Saturday, December 24, 2011

सर्प - मानवाचा शत्रू नव्हे मित्र! (भाग२)

सर्पाचे नीट जवळून शास्त्रीय अभ्यास केला की, सर्प विनाकारण कोणालाही दंश करीत नाही. ज्यावेळी सापाच्या अंगावर आपला पाय पडतो, तो डिवचला जातो, त्याची कोंडी होते त्याच वेळी सर्पाची स्वत:च्या रक्षणाकरिता जी प्रतिक्रियात्मक क्रिया होते, त्यालाच सर्पदंश म्हणतात. 

वस्तुत: सर्प शेतकरी बांधवांचा खऱ्या अर्थाने मित्रच आहे. कारण उंदीर शेतातील बी-बियाणांचा तसेच उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र नाग, धामण, डुरक्या, घोणस, मंडोल इत्यादी प्रकारचे सर्प शेतातील उंदरांची वाढत जाणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेऊन निसर्गातील समतोल राखण्यास सहकार्यच करतात अशी माहिती सर्प दर्शन ऑफ इंडिया, मुंबई चे संचालक, सर्पमित्र भरत जोशी यांनी महान्यूजशी बोलताना दिली.

प्रश्न:-प्रथमोपचार दिल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ? 
उत्तर :- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस प्रथमोपचार दिल्यानंतर दोन तासांच्या आत जवळील रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असते. त्यास बांधलेली आवळपट्टी दर १० ते १५ मिनिटांनी सोडून परत बांधणे गरजेचे असते.आवळपट्टी अशीच दोन ते तीन तास घट्ट बांधून ठेवली तर त्या व्यक्तीच्या हाताला शुद्ध शक्ताचा पुरवठा होऊ शकणार नाही व हातास गँगरीन होऊन तो हात निकामी होऊ शकतो. दंश झालेला भाग हृदयाच्या खालच्या बाजूस ठेवावा. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णवाहिका, उपलब्ध वाहन यामधून त्याच्या शरीराची कमीत कमी हालचाल होईल यावर देखरेख ठेवून रुग्णालयात त्वरित घेऊन जावे. 

प्रश्न:-रुग्णालयात सर्पदंशावर कोणती उपचार पद्धती आहे ? 
उत्तर :- प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात सर्पदंशावर त्वरित उपचार केले जात असून अशा व्यक्तीस प्रतिविषे (लायफोलाईज्ड अँन्टी-स्नेक-व्हेनम-सिरम) ही इंजेक्शने नसे द्वारे दिली जातात. विषधर सर्पापासून जास्त प्रमाणात विष गेले असल्यास त्या व्यक्तीस ४० ते ५० पर्यंत इंजेक्शने लागतात. 

रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असल्याने व्हेंटीलेटर द्वारा उपचार करत असता डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या हृदयातील स्पंदनावर लक्ष ठेवता येते. व आवश्यकतेनुसार उपचार पद्धतीमध्ये फेरबदल करता येतो. हजारोत एखादी व्यक्तीअशी असते की, त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्पदंशावरील प्रतिविषे त्याच्या शरीरात सुट होत नाहीत. अशा वेळी ती प्रतिविष सलाईन द्वारा एकास दहा या प्रमाणात म्हणजेच दोन हात व दोन पायातील नसांद्वारे दिले जातात. 

प्राथमिक वैद्यकीय उपचारांबरोबरच सर्पदंश झालेल्या व्यक्तीशी सकारात्मक बोलून त्यास मानसिक धीर देणेही तेवढेच गरजेचे असते. सर्पदंशानंतर रक्तातील श्वेतपेशींचे प्रमाण कमी होत असल्याने त्याची प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होत जाते. अशा वेळी त्या व्यक्तीची मानसिकशक्ती वाढवण्याची नितांत गरज असते. कित्येकदा साप चावला या घटनेने मानसिकदृष्ट्या हतबल होऊन हृदयविकाराने मृत्यूमुखी पडल्याची असंख्य उदाहरणे आढळून आली आहेत. 

प्रश्न:-या क्षेत्रात अंधश्रध्दा दिसून येते का ?
उत्तर :- हो ! सर्पांच्या मोठ्या प्रजाती असतात त्याच्या दुप्पट अंधश्रद्धा असतात कारण सर्पांच्या आपण वैज्ञानिक दृष्टिने अभ्यास करीत असतो. माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे असे आपण नेहमीच म्हणत असतो मात्र अजूनही समाजात या क्षेत्रात अंधश्रद्धेचा अंधार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 

राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये तसेच आदिवासी मध्ये अजूनही सर्पदंश झाल्यावर 'मंत्र तंत्र', जडीबुटी, कोंबड्या लावण्याची पद्धत आढळून येते. अशा व्यक्तीस ते रुग्णालयाऐवजी शंकराच्या देवळात घेऊन जातात. मोठमोठी वाद्ये जोरात वाजविली जातात. त्या व्यक्तीच्या डोक्यावर पाण्याच्या घागरी उपड्या केल्या जातात. शहरी भागातील सुशिक्षित लोक वैद्यकीय उपचारांकडे वळलेले आढळतात. 

प्रश्न:-सर्पविषयक शास्त्रीय ज्ञानाचा आपण समाजात कसा उपयोग करुन दिला. ? 
उत्तर :- सर्पविषयक शास्त्रीय माहिती शहरापासून ते ग्रामस्थांना व्हावी त्याचप्रमाणे विषारी तसेच बिनविषारी सर्प कसे ओळखावेत ? सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे? सर्प दंशाची लक्षणे, त्यावरिल प्रथमोपचार आणि वैद्यकीय कार्यक्रमांचे आयोजन करुन आतापर्यंत ४३ हजार बांधवांनी याचा शैक्षणिक लाभ घेतला आहे. त्यामध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट्स, आदिवासी, कातकरी, वनवासी, शेतकरी बांधव, रोटरी, लॉयन्स क्लब, सेक्टर, मधील अधिकारी आदींचा समावेश आहे. परंतु तसेच आकाशवाणी-मुंबई,पुणे, रत्नागिरी, इंदोर, भोपाळ, कलकता, गोवा, यवतमाळ आणि दूरदर्शन व्दारे मुंबई, पुणे, गोवा, नागपूर वरुन सर्पविषयक विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. 

