Wednesday, April 25, 2012

शाश्वत विकासाचे सूत्र

सातपूडयाच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं मेळघाटातील डोमा हे अतिदुर्गम गाव. आदिवासी बहुल या गावाला जाण्यासाठी सुमारे ३० किलोमीटर मध्यप्रदेशातून प्रवास करावा लागतो. चिखलदरा तालुका मुख्यालयापासून डोमा गाव ६० किलोमीटरवर आहे. परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे या गावाला स्थैर्य मिळाले आहे. या गावाला भेट देऊन तेथील जनजीवनाची माहिती घ्यावी हे ठरवूनच डोमा गावाकडे प्रयाण केले.

कुपोषण आणि मजुरांचे कामासाठी स्थलांतर म्हणून मेळघाटची ओळख होती. परंतु आता गावातच स्थायी रोजगार आणि राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषणाच्या शाश्वत कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण मेळघाटचे चित्र बदलल्याचे दिसत होत. अतिदुर्गम असलेले डोमा हे गाव आहे. शेती हेच येथे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्यामुळे सहा महिने रोजगारासाठी भटकंती आणि स्थलांतर येथे नित्याचेचे परंतु पूर्वीचे हे चित्र पालटले असून हे गाव आता शाश्वत विकासाचे प्रतिक ठरले आहे.

या गावात गेल्यावर जाणवले की ९० टक्के लोकांची घरे ही कच्च्या मातीची व साधे कवेलू छपराची आहे शेती चांगल्या प्रतीची नाही. मजुरांना गावात रोजगार उपलब्ध नसल्याने गावातील ८० टक्के नागरिक गावाबाहेर कामाला जाताहेत. ६८ टक्के आदिवासी, ३० टक्के अनुसूचित जाती व २ टक्के इतर लोकवस्ती आहे. स्थलांतरणामुळे मुलांच्या शिक्षणाची दुराव्यवस्था, कुपोषणाला मिळणारा दुजोरा या गोष्टी भयावह होत्या. या सर्वाचा विचार करून शासनाने ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत या गावात रोजगारासाठी विविध कामे सुरू केली. त्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध झाला असून जलसंधारणासह जमीन सुधारणेची कामे झाली.

या बदलासाठी मानसिकता महत्वाची असते. ही मानसिकता कशी निर्माण याचे कुतूहल होतेच. याबाबत माहिती घेतली असता समजले ते ग्रामसभेचे महत्व. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत डोमा येथील सरपंचांनी ग्रामसभा घेऊन गावातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आम्हाला गावातच काम मिळाले तर, आम्ही गावाबाहेर कामाला जाणार नाही असे गावकऱ्‍यांनी सांगितले अन् गावाच्या विकासाची सुरूवात झाली. परंतु याच वेळी ग्रामपंचायतीने काम पुरविण्याची जबाबदारी घ्यावी ही भूमिकाही स्वीकारली.

ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे गावाच्या विकासाचा आराखडा तयार केला गेला. त्यानुसार चार समित्या गठित करण्यात आल्या. उपलब्ध शेतीचे परिसरात किती व कोणते काम घ्यावे हे निश्चित करण्यात आले. यानुसार प्रथम जल व मृद संधारणाची कामे हाती घेण्यात आली. कोणत्या ठिकाणी कोणती कामे घ्यावी व घेता येतात, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पाणलोट क्षेत्र समजावून देवून त्याचे फायदे व तोटेही सांगण्यात आले.

या गावात शेततळे, दगडी बांध, जमिनीची सुधारणा आदी विकासाची कामे ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आली. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी नदीचे पात्राच्या आजुबाजूला शेततळी खेदली त्यांना त्या शेततळयामधून पाणी घेऊन गव्हाचे पीक, भाजीपाला पीक, हरभरा पीक, इत्यादी दुबार पिके घेण्यात आली व बारमाही भाजीपाला पीक घेतल्याने कायम स्वरूपी रोजगार प्राप्त झाला. या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली.

ज्या शेतकऱ्यांनी सिंचन विहिर खोदून बांधून त्या विहीरीमधून पाणी घेऊन त्यापासून गहू, हरभरा, भाजीपाला, यासारखी पिके घेऊन त्यांना दुबार पिके घेण्याकरिता साधननिर्मीती झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नात सुध्दा भर पडली व त्या कुटुंबाला कायम स्वरूपी रोजगार प्राप्त झाला.

प्रबळ इच्छाशक्ती अन् शासनाचे सहकार्य यामुळे गावाचा विकास साध्य होवून शाश्वत रोजगाराच्या साधनांची निर्मिती होवू शकते याची साक्ष या गावाला भेट दिल्यानंतर जाणवत होते. शासनाचे सहकार्य , प्रबळ इच्छाशक्ती , नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न हे डोमा गावाच्या विकासाचे रहस्य होते. हे रहस्य केवळ डोमा गावापुरतेच मर्यादित न रहाता ते मेळघाटच्या विकासाचे सूत्र व्हावे हीच सर्वाची अपेक्षा आहे.

  • अनिल गडेकर
  • No comments:

    Post a Comment