Thursday, January 5, 2012

तंबाखू मुक्त नवी मुंबई मोहिमेचा आरंभ

नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाने सामाजिक बांधिलकीने प्रेरीत होऊन ‘तंबाखू मुक्त नवी मुंबई मोहीम’ सुरु केली आहे. या मोहिमेचा आरंभ गुरूवारी रुग्णालयात आयोजित समारंभात करण्यात आला. गृह राज्यमंत्री सतेज पाटील, डॉ.डी.वाय.पाटील समुहाचे अध्यक्ष विजय पाटील, संचालक डॉ.प्रिया पाटील-छोलेरा, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ.रश्मीन छोलेरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आपल्या देशात दरवर्षी तंबाखू, गुटखा यांच्या सेवनाने तसेच धुम्रपानाने सुमारे १० लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. यात तरुण पिढी ओढली जात असल्याने हे हानीकारक ठरत आहे. यातून आपल्या देशातील मौल्यवान मनुष्यबळाला धोका पोहोचत आहे. तरुणांनी तंबाखू व अन्य अंमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे व इतरांनाही यापासून रोखले पाहिजे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

तंबाखूमुक्त नवी मुंबई मोहीम पाच महिने राबविण्यात येणार असून या मोहिमेत पथनाट्ये, आरोग्यरक्षण, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. याद्वारे तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम दाखवून तरुणांनी यापासून दूर राहण्याचा संदेश दिला जाणार आहे.

No comments:

Post a Comment