Wednesday, February 22, 2012

कळवण मध्ये मध उत्पादनात यश

आदिवासी भागाच्या विकासासाठी बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध प्रयत्नांचे मधु फळ आता मिळू लागले आहे. नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात मध उत्पादनात मिळालेले यश लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने नोव्हेंबर मध्ये शुद्ध मध उत्पादनाचे एक स्वतंत्र युनिट सुरु करण्यात येणार आहे. 

कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाच्या पायथ्याशी बिलवाडी हे छोटेसे गाव आहे. महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत गावात सहा बचतगट सुरु झाले आहेत. तोपर्यंत शेती व जोड व्यवसाय करणे यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. बचत गटाच्या माध्यमातून शेतीला पूरक अशा मध उत्पादन क्षेत्रात शिरकाव करताना या महिलांची ओळख महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी ज्योती निंभोरकर यांच्याशी झाली. निभोकर यांनी तळेगांव दाभाडे येथून २०११ मध्ये २२ मध कॉलनी (पेट्या) या बचत गटाला दिल्या. या पेटीसाठी बचत गटाने १० हजार रुपये जमा केले, तर महामंडळाने ९० हजार रुपयांची मदत केली. पेटीत एक राणी माशी व बाकीच्या सेवेकरी माशा असतात. या पेटीसोबतच मध काढण्याचे यंत्र, ॲपिक्स सेराइं‍डिका या जातीतील मधमाशी, जाळी यांसह इतर साहित्य देण्यात आली. यासाठी एका पेटीमागे प्रत्येकी साधारणत: ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. 

महामंडळाच्या वतीने बिलवाडी, देवळीवण, बौरदैवत, बेटकीपाडा, चिंचवाडा या गावातील ३० महिलांना मध तयार करण्याचे साहित्य देण्यात आले. सेंट्रल बी रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांना तीन दिवसांचे कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. महिलांनी प्रशिक्षण मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या कामकाजाचा श्रीगणेशा केला. 

सकाळी मधपेट्यांचे निरीक्षण करणे, साधारणत: काल जेवढ्या माशा होत्या, तेवढ्या आहेत की नाही हे पाहणे ही कामे महिलांकडून केली जातात. मधमाशा मधपेट्यांपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर पराग कण शोधत फिरतात. त्या एक किलोमीटरच्या आवारातच फिराव्यात यासाठी त्यांनी कांद्याच्या शेतीतच हा उपक्रम राबविला. कांदा बीजात मोठ्या प्रमाणावर परागकण असल्याचा फायदा होणे, हे ही एक कारण यामागे आहे. एका हंगामात सुरुवातीच्या काळात चार महिन्यामध्ये कमीत कमी दोन किलो मध मिळतो. याशिवाय एका पेटीतून चार किलो मेण मिळते. मध बनण्याची प्रक्रिया सुरु असताना त्या पेट्यांना मुंग्या लागू नयेत, ही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीपासूनच पेटी ज्या स्टॅन्डवर असते, त्यांचे पाय पाणी असलेल्या चार वाट्यांमध्ये ठेवले जातात.

महामंडळाने प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र पेटी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हा खर्च त्या व्यक्तीने स्वत: करावयाचा आहे. यामुळे बचत गटाच्या स्वत:च्या मालकीच्या जादा पेट्या तयार होत आहेत. बचत गटाने आपले पहिले उत्पादन मिळविले असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र बाजारपेठेत त्याचे मूल्य वाढावे यासाठी मंडळाच्या व्यवसायवृद्धीसह केंद्रात नि:शुल्क पॅकेजिंग केले जाते. कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मधाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. शुद्ध स्वरुपातील हे मध नाशिक येथील महिला आर्थिक विकास महामंडळ येथे उपलब्ध आहे. तेथील संपर्क क्रमांक ०२५३-२५८०६०८ असा आहे. 

सदर मध निर्मिती ही चार महिन्यात होते. एका पेटीच्या मधातून ३ हजार रुपये उत्पन्न मिळते. कळवण आदिवासी विभागात सुरु केलेल्या या ५ गावातील बचतगटांना दिलेल्या २२ पेट्यांमधून प्रथम हप्त्यात ६६ हजार रुपये उत्पन्न झालेले आहे. हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने याचा लाभ शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, बचतगट यांनी घेतल्यास ते सर्वांच्या हिताचेच ठरेल हे खरे.

  • अशोक साळी
  • No comments:

    Post a Comment