Tuesday, February 26, 2019

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जर खरेच खोटारडे मोदी नको आहेत...तर सोलापूरची जागा आंबेडकर यांना देऊन आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणावे…! राजेश खडके सकल मराठी समाज


रोज मिडीयावर आम्ही ऐकत आहे की,जातीवादी पक्षाला आणि खोटारड्या मोदीला दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला सोडून महाआघाडीत सामील व्हावे.परंतु प्रकाश आंबेडकर यायला तयार नाहीत त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा जातीवादी भाजप-सेनेला होत आहे.परंतु हे मत केवळ राजकारण करण्यासाठी आणि आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून पेरल्या जात आहेत असे आमच्या सकल मराठी समाजाचे मत आहे.प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस बरोबर युती करण्यासाठीचा प्रस्ताव एमआयएम पक्षाला बरोबर घेण्यापूर्व कॉंग्रेसला दिलेला होता हे सर्वांनाच माहित आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात काहीच ताकद नाही असे म्हणून त्यांच्या प्रस्तावाचा विचार कॉंग्रेसकडून करण्यात आलेला नव्हता. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन एमआयएम पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी स्थापन करून सभेचे आयोजन केले आणि संपूर्ण महाराष्ट्रात अहोरात्र फिरून वंचित घटकांना बरोबर घेऊन सभा यशस्वीपणे पार पाडल्या तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे असे आवाहन केले आहे.परंतु सदरचा प्रस्ताव मान्य करण्याकरीता वंचित घटकांना सत्तेमध्ये घेण्याचे आणि संविधान अबाधित राहण्यासाठी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याविषयीचा कार्यक्रम कॉंग्रेसने द्यावा असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसकडे ठेवला.परंतु सोलापूरच्या कार्यकर्त्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असा आग्रह धरला की,प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मधून लोकसभेची निवडणूक लढवावी त्यांना विजयी करण्याची जबाबदारीही सोलापूरच्या कार्यकर्त्यानी घेतली आहे.त्यामुळे सोलापूरची जागा कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीसाठी सोडावी अशी कॉंग्रेसकडे मागणी आहे.सोलापूर लोकसभेतून सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवीत असतात त्यामुळे ती जागा देण्याची मानसिकता कॉंग्रेसची नाही.खरेच जर कॉंग्रेसला जातीयवादी पक्षाला बाहेर ठेवायचे आहे आणि खोटारड्या मोदीला सत्तेपासून दूर करायचे आहे तर त्यानी सोलापूरची जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यास काहीच हरकत नाही.राष्ट्रवादीचे नेते म्हणतात आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी प्रस्तावाला आमचा पाठींबा आहे,परंतु कॉंग्रेस यासाठी तयार नसल्याचे वातावरण सर्वत्र दिसत आहे.जर कॉंग्रेसचा खरेच अजंठा धर्मनिरपेक्ष आहे असे जर ते मानीत आहेत तर महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यापासून ते का दूर जात आहे असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे.एकंदरीत पाहिले तर कॉंग्रेस महत्वाकांक्षा ठेऊन काम करीत आहे तर प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठी आणि संविधान वाचविण्यासाठी काम करीत आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच आहे.कॉंग्रेस जरी म्हणत असली की आम्ही वंचित बहुजन आघाडीला चार जागा द्यायला तयार आहोत त्यात काही अर्थ नाही कारण आजची परिस्थिती अशी आहे की,वंचित बहुजन आघाडी स्वबळावर जरी लढली त्यांच्या ३ ते ४ जागा जिंकून येण्याची परिस्थिती आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करतात या मताशी आमची सकल मराठी समाज बिलकुल सहमत नाही.मात्र आरएसएसवादी भाजपा आणि कॉंग्रेस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आम्ही मान्य करतो.आणि जर खरेच असे नसेल तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मोदीला बाहेर ठेवण्यासाठी सोलापूरची जागा आंबेडकर यांना देऊन आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणावे…!

No comments:

Post a Comment