Sunday, July 8, 2012

महाराष्ट्रातील जिल्हे


1]अकोला जिल्हा...........अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने अकोला शहर वसविल्याचे सांगितले जाते. नर्नाळ्याच्य सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख ‘ऐन-ई-अकबरी’त आढळतो.

२२ कि. मी. क्षेत्रावर पसरलेला सदुसष्ट बुरूज व सत्तावीस दरवाजे असलेला नर्नाळ्याचा इतिहासप्रसिद्ध किल्ला याच जिल्ह्यात गाविलगडच्या डोंगररांगांत पहुडलेला आहे.
अनुकूल हवामान व मृदा यांमुळे हा जिल्हा आज कापसाचे आगरच ठरला आहे. त्यामुळेच की काय, विदर्भाचे कृषी विद्यापीठ- पंजाबराव कृषी विद्यापीठ- येथेच स्थापन झाले आहे.
अकोट, तेल्हारा बाळापूर, मुर्तिजापूर, वाशिम, मंगरूळपीर, बार्शी टाकळी ही सर्व प्रसिद्ध कापूसकेंद्रे याच जिल्ह्यातील.
‘शंकरपट’ म्हणजे बैलांच्या शर्यतीत धावणाऱ्या धष्टपुष्ट बैलांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

2]मुंबई उपनगर जिल्हा....... ,......मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबई, माझागाव, परळ, वरळी व माहीम ही सात बेटे एकमेकांना जोडून मुंबई बेट तयार केले गेले साहजिकच, शहराचे क्षेत्रफळ मर्यादित होते. ब्रिटिश राजवटीत सुरुवातीस ‘मुंबई शहर’ हा एकच जिल्हा होता. शहराचे भौगोलिक व राजकीय स्थान लक्षात घेता स्वाभाविकतःच व शहाराची वाढ वेगाने होत गेली. शहरात वस्तीसाठी जागा अपुरी पडू लगल्यामुळे शेजारच्या साष्टी बेटावर या वाढत्या लोकसंख्येने आक्रमण व मुंबईची उपनगरे अस्तित्वात आली. ब्रिटिश राजवटीत १९२० च्या दरम्यान या उपनगरांना स्वतंत्र जिल्ह्याचे स्थान दिले गेले.

दरम्यानच्या काळात शहराचा विकास व महत्त्व आणि त्याबरोबर लोकसंख्या वाढत गेली. क्रमाक्रमाने खार, सांताक्रुझ, विलेपार्ले व अंधेरी येथे वसाहती उभ्या राहिल्या. गोरेगाव, मालाड येथील खाड्यांच्या परिसरात वस्ती वाढली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव हे परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झाले. चेंबूर, घाटकोपर,भांडुप या परिसरातही लोकसंख्या फुगू लागली. मुळातच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचे बनले. या पार्श्वभूमीवर मुंबई शहराची मर्यादा वाढविली गेली आणि १९५७ मध्ये उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यात विलीन करण्यात आला. या नव्या जिल्ह्याला बृहन्मुंबई जिल्हा’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
पुढील काळात तर शहराचे सर्वांगीण महत्त्व व लोकसंख्या यात गुणात्मकरित्या वाट घडून आली आणि १९९० मध्ये या नव्या बृहन्मुंबई जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्यात येऊन ‘मुंबई शहर’ व ‘मुंबई उपनगर” हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण केले गेले.

3]अहमदनगर जिल्हा..............इ. स. १४१८ मध्ये मलिक अहमद याने वसविलेले निजामशाहीच्या राजधानीचे शहर पुढे मलिक अहमदच्या नावावरून ‘अहमदनगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आलेल्या या शहराच्या नावावरून जिल्ह्यालाही अहमदनगर जिल्हा म्हणून संबोधले जाऊ लागले.

