Wednesday, August 29, 2012

बचत गटाची नवलाई


महिला बचत गट म्हणजे लोणची, पापड बनविणे, यापुढेही जाऊन घाऊक दरात वस्तु घेऊन किरकोळ स्वरुपात विकणे हे चित्र समाजात आजही दिसतय. केवळ टाईमपास म्हणून  या संकल्पनेकडे पाहणाऱ्या महिला आता व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू लागल्यात. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे महाड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दारिद्रय रेषेखालील महिलांचा  नवलाई महिला बचत गट.  या महिलांनी दहा लाखांची मिनी बस खरेदी करुन महाड एम.आय.डी.सी. मधील सॅडोझ प्रा. लिमिटेड या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामगारांना ने-आण करण्याची सेवा देत आहेत. 

महाड मधील नामांकित हिरवळ संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. सिताराम कडू यांनी 25 ऑक्टोबर 2007 रोजी मांघरुण गावातील दारिद्र्य रेषेखालील महिलांची सभा घेऊन त्यांना स्वर्णजंयती ग्राम स्वरोजगार योजनेची माहिती दिली. आणि महत्वाचे म्हणजे त्याच दिवशी गटाची स्थापना झाली. प्रारंभी बचत गटात एकूण अकरा सभासद घेण्यात आले. त्यात आठ दारिद्र्य रेषेखालील सभासद आहेत. खरंतर एकदा महिलांची मनं जुळली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे नवलाई महिला बचत गटाने सिद्ध करुन दाखवलं. अवघ्या एका वर्षातच या गटाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग व बँक ऑफ महाराष्ट्र बिरवाडी यांचे मार्फत फिरता निधी देण्यात आला. या गटाने नियमितणे कर्जाचा हप्ता भरत केवळ सहा महिन्यात फिरता निधी कर्ज गटाने फेडला.

दरम्यान सॅडोझ प्रा. लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक श्री. सुरेश भोसले यांनी महिलांच्या बचत गटाने कंपनीच्या कामगारांना ने-आण करण्यासाठी मिनी बस उपलब्ध करुन दिल्यास त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसेच कंपनी कडून संपूर्ण सहकार्य मिळेल याची हमी दिल्यानंतर, दहा लाखाची बस घेण्यासाठी संपूर्ण तालुक्यात सक्षम गट कोणता याचे सर्वेक्षण करताना ज्या गटाने आपली क्षमता सिद्ध केली तो गट म्हणजे नवलाई महिला बचत गट मांघरुण.

हिरवळचे अध्यक्ष श्री. किशोर धारिया व सॅडोझ कपंनीचे व्यवस्थापक श्री. सुरेश भोसले यांच्या सहकार्यामुळे महिला हया वाहतूक व्यवसायात सहभागी झाल्या. मिनी बसची किंमत 9.15 लाख असल्याने बँकेला संपूर्ण यशाची खात्री दिल्यानंतरच बँक ऑफ महाराष्ट्र बिरवाडी यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग यांचेकडून या गटाला तातडीने रु. 80,000/- अनुदान उपलब्ध झाले. गटाचे स्वत:चे भांडवल रु. 20,000/- आणि बँकेचे कर्ज 8,15 लाख रु. असे एकूण 9.15 लाख रु. कर्ज मंजूर झाले आणि बघता बघता बचत गटाच्या कामाला वेग आले.ऑक्टोबर 2010 रोजी महाड-पोलादपूरचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले, तहसिलदार श्री. नवले व गट विकास अधिकारी श्री. तपकिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीकडून या गटाला दरमहा रु. 69,000/- रक्कम भाडेतत्वावर दिली जाते. प्रत्यक्ष प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी बचत गट व बँकेने हिरवळचे प्रकल्पाधिकारी श्री. सिताराम कडू यांची नेमणूक केली.

अगदी 20,000/- रु. भागभांडवलावर सुरु केलेल्या ह्या प्रकल्पाने आज 20 महिन्यात 12 लाखाची मजल मारली आहे. बसचा हप्ता, ड्रायव्हर, क्लिनर व इतर डिझेल मेंटनंस हा सर्व खर्च जाऊन दरमहा गटाला निव्वळ 35,000/- रु. चा नफा होतोय. फक्त दिड वर्षात गटाने रुपये 5.5 लाखाचे कर्जफेड करुन एखादा दारिद्र्य रेषेखालील बचत गट देखील व्यवहार कुशलता दाखवू शकतो, याचे आदर्श उदाहरण साऱ्या महाराष्ट्रातील बचत गट व बँकांसमोर ठेवले आहे.

नवलाई बचत गटाच्या अध्यक्षा सौ. कलावती शिंदे, उपाध्यक्षा सौ. संगिता शिंदे व सचिव सौ. भारती शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच गेली पाच वर्षे अनेक अडचणी येऊन देखील हा गट यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणखी या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमित मासिक सभा, नियमित बचत व सभेत दरमहा जमाखर्चाचा हिशेब मांडणे, सर्वांना विश्वासाने सांभाळणे त्याचप्रमाणे कोणत्याही पुरुषांना गटाच्या व्यवहारात हस्तक्षेप करु न देणे ह्या गुणवैशिष्ट्यामुळे हा गट संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाने आदर्श उदाहरण म्हणून नावारुपास येत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात महिला बचत गटाची बस कंपनीसाठी चालविली जाते, ही घटना ठळकपणे अधोरेखित केली जाईल. श्री. किशोरभाई धारिया यांचा एक मानस होता तो असा की असं काही वेगळं आपण करुन दाखवू ज्यायोगे आपण सामाजिक कार्य करणाऱ्यांना एक उदाहरण देऊ शकू. एक पाऊल खूणा मागे ठेवू शकू. ज्याचं समाज अनुकरण करेल व आपल्या जीवनाचा त्यात मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल. पुरुष व भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढून महिलादेखील अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय करु शकतात. याचं उत्तम उदाहरण आपण समाजसमोर आज ठेवत आहोत. त्यांचे हे कार्य सामाजिक क्रांतीला प्रेरणादायक ठरेल. ह्या महिला आपल्या विभागातील/ समाजातील गरीब असहाय कुटूंबांना आपला व्यवसाय अनंत अडचणीतून कसा उभा केला आणि तुम्ही देखील अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय करुन आपल्या परिवाराला आर्थिक पाठबळ देऊ  हा विश्वास त्यांना नक्कीच देतील.

आर्थिक सामर्थ्य, कठोर परिश्रम व चिकाटी यामुळे महिला मानसिकदृष्ट्या सुदृढ, स्वाभिमानी व तेजस्वी होतील. यापूर्वी सतत पुरुषांच्या हातात खेळणारा पैसा आता यापुढे बचत गटांच्या प्रभावी माध्यमाद्वारे महिलांच्या हातातून प्रवाहित होईल. महिला आता कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर राहील याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

राजेंद्र मोहिते, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग.

No comments:

Post a Comment