Wednesday, May 2, 2012

व्यवसायात यशस्वी भरारी

वर्धा जिल्‍ह्यातील हिंगणी हे सेलू तालुक्‍यातील बोरधरण रोडवर वसलेले. २००० पर्यंत लोकसंख्‍या असलेल्या या गावात एकूण ४० ते ४५ बचतगटांची स्‍थापना झालेली आहे. त्‍यापैकी माविम अंतर्गत पाच गट आहेत. यातील एक असलेल्या उन्‍नती स्‍वयंसहायता गटातील सदस्‍य ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांनी चूल आणि मूल या चौकटीबाहेर पडून व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे.

ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांना उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा होती. परंतु बचतगटामध्‍ये येण्‍यापूर्वी फक्‍त चूल आणि मूल इतपतच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. मात्र गटामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून आले.

माविम सहयोगीनी मार्फत जेव्‍हा उन्‍नती बचतगटाची स्‍थापना झाली तेव्हापासून त्‍या गटामध्‍ये सक्रिय सभासद म्‍हणून सहभागी आहेत. गटाच्‍या नियमित सभेला उपस्थित राहणे, प्रशिक्षणामध्‍ये सहभागी होणे, यामुळे त्‍यांच्‍यात आत्‍मविश्वास निर्माण झाला. उद्योजकता जाणीवजागृती प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून व्यवसाय करण्‍याची त्यांची इच्‍छा पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आणि गटातून ४००० रूपये कर्ज घेऊन साडी, रेडिमेड कपड्याच्‍या व्‍यवसायाला त्यांनी सुरुवात केली.

व्‍यवसायाच्‍या उत्‍पन्‍नातून त्यांनी गटाच्‍या कर्जाची परतफेड केली. त्‍यानंतर माविम सहयोगीनीच्‍या मार्गदर्शनाने महात्‍मा फुले महामंडळातील योजनेच्‍या माध्‍यमातून २० हजार रूपयांचे कर्ज घेऊन त्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये वाढ केली. व्‍यवसाय वाढला तसे उत्पन्नही वाढू लागले. त्या माध्‍यमातून एका वर्षामध्‍ये या कर्जाचीही परतफेड झाली. ज्‍योत्‍स्‍ना यांची व्यवसायातील प्रगती आणि कर्ज परतफेडीची प्रामाणिकता पाहून बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेने त्यांचा सत्कार केला. यातून ज्योत्स्ना यांचा आत्मविश्वास आणि उत्साह देखील वाढला.

मेहनत करण्याची तयारी असल्याने व्‍यवसायवाढीसाठी त्यांनी सर्व ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवली. यामध्ये बचतगट आणि बँकेचीही साथ मिळाली. पहिले कर्ज वेळेत परत केल्याने बँकेकडे पत निर्माण झाली. या परिस्थितीचा लाभ घेण्याचे ठरवून व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले. बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेकडे त्यांनी ५० हजारांच्या कर्जाची मागणी केली. बँकेनेही कर्ज मंजूर केले. त्यानंतर व्यवसायाला भरभराट आली असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

ज्‍योत्‍स्‍ना यांच्‍या अल्पावधीतील प्रगतीमुळे गाव विकास समितीमध्‍ये त्यांची अध्‍यक्ष म्‍हणून निवड झाली. गाव विकास समितीच्‍या माध्‍यमातून त्यांच्या पुढाकाराने आणि सर्व गटातील महिलांच्‍या सहभागाने गावात वृक्षारोपण, एच.आय.व्ही.एड्स जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम, रॅली, महिलांची आरोग्य व हिमोग्‍लोबीन तपासणी, सावित्रीबाई फुले जयंती इत्‍यादी महत्‍वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले.

ज्‍योत्‍स्‍ना उरकुडे यांची बचतगटात येण्‍यापूर्वीची परिस्थिती आणि संधी मिळाल्यानंतर व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून त्यांनी घेतलेली भरारी हे इतर महिलांसाठी आदर्श ठरावे असेच उदाहरण म्हणता येईल.

No comments:

Post a Comment