Sunday, October 9, 2011

प्रदुषणमुक्तीचे अनोखे अभियान

वतमाळ जिल्ह्यातील वणी या शहराच्या परिसरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी आहेत. त्यामुळे परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या गावांनी आपआपल्या परीने प्रदुषणाचा सामना करण्याचे प्रयत्न चालविले आहे. प्रदुषणापासून मुक्ती मिळविण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी कार्य सुरु केले आहे. मात्र पुरड (पूनवट) येथील सरपंच सुनिल देरकर यांनी प्रदुषणमुक्तीचा उदात्त उद्देश डोळ्यासमोर स्वातंत्र्यदिनी गावाच्या परिसरात एक हजार वृक्षांची लागवड करुन इतर गावांना प्रेरणा दिली आहे.

वणी परिसर मोठ्या प्रमाणात खदानी असल्याने प्रदुषणाचे प्रमाण जास्त आहे. या प्रदुषणाचा माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता जो तो शासन व उद्योगांवर बोट दाखवत आपली जबाबदारी झटकून मोकळा होतो. परंतु पूरड (पूनवट) येथील याच परिसरातील सरपंच सुनिल देरकर यांनी असे न करता आपल्या गावाला व परिसरातील गावांना वृक्षारोपण करुन प्रदुषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार एक हजार वृक्षांची गावकरी व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजूरांच्या मदतीने लागवड केली. त्यांच्या या कार्याचे परिसरातील गावात कौतुक होत असून या कार्यामुळे परिसरात वृक्ष लागवडीचे गांभिर्यही सर्वसाधारण माणसाला कळले आहे. कोळसा उद्योगाच्या धुळीपासून मुक्ती करीता गाव पातळीवरच उपाय करण्याची गरज परिसरातील नागरिक बोलून दाखवित आहे. या कार्यासाठी सर्वसाधारण माणूस, युवा, शाळेचे विद्यार्थी, शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे.

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुनवटकर, श्रीमती पुनवटकर, श्रीमती पेंदोर, सुचिता कुळे, दिपाली निखार, सचिन खरात, पोलीस पाटील नथ्थुजी ठाकरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल टोंगे, शाळा समिती अध्यक्ष नंदकिशोर मोहितकार, विजय विधाते, सतीश कोंगरी, रामा नागपूरे, चंपत इटवकर, बंडू गोडे, विजय टोंगे आदीं या मोहिमेसाठी राबत असून पुढे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा त्यांचा माणस आहे.

  • अनिल आलुरकर

  • No comments:

    Post a Comment