Thursday, September 29, 2011

शासनाची साथ बेरोजगारीवर मात


लोकसंख्येच्या तुलनेत नोकरीची संधी फार कमी असल्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अंतरी प्रचंड उर्जा असणारी युवा पिढी नैराश्याच्या गर्तेत ढकलेली गेली आहे. हीच उर्जा लघु व्यवसायासाठी वापरली गेल्यास बेरोजगारीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकेल. या हेतूने शासनाकडून विविध योजनांची अमंलबजावणी होत असते. सुशिक्षित बेरोजगारासाठी अर्थसहाय्य , बीज भांडवल योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत उद्योग धंदासाठी कर्ज दिले जाते. त्यामुळे युवा वर्ग स्वत:च्या पायावर उभा राहून सुखी व समाधानी जीवन जगू शकतो. हेच दर्शविणारी अमरावती जिल्हयातील नेर पिंगळाई येथील सौ. लता राऊत यांची यशोगाथा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेरपिंगळाई आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत गारमेंन्ट मॅन्युफ्कॅचरींगच्या व्यवसायासाठी अमरावती जिल्हयातील नेरपिंगळाई ता. मोर्शीतील सुशिक्षित बेरोजगार सौ. लता नरेंद्र राऊत हिला १ लाख ५० हजार रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेकडून ७५ टक्के रक्कम देण्यात आली. या रक्कमेतून सौ. राऊत यांनी गारमेंट मॅन्युफ्कॅचरींगव्दारे पेटीकोट निर्मितीच्या व्यवसाय सुरु केला आहे. आज या व्यवसायात ती यशस्वी झाली आहे.

महिलासाठी असलेल्या चुल आणि मूल या संकल्पनेला तडा देवून आयुष्यात काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने सौ. लता हिने शिलाई मशीन चालविण्याचे तंत्र अवगत करुन घरीच महिला वर्गाचे कपडे शिवणे सुरू केले. पंरतू एवढयाने समाधान न होता शासनाची विविध योजनेतील व्यवसायासाठी कर्ज मिळविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आणि थेट अमरावतीच्या जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते अशा सल्ला श्रीमती राऊत यांना दिला. बी. ए. शिकलेली असल्याने शिक्षणाचा चांगला अनुभव असल्याने अर्ज भरून अर्जासोबत कागदपत्रे जोडून अर्ज सादर केले. जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाऱ्यांनी सौ. लताच्या कामाची जिद्द पाहून प्रकरण शिफारस करुन सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेरपिंगळाई शाखेत पाठविले. त्यास बँकेनी कर्ज प्रकरण तपासून गारमेंट मॅन्युफ्कॅचरींगच्या व्यवसायासाठी १ लाख ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले. सौ. लताने नियमानुसार पाच टक्के रक्कम भरली. त्यानंतर बँकेने कर्ज रक्कम उपलब्ध करुन दिली. त्यातून सौ लताने शिलाई मशीन आणि पेटीकोटसाठी कापड खरेदी केले. शिलाई मशीन व कापड ख्‍ारेदी केल्यानंतर स्वत:च्या घरात पुर्वा पेटीकोट मॅन्युफ्कॅचरींगचे दुकान थाटले. पेटीकोट शिवून ग्राहकांना विकायला सुरवात केली.

या व्यवसायात पतीचेही सहकार्य असल्याने व्यवसायास गती मिळायला लागली. सौ. लताबाई ३ ते ४ हजार रुपयापर्यंत मासिक उत्पन्न मिळत आहे. यातून ती बँकेच्या कर्जाचा हफ्ता ३ हजार रुपये प्रमाणे नियमितपणे परतफेड करीत आहेत. सौ. लताला ती करीत असलेल्या या नव्या व्यवसायाबद्दल विचारले असता तिने आत्मविश्वासाने व उत्साहाने सांगितले की, शासकीय योजनेच्या लाभामुळेच माझ्या जीवनात स्थैर्य प्राप्त झाले. कायमस्वरुपी रोजगाराचे साधन मिळाल्याने मी माझा व कुटुंबांचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करीत आहे. अशा त्या म्हणाल्या सौ. लता प्रमाणेच इतर सुशिक्षित बेराजगार महिलांनीही या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.


  • शामलाल कास्देकर

  • 1 comment:

    1. mala uagasathi karj have ahe mi kay kele pahije margdarshan kara .mi telrig chya koors kilela ahe

      ReplyDelete