Thursday, September 22, 2011

'जिवंत सात-बारा मोहीम'


'सात-बारा' हा शेतक-यांच्या शेतीवरील मालकी आणि हक्काची एक प्रकारची सनदच! हाच 'सात-बारा' शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा Property Record ही समजला जातोय.सात-बारा म्हणजे शेतीचं क्षेत्र, पिक,सीमा, शेतीचा मालक याबरोबरच पिक-कर्ज यांची माहिती देणारा शासकीय दस्तावेज....हाच सात-बारा कृषी संस्कृती आणि जीवनाचा अविभाज्य घटकही समजला जातोय. हाच सात-बारा उतारा शेतक-याला अद्ययावत करुन मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही हीच नेमकी गोष्ट हेरुन अकोला जिल्हा महसूल प्रशासनाने जिवंत सात-बारा मोहिमे बरोबरच अभिनव अशी योजना गेल्या १ तारखेपासून सुरु केली आहे. अद्ययावत अभिलेख अधिकार अभियान अकोल्याचे नूतन जिल्हाधिकारी परिमल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन अभियान हाती घेण्यात आले आहे.

हाच सात-बारा उतारा शेतक-याला अद्ययावत करुन मिळाला तर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही हीच नेमकी गोष्ट हेरुन अकोला जिल्हा महसूल प्रशासनाने जिवंत सात-बारा मोहिमे बरोबरच अभिनव अशी योजना गेल्या १ तारखेपासून सुरु केली आहे. केवळ मृत व्यक्तीच्या वारसांच्या नोंदी हे काम जिवंत सात-बारा उपक्रमात मार्यदित होते.जिल्हाधिकारी परिमल सिंह यांनी आजच्या घटकेला शेतीचा मालक, वहिवाटदार, शेतातील झाडे,विहीर या सर्वांच्या नोंदी सात-बारा उता-यामध्ये करुन एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

'सात-बारा' द्यायला प्रशासन आणि त्यातही तहसीलदार येणार हे आपल्याला काहीसं नवल वाटणारच...'सात-बारा', शेती आणि शेतकरी यांचं नातं अगदी घट्ट...तुमच्या शेतीची नोंद, मालकी, शेतीवर मिळणारं कर्ज, हंगामात तुम्ही घेत असलेली पिकं, शेतातील झाडं, विहीर या सर्वांची इत्यंभूत लेखाजोखा ठेवणारा सरकारी दस्तावेज म्हणजे 'सात-बारा'. त्यामुळेच या 'सात-बारा'चं शेतक-यांच्या लेखी अतिशय महत्व!.अलीकडेच राज्य सरकारने राबविलेल्या 'ई-सातबारा' मोहिम शेतक-यासाठी वरदान ठरू लागली आहेय. एखाद्या वेळी शेतीचा मूळ मालक मरण पावला असेल तर 'सात-बारा'वर त्याच्या वारसाची नोंद करण्याची प्रक्रिया लक्षात घेऊन ही मोहिम हाती घेतली आहे.

शेतक-यांसाठी सरकारच्या एखाद्या योजनेचा एक सरकारी अधिकारी कसा उपयोग करून घेऊ शकतो याचं चित्र सध्या अकोला जिल्हयात पहायला मिळतंय, मृत झालेल्या मूळ मालकाच्या जागेवर त्याच्या वारसाच्या नावाची नोंद असं या अभियानाचं साधं पण उदात्त सूञ.

या मोहिमेत सध्या ज्या शेतीच्या वारसांच्या संदर्भात कोणतेही वाद अथवा संभ्रम नाहीय अशा लोकांना गावातच घरपोच 'सात-बारा' देण्यात येत आहे . यासाठी तहसिलदार गावा-गावांत प्रशासनातील नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह चावडी वाचनाचे कार्यक्रम घेतात .

'सात-बारा'वरील नोंदी अद्ययावत करण्यासाठी खातेदाराचे वारस पुढे न आल्यास संबंधित खातेदाराचे वारस नाही असे गृहीत धरून ती जमीन शासन दरबारी जमा करण्याची तजवीज या मोहिमेत करण्यात आली आहे.. त्यामुळे या मोहिमेला शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारस नोंदीकरिता सरपंच किंवा पोलीस पाटील यांचे दाखले आवश्यक करण्यात आले आहे.

सरकार आणि प्रशासन समस्या सोडविण्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जाणं हीच ग्रामस्वराज्याची मूळ संकल्पना.शासनाने यासाठी अनेक ठोस आणि सकारात्मक प्रयत्नही केले आहेय. 'जिवंत सात-बारा' ही मोहीम प्रशासनातील 'जिवंत' आणि सकारात्मक विचारांच्या संचिताची देणं आहे. अकोला जिल्हयात राबविल्या जाणारी ही मोहीम शेतकरी हिताच्या दृष्टीनं महाराष्ट्राची लोकचळवळळ होणं गरजेचं आहे.


  • गो.रा.देशपांडे
  • No comments:

    Post a Comment