Friday, March 22, 2013

उणिवांवर केली मात गावकऱ्यांची विकासाला साथ


असं म्हणतात की आपल्यातील उणिवा ज्यांना समजतात आणि त्या दूर करून जी माणसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या वाट्याला अपयश कधी जात नाही. निरंतर प्रयत्नातून शिकत राहणं आणि कामात सातत्य राखणं हा त्यांचा स्थायीभाव असतो. बीड जिल्ह्याच्या अंबोजोगाई तालुक्यातील सनगाव हे असंच गाव.

अंबाजोगाईच्या पश्चिमेस 8 कि.मी अंतरावर वसलेल्या या गावाच्या उत्तरेला डोंगरमाथा तर दक्षिणेकडे मोठा तलाव. तलावामुळे गावातलं सिंचनही चांगलं. जमीन सुपिक, बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती. बागायती परिसर असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही उत्तम. गावातला दुग्धव्यवसाय ही चांगला. उस लागवडीबरोबर सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला ही शेतकऱ्यांची पूरक पिकं. भाजीपाल्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळते हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी गावात गटशेतीचा अभिनव प्रयोग यशस्वीरित्या राबवला.

आताचे उपसरपंच आणि तत्कालीन सरपंच शंकर उबाळे हे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदविकाधारक. ते एका प्रशिक्षणासाठी यशदा येथे गेले. तेथून परततांना त्यांनी हिवरेबाजार आणि राळेगनसिद्धी या दोन आदर्श गावांना भेटी दिल्या. पोपटराव पवार यांच्याबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली. गावातील इतर सदस्यांना श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा म्हणून तालुकास्तरीय मेळाव्याचे गावात आयोजन केले.

आदर्श गावाच्या ध्येयाने झपाटलेले श्री. उबाळे इथेच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या गावातील काही तरूणांसाठी हिवरेबाजार आणि राळेगनसिद्धीचा अभ्यासदौरा आयोजित केला. या गावांचा विकास पाहून हरखून गेलेली ही तरूणाई आपल्या गावाचा “अस्साच” विकास करायचा हा निर्धार मनाशी करूनच परतली. त्यांच्या 245 कुटुंबांच्या गावात सुरुवातीला फक्त 4 कुटुंबाकडे शौचालये होती. आज गावात शंभरटक्के कुटुंबाकडे शौचालय आहे. “आपला विकास- अपुल्या हाती, ग्रामविकासाचे होऊ या साथी” असं म्हणत गाव सर्वांगीण विकासाच्या एका ध्येयाने प्रेरित झालं. स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावानं 2008-09 साली सहभाग घेतला. लोक एकजूटीने कामाला लागले. श्रमदान करू लागले. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले, गावात वृक्ष लागवड झाली. शोषखड्डे, घर तिथे शौचालय, गांडूळ खत निर्मिती, गप्पी माशांची पैदास, सेंद्रीय खत प्रकल्प यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गावाने राबविले.

गावातील महिला आणि युवक मंडळे, बचतगट, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळे, शाळेतील स्वच्छता दूत, सर्व ग्रामस्थ यांनी एकमेकांच्या हातात हात घालून ग्रामविकासाची ही दिंडी जोमाने पुढे नेली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळालं आणि गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यात आणि नंतर विभागात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला की हुश्श्श्. . . संपली बाबा आपुली जबाबदारी असं न म्हणता गावानं कामात सातत्य ठेवलं आणि त्याचं फळ म्हणून गावानं 2009-10 मध्ये याच अभियानात जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.

असा पुरस्कार मिळवणारी सनगाव ही अंबाजोगाई तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली. याचवर्षी ग्रामपंचायतीला विभागीयस्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. गावकऱ्यांचे कामातील सातत्य त्यांना यश देऊ लागले आणि पुरस्काराची मालिका सुरु राहिली. त्यामुळे गावकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला. आता विभागात “पहिलं यायचंच “ या ध्येयाने गावकरी कामाला लागले. यासाठी गावाच्या कामातील उणिवांचा शोध घेण्यात आला, त्याची कारणं जाणून घेण्यात आली आणि त्यावर उपाय शोधण्यात आले.

गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना आणि निर्धाराला यातून घवघवीत यश मिळाले, ग्रामपंचायत 2010-11 च्या अभियानात तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावर पहिली आली. याचकाळात ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन पुरस्कार आणि सामाजिक एकतेसाठीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्काराने राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील कामाने गावाला राष्ट्रीयस्तरावरचा” निर्मलग्राम” पुरस्कार देखील मिळवून दिला. ग्रामपंचायतीने या पुरस्कारातही सातत्य राखले आहे.गाव आज पूर्ण हागणदारीमुक्त आहे. एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जात नाही. विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या गावाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत सहभाग नोंदवला. एक व्यक्ती एक झाड, गावातील प्लॅस्टिक बंदी, करवसुली, यासारख्या सर्व निकषांवर खुप चांगलं काम केलं. एक व्यक्ती एक झाड योजनेत जेवढी झाडं लावली तेवढी जगवण्यात गावाला यश मिळालं. झाडं लावण्याच्या आणि जगवण्याच्या कामात शिस्त राहावी म्हणून प्रत्येक झाडाला नंबरिंग करण्यात आले.

केवळ विकास कामं करून थांबायचं नाही तर प्रगत विचारांची पेरणी करण्याचे कामही गावानं केलं. मागील 10 वर्षांपासून गावात “एक गाव एक गणपती” हा उपक्रम राबविला जात आहे. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी गावातील ही एक गणेश मूर्ती माती पासून तयार करण्याचा एक सुंदर निर्णय गावाने घेतला आणि अंमलात आणला.

गावातील पथदिवे हे सीएफएल आणि एलईडी चे आहेत. चौकात सौरदिवे आहेत. प्रत्येक घरातील कचरा गोळा करून तो वाहून नेण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. गोळा झालेला कचरा एकाठिकाणी साठवून त्यापासून खत निर्मिती केली जाते. त्याचा वापर परसबागा, शाळेतील बागा, शेती यासाठी केला जातो. गावात बंदिस्त गटारे आहेत. बंदिस्त गटारे, परसबागा आणि शोषखड्ड्यांच्या माध्यमातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. इको व्हिलेजमधील गावाची करवसुली 100 टक्के आहे. यामुळे ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत झाली असून गावानं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील तीनही वर्षांचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केल्याने ग्रामपंचायतीचा तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते “पर्यावरण विकासरत्न” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

चांगले काम झाले, गावाचे नाव ही झाले. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मुद्दाम या गावाला भेट देऊन येथील विकासकामांची पाहणी केली. 10 लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर केला. त्यातून गावात बंदिस्त नाल्यांचे काम करण्यात आले. यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार 2010-11 साठी ग्रामपंचायतीला जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळाला. यातही गावाने सातत्य राखलं आणि सन 2011-12 च्या यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्काराने नुकताच सरपंच श्रीमती रेखा दिपक कांबळे, उपसरपंच शंकर उबाळे आणि ग्रामसेवक एन.व्ही पवार यांचा गौरव करण्यात आला. आज गावाचा चेहरामोहरा पूर्ण बदललेला आहे. सनगावाला भेट देऊन इथल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आता आजूबाजूच्या जिल्ह्यातून, विभागातून लोक येऊ लागले आहेत.

आज गावाचा कारभार श्रीमती रेखा कांबळे या कार्यक्षम महिला सरपंचाच्या हाती आहे. अतिशय संवेदनशीलपणे गावचे प्रश्न समजून घेतांना त्यांनी गावाची ही विकास घोडदौड अशीच नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांचे मार्गदर्शन, गावकऱ्यांचा सहभाग, गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सहकार्य आणि योगदानातून आम्ही यशस्वीपणे पुढे जात आहोत, अशी प्रामाणिक भावना विस्तार अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. सुरेखा मुळे

No comments:

Post a Comment