चारही बाजूंनी मोठमोठे खंदक असलेला अहमदनगरचा भुईकोट किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात याच किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यासारख्या नेत्यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित जवाहरलाला नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.
सहकारी चळवळीत देशात महाराष्ट्र अग्रेसर असून अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे प्रवरानगर (लोणी येथे उभा राहिला. हा कारखाना आता ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना’ म्हणूनच ओळखला जातो. सहकारी तत्त्वावरील सर्वाधिक साखर कारखाने राज्यात याच जिल्ह्यात आहेत.
‘अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ ही सहकारी क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी बँक ठरावी.

4]औरंगाबाद जिल्हा.....,,..........औरंगाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे तो अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमुळे, दौलताबादच्या किल्ल्यामुळे, घृष्णेश्वर येथील ज्योतिर्लींगामुळे आणि संतभूमी या नात्याने!

अजिंठ्याच्या लेण्यात शिल्पकाम असले तरी ती जगप्रसिद्ध आहेत, ती तेथील भित्तीचित्रांमुळे- या भित्तीचित्रांमधून प्रकट होणाऱ्या अमिजात चित्रकलेमुळे !
वेरूळ प्रसिद्ध आहे ते तेथील अप्रतिम कैलास लेण्यामुळे. या सौंदर्यशाली शैलमंदिराच्या खोदकामास राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याच्या कारकिर्दीत प्रारंभ झाला. आठव्या शतकात प्रथम कृष्णराजाच्या कारकिर्दीत या शैलमंदिरास पूर्णत्व प्राप्त झाले. ‘आधी कळस मग पाया!’ या पद्धतीने हे लेणे साकारलेले आहे!
सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मोगल व निजाम यांच्या राजवटी येथे नांदल्या. त्यामुळे जिल्ह्यात संमिश्र संस्कृतीचा सुंदर मिलाफ झालेला आढळतो. चक्रधरस्वामी, बहिणाबाई, भानुदासम एकनाथ, मुक्तेश्वर व अमृतराव यांसारख्या संताच्या शिकवणुकीने सहिष्णुतेचा पाठच या जिल्ह्यास घालून दिला आहे!

5]नांदेड जिल्हा.............नांदेडचे नाव पूर्वी ‘नवदंडी’ होते, असे सांगितले जाते. ‘नवदंडी’ म्हणजे नऊ ऋषीचे निवासस्थान. ‘नवदंडी’ शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन आजचे ‘नांदेड’ नाव पडले, असे मानले जाते.

या भागात नंद घराण्याने दीर्घकाळ राज्य केले. त्यामुळे या प्रदेशास ‘नंदतट’ असे म्हटले जाते. ‘नंदतट’ या शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन ‘नांदेड’ हे नाव पडले, अशीही नांदेड नावाची आणखी एक व्युत्पत्ती मांडली जाते.
इ. स. १७०८ मध्ये शिखांचे दहावे गुरू गुरूगोविंदसिंहजी यांची समाधी येथे आहे. गुरूगोविंदसिंहजी वापरीत असलेली शस्त्रे अद्याप जतन करून ठेवण्यात आली आहेत. शीख पंथीयांच्या श्रद्धा व भावना येथे एकवटल्या असून देशाच्या कानाकोपऱ्यातून व परदेशांतूनही शीख संप्रदायाचे लोक येतेह दर्शनासाठी येतात.
मराठीतील सुप्रसिद्ध पंतकवी वामन पंडित येथीलच.

6]कोल्हापूर जिल्हा...... ,,......राजर्षी शाहूंची कर्मभूमी महणून कोल्हापूर जिल्हा पुरोगामी महाराष्ट्रास ज्ञात आहे. कोल्हापूर संस्थानाच्या या अधिपतीस महाराष्ट्रातील बहुजन समाजाने आपले दैवतच मानले आहे. शाहूंचा जन्मही कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या घाटगे घराण्यात झाला असल्याने एका अर्थाने कोल्हापूर जिल्हा ही शाहूंची जन्मभूमीही आहे.

