Wednesday, February 20, 2013

फुलवली शेती

रासायनिक खत आणि किटकनाशकांचा भडीमार करुन उच्चांकी उत्पादन घेणाऱ्यांची संख्या सध्या वाढत आहे. मात्र या दोन्हीला फाटा देवून केवळ देशी गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करुन एकरी 10 टन टोमॅटोचे उत्पादन घेण्याची किमया संजय एकापूरे या शेतकऱ्यांनी साधली आहे.

पवनी रोडवर पहेला गावापासून 3 किलोमिटर अंतरावरील निमगांव येथे एकापूरे यांची 10 एकर शेती आहे. 2008 मध्ये एका शेतकऱ्यांकडून त्यांनी ही शेती विकत घेतली त्यावेळी शेतीत फारसे उत्पादन निघत नव्हते. एकापूरे यांनी बांध्या फोडून शेतीचे सपाटीकरण केले. सुरुवातीला 2 वर्ष त्यांनी धानाचे उत्पादन घेतले. त्यावेळी बोरू, धैंचा, गिरीपुष्प या हिरवळीच्या खतासोबतच त्यांनी रासायनिक खताचा वापर केला होता. 2010 मध्ये सुभाष पाळेकर (अमरावती) या शेतीतज्ञाचे पुस्तक वाचून एकापूरे यांनी नैसर्गिक पध्दतीने शेती करण्याचा ध्यास घेतला. एकलव्याप्रमाणे सुभाष पाळेकर यांना गुरु मानून त्यांच्या झीरो बजेट शेतीची माहिती इंटरनेटवरुन घेवून त्यांनी ते तंत्रज्ञान शेतीत वापरायला सुरुवात केली. नैसर्गिक शेती करण्यासाठी त्यांनी दोन देशी भाकड गाई विकत घेतल्या. त्यांना पौष्टिक खुराक देवून धष्टपुष्ट बनवले. या दोन गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करुन त्यां नी 10 एकर भाजीपाल्याची शेती फुलवली आहे.

दरम्यान त्यांनी शेतामध्ये विंधन विहिर तयार करुन सबमर्शियल पंप बसवून घेतला. तसेच ठिबंक सिंचन पध्दतीचा वापर करुन पाण्याचे व्यवस्थापन करुन उन्हाळी पिक घ्यायला सुध्दा सुरुवात केली. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात एकापूरे यांनी लक्ष्मी वाणाच्या टमाटरची लागवड केली. 4X2 फुट अंतरावर हलके गादीवाफे तयार करुन 1 एकरात टोमॅटो पिक घेतले. ठिबक सिंचनाचा वापर करुन गाईचे गोमुत्र आणि पाणी एकत्र करुन ते झाडांना देतात. गोमुत्रामधून युरीया खताचा पुरवठा पिकांना केला जातो. तसेच देशी गाईचे 10 किलो शेण, 10 लिटर गोमुत्र, 2 किलो डाळीचे पिठ, 2 किलो गुळ, आणि मुठभर शेतीतील माती यांचे मिश्रण करुन ते 180 लिटर पाण्यात टाकून 72 तास आंबवतात. हे आंबवलेले द्रावण मगाने थोडे-थोडे झाडाच्या बुंध्याशी टाकतात. या जीवामृतामुळे जमीनीला अन्नघटकांचा पुरवठा तर होतोच शिवाय त्यातील डाळीच्या पिठामुळे हवेतील नायट्रोजन जमीनीत स्थिरावण्यास मदत होते. तसेच शेणामुळे जमीनीतील सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमीन भुसभूसीत राहण्यास मदत होते. त्यामुळे मुळांना ऑक्सीजन मिळतो असे एकापूरे यांचे म्हणणे आहे. किडीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून त्यां नी शेतात 10 ते 15 झेंडूची झाडे लावली आहेत. पिकावर येणारी किड या झेंडूच्या फुलांकडे आकृष्ट होते.

अशा पध्दतीने नैसर्गिक ज्ञानाचा वापर करुन फुललेल्या टमाटरच्या शेतातून टोमॅटो बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे. या टोमॅटोचा आकार, रंग, चव आणि टिकावूपणा ग्राहकांच्या नजरेत भरण्यासारखा आहे. दर आठवडयाला 1 टन माल ते बाजारात विक्रीला पाठवित आहेत. आतापर्यंत 5 टन माल त्यांखनी विकला आहे. एकरी 10 टन उत्पादन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या टोमॅटोला 12 रुपये दर मिळत असून उन्हाळयात तो 18 ते 20 रुपयांपर्यंत जावू शकतो. सरासरी 12 ते 13 रुपये दर मिळाला तरी 1 एकरात त्यांना 1 लाख 30 हजार रुपयांचे उत्पन्न होते. लागवड खर्च, मजूरांचा खर्च आणि पाणी व्यवस्थापन यासाठी 30 हजार रुपये खर्च वजा करुन त्यांाना 1 एकरात 1 लाख रुपयांचा नफा मिळतो.

अशा पध्दतीने शेती केल्यास 1 देशी गाय पाच एकर शेतीसाठी खताचा पुरवठा करु शकते. एकापूरे हे 10 एकरामध्ये विविध भाजीपाल्याचे पिक घेतात. टमाटर, वांगे, गवार, चवळी, भेंडी, हळद, कांदे, लसून अशा विविध पिकांचा त्यारमध्ये समावेश आहे. 10 एकरामध्ये खर्च वजा जाता त्यांना 10 लाखांचे उत्पन्न होते. शिवाय वर्षभर 7 महिला व 2 पुरुषांना कायमस्वरुपी रोजगारही पुरवितात. त्यामुळे देशी गाईची संख्या वाढविण्यावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

किडीसाठी जालिम उपाय
किडीचा प्रादुर्भाव झाल्यास एकापूरे 10 किलो गाईचे गोमुत्र, 5 किलो कडुनिंबाची पेस्ट, 2 किलो तंबाखू पावडर, 1 किलो हिरवी मिरची व लसणाची पेस्ट यांचे द्रावण तयार करुन ते 3 तास शिजवतात. त्यानंतर 24 तास थंड होवू देतात. हे थंड झालेले द्रावण गाळून घेतात. 100 लिटर पाण्यामध्ये 3 लिटर द्रावण मिसळवून त्यातची फवारणी करतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव नष्ट होतो. 3 लिटर द्रावण 3 एकरासाठी पुरेसे होते. शिवाय पिकांना धोका संभवत नाही. असे एकापूरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment