Saturday, August 4, 2012

समाज आणि भाषा


मराठी भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृत विरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभव पंथाने मराठी ही अधिकृत धर्मभाषा म्हणून पुरस्कृत केली हेही खरे तथापि तरीही संत एकनाथांना संस्कृत वाणी देवे केले। प्राकृत काय चोरांपासुनी झाली ? असा खडा सवाल समाजाला विचारायलाच लागला. यादवांचे राज्य गेले व मराठीचा राजाश्रय संपुष्टात आला. पुढे मुस्लिम राजवटी सुरु झाल्या व या परतंत्र कालखंडातही फार्सी-अरबी शब्‍द मराठी हा मूक ताण मराठी भाषक सहन करीत होतेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापन केले, राज्यकारभारासाठी 'राज्यव्यवहार कोश' हा पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचा ग्रंथ निर्माण केला. याच सुमारास संस्कृत काव्याच्या धर्तीवरचे पण अस्सल मराठी पंडिती काव्य रचले जाऊ लागले. पुढे पेशवाई आली. या कालखंडात मराठी काव्याचा विस्तार झाला व उत्तर पेशवाईच्या काळात शाहिरांनी मराठी काव्याला खूपसे ऐहिक शृंगारिक वळण प्राप्त करुन दिले. थोडक्यात बाराव्या शतकापासून मराठी समाजाची भाषिक क्षमता व विविधांगी अभिव्यक्ती-कौशल्ये वाढविण्याची कामगिरी मराठी भाषेने केली. तीने समाजाला धर्माची व अध्यात्माची परिभाषा व प्रमेये शिकविली, पंडित कवींनी समाजाला संस्कृतातील विदग्ध काव्याची कलात्मकता शिकविली, तर विशाल जनसामान्यांचे नाट्यपूर्ण मनोरंजन करण्याची शाहिरी भाषा शाहिरांनी शिकविली. या प्राधान्याने इहवादी वळणाचा मात्र पुरेसा तर्कसंगत विकास झाला नाही नाहीतर मराठी गद्य हे देखील अठराव्या शतकातच जन्माला आले असते. जे गद्य लेखन झाले, ते बखरींच्या स्वरू पात, पौराणिक वळणाचे ! एकोणिसाव्या शतकात इंग्रजी राजवट आली व शासनभाषा इंग्लिश झाली. तेव्हापासून इंग्लिश विरुद्ध मराठी हा वाद सुरु झाला. हा वाद आजही काहीशा वेगळ्या संदर्भात चालूच आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हिंदी (व इंग्लिश) यांनाऑफिशिअल शासनभाषा म्हणून मान्यता मिळाली म्हणजे एक प्रकारे हिंदी - मराठी स्पर्धा कधी उघडपणे तर कधी प्रच्छन्नपणे सुरु झाली. ही भाषिक स्पर्धा आजही चालू आहे व हिंदीचे मराठीवर आक्रमण होत आहे. अशी तक्रार अधूनमधून करण्यातही येते, असे दिसून येईल.

या भाषिक इतिहासाला राजकीय संदर्भ आहेच व तो मोठ्या महत्त्वाचाही आहे. राजकीय पारतंत्र्य हे दीर्घकाळ महाराष्ट्रात होतेच. पारतंत्र्याने संस्कृतीच्या सगळ्याच अंगांची गळचेपी होत असते व त्यात भाषाही अंतर्भूत आहेच आहे. मुस्लिम राजवटीत फार्सी-अरबी, इंग्रजी अमदानीत इंग्लिश व स्वतंत्र भारतात हिंदी यांना शासनभाषा म्हणून सर्वोच्च स्थान राहिले. मात्र भाषावार प्रांतरचनेमुळे जी जी भाषिक राज्ये निर्माण झाली, त्यात मराठी भाषकांचा महाराष्ट्रही आहे. महाराष्ट्राची अधिकृत शासनभाषा मराठी खरी पण प्रत्यक्ष परिस्थितीच अशी झाली आहे की, केवळ शासनव्यवहारातच नव्हे, तर इतर सर्व प्रकारच्या भाषा व्यवहारात हिंदी, इंग्रजी व मराठी या तीन भाषा मुक्तपणे वापरल्या जातात. याचा अर्थ भाषाव्यवहार हा केवळ राज्यकर्त्या भाषकांच्या भाषेवर अवलंबून नसतो, तो केवळ राजकीय स्वातंत्र्य वा पारतंत्र्य यावर विसंबून नसतो, तो समाजाच्या घटकांवर, समाजाच्या व्यवहारांवरही अवलंबून असतो. त्रैभाषिक सूत्र हे आपल्या भाषिक मराठी जीवनाचे एक लक्षण होय. हे काहीही असले, तरी एके काळी मराठी समाज हा एक प्रभावशाली राज्यकर्ता समाज होता व त्याची मराठी भाषा ही शासनाची भाषा होती. एक मात्र खरे की, महाराष्ट्राबाहेर जी मराठी संस्थाने होती, त्या संस्थानांत तेथील मराठी राज्यकर्त्यांनी मराठीची सक्ती केली नाही. स्थानिक भाषांची मुस्क्टदाबी केली नाही. तसे नसते, तर इंदूर, ग्वाल्हेर इत्यादी संस्थानात मराठी भाषकांची संख्या व व्यवहार वाढला असता. बडोदे संस्थान काहीसे अपवाद म्हणावे लागेल, कारण सयाजीराव गायकवाडांनी मराठी भाषा व वाड्:मय यासाठी खूप प्रयत्न केले. उपक्रम राबवले व मराठी ग्रंथनिर्मिती समृद्ध केली. दक्षिणेत तंजावरला निदान मराठी रचनांना दरबारी आश्रय लाभला.

