Monday, February 25, 2013

पाणलोटामुळे समृद्धी

देशाच्या सकल उत्पादनात कृषि क्षेत्राचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्याला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देवून त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध कार्यक्रम,योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. गोंदियासारख्या मागास जिल्ह्यातील दुर्गम,आदिवासी व नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी तालुक्यात कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाने मेहताखेड्यातील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणली आहे.

गोंदिया जिल्हयातील मेहताखेडा या गावाची राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. पाणलोटाचे भौगोलिक क्षेत्र 3542.63 हेक्टर असून निव्वळ पिकाखाली 612 हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात 592.12 हेक्टर, रब्बी हंगामात 14.10 हेक्टर क्षेत्र आणि उन्हाळी हंगामात 2.78 हेक्टर एवढ्याच क्षेत्रावर प्रकल्पापूर्वी पिके घेण्यात येत होती.

राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमापूर्वी मेहताखेड्यात रब्बी हंगामात भाजीपाला व इतर पिके फारच नगण्य होती. शेतकऱ्यांना आठवडी बाजारातून भाजीपाला विकत घ्यावा लागत होता. खरीप हंगामात संरक्षीत ओलीताची साधने नव्हती. शेतकऱ्यांच्या 12 सिंचन विहिरींची भूजल पातळी खोलवर गेलेली.

मेहताखेड्याची राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाची निवड झाल्याने ग्रामसभेने पाणलोट समिती स्थापन केली. सन 2007-12 पर्यन्तचा वर्षनिहाय नियोजन आराखडा तयार केला. यामध्ये शेतकरी अभ्यास दौरे, चेतना भवन, शेतकरी प्रशिक्षण, घरगुती उत्पादन किट, युरिया ब्रिकेटचा वापर, झिंक सल्फेटचा वापर, पीक प्रात्यक्षिक, नाडेप कंपोस्ट खत, कुक्कुटपालन, जलसंवर्धनाच्या कामांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार त्यांनी नियोजन केलेल्या आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा केली.

गवताबाई मंगतुराम भागवत ह्या मेहताखेड्याच्या. त्यांच्याकडे सहा एकर शेती. ही सर्व धान शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी. गावात पाणलोट समितीची सभा होऊन गवताबाईच्या शेताजवळ नाल्यावर बंधारा बांधण्याचे निश्चित करण्यात आले. बंधारा बांधल्यामुळे धान पीक तर चांगलेच आले. बंधाऱ्यामुळे सिंचनाची सुविधा झाल्याने दोन बांधित हळद व भाजीपाला,मिरची,टमाटरही गवताबाईच्या हाती पैसा खेळू लागला, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.

ओमराज उईके यांचेकडेही आठ एकर शेती. यापैकी काही जमीन पडिक राहायची तर काही जमिनीवर धान घ्यायचे. सिंचनाची व्यवस्था पाणलोटच्या बंधाऱ्यामुळे निर्माण झाल्याने दोनदा धान पीक घेतल्या जात आहे. याशिवाय जी जमीन पडिक राहायची ती बंधाऱ्यामुळे सिंचनाखाली आल्याने आता भाजीपाला, मिरचीचे उत्पादन घेता येत असल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली.

मानकीबाई गुरुभैल्लीया यांची सात एकर शेती. मात्र ही सातही एकर शेती उतारावर असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जायचे. जमिनीला भेगा पडायच्या. पाहिजे त्या प्रमाणात धान होत नव्हते. शेताजवळील नाल्यावर कृषी विभागाने बंधारा बांधून दिल्याने आता इंजिन बसवून धान पिकाला पाणी देणे शक्य झाले आहे. टमाटे,वांगे,मिरची व इतर भाजीपाला लागवडीतून आर्थिक स्थिती सुधारली. पूर्वी इतरांकडे रोजंदारीने काम करण्यासाठी जावे लागत. आता मानकीबाईकडेच मिरची तोडण्यासाठी मजूर येत आहे.

कृषी विभागाने राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमातून बंधाऱ्यांची निर्मिती केल्यामुळे मेहताखेड्यातील आदिवासी शेतकऱ्यांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे मेहताखेड्यात पाणलोट कार्यक्रमाने समृद्धी आली आहे.

विवक खडसे

No comments:

Post a Comment