Friday, May 4, 2012

गावाची गोष्ट न्यारी

गावात सांडपाण्याचा निचरा व त्याचा योग्य वापर, स्वच्छतेबरोबरच गावातील साथरोगांना आळा घालून निरोगी व प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळते ते मान्याच्या वाडीमध्ये. गावकऱ्यांनी भविष्याचा वेध घेऊन मान्याच्या वाडीला सक्षम बनविले. येणाऱ्या स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी या गावाने आधुनिकतेची कास धरली. ग्रामपंचायतीबरोबरच प्राथमिक शाळेला संगणक व प्रत्येक वर्गातील संगणकाला इंटरनेटची जोडणी. यामुळे नवी पिढी माहितीच्या महाजालाशी जोडली गेली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील केवळ १०० घरांच गाव असलेल्या मान्याची वाडी येथे एकविसाव्या शतकातील आधुनिकतेचं दर्शन होत आहे.


महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श खेडं म्हणून जिल्ह्यात नव्हं राज्याचं लक्ष वेधून घेणारं गाव म्हणजे मान्याची वाडी. आधी केले नी मग सांगितलं ! ही उक्ती कृतीतून साकार करणारं असं हे गाव. गावाची ख्याती ऐकून मी गावाला भेट देण्यासाठी गेलो. गावातील प्रगती पाहून व ऐकून ऐकावे ते नवलच अशी माझी गत या गावाची यशोगाथा ऐकताना झाली होती. शासनाची मिळाली मदत तर ठिक नाही तर स्वकर्तृत्वावर गावानं केवळ एकीच्या बळावर अनेक जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरील पोरितोषिक खेचून घेतली आहेत. एवढच नव्हं तर इतर गावांनाही निर्मल करण्यासाठी स्वखर्चानं, स्वत:चं जेवण बरोबर घेऊन इथल्या महिला पुरुषांनी शौचालयासाठी खड्डे खनून शौचालयांची उभारणी करुन दिली. अशा या मान्याच्या वाडीनं यशोगाथांचा कळसावर कळस रचला आहे.

गावाची माहिती घेत असतांना समजले त्या गावाचे सुपूत्र उत्तमराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सरपंच स्व. तात्यासो माने (तात्या), पत्रकार रविंद्र माने आणि त्यांचे सहकारी यांनी गावाला नवी दिशा दिली आहे. गावकऱ्यांनीही त्याला साथ दिली आहे. इतर गावांचेही प्रबोधन केलं आहे. गावकऱ्यांनी हातात हात घालून गावच्या विकासाचा एकेक टप्पा पूर्ण करीत आज राज्याला नव्हं देशाला भेडसावणाऱ्या वीज आणि भारनियमनाला फाटा देऊन बचतगटाच्या माध्यमातून घर तिथ 'सौर ऊर्जा' हा अभिनव संकल्पही पूर्ण केला आहे. आज अंधारातून प्रकाशाकडं जाणारा मार्ग कृतीतून साकार केला. आता केवळ सरासरी ३० रुपये एवढेच घरटी विद्यूत देयक येतं आहे.

यापूर्वी आर्थिक परिवर्तनासाठी घर तिथ हरियानातून आयात केलेली मुऱ्हा म्हैस, घर तिथं गांडूळखत, शौचालय, परसबाग, बचत खातं, घर आणि शेती पती-पत्नीच्या नावे, वृक्ष लागवड-संवर्धन, जलसंधारण, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, शासन जी योजना राबविण्याचा संकल्प करील ती ती योजना मान्याच्या वाडीत साकार करण्याची किमया या गावानं करुन दाखविली आहे.

आजपर्यंत गावातील सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या. गावच्या विकासाचे निर्णय सर्वानुमते घेतले जातात. ग्राम सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. गावच्या आणि घरच्या अर्थकारकारणाला हातभार लावणारा इथला दूध व्यवसाय. दूध काढणे, दूध संकलन केंद्रात जमा करणे आणि त्याचा मोबदला स्वीकारणे ही कामेही महिलाच करतात. इथे पुरुषांचा हस्तक्षेप चालत नाही. महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी अनेक प्रकारचे लघुव्यवसाय सुरु करुन प्रपंचाला हातभार लावलेला आहे. सभोवतालच्या डोंगरावर माथ्यापासून पायथ्यापर्यंत श्रमदानातून समतलचर, दगडी बंधारे, सिमेंट बंधारे तर कुठे भूमिगत बंधारे बांधून पाण्याची साठवणूक गावकऱ्यांनी केलेली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तर चार लाख रुपये, राज्यस्तरावरचे पहिले पाच लाख रुपये, पर्यावरण संतूलन समृध्द गाव प्रथम पुरस्काराचे दोन लाख रुपये, निर्मल ग्राम पुरस्काराचे दोन लाख रुपये, यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर तीन लाख व राज्यस्तरावरचे पाच लाख, महात्मा गांधी तुटामुक्त गाव एक लाख रुपये, स्व. बाबासाहेब खेडेकर पुरस्कार ५० हजार रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २० हजार रुपये, सावित्री बाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार ५० हजार रुपये, आदर्श शाळा पुरस्कार ११ हजार रुपये अशा अनेक पुरस्कारानं सन्मानित झालेल्या मान्याच्या वाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला तो गेल्या वर्षी ग्रामपंचायतीस 'आयएसओ' नामांकन मिळाल्यामुळे.

आज समाजाला भेडसावणारा ऐरणीवरला विषय म्हणजे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यातही मान्याच्या वाडीने पुढाकार घेतला आहे. शासन एक/दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना अर्थसहाय्य करते. त्याच धर्तीवर ग्रामपंचायत स्व निधीतून अशा जोडप्यांचा सत्कार व अर्थसहाय्य करते. छोट्याशा पण आदर्श मान्याच्या वाडीला मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. येणारे मान्यवर ऊर्जा घेऊन मान्याच्या वाडीचे अनुकरण करीत आहेत. या गावाला त्रिवार मानाचा मुजरा !

  • हंबीरराव देशमुख, पुणे
  • No comments:

    Post a Comment