Thursday, February 15, 2018

तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा

असदुद्दीन ओवेसी ही असामी बुद्धीमान आहे. ब्रिटीश काळात हैद्राबादेत (आंध्र) स्थापन झालेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षाचं अध्यक्षपद त्यांच्याकडं घराणेशाहीतून आलंय. ओवेसींचे वडील-आजोबा यांनीही या पक्षाचं अध्यक्षपद सांभाळलंय. ओवेसींचं वक्तृत्त्व खूप प्रभावी आणि भाषा रोखठोक आहे. आपला मतदार कोण आणि आपल्या पक्षाच्या मर्यादा काय, याची पुरेपूर जाण त्यांना आहे. त्यामुळंच हे पाठीराखे दुरावणार नाहीत, याची काळजी ते घेत असतात. हैद्राबादेत त्यांनी स्वतःचा गड कायम राखलाय. लोकसभेच्या सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्यात. त्यांचा भाऊ अकबरुद्दीन तेलंगणा विधानसभेत आमदार म्हणून निवडून येतोय. विचारसरणी आणि भूमिकांच्या बाबतीत असदुद्दीन-अकबरुद्दीन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘डिलीव्हरी’ची पद्धत फक्त दोघांची वेगळी. असदुद्दीन यांचं इंग्रजीवर प्रभुत्त्व आहे. कायदा-राज्यघटनेचा उत्तम अभ्यास असल्यानं चौकट न मोडता द्यायचा तोच ‘संदेश’ नेमकेपणानं देण्याची हातोटी त्यांच्याकडं आहे. तुलनेनं अकबरुद्दीनची जीभ सैल आणि अधिक तिखट आहे. तेढ निर्माण करणारी जातीय-धार्मिक विधानं करुन ते वारंवार कायद्याच्या कचाट्यात सापडतात. मात्र ‘विशिष्ट’ विधानं जाणीवपुर्वक करुन स्वतःची जहाल मतपेढी टिकवण्याचं, वाढवण्याचं त्यांचं काम चालू असतं.
आटोकाट प्रयत्न करुनही ओवेसी बंधूंना अजून तरी देशातल्या मुसलमानांचा नेता बनता आलेला नाही; कारण त्यांच्या दुर्दैवानं आणि देशाच्या सुदैवानं विचारी, परिपक्व मुसलमानांची संख्या देशात सर्वाधिक आहे. परिणामी अजूनही त्यांच्या पक्षाचा परिघ उथळ मुस्लिम मनाच्या पलीकडं फार विस्तारलेला नाही. म्हणून अलिकडं त्यांनी डॉ आंबेडकरांचं नाव घेण्याचा प्रघात सुरु केलाय.
ओवेसींच्या पक्षाच्या स्थापनेचा मूळ हेतू आणि इतिहास हा स्पष्टपणे भारतविरोधी आहे. परंतु, भारतात मुस्लिमांना मिळणारं व्यक्ती स्वातंत्र्य जगाच्या पाठीवर कोणताही देश देत नाही, हे वास्तव लक्षात आल्यानं ओवेसी आणि त्यांचा पक्ष भारतातच राहिला. आर्थिक, शैक्षणिक, भौतिक अशा कोणत्याच प्रगतीची दारं पाकिस्तानात-बांगला देशात जाऊन उघडी होणार नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. शिवाय, कितीही झालं तरी पाकिस्तानात गेलेल्या भारतीय मुसलमानांचा दर्जा ‘मुहाजीर’च. सौदी अरेबिया-तुर्कीसारख्या उच्च मुस्लिम वर्तुळातही भारतीय मुसलमानांना कमअस्सल, दुय्यम ठरवलं जातं. या निखळ व्यावहारिकतेतून त्यांचं भारतावरचं प्रेम टिकून राहिलेलं असावं, असा निष्कर्ष काढण्यास जागा आहे. (ओवेसींच्या वक्तृत्त्वाची आणि व्यक्तीमत्वाची तात्पुरती भुरळ पडलेल्या अनेक भारतीय मुस्लिमांना हे मत लागू होणार नाही.) म्हणूनच ओवेसींच्या तोंडची भाषा भारतप्रेमाची असते. पाकिस्तान विरोध ते जाहीरपणे व्यक्त करतात. पण पाचशे-सातशे वर्ष हा भारत मुस्लिमांच्या टाचेखाली होता, सगळे हिंदू मुस्लिमांच गुलाम होते, या देशावर मुस्लिमांचा अधिकार आहे, ही त्यांच्या मनाच्या तळाशी असणारी भूमिकाही ते ठासून सांगत राहतात. केवळ संधी नाही, मुस्लिमांची लोकसंख्या पुरेशी नाही म्हणून सध्या भारतावर आपली हुकूमत नाही, अन्यथा आपल्या पुर्वजांप्रमाणे भारत ही आपलीच जहागिरी आहे, असे उसासे ओवेसी बंधूंच्या भाषणातून व्यक्त होत असतात. थोडक्यात ओवेसी आणि त्यांचा धर्मांध, एकेरी पक्ष हा भारतीय मुस्लिम किंवा भारतीयांचा प्रतिनिधी होण्याच्या लायकीचा नाहीच.
देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानाचा धर्म काढून असदुद्दीन ओवेसी यांनी याचा पुरावा पुन्हा एकदा देशासमोर सादर केला. वास्तविक असली मूर्खपणाची वक्तव्यं जाहीरपणे करण्याचा मक्ता त्यांच्या भावाकडं आहे. यावेळी असदुद्दीन यांचाही खरा चेहरा त्यांचा ‘इंटेलेक्च्युअल’ बुरखा टरारुन फाडत बाहेर आला इतकंच. तिन्ही सैन्य दलात काम करणारा प्रत्येकजण फक्त आणि फक्त ‘भारतीय’च असतो, हे बुद्धीमान ओवेसींना कळत नाही अशातला भाग नाही. परंतु, स्वतःचं राजकारण तेवत ठेवण्यासाठी ते या क्षुद्र पातळीवर उतरले.
ब्रिटीश काळापासून सैन्यदलात काही रेजिमेंट्सना प्रादेशिक किंवा जातीय नावं दिली गेली आहेत. मराठा रेजिमेंट आहे. राजपुत, महार, शीख, मद्रास, नागा, जाट अशा चौदा रेजिमेंट आहेत आपल्या पायदळात. यातल्या बहुतांशी रेजिमेंट्स ब्रिटीशांच्या काळातल्या. त्यावेळची प्रादेशिक, धार्मिक गरज म्हणून त्यांनी त्या स्थापल्या. त्याहीपेक्षा ब्रिटीशांचा महत्त्वाचा उद्देश असणार तो म्हणजे ‘भारतीय’ म्हणून ब्रिटीश सैन्यात कधीही एकी निर्माण होऊ नये हा. भारतीय सैनिक रेजिमेंट्समध्ये विभागलेले राहणं हे अफगाणिस्थान ते ब्रह्मदेशापर्यंत पसरलेल्या ब्रिटीश साम्राज्याच्या हिताचंच होतं. 1857 चा दणका ब्रिटीश कधीही विसरले नव्हते. नंतर सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेनं उभ्या केलेल्या आव्हानाचा तर ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावण्यास मुख्य हातभार लागला, हा इतिहास आहे. त्यामुळं भारतातली सत्ता टिकवण्यासाठी रेजिमेंट्सच्या नावाप्रमाणेच सैन्यातले भेद आवर्जून जपणे ही ब्रिटीशांची गरज होती.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र हे चित्र एकदम बदललं. म्हणजे महार रेजिमेंटचं नेतृत्त्व ‘महार’च करतो, असं अजिबात नाही. शिख रेजिमेंटची सूत्रं फक्त ‘शिख’ सांभाळतो, असं नाही. मराठा, कानडी, गुरखा, जाट, तामिळ, बंगाली, गुजराती असा कोणीही, कोणत्याही रेजिमेंटचा प्रमुख होतो. केवळ त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर. रेजिमेंट्सची नावं प्रादेशिक-जातीय-वांशिक असली तरीही त्या रेजिमेंटचा नेता आणि त्याच्या अखत्यारीतलं सैन्य हे केवळ ‘भारतीय’च असतं. तिथं जात, धर्माला थारा नाही. अपवाद काही डोंगरी जमातींचा. कारण शारिरीक ठेवण आणि मर्यांदामुळं व्यावहारिक गरज म्हणून काही निकष सैल करावे लागतात. उदाहरणार्थ – लडाखच्या उणे तापमानात महिनोमहिने तग धरण्याची सवय एखाद्या दक्षिणी भारतीयापेक्षा हिमालयाच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या गुरख्याला जास्त असते. असे काही अपवाद वगळले तर तिन्ही दलांध्ये फक्त ‘भारतीय’च असतात.
