Saturday, August 4, 2012

भाषा -- लोकजीवन समृद्ध करण्याचे साधन


मराठी भाषा राज्यभाषा करण्याचे तत्त्व आपण स्वीकारले आहे. मराठी भाषेवर आता अशी जबाबदारी आली आहे, की तिने लोकशाहीचा कारभार केला पाहिजे, की ज्यामुळे ती लोकांचे जीवन संपन्न करील. सगळ्या अर्थाने संपन्न करील, असा याचा अर्थ नव्हे तर भौतिक अर्थाने जगातले जे जे शास्त्र उंचावते आहे त्या त्या शास्त्रातील ज्ञान आपल्या भाषेत पकडून आणण्याचे सामर्थ्य आपल्या भाषेत उपलब्ध केले पाहिजे. मराठी भाषेचे राज्य यशस्वी करण्यासाठी, मराठी माणसाच्या मनात जो ज्ञानेश्‍वर आहे, जो रामदास आहे, जो तुकाराम आहे आणि त्याच्या मनात जी मराठी माऊली आहे त्या सर्वांना जागे करण्याचा, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी प्रयत्न करीन. कुणाच्या हातातला तराजू आणि कुणाची तिजोरी माझ्या या कामाच्या आड येईल, अशी भीती बाळगून मी हे काम करीत नाही. भाषेचा विकास हा केवळ त्या भाषेतील ललित साहित्याच्या संदर्भात होतो ही समजूत चुकीची आहे. निरनिराळ्या वैज्ञानिक शास्त्रांचा आविष्कार जेव्हा भाषा करू लागेल तेव्हाच तिचा खरा विकास झाला असे म्हणता येईल. तेव्हा साहित्यिकांबरोबर शास्त्रज्ञ, इतिहासकार, तत्त्ववेत्ते हे सर्व जण मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासास चालना देतील असा मला विश्‍वास वाटतो.

राज्यभाषेचा दर्जा जेव्हा भाषेला प्राप्त होतो तेव्हा लोकजीवन समृद्ध करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून आपण त्या भाषेकडे पाहात असतो. वेगवेगळ्या साहित्य प्रकारांनी लोकजीवन समृद्ध होत असते. लोकजीवन समृद्ध करणे हे साहित्याचे अंग आहे, की नाही त्याचा तो उद्देश आहे की नाही, हा अर्थात वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निदान त्याचा परिणाम तसा घडत असतो असे गृहीत धरून मी या गोष्टीची चर्चा करतो आहे आणि म्हणून मराठी भाषेचे राज्य झाल्यानंतर ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील विचारांची संपदा तिने मराठी जीवनात आणली पाहिजे, ही जिम्मेदारी तिच्यावर आहे. त्याकरिता मराठी भाषा ही अधिक विचारप्रवाही झाली पाहिजे.

मराठी भाषेवर लोकशाहीचा कारभार करण्याची आता जबाबदारी आलेली असून, तो तिने अशा रीतीने केला पाहिजे, की लोकांचे जीवन संपन्न होण्यास, समृद्ध होण्यास तिचे साहाय्य होईल. त्यासाठी भौतिकदृष्ट्या जगात जे जे शास्त्र उंचावलेले आहे त्या त्या शास्त्रातील ज्ञान आपल्यात उतरविण्याचे सामर्थ्य मराठी भाषेला प्राप्त झाले पाहिजे. साहित्याचा आणि संस्कृतीचा, विचारवंतांचा आणि लेखकांचा जन्म खरोखरी कशासाठी होत असतो? मी तर असे मानतो, की मानवी मनात अनेक मूक आशाआकांक्षा असतात, कल्पना असतात आणि त्या प्रगटीकरणासाठी, व्यक्तिमत्त्वासाठी, एकप्रकारे हाका मारीत असतात. शब्दासाठी त्या भुकेलेल्या असतात. तहानलेल्या असतात. त्यांच्या हाकेला ओ देऊन लेखक, विचारवंत, संशोधक वा शास्त्रज्ञ त्यांना लेखनाद्वारे शब्दरूप देत असतात. मराठी भाषिक जनतेच्याही अशा काही आशाआकांक्षा इच्छा असून, त्या विविध प्रवाही आहेत. त्यांना आपण लेखनद्वारे शब्दरूप दिले पाहिजे.
यशवंतराव चव्हाण

(
यशवंतराव - विचार आणि वारसा ग्रंथातून साभार)

No comments:

Post a Comment