Tuesday, January 3, 2012

शेतात उमलले समृध्‍दीचे फूल !

लहरी निसर्गावर अवलंबून राहत कापूस आणि सोयाबीन यांची परंपरागत शेती करण्‍यापेक्षा फूलशेतीचा वेगळा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत नाही. ती शेती फायद्याची ठरते, असे यशस्‍वी प्रयोगाअंती वर्धा जिल्‍ह्यामधील सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर गावच्‍या संजय अवचट यांनी दाखवून दिले आहे. 

श्री. अवचट हे पॉलिहाऊस उभारुन तेथे जरबेरा या जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी सेलूच्या बँक ऑफ इंडियाकडून ९.७५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अनुदान ३.१५ लक्ष रुपये मिळाले. एकूण १३ लक्ष १२ हजार रुपयांमध्ये पॉलिहाऊसची उभारणी करण्यात आली. या पॉलिहाऊसचे आकारमान ३६ × २८ चौ.मी. असून जरबेरा जातीच्या फोर्जा, बॅलेट, प्राईम रोज, गोलीमय, दाना ऐलीन, इन्सरन्स मनीबलू या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. 

झाडांची लागवड ऑगस्‍ट २०११ मध्ये करण्यात आली. मात्र फुलांच्या उत्पादनाला २ नोव्हेंबर २०११ पासून सुरुवात झाली. आतापर्यंत २७ हजार १६० उत्पादित फुलांची विक्री करण्यात आली आहे. या विक्रीपासून श्री. अवचट यांना १ लक्ष ५१ हजार ९२ रुपये एवढी रक्कम मिळाली. आतापर्यंत फुलाच्या उत्पादनावर ६२ हजार रुपये खर्च झाला असून निव्वळ नफा ८९ हजार ९२ रुपये झाला आहे. येत्या काळात प्रत्येक महिन्याला सरासरी ३० हजार फुलांचे उत्पादन अपेक्षित असून प्रत्येक फूल ३ रुपये प्रमाणे विकल्यास ९० हजार रुपये प्रत्यक्षात उत्पन्न होऊ शकते.

एका वर्षाचा ताळमेळ सांगताना अवचट म्हणाले, १० लक्ष ८० हजार रुपये फुलांची विक्री होणार असून ४ लक्ष ५६ हजार रुपये खर्च वजा जाता ६ लक्ष २४ हजार रुपये नफा मिळू शकतो. यावेळी त्यांनी स्वत:चे शेड्यूल, ड्रेनचीग व किटक नाशके व बुरशी नाशक फवारणीची महिती सांगितली.

या फुलांची हैद्राबाद व बंगलुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आहे. या बाजारपेठांत फुले पोहचविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मात्र फुल उत्पादन मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यास वाहतुकीचा खर्च अल्प प्रमाणात येऊ शकेल. कदाचित फुलांचे व्यापारी सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुले खरेदी करु शकतील. त्यादृष्टीने आता या भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

नागपूर बाजारपेठेत इव्हेंट, मॉल व सणासुदीच्या दिवसाचे महत्त्व ओळखून फुलांची विक्री केली पाहिजे. शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नाविण्यपूर्ण शेती करुन आर्थिक समृध्दी साधावी, अशी वेळ आता आली आहे.

  • मिलिंद आवळे
  • No comments:

    Post a Comment