Saturday, December 24, 2011

सर्प - मानवाचा शत्रू नव्हे मित्र! (भाग१)

सर्पाचे नीट जवळून शास्त्रीय अभ्यास केला की, सर्प विनाकारण कोणालाही दंश करीत नाही. ज्यावेळी सापाच्या अंगावर आपला पाय पडतो, तो डिवचला जातो, त्याची कोंडी होते त्याच वेळी सर्पाची स्वत:च्या रक्षणाकरिता जी प्रतिक्रियात्मक क्रिया होते, त्यालाच सर्पदंश म्हणतात. 

वस्तुत: सर्प शेतकरी बांधवांचा खऱ्या अर्थाने मित्रच आहे. कारण उंदीर शेतातील बी-बियाणांचा तसेच उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मात्र नाग, धामण, डुरक्या, घोणस, मंडोल इत्यादी प्रकारचे सर्प शेतातील उंदरांची वाढत जाणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेऊन निसर्गातील समतोल राखण्यास सहकार्यच करतात अशी माहिती सर्प दर्शन ऑफ इंडिया, मुंबई चे संचालक, सर्पमित्र भरत जोशी यांनी महान्यूजशी बोलताना दिली.

प्रश्न:- नाग/साप हे शब्द कानावर आले तरी सामान्य माणूस घाबरतो आणि प्रत्यक्ष पाहिल्यावर तर नखशिखान्‍त हादरतो असे असताना या प्राण्याविषयी आपली जिज्ञासा कशी जागृत झाली ?
उत्तर :- गृहरक्षक दलात कार्यरत असल्यामुळे सत्तरच्या दशकात राज्य शासनाचा झालेल्या दीर्घकालीन संपाच्या काळात आम्हाला परळ येथील हाफकिन संस्थेत जाण्याचे आदेश मिळाले. या ठिकाणी १५० नाग, ६५ मण्यार, ७५ घोणस, ३५० फुरशी त्याच प्रमाणे १००० काळे, तांबडे विंचू यांची देखभाल करण्याचे काम आमच्यावर सोपविण्यात आले. 

आमच्यापैकी पाच जणांची सर्पालयात नियुक्ती करायची होती.उपस्थितांपैकी कोणीच पुढे येईनात अखेर ते आव्हान मी स्वीकारण्याचे ठरवून अन्य चौघांनाही यासाठी उद्युक्त केले. पिंजऱ्यातील नागांना खाद्य म्हणून पांढरे उंदीर देऊन पाण्याच्या वाटीत स्वच्छ पाणी घालून ती वाटी पिंजऱ्यात ठेवायची असे कामाचे स्वरुप होते. दिवसा सुमारे २० विषधर सर्पांना त्यांचे खाद्य व पाणी पुरविले जाई. 

नागाचा पिंजरा उघडताच तो फणा काढून फुत्कार टाकीत असे, सुरूवातीस भीती वाटली मात्र सर्पाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करता लक्षात आले की, हूक स्टीकचा वापर योग्य प्रकारे केल्यास नाग आपल्या काबूत येऊ शकतो. हूक स्टीकचा स्पर्श होताच नाग थोडा खाली जाई अशा वेळी पटकन पाण्याची वाटी काढून पाणी बदलायचे व वाटी जागेवर ठेवून त्या नागास पांढऱ्या उंदरांचे खाद्य द्यायचे. एका पिंजऱ्यात एकच नाग असे, अशा प्रकारे सर्पालयातील आमचे काम आठवडाभर व्यवस्थित सुरु होते. 

नवव्या दिवशी एका पिंजऱ्याचे झाकण उघडताच त्यामध्ये दोन ब्लॅक कोब्रा नाग आढळून आले. नागाच्या पोटाकडील भागास हूक स्टीकचा धक्का लागला. त्याचक्षणी दुसऱ्या नागाने उसळी मारली त्याबरोबर पहिला नाग पिंजऱ्याबाहेर आला आणि मण्यार सर्प लोखंडी रॅक खाली दडला. पिंजऱ्यातील दुसऱ्या नागाने देखील चपळाईने पहिल्या नागाचे अनुकरण केलं. 