राजर्षी शाहूंनी स्थापन केलेली शाहू मिल, त्यांनी वसविलेली शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ व त्यांनी बांधलेले राधानगरी हे धरण आजही त्याची स्मृती तेवत ठेवीत आहेत. संतकवी मोरोपंत, ‘ययाती’कार वि. स. खांडेकर, माधव, ज्युलियन, ना. सि. फडके, ‘गीतरामायण’ कार ग. दि. माडगूळकर, ‘मृत्युंजय’काअ शिवाजी सावंत, ‘स्वामी’कार रणजित देसाई याची प्रतिभा येथे बहरली- त्यांचे साहित्य येथेच फुलले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बाबूराव पेंटर यांनी आपल्या ‘सैरंध्री’ या चित्रपटाद्वारे चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली. प्रभात कंपनीही येथेच उदयास आली. मा. विठ्ठल, मा. विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, यांसारख्या चित्रपटमहर्षीची कलाकारकीर्द येथेच फुलली-बहरली. पुढील काळातही कोल्हापुराने ही परंपर जोपासली. आज महाराष्ट्रातील ‘चित्रगगरी’ हे स्थान कोल्हापुरात प्राप्त झाले आहे. गानसम्राज्ञी, महाराष्ट्रभूषण लता मंगेशकर याही या मातीचीच देणगी होत.

7]सोलापूर जिल्हा.......आपल्या असामान्य प्रतिमेमुळे शाहिरि जगतात तळपून गेलेले कवीराय रामजोशी यांचा जन्म सोलापूरचाच. पेशवाईच्या अखेरीस दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या या शाहिराच्या लावणीने मराठी मनाला कायमच भुरळ पाडली आहे-वेड लावले आहे.

ग्रामीण ढंगाची, शाहिरीबाजाची व रांगड्या श्रुंगाराने नटलेली, तरीही आपली एक नजाकत जपणारी कविरायांची लावणी मराठी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे.
चीनमधील युद्धकाळात १९३८ ते १९४२ च्या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गरिबांची सेवा करून सेवाभावाचा जणू आंतराष्ट्रीय आदर्शच जगापुढे डॉ. द्वारकनाथ कोटणीसही सोलापूरचेच !

8]जालना जिल्हा.......,,......कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर मनमाड-काचीगुडा लोहमार्गावर वसलेले जालना हे एक प्राचीन शहर आहे. औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना केली जाऊनच या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली असल्यामुळे या जिल्ह्याच्या इतिहासाचा मागोवा घेणे द्विरुक्तीचे ठरेल. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व ‘ऐन-ई-अकबरी’चा कर्ता अबुल फजल, औरंगजेब व छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख सापडतो.

जालना म्हटले की, शूर व धाडसी लमाणी लोक डोळ्यापुढे येतात. ‘महिको’ची प्रसिद्ध बियाणीही जालन्याचीच. विड्यांसाठी सुद्धा जालना प्रसिद्ध आहे. जालना ही मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ गणली जाते.
प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले ‘भोकरदन’ हे स्थळ तसेच देवीचे ‘अंबड’ व समर्थ रामदासांचे जन्मगाव ‘जांब’ ही याच जिल्ह्यात आहे.

9]सांगली जिल्हा....... ,,....प्राचीन इतिहास असलेला हा प्रदेश मोर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव व बहामनी आणि मराठी सत्तांच्या वाढीचा व ऱ्हासाचा साक्षीदार आहे. पेशवाईत मिरज-सांगली हा प्रदेश पटवर्धन घराण्याकडे होता. सांगली शहर हे पटवर्धनांच्या सांगली संस्थानची राजधानी होते.

ज्या विठोजीराव चव्हाणांनी औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाच्या उरात धडकी भरविली, ते विठोजीराव चव्हाण याच जिल्ह्यातील डिग्रजचे!
सांगली जिल्हा हा कलावंताचा जिल्हा आहे, असे म्हटले जाते. नाटककार गोविंद बल्लाळ देवल व विष्णुदास भावे हे मूळचे सांगलीचे. गायक अब्दुल करीमखान मिरजचे, तर विष्णु दिगंबर पलुसकर हे पलुसचे. बालगंधर्व म्हणून प्रसिद्धीस आलेले नारायणराव राजहंस हे या जिल्ह्यातील नागठाणे येथील, तर नटवर्य गणपतराव बोडस हे बोरगावचे.
एवम, या जिल्ह्याने अनेक मातबर कलावंताची देणगी महाराष्ट्राला दिली आहे, म्हणूनच या जिल्ह्याला यथार्थतेने ‘नाट्यपंढरी’ म्हणून गौरविले जाते.

