्ती जागृत झाली. स्वत:चा विकासाचा उध्दार व्यवसायातून करावयाचा असेल तर वडिलोपार्जित व्यवसायाची कास धरणारा छोटा मोठा उद्योगाकडे वळले पाहिजे एवढ्याच त्यांच्या जागृत सुप्त इच्छाशक्तीने त्यांना आज यशस्वी उद्योजकाच्या शिखराकडे वाटचाल करणारी परिस्थिती बनविण्यासाठी रस्त्यावर पडलेली एक जूनाट स्कूल बॅग आणि उद्योजकता केंद्राचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले.रस्त्यावरील जुनाट बॅग त्यांनी घरी आणून तिला धुवून,पूर्णपणे उसवून तिचे सर्व भाग वेगळे करुन त्या आधारे नवीन बॅग बनविण्याची कल्पना साकारली आणि या कल्पनेला साथ मिळाली.

उद्योजकता विकास केंद्राकडील शास्त्रशुध्द मार्गदर्शनातून त्यांनी या व्यवसायाकडे आपली स्वारी निर्धारपूर्वक वळविली.स्वत:कडील तुटपुंजे भांडवल,महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज प्रकरणानुसार मिळालेले बँकेचे अर्थसहाय्य यातून त्यांनी चर्मकार व्यवसायाशी निगडित शिलाई मशिन घेतले. योग्य दरातील कच्चामालालासाठी मुंबई, पुणे शहराकडे चौकशीसाठी धाव घेतली. आणि स्कूलबॅगा, बाजारहाटासाठी लागणा-या पिशव्या, ऑफिसबॅग, प्रवाशी बॅग, मनी पर्स, कॉम्प्यूटर कव्हर, मशिनरी आच्छादने अशी विविध प्रकारातील दर्जेदार एटीएस प्रोडॉक्शनच्या नांवाने उत्पादन ते आज शहरातील कॅनॉट गार्डन परिसरातील स्वत:च्या गाळ्यात घेत आहेत. श्री. नन्नावरे केवळ मालक म्हणूनच काम करत नाहीत तर ते आजही बॅगा तयार करण्यासाठी पत्नीसह योगदान देत आहेत. स्वत: योगदान दिल्यास रोजगारही आत्मियतेने कामात योगदान देतात आणि यातूनच खरा रोजगार निर्माण होऊ शकतो असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

उत्पादित मालाची विक्रीसाठी त्यांनी या व्यवसायाच्या जोरावर गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलमध्ये एक शोरुम वजा दुकान घेऊन ते उत्पादित मालाची विक्री करण्यात येत आहे. या व्यवसायासाठी त्यांना त्यांची पत्नी सौ. अलका यांची साथ मिळत आहे. तसेच व्यवसायिक मालाच्या उत्पादनासाठी बेरोजगारांना रोजगारांना रोजगार देत आहेत. आज श्री. तुकाराम नन्नावरे यांनी स्वकतृत्व, कष्ट, चिकाटी आणि जिद्यीने स्वत:चे विश्व चांगले उद्योजक म्हणून निर्माण केले आहे. याचबरोबर त्यांनी भाऊ, पुतन्या, व अन्य कामगारांनाही वैयक्तीक व्यवसायाकडे वळविले आहे.

भविष्यात नन्नावरे हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपले विक्री शोरुम जाळे पसरविण्याच्या विचारात असून मुंबई व अन्य शहरातील कुशल कारागिराच्या मदतीने या व्यवसायात शेंद्रा एमआयडीसी परिसरात 100 रोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हा प्रयत्न म्हणजे स्वत:च्या विकासापुरते मर्यादित न राहता इतरांना रोजगार मिळवून देणे हे त्यांचे स्वप्न असून हे स्वप्न ते उद्योजकता विकास केंद्राच्या शास्त्रशुध्द प्रशिक्षणातील मार्गदर्शनाचाच एक भाग असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

No comments:

Post a Comment