ही घटना वरिष्ठांच्या कानावर घातली असता त्यांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना पाचारण केले. तथापि काही वेळातच सर्पालयातील वरिष्ठ वैज्ञानिक, डॉ.निळकंठ एकनाथ वाड त्या ठिकाणी राऊंडवर आले असता या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हूक स्टीक समवेत सर्पालयात प्रवेश केला. आणि त्या दोन जिवंत नागांना शोधून परत पिंजऱ्यात ठेवलं. 

सर्पविष म्हणजे नक्की काय असतं या विषयावर डॉक्टरेट मिळवलेल्या वाड यांची धाडसी कृती मी आवाक होऊन पाहत राहिलो. ही घटना माझ्या जीवनाला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरली. 

प्रश्न:- याविषयी आवड निर्माण झाल्यावर आपण काय केले ? 
उत्तर:- उपरोक्त घटनेनंतर या विषयाचा सर्वंकष अभ्यास करायचा मला ध्यास लागला. प्रारंभीच्या काळात हाफकिन संस्थेच्या वाचनालयात असलेली सर्प-विषयक सर्व पुस्तकं अभ्यासली. हाफकिन संस्थेद्वारा आम्हाला सर्पविषयक प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्याचप्रमाणे मद्रास येथील सर्पालयात अद यावत प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आलं होतं. 

प्रश्न:-देशात सर्पांच्या प्रजाती किती आहेत ? 
उत्तर :- आपल्या देशात सुमारे २५६ प्रकारचे सर्प आढळून येतात त्‍यातील ५५ प्रजाती या विषारी आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण ५५ सर्पजाती आढळून येत असून त्यातील नाग, मण्यार,घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्रसर्प हे विषारी आहेत तर उर्वरित सर्व प्रजाती उदा.धामण, कवड्या, डुरक्या-घोणस, नानेटी, हरण टोळ, श्वान सर्प, मंडोल(दुतोंड्या), रुकई, अजगर वगैरे बिनविषारी प्रकारात मोडणाऱ्या प्रजाती असतात.

प्रश्न:-सर्पाची आश्रयस्थाने कोणती ? 
उत्तर :- जमिनीतील बिळे, दगड-विटांचे ढिगारे, झाडाझुडपातील जागा, मोकळी मैदानी जागा, भात शेती तसेच सपाट भूभाग ही सर्पांची मुख्य आश्रय स्थाने आहेत. मात्र जागतीकीकरणामुळे, गगनचुंबी इमारतीच्या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणात जंगलतोड होते आणि हे सर्प निसर्गाकडून मानवी वस्तीत येतात.

प्रश्न:-साप घरात आढळल्यास काय करावे ? 
उत्तर :- कोणत्याही प्रकारचा सर्प घरात आल्यास त्याला न मारता, निष्णात आणि अनुभवी साप पकडणाऱ्यास बोलवावे, घराजवळ लोकांची गर्दी करु नये, सर्पास कपाटामागे अडगळीत, बिळात तसेच खोलीच्या आतील बाजूस जाण्यापासून रोखावे, संध्याकाळच्या वेळेस दारे बंद ठेवावीत. 

घरातील, पडवीतील दिवे लावावेत, विजेरी पटकन मिळेल अशा ठिकाणी ठेवावी .सापास घरातून बाहेर हुसकावण्यास लांब काठी, तारेचा आकडा, छत्रीचा आकडा यांचा उपयोग करुन सर्पास मानवी वस्तीपासून दूर सोडावे.

प्रश्न:-विषारी बिन-विषारी सर्पाचा दंश कसा ओळखावा ? 
उत्तर :- सर्वसाधारणपणे सर्पाचा दंश माणसाच्या हाताला किंवा पायाला होत असतो. दंश झालेल्या ठिकाणी तो साप जर विषारी असेल तर त्या जागी विषदंतांच्या दोन खुणा स्पष्टपणे आढळून येतात आणि साप जर बिनविषारी असेल तर तशा खुणा आढळून येत नाहीत. 