या शिवाय दैनिक, पाक्षिक, मासिके, राज्य शासनाचे लोकराज्य यामध्येही सर्पांविषयक शैक्षणिक लेखांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे.

प्रश्न:- या कार्यक्रमांदरम्यान आपल्याला काही अनुभव आले काय ?
उत्तर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनविभागाचे तत्कालिन संचालक प्रकाश ठोसरे या कार्यक्रमामुळे खूपच प्रभावित झाले व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हानिहाय सर्पविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले. सुमारे सहा हजार लोकांना याचा शैक्षणिक लाभ झाला या दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आलेला अनुभव स्मरणात जाऊ शकत नाही.

कार्यक्रम संपवून एस टी स्टँड कडे चालत जात असताना तो रस्ता शेतातून होता. एक शेतकरी शेतात काम करत होता त्याच्याजवळ जाऊन मी त्याला स्टॅन्डचा रस्ता विचारला असता त्यानं चक्क नकार दिला कारण तो बिचारा जन्मताच अंध असल्याचे समजले. हे ऐकताच मनात एक विचार आला आपण डोळस व्यक्तींकरिता कार्यक्रम करतो याच विचारात मी परतलो. 

डोळस लोकांसाठी सर्पविषयक शास्त्रीय पुस्तके लिहिली तसेच सर्पविषयक माहितीच्या घडीपत्रिका तसेच चार्टस तयार केले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे 'भारतातील सर्प' या पुस्तकाची निर्मिती महाराष्ट्रातील सर्पमित्रांची नावे, पत्ते आणि मोबाईल क्रमांक इत्यादीसह तयार केली. पण शेतात राबणाऱ्या अंधबांधवांकरिता काय ?

प्रश्न:-नेत्रहीन व्यक्तींसाठी आपण काय पाऊले उचलली ? 
उत्तर :- नॅब मधील सहायक संचालक हेमंत पाटील यांच्या मदतीने सुमारे २१ दिवसात ब्रेल लिपी शिकलो आणि अंधबांधवांविषयी सर्पविषयक सर्वंकष-शास्त्रीय माहिती असलेली 'सर्पस्पर्श' ही ब्रेल लिपीतील २५ पानांची पुस्तिका तयार करुन राज्यातील १०० अंध शाळांना मोफत वितरित केली. 

सर्पस्पर्श ही पुस्तिका एका अंध बांधवाने वाचले तेव्हा त्यांनी लगेच दूरध्वनीवर संपर्क साधून प्रतिक्रिया व्यक्त केली. जोशी सर ! तुम्ही तयार केलेलं पुस्तक खूप भावलं कारण यात सर्पविषयक माहिती आम्हा अंध बांधवांना सहज सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे मांडली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यास शास्त्रीय अधिष्ठान आहे. 

ती अंध व्यक्ती पुढे म्हणाली,जर एखाद्या डोळस व्यक्तीला सर्पदंश झाल्यास आम्ही तेथे जाऊन त्या माणसाचा प्राण वाचवू शकू. 

प्रश्न:-सर्पदंश टाळण्यासाठी काय करावे ? 
उत्तर :- घरासमोरचा परिसर स्वच्छ ठेवा, घराजवळील लता-वेली, झाडांच्‍या फांद्या छाटून टाकाव्यात, घरातल्या दारावरील, भिंतीवरील, भेगा बुजवून टाकाव्यात. जेणेकरून ह्यात सर्प जाणार नाहीत. अंधारात घराबाहेर जाताना विजेरीचा उपयोग करा.

पाणवठा, तळी, अडगळीची जागा, लाकूडफाटा, दगडविटांचा ढिगारा येथे जात असता पायात बूट घाला तसेच हातात काठी असणे आवश्यक ठरेल.

जंगलातून फिरताना झाडावरील सर्पदंश टाळण्यासाठी टोपीचा वापर करावा. शेतातून जाताना शक्यतो पायवाटेचा वापर करावा.

समुद्र किनारी समुद्र सर्प निपचित पडला असता त्यास चुकूनही हात लावू नका. कारण त्या सर्पापासून दंश होऊ शकतो. समुद्रसर्प हा नागापेक्षा दहा पटीने जास्त विषारी असतो. हे विसरु नका. 

प्रश्न:-आपण आधुनिक नागपंचमी हे पुस्तक प्रकाशित केले ,त्या पुस्तकाची संकल्पना काय ? 
उत्तर :- आधुनिक नागपंचमी या पुस्तकात अशी मांडणी केली आहे की, नागपंचमीचे दिवशी जिवंत नागाची पूजा न करता नाग प्रतिमेची, मातीच्या मुर्तीची किंवा पाटावर अष्टगंधाने नाग काढून, जिवतीचा कागद देवघरात ठेवून नागाचे स्मरण करा त्याच्या उपयुक्ततेचा स्मरण करा , मी सापाची नाहक हत्या करणार नाही व इतरांना त्यापासून परावृत्त करीन अशी प्रार्थना हीच खरी नागाची श्रद्धायुक्त पूजा ठरु शकेल, हे या आधुनिक नागपंचमी या पुस्तकात दिलेले आहे.

No comments:

Post a Comment