सैनिक असला तरी शेवटी तो माणूस आहे. या सैनिकांना सैन्यातही त्यांच्या धार्मिक श्रद्धांचं पालन करण्याची मुभा असते. कुटूंब कबिल्यापासून दूर, खडतर अवस्थेत एकटं राहात असताना जवानांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी त्यांना कशाचा तरी आधार लागतो. काही सैनिक तो धार्मिक श्रद्धेत शोधतात. अशांसाठी सर्व धर्माच्या गुरूंचीही भरती सैन्यात करुन घेतली जाते. धार्मिक उत्सव सैन्यात साजरे होतात. सैन्यस्थळी मंदिरं, मशिद, चर्च आदी प्रार्थनास्थळं उभारली जातात. हा सगळा वैयक्तीक स्वातंत्र्याचा भाग असतो. वर्दी चढवून ‘ड्युटी’ला उभा राहिल्यानंतर मात्र प्रत्येकाची जात-धर्म ‘भारतीय’. दुसरी ओळख नाही. सैन्यदलाच्या सदर्न कमांडंच मुख्यालय पुण्यात आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी, मिलीट्री इंजिनिअरींग कॉलेज, मेडिकल कॉलेज यासारख्या सैन्याच्या कित्येक महत्त्वाच्या संस्था पुण्यातच आहेत. पत्रकार म्हणून यातल्या अनेक ठिकाणी कित्येकदा जाण्याचा योग येतो. तेव्हा सैन्याचं अखिल भारतीय रुप जवळून पाहायला मिळतं, अनेक गोष्टी ऐकायला मिळतात.
रेजिमेंट्सची घोषवाक्य पाहा. मराठा लाईट इन्फंट्रीचं घोषवाक्य आहे – ‘बोलो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.’ शत्रु सैन्यावर तुटून पडताना या रेजिमेंटमधला प्रत्येकजण हीच घोषणा देतो. या घोषणेनं त्याला स्फूर्ती येते. पण म्हणून घोषणा देणारा प्रत्येकजण महाराष्ट्रातला नसतो. तो बिहारी असतो. तो बंगाली असतो. तो कानडी असतो. असंच इतर रेजिमेंट्सं. ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल,’ अशा आरोळ्या ठोकत शिख रेजीमेंट शत्रुचा धुव्वा उडवत असते. जम्मु-काश्मिर रायफल्सचे जवान दुर्गा माता की जय म्हणत शत्रुच्या चिंधड्या करतात. या सगळ्या रेजिमेंट्समध्ये मुसलमान आहेत. नौसेनेत, वायुदळात मुसलमान आहेत. साध्या शिपाईगड्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणत्याही जागी गुणवत्ता या निकषावरच नेमणूका होतात. सैन्यात अजून आरक्षण नाही. जात-धर्म पाहून नोकरी दिली जात नाही. देशासाठी प्राण पणाला लावणारे हजारो मुसलमान यापुर्वीही भारतीय सैन्यात होते. भारतीय मुसलमानांनी इतर कोणत्याही जाती-धर्माप्रमाणांच निस्सिमपणे सैन्यातल्या जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. भारतीय मुसलमान भविष्यात देखील ही परंपरा चालू ठेवतील, यातही शंका घेण्याचं काडीमात्र कारण नाही.
असं असताना ओवेसींनी केलेला ‘मुसलमान सैनिक’ हा उल्लेख निषेधार्ह आहे. संतापजनक आहे. “तुमच्या घाणेरड्या राजकारणात शहीद सैनिकांना ओढू नका,” अशी सौम्य भाषेतली पण वेदना व्यक्त करणारी प्रतिक्रीया ओवेसींचं नाव न घेता सैन्यानं व्यक्त केलीय. आपण मात्र ओवेसींचं नाव घेऊन तुकोबांच्या शब्दात त्यांना हासडलं पाहिजे – “तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा.” म्हणजे ओवेसींचं अनुकरण करत आणखी कोणी दिवटा राजकारणी सैनिकांची जात-धर्म यापुढं काढणार नाही.
@ सुकृत करंदीकर,
15 फेब्रुवारी, 2018 पुणे.

No comments:

Post a Comment