Thursday, April 26, 2012

‘पापळ’ जलसंधारणात ‘अढळ’


अमरावती जिल्ह्यातील जवळपास सात हजार लोकवस्तींच पापळ हे गाव. कोरडवाहू शेतीवर विसंबून असलेल. पण या गावाला आगळी पुण्याई लाभलीय. भारताचे पहिले कृषीमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख याचे हे जन्मगाव. भारताच्या कृषी क्रांतीला चालना देण्याचं काम ज्यांनी केलं. त्या डॉ. भाउसाहेंबांच्या जन्मगावाला कृषितीर्थ अशी ओळख मिळवून देण्याचं काम आता सुरू झालय. आदर्श गाव संकल्प योजनेतून त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. गावाचा कायापालट होतांना दिसतो आहे. पण खरा बदल झाला तो जलसंधारणामुळे

पापळ- वाढोणा या भागातली शेती कायम पावसावर विसंबून असलेली. गावाच्या परिसरात धरण, बंधारे नाहीत. विहीरीवरच सगळा भार. विहीरी देखील बेभरवशाच्या. ओलिताची शेती करणारे त्यामुळे कमीच. कोरडवाहू शेतीतल्या पिकांवर सर्व अर्थकारण अवलंबून. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेनं आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेच्या माध्यमातून या गावाचा कायापालट करण्याचं ठरवले. गेल्या तीन वर्षापासून या गावाच्या परिसरात जलसंधारणाची कामे सुरू झाली आणि त्याचे दृष्य परिणामही जाणवू लागले.

ढाळीचे बांध, शेततळी, आणि सिमेंट बंधारे अशी कामं आकाराला आली. विहीरीमध्ये पाणी दिसायला लागलं. मातीत ओलावा टिकून असल्यानं रब्बी हंगाम अधीक फुलला. हे एका दिवसात झालेलं नाही. वेगवेगळया प्रयोगांना कंटाळून गेलेल्या या भागातल्या शेतकऱ्यांना पाणलोट विकासांच हे काम सुरूवातीला अविश्वासाचं होत. ढाळीच्या बांध बंदिस्तीमुळे जमिनीची धूप थांबून पावसाच्या पाण्याचा योग्य पध्दतींने निचरा होण्यास मदत झाली. या कामांच महत्व आता पचंक्रोशीतल्या शेतकऱ्यांना पटू लागले आहे. अनेक शेतकरी उत्सूकतेनं या गावात येऊ लागले आहेत.

पापळचे संरपंच किशोर गुलालकरी सांगतात, डॉ. पंजाबराव देशमुख यांचं जन्मगाव अशी ओळख असलेल्या या गावानं जलसंधारणेचं महत्व ओळखल आहे. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, बोअरवेलबंदी, निर्मलग्राम आणि श्रमदान ही आदर्श गावाची सप्तसूत्री त्यानुसार गावानं आपली वाटचाल सुरू केली आहे. गावाचा बाजार आधी रस्त्यावर भरायचा. वाहतुकीला अडथळा आणि गैरव्यवस्था पाहून आदर्श गाव योजनेतून गावातच मोकळया जागेवर १६ बाजारओटे बांधण्यात आले. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार या गावात तीन वेळा येऊन गेले. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. गांवातील बहुतांश घरांना एकच रंग आहे. एकत्वांच हे प्रतिक गाव ‘निर्मल’ करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. हे काम आता ८० ते ८५ टक्के पूर्ण झालं. गावात कुऱ्हाडबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला बाजार ओटयांचा परिसर स्वच्छ करण्यापासून ते गावातील साफसफाईसाठी श्रमदान हे एक वैशिष्ठ ठरलं. लोकांच्या उत्फूर्त प्रतिसादामुळे हे शक्य झालं आहे.

जलसंधारणाच्या या कामासोबतच गावात पायाभूत सोयी सुविधा उभारण्याच्या कामाकडे लक्ष दिलं जात आहे. गावात सर्व सुविधांनी सज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आमदार विरेंद्र जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं गावाच्या विकासाच्या १५ कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख याच्या स्मारकाच्या सौदर्याकरणाचं काम सुरू झालं आहे. रस्त्ये , गावातील नाल्यांचे खोलीकरण, ईतर कामेही सुरू झाली आहेत. व्यायामशाळा, सुलभ शौचालय वाचनालय, ही कामे प्रस्तावित आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांच वारसा सांगणारे हे गांव आता कूस बदलत आहे. एक आदर्श गाव म्हणून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरावं अशींच गावाची वाटचाल सुरू आहे.
  • मोहन अटाळकर
  • No comments:

    Post a Comment