Monday, March 11, 2013

फुक्कीमेट्याचे शेतकरी वळले नगदी पिकाकडे

दिया जिल्ह्यातील देवरी हा तालुका आदिवासी,दुर्गम व नक्षल प्रभावीत आहे. तालुक्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षल प्रभावीत असलेले फुक्कीमेटा हे गांव. सन 2008-09 या वर्षात फुक्कीमेटा गावाची निवड गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमासाठी कृषी विभागाने केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे फुक्कीमेट्याच्या शेतकऱ्यांनी पारंपारिक धान पिकाला फाटा देवून नगदी पिकाचा मार्ग निवडला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमाचा आधार झाला.

फुक्कीमेटा गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1007 हेक्टर इतके असून निव्वळ पिकाखाली 433 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी खरीप हंगामात 429 हेक्टर, रब्बी हंगामात 81.85 हेक्टर आणि उन्हाळी 29.50 हेक्टरवर पूर्वी पिके घेण्यात येत होती. गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम येण्यापूर्वी रब्बी हंगामात फारच कमी शेतीवर भाजीपाला व इतर पिके नगण्यच प्रमाणात होत होती. फुक्कीमेट्याचे आदिवासी शेतकरी दैनंदिन चरितार्थासाठी घरच्या परसबागेतच भाजीपाला पिके घेत. रब्बी हंगामात फक्त हरबरा, गहू,जवस ही पिके कमी क्षेत्रात घेण्यात येत होती. खरीप हंगामात संरक्षीत ओलीताचे साधन पुरेसे नसल्यामुळे खरीप उत्पादनात लक्षणीय घट झाली. फुक्कीमेट्याच्या शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरी 25 आहे, मात्र पाण्याची पातळी खोल गेलेली होती.

सन 2008-09 मध्ये फुक्कीमेट्याची निवड कृषी विभागाने गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमासाठी केली. फुक्कीमेट्याच्या आमसभेत गावातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या 5 ठिकाणी नाल्यावर सिमेंट नाला बांध व 2 ठिकाणी वळण बंधारे बांधली.गतीमान पाणलोटामुळे सिमेंट नाला बांध व वळण बंधाऱ्याची कामे केल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी तर वाढलीच शिवाय बंधाऱ्यातील पाण्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनाची सोयही झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापूरे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे नगदी पिकाकडे वळल्याचे फुक्कीमेट्याचे ग्रामस्थांना सांगितले. या बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे त्यांच्या भाजीपाला पिकात चार पटीने वाढ झाली. रब्बी हंगामात गहू, हरबरा, जवस, वाटाणा आदी पिकाच्या क्षेत्रात दीड पटीने वाढ झाली.

गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमामुळे बंधाऱ्यात पाणी अडविले जाऊ लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. बंधाऱ्यात साचलेले पाणी सिंचनासाठी कामी येवू लागले. फुक्कीमेटा येथील शेतकऱ्यांच्या 30 सिंचन विहिरींची पाण्याची पातळी सुद्धा बंधाऱ्यामुळे सरासरी 0.46 मीटरने वाढली.पाणलोट विकासामुळे भाजीपाला क्षेत्रात वाढ झाली. मिरची पूर्वी हेक्टरी 1 क्विंटल 20 किलो आता 6 क्विंटल 40 किलो. वांगे पूर्वी 40 किलो व्हायचे आता हेक्टरी 2 क्विंटल, पूर्वी टमाटर व इतर भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत नव्हते आता 4 क्विंटल 40 किलो प्रती हेक्टरी उत्पादन होऊ लागले.

कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनामुळे पाणलोटची कामे पुर्ण झाल्यानंतर भाजीपाला पिकापासून 7 लाख 33 हजार रुपयांची वाढ झाली. रब्बी पिकापासून 10 लाख 32 हजार इतकी उत्पादनात वाढ झाली. आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नगदी पिकाकडे वळता आले. या नगदी पिकाच्या लागवडीचा फायदा त्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास कामी आला.

No comments:

Post a Comment