10]परभणी जिल्हा........,.....धार्मिक जनांची अनेक श्रद्धास्थाने जपणारा, धार्मिक मनाला वंदनीय असलेला हा जिल्हा ! हा नामदेवांचा जिल्हा. नामदेवांचा जन्म येथीलच नरसीबामणीचा ! नामयाची दासी जनाबाई, तिचा हा जिल्हा. ती गंगाखेडची ! येतेह जनाबाईची समाधीही आहे.

नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांच्य वास्तव्यानेही ही भूमी पावन झाली आहे. औंढ्या नागनाथ येथे गुरू-शिष्यांच्या समाधी आहेत.
महानुभाव पंथातील एक संतकवी भास्करभट्टही याच जिल्ह्यातील कासारबोरीचे.
औंढ्या नागनाथ, मुदगळ, शिरडशहापूर, जिंतूर (जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान) यांसारखी क्षेत्रे या जिल्ह्यात आहेत.

11]सातारा जिल्हा....... ...चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव बहामनी व तद्नंतर आदिलशाही या राजवटी येथे नांदल्या. चालुक्य काळातील इ. स. ७५४ मधील सामानगडच्या ताम्रपटात सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. भारहूत (जबलपूर) व कुडा (अलिबाग) येथील स्तूपांवर करहाट (कऱ्हाड) चा उल्लेख केलेला आहे.

मराठ्यांच्या इतिहासाशी तर, साताऱ्याचे नाते अतूट आहे. शिवशाहीत हा प्रदेश स्वराज्यात अंतर्भूत होता, हा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातच छत्रपती राजारामाने आपली गादी येथे स्थापन केली होती. इ.स. १७०० मध्ये राजाराम मरण पावल्यावर आपला मुलगा दुसरा शिवाजी यास राज्याभिषेत करवून ताराबाईने येथूनच राज्यकारभार पाहाण्यास सुरुवात केली. छत्रपती शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर झालेल्या संघर्षात शाहूचा पक्ष वरचढ ठरला. सातारची गादी शाहू महाराजांच्या ताब्यात आली. १७०८ मध्ये येथे शाहूंचा राज्याभिषेक संपन्न झाला. ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन केली. तेव्हापासून छत्रपतींची ‘थोरली पाती’ सातारा येथे प्रस्थापित झाली.
कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्रई या पंचगंगाप्रमाणेच रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उद्‍गमही याच जिल्ह्यात झाला ! कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इ. स. १९१९ मध्ये काले तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. १९२४ मध्ये या शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचे रूपांतर आज संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या वटवृक्षात झाले आहे.

12]जळगाव जिल्हा..........पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा होय. सखाराम महाराजांच्या समाधीमुळे व तत्त्वज्ञान मंदिरामुळे एक संतपीठ ठरलेले अमळनेर; पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा यांमुळे ऐतिहासिक ठरलेले एरंडोल; यादवकालीन शिल्पांमुळे महत्त्व प्राप्त झालेले पाटण व कॉंग्रसच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे (१९३६) आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले फैजपूर ही गावे या जिल्ह्याची आभूषणे होत.

‘मृत्यूचे चुंबण घेणारा महाकवी’ या शब्दात आचार्य अत्रे यांनी ज्यांचे वर्णन केले, त्या सानेगुरुजीम्च्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण याच जिल्ह्यात झाली. येथेच त्यांचे कार्य-कर्तृत्व फुलले. बालकवी ठोंबरे, अहिराणी बोलीत रसाळ व प्रासादिक काव्यरचना करणाऱ्या ‘निसर्गकन्या’ बहिणाबाई चौधरी ह्या या मातीने महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत.

