Wednesday, February 29, 2012

हास्यमैफल आणि प्रबोधन

विदर्भ वऱ्हाडातील बोली भाषा, बोली भाषेतून आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या, कापूस पिकाची कोंडी, ग्रामीण तरूणाईचे प्रश्न आणि त्याला प्रमाण भाषेतील गेय गझलांचा श्रृगांरिक तडका, असा एकूण हास्य, विनोद आणि त्यातून अंतर्मुख करणारा माहौल, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचं वैशीष्टय ठरला. अस्सल ग्रामीण प्रतिभांचा महाराष्ट्र सदनाच्या व्यासपीठावर उमटलेला ठसा अनेक दिवस स्मरणात राहणार आहे हे निश्चित.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात युवाकवी संमेलन घेण्यात आले.

विविध काव्यसंमलेन गाजविणारे, कवीतेसाठी विविध पुरस्कार मिळालेले पाच प्रतिभावान कवींचा संच प्रा. रूपेश कावलकर यांच्या सूत्रसंचालनात ही काव्यसंध्या रमली. यामध्ये सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी किशोर मुगल, संतोष खडसे हास्यव्यंगाचे सादरकर्ते प्रा. प्रवीण तिखे, गझलकार पुनीत मटकर आणि प्रसिद्ध कवी प्रा. रूपेश कावलकर यांचा समावेश होता. या सर्वांनी दोन तास हास्यची कारंजी महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीत रूजवली.

वऱ्हाडी कवींनी सजविलेल्या मैफीलीमध्ये प्रेम, विरह, व्यंग, दु:ख, व्यथा, जीवनातील अनेक रंग यांवर आधारित कवितांचा समावेश होता. वऱ्हाडी भाषेत सादर झालेल्या कवितां उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख करणा-या ठरल्या. 

मराठीमध्ये असलेल्या प्रांतवार भाषा रचनेवर आधारित कवी संतोष खडसे यांची 


माय मराठीची बोली आहे लयी भारी.....
वऱ्हाडीच आहे त्याला अस्तर......

या कवितेला रसिकांनी विशेष दाद दिली. 

पांढर सोनं पिकविणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर शेतकाऱ्यांच्या पत्नीच्या वेदनचे वर्णन करणा-या कवी पुनीत मेटकर यांच्या कविते ने श्रोत्यांचे डोळे पाणावले. 

भरल्या वाटयावर कपाळयावरं कुंकु मोडल.....
अर्ध्या वाटेवर धनी तुम्ही गेले सोडुन ......
अईन मीरगाच्या वेळी ......
डोळयात आल पाणी...

सरळ, साध्या, छोटया-छोटया पण आशयपुर्ण असणा-या कवितां श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत होत्या. 

घरी टि.व्ही. ले लावला केबल.......
तवा घरातील समदे पॅनल झाले खुश......
भातात निघे केस, भाजीत नसे मीठ
भाकरीत नसे पीठ.....
हे किशोर मुगल यांच्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या जाहिरातींचे विडंबन सर्वाना खुप भावले. 
प्रा. प्रवीण ‍तिखे यांनी यावेळी सादर केलेले मॅराथॉन किस्से हसता हसता पुरेवाट लावणारे होते. मंच संचालक रूपेश कावलकर यांनी सुशिक्षित तरूण शेतकऱ्यांच्या अंतर्मनातील वेदना आपल्या मुक्तछंदात बांधल्या ...... नव्या प्रतिभेतून साकारलेल्या या नव्या कल्पना उप‍स्थितांची दाद मिळवून गेल्या. हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या या काव्यसंधेला दिल्लीतील मराठी बांधवासोबतच अन्य भाषिकांनीही चांगलीच दाद दिली. 


  • अंजु कांबळे 
  • 1 comment:

    1. ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.


      जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे...

      • प्रकरण पहिले - प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.

      • प्रकरण दुसरे - आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष.

      • प्रकरण तिसरे - मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक - सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.

      • प्रकरण चौथे - मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.

      • प्रकरण पाचवे - मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा - प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.

      • प्रकरण सहावे - उपसंहार

      डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० - ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे. अधिकृतरीत्या आय. एस. बी. एन. नोंदणीकृत असलेला ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ हा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्य विश्वातली एक अजोड कलाकृती ठरला आहे.

      संपर्कासाठी पत्ता: कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर, सुदर्शन बिल्डिंग, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१, पोस्ट - जयसिंगपूर, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. मुस्लिम कवींनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



      • पुस्तक - मुस्लीम कवींची मराठी कविता (समीक्षा ग्रंथ)
      • ISBN - 978-81-929803-4-8
      • लेखक - डॉ. किशोरकुमार कांबळे (7385218021)
      • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
      • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
      • संपर्क - 02322 - 225500, 9975873569
      • ईमेल - sunildadapatil@gmail.com


      ReplyDelete