इंग्रजी राजवटीत घडलेली मराठी भाषेच्या दृष्टीने अत्यंत क्रतिकारक घटना म्हणजे मराठी गद्याचा उदय. पद्यरचनेत अडकून पडलेली मध्ययुगीन मराठी भाषा खरोखरच या गद्याच्या नव्या अवताराने मूलत: बदलली व तिची वाढ व विकास यांना जोराची चालना मिळाली.

मराठी भाषा व समाज यांचा सुमारे दहा शतकांचा पूर्वेतिहास गेल्या हजार वर्षांत जितक्या वेगाने बदलत राहिला, त्या वेगाच्या कितीतरी अधिक पट वेगाने त्यांचा इतिहास स्वातंत्र्योत्तर काळातील फक्त साठ वर्षात बदलत गेला व आजही बदलत आहेच. बॉम्बेचे मुंबई करावयाला आपणास तीस-पस्तीस वर्षे लागली, हे आपण जाणतोच. राजकीय दृष्टीने स्वतंत्र समाज व त्याची स्वतंत्र भाषा यांचा अर्थ काय व त्या बाबतीत आपले उत्तरदायित्व काय, यांचा खरे म्हणजे आपल्याला बोधच झाला नाही, असे कधी कधी वाटते. नपेक्षा संयुक्त महाराष्ट्रासाठी एवढे मोठे आंदोलन करण्याची खरोखरच वेळ आली नसती. या आंदोलनाच्या निमित्ताने जे लढाऊ लेखन मराठीत झाले, त्यात मराठीचे सामर्थ्य, परंपरा व ध्येय यांची चांगली माहिती मिळते. खरे तर या आंदोलनामुळेच आपण आपल्या मराठी समाजाची, मराठी भाषेची, आपल्या इतिहास-भुगोलाची आपणास नसलेली ओळख पुनरपि नव्याने करू न घेतली असे म्हणता येईल.

आपल्या मराठी भाषिक जाणिवेत एक प्रकारचा अहंभाव आहेच आहे आणि अगदी कालपरवापर्यंत इतर भाषांची टिंगल करण्याची वृत्तीही त्यामुळेच मराठी समाजात आढळते. त्यामुळे तोडके-मोडके मराठी बोलू पाहणारा परभाषिक एकदम दचकतो व मग मराठीचा नादच सोडून देतो. ही स्थिती आता उरली नाही हे खरेच, पण ती होती यात शंका नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भातील मराठी वाड्:मयाबरोबरच आणखी एक संदर्भ मराठी समाज आणि भाषा यांच्या वाटचालीच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. तो म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणे. आतापर्यंत ८४ साहित्य-संमेलने झाली आहेत व ती १८७४ पासून मध्ये काही वर्षे थांबून आजतागायत चालू आहेत. भाषेचा प्रश्न गेली दोनशे-सव्वा दोनशे वर्षे कसकशी वळणे घेत होता, हे त्यावरुन लक्षात येईल. मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा प्रवेश होण्यास १९०१ साल यावे लागले व तेही न्यायमूर्ती रानड्यांच्या अथक परिश्रमांनी. १९२५-२६ साली थोर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठी ही मुमुर्क्षू अवस्थेत आहे, असे निराशेचे उद्गार काढले होते. पण मराठी मृत झाली हे खरे, तिचा विकास होतच राहिला. पण तो पुरेसा नाही.

  • प्रा. रा. ग. जाधव

  • No comments:

    Post a Comment