13]रत्नागिरी जिल्हा.......,,......या जिल्ह्यातील पोंभुर्ले हे मराठी वृत्तपत्रांचे जनक ‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक पर्वच ज्यांच्या नावाने ओळखले जाते; ते हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते, हिंदी असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म याच जिल्ह्यातील रत्नागिरीजवळच्या चिखली येथील. स्त्री-शिक्षणासाठी आयुष्यभर स्वतःस वाहून घेणारे स्त्री-शिक्षणाचे व विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते महर्शी धो.के. कर्वे याच जिल्ह्यातील शेरवलीचे.  मालगुंड हे मराठीतील युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले-केशवसूत- यांचे जन्मगाव. प्रसिद्ध समाजवादी विचारवंत नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्मही याच जिल्ह्यातील हिंदळे गावचा.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात धडाडीने सहभाग घेणारे, जगाला मानवधर्म शिकविणारे मातृहृदयचे कवी साने गुरुजी यांचा जन्मही याच जिल्ह्यातील पालगडचा. न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखले यांचाही जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक गावचा. रँग्लर पराजंपे, लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग. वा. मावळंकर, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, सुप्रसिद्ध विनोदी नट शंकर घाणेकर व नटवर्य काशिनाथ घाणेकर ह्या या जिल्ह्यानेच महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत. रत्नागिरीस ‘रत्नभूमी’ म्हणूनच ओळखले जाते.

14]बीड जिल्हा........ ,....बीड जिल्ह्याचा इतिहास बीड शहराशी जोडला गेला आहे. बीड जिल्ह्याचे नावही बीड शहरावरून पडले आहे. बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या खोलगट किंवा विळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने ‘बीड असे पडले असावे, अशी ‘बीड’ नावाच्या व्युत्पतीची एक सारणी लावली जाते.

‘भीर’ या फार्सी शब्दाचा अर्थ ‘पाणी’ असा होतो. या परिसरात भूगर्भात थोड्याच अंतरावर पाणी लागते; तसेच बिंदुसरा नदीही शहरातूनच वाहाते. त्यामुळे पूर्वी येथे पाण्याचा तुटवडा नव्हता. शहरास मुबलक पाणीपुरवठा होत असे. त्यामुळे मुस्लीम राजवटीत या शहरास ‘भीर’ हे समर्पक नाव दिले गेले असावे व पुढे भीरचा अपभ्रंश होत जाऊन बीड हे नाव रूढ झाले असावे, असेही एक मत मांडले जाते.
सीतेस पळवून नेणाऱ्या रावणास जटायूने येथेच रोखले. रावणाबरोबरच्या द्वंद्वात घायाळ होऊन आसन्नमरण स्थितीत पडलेल्या जटायूने येथेच सीताहरणाची हकीकत रामास सांगून प्राण सोडले, अशी एक आख्यायिका या शहराशी जोडली जाते. या दंतकथेस आधार म्हणून शहरात असलेल्या जटाशंकर मंदिराची साक्ष दिली जाते. महाभारतात उल्लेखलेली दुर्गावती नगरी ती हीच, असेही म्हटले जाते.

15]सिंधुदुर्ग जिल्हा.............अंगावर आदळणाऱ्या असंख्य लाटा झेलत आणि छत्रपती शिवरायांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत व शिवकालीन इतिहासाच्या देदीप्यमान आठवणी काढीत जलदुर्ग-सिंधदुर्ग-अरबी समुद्रात ताट मानेने उभा आहे. मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास सिंधुदुर्गच्या रूपाने जणू समुद्राच्या लाटांवरच चितारलेला आहे- साकारलेला आहे. या सिंधुदुर्गचे नावच या जिल्ह्याने धारण केले आहे.

