Sunday, October 9, 2011

परंपरा दीडशे वर्षांची


सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला मराठवाडयातील हिंगोली येथील दसरा महोत्सव देशवासियांसाठी आकर्षण ठरले आहे. यंदाही हा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा केला जाणार आहे. या वैशिष्टयपूर्ण सोहळयाचा इतिहास या लेखातून मांडण्यात आला आहे.

दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीने दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी उत्साहाने साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सव या नावाने साजरा होणाऱ्या या उत्सवात दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या दुर्गादेवीची उपासना केली जाते. कर्नाटकात म्हैसूर येथे वाडियार या राजघराण्याने सुरु केलेला दसरा महोत्सव देशभरात प्रसिध्द आहे. जवळजवळ तितकीच प्रदीर्घ परंपरा हिंगोलीच्या सार्वजनिक दसऱ्याला लाभलेली आहे.

१५० वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोली व म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील मुख्य फरक म्हणजे म्हैसूरच्या दसऱ्याला राजाश्रय लाभला, तर हिंगोलीच्या दसऱ्याला लोकाश्रय. हा लोकाश्रय इतका उदार आहे की, म्हैसूरच्या खालोखाल क्रमांक दोनचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.

हिंगोली हे विदर्भ व मराठवाडयाच्या सीमेवर कयाधु नदीच्या काठावर वसलेले एक शहर आहे. वंजारगढी म्हणून या शहराची एकेकाळी ख्याती होती. संत नामदेव महाराज, विठोबा खेचर, संत जनाबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला खाकीबाबा मठ, दत्तमंदीर, गोपाललाल मंदीर, खटकाळी हनुमान आदी देवस्थानांमुळे धार्मिक चेहरा प्राप्त झाला आहे. एकेकाळी येथे कापसाची मोठी बाजारपेठ असल्याने व्यापाऱ्यांचे शहर म्हणून या शहराची ओळख होती. पूर्वी मोगल साम्राज्यात हे शहर होते. त्यानंतर हिंगोलीचा समावेश निजाम राज्यात झाला.

हिंगोली शहर वऱ्हाड प्रांत व निजामाच्या उर्वरित राज्यांच्या सीमेवर असल्याने ब्रिटिशांनी हिंगोलीत लष्काराची छावणी उभारली. या छावणीतील ब्रिटीशांच्या फौजेत प्रामुख्याने उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक होती. उत्तर भारतीयांच्या मते, कयाधू नदीच्या काठावरील खाकीबाबा मठ म्हणजे आखाडा परंपरेतील मठ होय. या मठाचे संस्थापक महंत खाकीबाबा हे उत्तरेतील असल्याने ब्रिटीश छावणीत आलेल्या उत्तर भारतीय सैनिकांचा हा मठ श्रध्दास्थान बनला. संत मानदास महाराज, संत शिवरीदास महाराज ही ऋर्षीतुल्य मंडळी या मठाचे मठाधिपती असल्याने त्यांच्या प्रती छावणीतील सैनिकांच्या मनात आदराचे स्थान होते. या संत मंडळींनी स्थानिक लोकांच्या अंत:करणातही आदराचे स्थान प्राप्त केले होते.

उत्तरेतून हिंगोलीत आलेली व ब्रिटीश छावणीत वास्तव्य करणारी ही मंडळी सैनिकीपेशाची असल्याने त्यांच्या पेशाच्या परंपरेनुसार ते दसऱ्याच्या दिवशी त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची पूजा करीत. खाकीबाबा मठ हा आखाडा परंपरेतील असल्याने तेथेही शस्त्रास्त्रे असत, तसेच त्या परिसरात राम मंदिर असल्याने दसऱ्याच्या दिवशी ही मंडळी खाकीबाबा मठात जाऊ लागली.त्यातूनच मठाच्या आवारात रावण दहनाची परंपरा दसऱ्याच्या दिवशी सुरु झाली, असे शहरातील जुनी-जाणती मंडळी सांगतात. नंतर ही परंपरा सैनिकांपुरती मर्यादीत न राहता हिंगोलीकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली.

या उत्सवाची व्याप्ती वाढू लागताच मठाची जागा अपुरी पडू लागली आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन होऊ लागले. आता हा महोत्सव हिंगोलीतील समस्त जाती-धर्मांच्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ब्रिटीशांनी निजामाला त्यांचा वऱ्हाड प्रांत परत केल्यानंतर हिंगोलीतील ब्रिटीश सैनिक छावणीचे अस्तित्वही संपुष्टात आले. तेव्हा हिंगोलीच्या नागरिकांनी या महोत्सवाचे यजमानपद मोठया आनंदाने स्विकारले आणि १८५५ पासून म्हणजे १५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या महोत्सवाचे अभिमानाने जतन केले.

भाद्रपद पौर्णिमेला बांसाफोड या कार्यक्रमाव्दारे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते. घटस्थापना ते रामराज्यभिषेक असा १२ ते १३ दिवस चालणारा हा महोत्सव म्हणजे हिंगोलीकरांच्या एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण होय. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक व बौध्दीक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच टेबल टेनिस आदी क्रीडा प्रकारांत भाग घेण्यासाठी खेळाडू येत असत. अलीकडेच्या काळात टेबल-टेनिस, बॅडमिंटन, कब्बडी, कुस्ती आदी क्रीडा प्रकारांचेही आयोजन केले जाते.

१९७० पासून या महोत्सवानिमित्त प्रदर्शनाच्या आयोजनाला सुरुवात झाली. सार्वजनिक दसरा महोत्सव समिती या प्रदर्शनाचे आयोजन करते. प्रदर्शनात विविध वस्तुंचे आकर्षक स्टॉल, आकाश पाळणे, मौत का कुव्वा, लहान मुलांसाठी रेल्वे आदी मनोरंजनाच्या सुविधा असतात.

रामलीला हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. उत्तर भारत, मध्यप्रदेशातील व्यावसायिक कलावंत रामलीला सादर करतात. हजारो भाविक रामलीलेचा आंनद घेतात. विजयादशमीला रावण दहन होते. त्या दिवशी नेत्रदीपक आतिषबाजी केली जाते. असा हा डोळयांचे पारणे फेडणार उत्सव प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.

  • अंबादास म्याकल

  • No comments:

    Post a Comment