Thursday, January 5, 2012

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

मराठी वृत्तपत्रांनी नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या भरारीने वैश्‍विक सीमारेषा पुसून टाकल्या आहेत. म्हणूनच मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रुजविणारे कै. बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण आजही होते. त्यांनी घातलेला पाया आता वेगळ्या तंत्रज्ञानाच्या टप्प्यावरून सामाजिक सुधारणेकडे वृत्तपत्रांनी नेला. जागतिकीकरणानंतर मराठी वृत्तपत्रांचा चेहरामोहराच नव्हे तर मांडणी आणि सजावटीसह माहितीपूर्ण मजकूरही प्रकाशित होऊ लागला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे मनोरंजन करणे, चालत्या काळाची वर्तमाने कळविणे, आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टीची 'दर्पण' छापणाऱ्यास मोठी उत्कंठा आहे. म्हणून या गोष्टी साध्य होण्याविषयी जितका प्रयत्न करवेल तितका ते करतील. 

कै.बाळशास्त्री यांचा जन्म पोंभुर्ले, ता. देवगड येथे खाडीच्या किनाऱ्यावरील एका दुर्गम परंतु निसर्गरम्य अशा खेड्यात २० डिसेंबर १८१२ रोजी झाला. त्यावेळी पोंभुर्ले गाव कोल्हापूर संस्थानच्या अंतर्गत बावडा जहांगिरीपैकी एक होते. सुमारे ५०० वर्षापासून तेथे जांभेकर घराणे आहे. बाळशास्त्रींचे वडील गंगाधर शास्त्री उपाध्ये होते. बाळशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण परंपरागत पध्दतीने वडिलांच्या सान्निध्यातच झाले. बालबोध, मोडी लेखन, वाचन, व्यावहारिक अंकगणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकाराम, ज्ञानेश्‍वर, वामन, मोरोपंत आदींची अभंग, गाथा, श्लोक, आर्या, कविता, रामायण, महाभारत, भागवत, पुराणातील कथा आदींचा अभ्यास त्यांनी ८ व्या वर्षीच पूर्ण केला. वेदपठण, गीतापठण आदींबरोबर अमरकोश, लघुकौमुदी आदी संस्कृत अध्ययन त्यांनी १३ व्या वषापर्यंत पूर्ण केले. 

बाळशास्त्री १८२५ च्या सुमारास दि.बॉम्बे नेटिव्ह बुक अँण्ड स्कूल सोसायटी या शाळेत दाखल झाले. बाळशास्त्रींच्या कुशाग्र, तल्लख व एकपाठी बुध्दीचा प्रत्यय लगेचच या शाळेतील शिक्षकांना आला. त्यांच्या असाधारण बुध्दीमत्तेमुळे रॉयल एशियाटिक सोसायटी ह्या जगप्रसिध्द संस्थेच्या मुंबई शाखेचे नेटिव्ह सेक्रेटरीपदही (१८३१) त्यांना मिळाले. भारतीय नागरिकाला हा मान प्रथमच त्यांच्यामुळे मिळाला होता.

दर्पण संग्रहात बाळशास्त्रींनी अनेक लेख लिहिले. त्यापैकी शास्त्रे व परलोकसिध्दी, हिंदूचा धर्म, दर्पणातील प्रतिबिंबे, ईश्‍वर आहे याविषयीचे प्रमाण, पुनर्विवाह प्रकरण, गुडगुडी ओढणे, जातीभेदाचा प्रश्न, मनुष्याची जात, जनावरातील जाती, सरकारी नोकऱ्यांचे हिंदीकरण, सरकारी नोकरीतील जातीयता, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, रहदारी जकाती हे लेख विशेष गाजले.

इंग्रजांच्या कालखंडात आक्रमणाला तोंड देण्यासाठी नवा माणूस घडवायचा असेल तर मरगळलेल्या मराठी माणसात शैक्षणिक व वैचारिक क्रांतीची गरज होती. सांस्कृतिक व शैक्षणिक आक्रमणाचा धोका व त्याचा पुढील १०० वर्षात होणारा परिणाम जांभेकरांनी ओळखला होता. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने वृत्तपत्र काढायचा धाडसी निर्णय घेतला. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी पहिले मराठी इंग्रजी संमिश्री पाक्षिक वृत्तपत्र 'दर्पण' या नावाने सुरु केले. एकीकडे भारतीय संस्कृती टिकविण्याची चेतना द्यायची, ज्ञानाचा प्रसार करून अवघा समाज शिक्षित पर्यायाने जागृत करायचा. सोबत पाश्चात्य ज्ञानही द्यायचे आणि हे सर्व करीत असताना तत्कालीन सरकारची मर्जी सांभाळण्याचा देखावा करावयाचा अशी तिहेरी कसरत जांभेकरांना आधुनिक भारताच्या उभारणीसाठी करावी लागली. पत्रकारिता, समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ, इतिहास व पुराणवस्तू संशोधक, ग्रंथकार आदि भूमिकेतून जांभेकरांचे काम पुढील पिढ्यातील संबंधित क्षेत्रातील मान्यवरांना प्रेरणादायी ठरले आहे. बाळशास्त्रीचे ग्रंथ कर्तृत्व प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या अनुषंगाने झाले. 

बाळशास्त्री जांभेकरांचे ३३ वर्षाचे अल्पायुष्य १७ मे १८४६ साली संपले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सर अस्क्रिन पेटी यांनी जांभेकरांच्या निधनानंतर भर न्यायालयात त्यांना विनम्र श्रध्दांजली वाहिली होती. तत्कालीन 'बॉम्बे कुरिअर' या इंग्रजी वृत्तपत्राने १० जुलै १९४६ च्या अंकात सर पेटी यांचे भाषण प्रसिध्द केले होते. कै. बाळशास्त्री यांच्या दु:खद मृत्यूने पश्चिम भारतावर जेवढी महान आपत्ती ओढवली आहे. तेवढी आपत्ती मुंबईतील कोणाही पुरुषाच्या मृत्यूने मग तो युरोपियन असो की एत्‌द्देशीय असो अथवा तो कितीही मोठ्या दर्जाचा असो ओढवणार नाही. असे न्यायमूर्तींनी म्हटले होते. एकूणच या सर्वांचा विचार करता असे म्हणता येईल की, मराठी पत्रसृष्टीत भले कितीही बदल झाले तरीही बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. विशेष म्हणजे ते सिंधुदुर्गातल्या मातीतले आहेत हा वेगळा अभिमान आपल्या सर्वांच्या मनात आहे. 

  • डॉ. ग.व.मुळे
  • No comments:

    Post a Comment