Sunday, August 28, 2011

धुळे शहरात रात्री उगवतो दिवस !

सारे धुळे शहर झोपी जाते तेव्हा तेथे दिवस उगवतो. कामाची लगबग सुरु होते. यंत्रांचा खडखडाट सुरु होतो. बाजार गजबजु लागतो. ग्राहकांची गर्दी वाढू लागते आणि एका रात्रीत लाखोंची उलाढाल होते. पहाटेचं तांबड फुटत तेव्हा सारे व्यवहार थंडावू लागतात.

धुळयातले यंत्रमाग सा-या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. भिवंडी नंतर इथल्या यंत्रमागाचा क्रमांक लागतो. कच्चे सूत मागवून यंत्रमागांवर कापड विणले जाते आणि आख्या महाराष्ट्रात ते पाठविले जाते.

मुस्लीम वस्तीत घराघरात यंत्रमाग आहे. तब्बल सहा हजार यंत्रमाग धुळे शहरात आहेत त्यावर ५० हजार कुटुंबे पोट भरतात. या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते. असा अंदाज आहे. धुळयातल्या यंत्रमागावरचा कपडा मालेगांवपासून सुरत, इंदोरपर्यंत जातो. यंत्रमागांचा हा व्यवसाय धुळयातील कॉटन इंडस्ट्रीज बनून गेला आहे.

हा व्यवसाय मोठा कुतूहलाचा आहे. इथले सगळे व्यवहार रात्रीच होतात. सुर्य मावळल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरवात होते. एका पाठोपाठ एक यंत्रमाग खडखडू लागतात. तो थेट पहाटे पर्यंत. रात्री साधारण १० वाजण्याच्या सुमारास कर्मचा-यांची जेवणाची सुटी होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा चहाची सुटी होते. एका यंत्रमागावर आळीपाळीने तीन ते चार कर्मचारी काम करतात. एका खोलीत १० पासून ५० पर्यंत यंत्रमाग असतात. प्रत्येक खोलीवर एक मुकादम असतो. यंत्रमागासाठी लागणारे सूत मालेगांव, इचलकरंजी, भिवंडी, सुरत इंदोर येथून येत असते.यंत्रमागांचे आर्थिक व्यवहारही रात्रीच घडतात, कर्मचा-यांचे पगार दिले जातात. व्यापा-यांशी बोलणी ठरते. मालाची पाठवणी सारे काही रात्री.

अंधार संपून प्रकाश दिसू लागतो. तसा पुन्हा नवा दिवस समोर येऊन उभा राहतो. रस्ते तेच राहतात. दुकाने तीच राहतात. बदलतात फक्त माणसे.एकीकडे खोलीत यंत्रमाग खडखडट असतांना बाहेर बाजार सजू लागतो. मौलवी गंज आणि देवपूरातील मशिदी मागील भाग त्यासाठी प्रसिध्द आहे. या बाजारात चहापासून भरजरी कपडयापर्यंत सारे काही मिळाते.

  • जगन्नाथ पाटील

  • No comments:

    Post a Comment