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर अजिंक्य असा जलदुर्ग असणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर क्षेत्रावर या दुर्गाची उभारणी केली. १० नोव्हेंबर १६६४ रोजी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले गेले, ते तीन वर्षे अहोरात्र चालूच होते. शिवरायांची दूरदृष्टी इतक्यावरच थांबली नाही, तर पद्मगड, भगवंतगड, सर्जेकोट, भरतगड आदी लहान-मोठे किल्ले सिंधुदुर्गच्या परिसरात बांधून त्यांनी सिंधुदुर्गल अभेद्य बनविले. महाराष्ट्रातील एकमेव असे. ‘शिवछत्रपती मंदिर’ या किल्ल्यात आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.
विविध क्षेत्रांत आपल्या तेजाने तळपणारी अनेक नररत्ने या जिल्ह्याने राज्यास दिली. उक्ती आणि कृती यांमध्ये एकवाक्यता असणारे थोर समाजसुधारक रा. गो. भांडारकर, कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन, र. के. खाडीलकर, बॅरिस्टर नाथ पै यांसारखी नररत्ने म्हणजे याच जिल्ह्याने आपणास दिलेली देणगी होय !

16]रायगड जिल्हा.....,....रायगड किल्ला – ६ जून १६७४ रोजी येथे शिवरायंचा राज्यभिषेक संपन्न झाला व हिंदवी स्वराज्यास खऱ्या अर्थाने एका छत्रपतीचे छत्र लाभले. तो हा रायगड किल्ला ! हा किल्ला सुमारे तीन हजार वर्षे इतका प्राचीन असावा. तथापि, त्याचा प्रथम उल्लेख येतो तो विजयनगरच्या इतिहासात !

राज्याभिषेकानंतर व तत्पूर्वीही काही काळ महारजांची राजधानी येथेच होती. या गडाचे मूळ नाव ‘रायरी’ असे होते. १६५६ मध्ये जावळी जिंकून घेतल्यानंतर चंद्रराव मोऱ्यांकडून हा गड महाराजांच्या ताब्यात आला. राजांनीच या गडाचे नाव ‘रायगड’ असे ठेवले. १६७४ नंतरच्या राजांच्या मोहीमा येथूनच आखल्या गेल्या. येथेच इ.स. १६८. मध्ये चैत्रशुद्ध पौर्णिमेस हा युगपुरुष निजधामास गेला.
महाराजांनंतर १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांकडून मोगलांच्या ताब्यात गेला. १७३५ मध्ये मराठ्यांशी तो पुन्हा मोगलांकडून जिंकून घेतला. पेशवाईच्या पडत्या काळात याच किल्ल्याने नाना फडणीस व दुसऱ्या बाजीरावास आश्रय दिला. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
१८६९ च्या आगेमागे महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
१८९७ मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांनी या ऐतिहासिक वास्तूस पुन्हा उजाळा दिला.

17]पुणे जिल्हा.........हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला.

समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात.
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यांसारखे समाजसुधारक ही पुण्याच्या मातीने राष्ट्राला दिलेली देणगीच ठरली. रा. गो. भांडारकर, सुधाकर आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या नररत्नांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले- याच पुण्यात फुलले ! असे हे पुणे !

18]नाशिक जिल्हा......,.....राम,लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते. असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.

याच ठिकाणी इसवी सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.
क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.
सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय !
धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा अलीकडील काळात एक अग्रगण्य ‘औद्योगिक जिल्हा’ होवू पाहात आहे !

19]धुळे जिल्हा..... ,....हा प्रदेश प्राचीन काळी ‘रायका’ नावाने ओळखला जाई. यादवकाळात याच प्रदेशाचा ‘साऊन देश’ असा उल्लेख केलेल आढळतो. पुढे बहामनी काळात हा प्रदेश खानाचा देश म्हणून ‘खानदेश’ या नावाने ओळखल जाऊ लागला. ब्रिटिशकाळात जळगाव व धुळे मिळून ‘खानदेश’ हा एकच जिल्हा होता. जिल्ह्याने मुख्यालय ‘धुळे’ येथे होते. पुढे खानदेशाचे ‘पूर्व खानदेश’ व ‘पश्चिम खानदेश’ असे दोन भाग करण्यात आले. पश्चिम खानदेश म्हणजेच थोड्याफार फरकाने आजचा धुळे जिल्हा ! १९६१ मध्ये पश्चिम खानदेशाचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण केले गेले.

प्राचीन काळी अभीर-अपभ्रंश अहीर- राजे सध्याच्या धुळे-जळगाव किंवा पूर्वीच्या खानदेश परिसरात राज्य करीत होते. या अहीरांची बोली ती ‘अहीराणी’ या भागात बोलली जाते.
‘भिल्ल’ ही राज्यातील एक प्रमुख आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात केंद्रीत झाली आहे. या जमातीने स्वतःची वेगली अशी सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्राचीन काळापासून जपली आहेत. या प्राचीन जमातीचा उल्लेख रामायण व महाभारतातही आढळतो. ही जमात मूळची भू-मध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील असावी व हवामान स्थितीत परिवर्तन झाल्यामुळे तिने स्थलांतर केले असावे, असे मानले जाते.

20]ठाणे जिल्हा..... .....आबाजी सोनदेव यांनी केलेली कल्याणच्या खजिन्याची लूट, थोरल्या बाजीराव पेशव्याचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसईच्या किल्ल्यास दिलेला वेढा, साष्टीचा कब्जा व ठाण्याच्या किल्ल्यातून त्रिंबकजी डेंगळे यांचे पलायन यांसारख्या मराठेशाहीतील अनेक स्फूर्तीदायक प्रसंगाचा हा जिल्हा साक्षी आहे; तर जिल्ह्यात असलेले ठाणे, वसई, अर्नाळा  माहुली हे ऐतिहासिक किल्ले या जिल्ह्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणल्या गेलेल्या या जिल्ह्यात राज्यातील सर्व प्रकारची भौगोलिक व सामाजिक विविधता एकत्र आली आहे.

राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ६.६४ टक्के इतकी लोकसंख्या या जिल्ह्यात राहाते. लोकसंख्येचा विचार करता राज्यात मुंबई उपनगर व पुणे य जिल्ह्यानंतर ठाणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटरला ५४९ इतकी असून ती राज्यातील लोकसंख्येच्या घनतेच्या दुपटीहून अधिक आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांनंतर ठाणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो.

21]मुंबई शहर जिल्हा...........‘मिरात-ई-अहमदी’ या ग्रंथात आलेल्या ‘मन्‌बाई’ या शब्दाचा आधार घेऊन ‘मुंबाई’ या स्थानिक देवतेवरून ‘मुंबई’ हे नाव पडले असावे, असे मत सालेटोर यांनी मांडले आहे. मुंगा कोळ्याने मुंबादेवीचे मंदिर बांधले आणि मुंबादेवीवरून मुंबाबाई-मुंबाआई-मुंबा-मुंबई असा अपभ्रंश होत जाऊन ‘मुंबई’ हे नाव प्रचलित झाले, असाही एक मतप्रवाह आहे. अ. द. पुसाळकर व वि. गो. दिघे यांसारखे संशोधक मृण्मयी-मुंबई-मुंबई अशीही मुंबई नावाची उपपत्ती लावतात. स्थानिक कोळी जमातीच्या मुंबादेवी या देवतेच्या नावावरून मुंबई हे नाव प्रचलित झाले असावे, हे मत सर्वसामान्यपणे मान्य करण्यात येते.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीवर दूरगामी परिणाम घडाविणाऱ्या रॉयल एशियाटिक सोसायटी (१८०५), स्टुडन्ट्स लिटररी अ‍ॅंड सायंटिक सोसायटी (१८४८), ज्ञानप्रसारक समा (१८५२), बॉम्बे असोसिएशन (१८५२); सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स (१८५७); प्रार्थना समाज (१८६७); आर्य समाज (१८७५), थिऑसफिकल सोसायटी (१८७५) यांसारख्या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशनही १८८५ मध्ये मुंबई भरले.
येथीलच गवालिया तँक मैदानावरून (सध्याच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरून) १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले. येथेच जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नौरोजी, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पाडुरंग, भाऊ दाजी लाड, बाबा पद्मनजी, न्यायमूर्ती महदेव गोविंद रानडे, फिरोजशहा मेहता यांसारख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतालाही ललाभूत ठरलेल्या थोर व्यक्तित्वांचे कार्य-कर्तृत्व फुलले


















No comments:

Post a Comment