प्रश्न:-विषारी सर्प दंशाची लक्षणे कोणती ? 
उत्तर :- सर्पाचे विष फिकट पिवळसर आणि पारदर्शक असून काहीसं चिकट असतं. मज्जासंस्थेवर परिणाम करणारे न्युरोटॉक्सीक आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे हिमोलॅटीक असे त्याचे दोन प्रकार असतात.

नाग, मण्यार समुद्र सर्प यापासून दंश झाल्यास माणसाच्या मज्जा संस्थेवर विषाचा परिणाम होतो व त्याचे पुढील दुष्परिणाम दिसून येतात.दंशाच्या जागी सूज येऊन बधीरपणा येतो. श्वासोच्छवासास त्रास होतो. जीभ आत ओढली जाते. तोतरेपणा येतो, डोळे मिटू लागतात, व्यक्ती बेशुद्धावस्थेतून कोमात जाण्याची शक्यता निर्माण होते. विष हृदयापर्यत गेल्यास रक्ताचे पाणी होऊन पांढऱ्या रंगाचा फेस तयार होतो, तो तोंडावाटे बाहेर पडू श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आणि अखेर हृदयक्रिया बंद पडून माणसाचा मृत्यू ओढवतो. 

प्रश्न:-रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या विषाची (सर्पदंशाची) लक्षणे कोणती ? 
उत्तर :- एखाद्या व्यक्तीला घोणस, फुरसे, हिरवा घोणस या सर्पांनी दंश केला असता त्याच्या विषाचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या रक्ताभिसरणावर होतो. सर्पदंश झालेल्या जागी बरीच सूज येऊन तो भाग हूळहूळा होऊन लालसर दिसू लागतो. त्वचा काळी निळी पडते. रक्तवाहिन्यातील रक्तात गुठळ्या निर्माण होऊन ते रक्त तोंड, नाक, कान याद्वारे बाहेर पडू लागतं. शरीरात विष अधिक प्रमाणात भिनल्यास पोटातील आतडी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे विष महारोहीणी द्वारे हृदयापर्यंत जाते आणि अखेर शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयास न झाल्याने मृत्यू होतो. 

प्रश्न:-सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार कसे करावे ? 
उत्तर :- सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर दहा ते पंधरा मिनिटांच्या आत प्रथमोपचार कळणे आवश्यक आहे. 

सर्वप्रथम जखम स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉल च्या पाण्याने धुवावी. हाताला सर्पदंश झाला असल्यास कोपराचे वर म्हणजेच दंडावर (एकेरी हाडावर ) पायास सर्पदंश झला असता गुडघ्याच्यावर (एकेरी हाडावर ) म्हणजेच मांडीवर दोरी किंवा कापडाचा तुकडा, दुपट्टा, वडाची पारंबी, केळीचे सोप, केपर बँडेज, किंवा आवळपट्टी बांधावी ज्यामुळे सर्पाचे विष शरिरातील अन्य भागात पसरण्यास मज्वाव होईल. 

चिरा छेदन पद्धती - नाग, मण्यार या सर्पांद्वारे दंश झाल्यास चिरा छेदन पद्धतीचा उपयोग करता येतो. सर्पदंशाचे दोन व्रणांवर पाव सेंटीमीटर लांब, रुंद आणि खोल अशी तिरपी चिर द्यावी .जेणेकरुन जखम उघडी होऊन त्‍या द्वारे ५० टक्के विष आणि विषारी रक्त शरीराबाहेर पडून प्रवाहित होईल. 

पोटॅशियम परमँगनेट (KmnO४)च्या द्रावामध्ये विषातील २६ विषघटकांपैकी ५० टक्के विष-घटकांचे निराकरण करण्याचे सामर्थ असल्याने एका ग्लासात अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात पोटॅशियम परमँगनेटचे चार ते पाच कण टाकून ढवळावे व सर्पदंशाच्या जागेवर याची संतत धार धरावी. 

क्रमश:

No comments:

Post a Comment