Saturday, June 9, 2012

प्रयत्न शाश्वत विकासाचे

सातत्या ने कमी होणा-या पर्जन्यचमानामुळे पाणी टंचाईला सामोरे जाणारी अनेक गावे राज्यात दिसत आहेत. उन्हाळा सुरु झाला की डोक्यावर, खांद्यावर पाण्याचा हंडा घेवून पाण्याच्या शोधात पायपीट करणारे बायाबापड्यांची केविलवाणी अवस्था मन हेलावून टाकते. पाण्यायसाठी अनेक योजना राबविल्या जातात. कालांतराने देखभाल व दुरुस्ती वेळेवर झाली नाही की, या योजना बंद पडतात. या योजना दीर्घकाळ बंद राहिल्याने त्या नादुरुस्त होवून निरोपयोगी बनतात आणि योजनांवर झालेला खर्च वाया जातो. पाण्याची समस्या पुन्हा निर्माण होते. मागले दिवस पुन्हा सुरु होतात, असे चित्र कमी अधिक प्रमाणात आपणास पहावयास मिळते.

पाणी समस्येतवर दीर्घकालीन कायम स्वहरुपी उपाययोजना करणे काळाची गरज निर्माण झाली आहे म्हणून ही समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील डोळसणे, दरेवाडी साकूर, खडकवाडी, हिवरेबाजार, जखणगांव सारख्या गावांना केंद्रिय पथकाने नुकतीच भेट देवून समस्या समजून घेतल्या. यावर काय करता येईल याची ग्रामस्थांशी चर्चा करुन माहिती घेतली. पाणी समस्येचे मूळ कारण काय आहे? त्यासाठी कोणत्या दीर्घकालीन योजना राबविल्यास त्याचा फायदा होईल या विषयी माहिती घेतली.

कमी पर्जन्यमान असतांनाही हिवरेबाजार सारख्या आदर्शगावाने पाणी टंचाईवर मात केली आहे. ही किमया कशी साध्य करता आली याची माहिती केंद्रिय पथकातील श्री. एन.बी.सिंग व श्री. बी. रथ यांनी आदर्शगांव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून समजून घेतली. या गावाला विविध प्रकल्पातून ही किमया साध्य करता आली तर इतर गावांना ही ते शक्य आहे. यासाठी गावक-यांमध्ये इच्छाशक्ती, प्रभावी मार्गदर्शन व एकोप्याची भावना असावी लागते. हे केंद्रिय पथंकाला प्रकर्षाने जाणवले.व ते प्रभावीत झाले. त्यामुळे पथकातील सदस्यांनी अधिकाधिक वेळ या गावात देवून पाणलोट विकासाचे काम, सलग समतल चर, नालाबांध, विहीर पूनर्भरण, विंधन विहिर व शेती पुरक व्यवसाय आदी कामांची पाहणी करुन त्यातील बारकावे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून जाणून घेतले.

निसर्गाकडून मिळणा-या पाण्याचा वापर आवश्यक व गरजेनुसार झाला पाहिजे. शाश्वत पाणी शेतीला देतांना कॅनॉलव्दारे न देता बंद पाईपव्दारे दिले आणि बागायती क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाव्दारे भिजविल्यास पाण्याची बचत होवून अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली येईल. पाणी व पिक पध्दतीची सांगड घातली तर भविष्यात पाण्याच्या टंचाईवर सहज मात करु शकू असा आत्मविश्वास पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात पिंपळगाव माळवी येथे लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा सुरु असलेला अभिनव उपक्रमाची पहाणी केंद्रिय पथकाने केली. स्वूयंस्फूर्तीने शेतकरी तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकत असल्याचे पाहून केंद्रिय पथकाने समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन ही पथकाने केले. अशा या विविध गावातील वेगवेगळ्या समस्या समजून घेवून यावर दीर्घकालीन कायमस्वरुपी करावयाच्या उपाययोजनाचा अभ्यासपूर्वक अहवाल केंद्र शासनास हे पथक सादर करणार आहे. यातूनच पाणी टंचाईला सामोरे जाणा-या गावांची समस्या दूर होण्यास मदत होईल, असा आशावाद केल्यास वावगे ठरणार नाही.

  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • No comments:

    Post a Comment