Friday, February 24, 2012

धरतीवरचा स्वर्ग

अजिंक्य ता-याच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्हयाची सांस्कृतीक, ऐतिहासिक तसेच पर्यटनाची ओळख साता समुद्रापार झाली आहे. जिल्हयाने विकासाच्या सर्व क्षेत्रात राज्यात गौरव नोंदविला आहे. पर्यटनात तर सातारा जिल्हा संपूर्ण जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे. सातारा शहरापासून अवघ्या ३० कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरले असून पर्यटकांची रिघ लागली आहे. या पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे ८५० पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे.

कास पठाराला जाताना सातारा शहरापासूनच घाट सुरू होतो. नागमोडी पण आकर्षक अशा वळणांनी रस्ता माणसांनी फुलून जातो. घाट समाप्त होताच विस्तीर्ण असे पठार डोळयात भरते. हे पठार म्हणजेज कास पठार संबोधले जाते. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळयांचे पारणे फिटाव्या अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोचत नाही तिथपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरले आहे. या पठारावर बोचरा वारा, पाहुण्यांचे विशेषत: पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणु धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणा-या प्रत्येकालाच होत आहे. या पुष्प पठारावरील क्षणात सुर्यकिरणांतील इंद्रधनुष्यीछटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवे-हवेसेपणा प्रत्येकालाच मोहात पाडत असून जणू धुक्यात न्हाऊन जावे अशीच मनोमन इच्छा या परिसराच्या आकर्षणाने होत आहे.

कास पठारावर जाणारा प्रत्येकजण येथील विविधांगी फुले आणि वनस्पतीकडे आपोआपच आकर्षिला जातो. कास पुष्प पठारावर पुष्प आणि वनस्पतीमुळे येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र, कधी लाल, निळा, जांभळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे फुले पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडतात. या फुलांवर पसरणा-या इंद्रधनुष्यीछटा पाहण्यास मिळत असून हा परिसर जणु स्वप्नसृष्टीत पोहोचविणाराच ठरतो.

कास पुष्प पठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वन विभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्प पठाराची जैव विविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्था पुढे सरसावल्या आहेत. कास पठार हे १७९२ हेक्टरवर पसरले असून यामध्ये वनखात्याची ११४२ हेक्टर तर खाजगी ६५० हेक्टर जमीनीचा समावेश आहे. साता-याच्या पश्चिमेला ३० कि.मी.वर वसलेल्या कास पुष्प पठारापासून पर्यटनासाठी जगप्रसिध्द असणारे महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ अवघ्या ३० कि.मी. अंतरावर आहे.
महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री, सहयाद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरुन दिलेला नैसगिर्क खजिनाच महाराष्ट्राला बहाल केला आहे. सह्याद्री म्हणजे जैवविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. जगातील महत्वाच्या अठरा ठिकाणांमध्ये सह्याद्रीचा समावेश होतो. कास पठार हा त्याचाच एक भाग असून त्यास कास पुष्प पठार असेही म्हणतात. कास पठाराला सडाही संबोधिले जाते. या सड्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे १२०० ते १३०० मीटर एवढी आहे. या ठिकाणी झाडे उगवत नाहीत. मात्र पावसाळ्यात रानफुले व पुष्पवैभव सर्वांनाच जादूमय भुरळ घालतात. कास पठारावरील लक्षावधी फुले विविध रंगांनी विविध ढंगांनी उगवतात. निसर्गाचे हे देखणं रुप आता सर्वांनाच मोह घालत असून धरतीवर जणू स्वर्गच अवतरला आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेला येवतेश्वरचा डोंगर आहे. या डोंगरापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर कास पठार आहे. या कास पठारावर पावसाळा संपता संपता जुलै ते ऑक्टोंबर या काळात रानफुले येतात. ही रानफुले विविध प्रकारची असतात. हिरव्यागार गालीच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वा-याची झुळुक आली की डोलणारी पांढरी अशी नानाविध रंगाची फुले अक्षरश: मनमोहून टाकतात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर पंधरा दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात. काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंत म्हणावा लागेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पठारावर सुमारे ८५० पेक्षा जास्त वनस्पतींचे प्रकार आढळून येतात. यामध्ये फॅमिली, जिनेरा जाती आणि औषधी वनस्पती नोंदविल्या आहेत.

जून महिना संपताच कास पठारावर सड्यावरचा चमत्कार दिसू लागतो. बालकवींच्या शब्दात सांगायचे झाल्यास हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे असं हे देखणं रुप म्हणजे कास पठारावरील पुष्पवैभवच आहे. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग मात्र आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते. या पठारावर जून महिना संपतानाच पांढरे हबे आमरीचे कोंब उगवतात.

तसेच दोन तु-याची वायतुरा ही वनस्पती दिसते. हीच ती ऍ़पोनोजेटान सातारेन्सिस म्हणजे सातारा कास स्पेशल फूल. लगेचच पिवळी सोनकी आणि कवळयाची मिकीमाऊस सारखी स्मिथियाची फुले उगवतात. मिकीमाऊस फुले ही पिवळया रंगाची असून ही फुले मिकीमाऊससारखी सतत हातात घेऊन मिरवण्याचा मोह येथे येणा-या प्रत्येकालाच आवरता येत नाही.

श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृष्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. तळयामध्ये जणू साठा करून ठेवल्यासारखी कमळांची फुले असून अलगद एखादा स्नॅप घेऊन तो संग्रही ठेवण्याचा मोह प्रत्येकालाच पडतो. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निचुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.
काविर्च्या फुलांची झुडपे कास पठारावर मोठ्या प्रमाणावर दर सात वर्षांनी येतात. या फुलांपासून काविर्चा मध मिळतो. काविर्चा मध आयुर्वेदिक म्हणून वापरण्यात येतो. लहान मुले तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी काविर्चा मध अत्यंत उपयुक्त आहे. येथील काही वनस्पती दुमिर्ळ असून काही कीटक भक्षी तर काही वनौैषधी आहेत. दरवर्षी येथे देशी - विदेशी शास्त्रज्ञ फुलांचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे येत असतात. एकंदरीत सातारा जिल्हयाच्या वैभवात भर घालणा-या कास पुष्प पठाराचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून आज देशवासियाबरोबरच परदेशी पर्यटकांसाठी कास पठार जीवनातील एक अपूर्व पर्वणीच ठरली आहे. त्यामुळेच कास पठारला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच कास पठार हे धरतीवरचा स्वर्ग वाटत आहे.


  • एस.आर. माने

  • No comments:

    Post a Comment