Monday, January 9, 2012

आठ एकरात डाळिंबाचे ७० टन उत्पादन

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे जवळच्या बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीत आठ एकर क्षेत्रातून विनायक मनोहर नामजोशी यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाचे ७० टन उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

श्री. नामजोशी हे फलटण संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांचे नातू आहेत. ते शेती पिकविण्यात आनंद मानतात. त्यांनी येथील शेतील ऊस पीक घेतले आहे, तर बिरदेवनगर (जाधववाडी) हद्दीतील जमिनीचे दर गगनाला भिडलेले असताना त्यांनी १३ एकर क्षेत्रात डाळिंब पीक घेणे पसंत केले आहे. 

डाळिंबाला एका बाजूने तेल्या रोगाने ग्रासले असताना त्यांनी दक्षता, नियोजन व निरीक्षणाच्या जोरावर या रोगाला बागेकडे साधे फिरकूही दिले नाही. २००३ मध्ये सहा एकर, तर २००७ मध्ये सात एकर क्षेत्रावर त्यांनी भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. त्यापैकी बहर धरलेल्या आठ एकर क्षेत्रांतील दोन हजार झाडांतून ५० टन निरोगी फळांचे उत्पादन घेण्यात आघाडी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच या बागेच्या धर्तीवर इतरत्र अनुकरण होऊ लागले आहे.

डाळिंब बागेला श्री. नामजोशी यांनी विहिरीतील पाणी ठिबक सिंचनाद्वारे पुरवले आहे. ठिबक सिंचन यंत्रणेच्या माध्यमातून ते पिकांना खतही देतात. त्याबरोबर शेणखत, पेंडीसह पोटॅश अमोनिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये या रासायनिक खतांच्या मात्रा त्यांनी या पिकाला दिल्या आहेत. मध्यंतरीच्या सततच्या पावसाने बागेत तणांचा मोठा उपद्रव झाला होता. मात्र त्यांनी तणनाशकांच्या फवारणीला फाटा देऊन मजुरांकरवी हे तण आटोक्यात आणले. महत्वाचे म्हणजे बाग सतत स्वच्छ ठेवली. वातावरणातील बदलानुसार औषधे व बुरशीनाशकांचा वेळोवेळी वापर करून बागेत रोग, किडी नियंत्रणाखाली ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

फलटण आज झपाट्याने विस्तारत आहे. अशा वेळी मुंबईत इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतलेले असताना, तसेच प्लॉटिंग व ले आउटच्या क्षेत्रातील अनुभव पाठीशी असताना सुध्दा शहरालगतच्या उपनगरात त्यांनी शेतजमीन विकसित करण्यामध्ये यश मिळविले आहे. त्याचबरोबर डाळिंबासह अनेक पिकेही घेतली जात आहेत. या त्यांच्या कृतीतून त्यांची शेतीनिष्ठा अधिकच उठून दिसते आहे, हे निश्चित.

No comments:

Post a Comment