Wednesday, January 4, 2012

बहु सामाजिक उपक्रम गट !

देवळी पासून २५ किलोमीटर असलेले गुंजखेड हे गाव, या गावामध्ये बचत गटाचा लवलेश नसतानासुध्दा ग्रामपंचायतच्या मदतीने १५ महिला एकत्र येवून बचत गट स्थापन केला. बचत गटाचे नाव रमाबाई महिला बचत गट ठेवण्यात आले. बचत गट सुरु करण्यामागचा उद्देश विचारला असता सावकाराच्या जाचातून सुटका व्हावी व महिलांच्या गरजा महिलांनीच भागवाव्यात व बचत गटातून जमा झालेला पैसा महिलांच्याच कामात यावा असे त्यांनी सांगितले.

सुरूवातीला त्यांनी पैसे जमा करुन अंतर्गत व्यवहार सुरु केला. त्यानंतर त्यांना खेळते भांडवल मिळाले. खेळत्या भांडवल मधून त्यांनी अंतर्गत कर्ज वाटप केले व त्या माध्यमातून महिलांच्या गरजा भागत होत्या. त्यानंतर त्यांना कपडा व्यवसायासाठी २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. त्यामधून त्यांनी कपडा व्यवसाय सुरु केला. कपडा व्यवसायामधून त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत नव्हती. 

मग सर्व महिलांनी मिळून चर्चा केली की कपडा व्यवसाय हा आपण सर्वजणी मिळून करतो त्यापैकी काही महिला बचतगटामधे काम करतात तर काही महिला शेतीच्या कामावर जातात.त्यामुळे जर असे केले तर आपण सर्व महिलांनी वैयक्तिक व्यवसाय करायचा व कर्ज गटामधून घ्यायचे हा विचार सुरूवातीला नवीन होता ‍की गट हा सुध्दा बहुव्यवसायी होऊ शकतो.सर्व महिलांनी ठरवून शेती, किराणा, हॉटेल, स्टेशनरी, शिलाई मशीन, पापड उद्योग इत्यादी व्यवसायासाठी कर्ज घेतले. हा गट बहुव्यवसायी म्हणून नावारुपास आला. वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्या व त्यांना चांगला नफा मिळू लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्या सक्षम बनल्या. व कर्ज व्याजासहित गटामध्ये परत करु लागल्या.

एका गटामधील हॉटेल चालविण्यार्‍या महिलेचे घर सर्वसाधारण होते. परंतु या व्यवसायामुळे त्या महिलेचे आज दुमजली घर आहे व हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्यामुळे झाले हे ती महिला अभिमानाने सांगते. त्याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसांपासून पडिक होती. त्या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली व आज त्या महिलेला चांगले उत्पन्न मिळत आहे.

महिलांना कर्ज देणे व परत करणे हे आपले कर्तव्य वाटू लागले. त्यामुळे पैसा खेळता राहिला. त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी गटाचे रहस्य म्हणजे त्यांच्या मासिक बैठका वेळेवर होत आहेत तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्या गटातील अडीअडचणी भागविण्यास नेहमी तत्पर असतात. बचत आपल्या गरजा भागविण्यात कामात येत आहे. त्याचप्रमाणे गटामध्ये महिलांच्या गरजा भागणे महत्वाचे असल्यामुळे महिलांनी वेगवेगळया व्यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्याही सदस्यांनी आडकाठी आणली नाही.

गटामध्ये फक्त आर्थिक देवाणघेवाण होत नाही तर महिलांच्या सु:ख दु:खावरही चर्चा करण्यात येते. त्यासोबत आरोग्यविषयक शिबीर घेण्यात येते त्याचप्रमाणे अंगणवाडीला देण्यात येणारा पूरक पोषक आहार रमाबाई महिला बचत गटाकडे आहे.स्वच्छता अभियान, तंटामुक्त ग्राम अभियानामध्ये सुध्दा गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

रमाबाई महिला बचत गट हा फक्त बहुव्यवसायी गट नसून बहु सामाजिक उपक्रम गट आहे. त्यामुळे त्यावरुन असे लक्षात येते की, रमाबाई महिला बचत गट हा महिला धनव्यवहारासोबतच मनव्यवहार सुध्दा करतात म्हणून हा गट यशस्वी दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

No comments:

Post a Comment