Wednesday, June 6, 2012

कायम वास्तव्य देणारी वस्ती सुधार योजना

चामोर्शी तालुक्यातील पांढरी भटाळ आणि येडानूर येथे अनेक वर्षापासून बंजारा समाज वास्तव्याला आहे. बहुसंख्य समाज अशिक्षित आणि गरीब आहे. हा समाज नेहमी भटकंती करीत असल्याने त्यांना आजवर अनेक प्राथमिक सुविधांचा लाभ घेता आलेला नाही. या समाजाचा आधुनिकतेकडे जाण्याचा कल असला तरी सोयी सुविधांचा फायदा न घेतल्यामुळे त्यांची सामाजिक, शैक्षणिक आणि अर्थिक परिस्थिती हलाखीची राहिली आहे. शासनाने सामाजिक न्याय खात्यामार्फत वस्ती सुधार योजना राबवून स्थलांतरित जीवन जगणाऱ्या समाजाला कायम स्वरुपी स्थिर करण्यासाठी वस्ती सुधार योजना राबवून त्यांच्या जीवनात क्रांती आणली आहे.

या दोन्ही गावात प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या. आता मात्र शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी उपाययोजना केल्या आहेत. दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर बंजारा, लभान, तांडा समाजाच्या सुधारणेसाठी तांडा सुधार योजना राबविण्यात आली. त्यामुळे पांढरी भटाळ आणि येडानुरचा बंजारा समाज तांडावस्ती सुधारणा योजनेमुळे कायम स्थिरावला आहे.

पांढरी भटाळ या गावात सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. नाल्यांची कामे झाली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी कुपनलिका खोदण्यात आल्या असून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बांधली आहे. आता या तांडयावर प्राथमिक शिक्षण मिळत आहे. गावातील रस्ते बांधण्यात आल्याने गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी थेट जवळच्या नाल्यात जाते त्यामुळे प्रदुषण व रोंगराई पासुन सुटका झाली आहे. गावातच परिचारिका राहत असल्यामुळे आरोग्य सुविधांचा लाभ देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment