Friday, April 27, 2012

घरकुलाचे स्वप्न झाले साकार

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी हे छोटसे गाव. या गावातील वसंत हजारे यांच्या कुटुंबाचा आनंद आज ओसंडून वाहतोय. त्याला कारणही तितकेच सबळ आहे. आज हे कुटुंब एका मोडक्या तोडक्या झोपडीतून सिमेंट विटाच्या घरात वास्तव्यास आले आहे. जिल्हा परिषदेकडून या कुटुंबास राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेमधून छोटसे पण टुमदार घरकुल मिळाले आहे.

वर्षानुवर्षे मोडक्या तोडक्या झोपडीत हजारे कुटुंबाने दिवस काढले. याच झोपडीत वसंताचा जन्म झाला. इथेच झोपडीतून पावसाळ्यात गळणारे पाणी अंगावर झेलत तो वाढला. दरवर्षी मोलमजुरीतील तुटपुंज्या पैशातील काही पैसे वाचवून पावसाच्या सुरुवातीला वसंता झोपडीची डागडुजी करीत असे. दारिद्र्याने पिचलेल्या वसंताला पुढे पुढे या कामासाठी पैसेही उरत नसत. जोराचा पाऊस झाला की झोपडी गळू लागे. सर्व हजारे कुटुंबिय पावसाने चिंब होत असत. पावसाळ्यात कित्येक रात्री त्यांनी जागून काढल्या. काही वेळेला तर गावातील समाज मंदिराच्या आश्रयाला हे कुटुंब झोपायला जात असे. परिणामी दैनंदिन जीवन आणि कुटुंबातील मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम होऊ लागला.

पण हे चित्र आता पालटले आहे. शासनाच्या राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. १ मधून या हजारे कुटुंबाला चांगले घर मिळाले आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या घराच्या हालअपेष्टा आता संपुष्टात आल्या आहेत. जिथे पावसाळ्यात बसणे मुश्किल होते तिथे आता पक्क्या घरामुळे हजारेंचा संसार सुखात फुलू लागला आहे. दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून वसंता आणि त्याच्या कुटुंबियांची सुटका झाली आहे. हक्काच्या या सुंदर घरकुलाने वसंताच्या मुलांच्या डोक्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगू लागली आहेत. या निवारा योजनेने वसंतासारख्या अनेकांचे जीवन पार उजळून गेले आहे. कुणी घर देता का घर? या भावनिक हाकेला शासनाने नक्कीच सकारात्मक उत्तर दिले आहे, हे मात्र निश्चित !

  • रुपाली गोरे
  • No comments:

    Post a Comment