Thursday, April 26, 2012

बचतगटाचा बॅग उद्योग

महिला बचतगटांच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारचे छोटेमोठे उद्योग स्थापन केले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गटांनी तर नवल करावे इतके चांगले उद्योग स्थापन करुन आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. बाभुळगाव तालुक्यातील वरुड येथील या फरीदबाबा महिला बचतगटाने बॅग उद्योगासह बकरी पालनाचा उद्योग सुरु करुन गटांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

वरूड या गावातील दहा महिलांनी एकत्र येऊन बचतगटाची स्थापना केली. सुरुवातीस प्रत्येकीने ५० रुपये बचत करुन पैसा जमा केला. गटात जमा झालेल्या पैशातून २००७ साली गटाने बॅग उद्योग सुरु केला. आकर्षक आणि फॅन्सी बॅगांना बाजारात मागणी आहे. त्यामुळे अशा बॅगांची निर्मिती केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते हा दृष्टीकोन समोर ठेवून गटातील महिलांनी घरीच बॅगा बनविण्याचे काम सुरु केले.

२०१० मध्ये गटाला खेळते भांडवल मिळाले. तेव्हापासून या उद्योगाला अधिक चालना मिळाली असल्याचे सुलोचना बिसेन यांनी सांगितले. गटात काही महिला स्वत:च मशिनकाम करणाऱ्या असल्याने बॅगांवर शिलाईची कामे करणे सोयीचे झाले. त्यामुळे खर्च कमी झाल्याने उत्पन्नातही वाढ झाली. खेळत्या भांडवलाची परतफेड केल्यानंतर २०१० मध्येच या गटाला एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. आता महिलांचा हा उद्योग उत्तम स्थितीत सुरू असून उद्योगासाठी महिलांनी जागाही किरायाने घेतली आहे. ज्या महिलांना शिवणकाम येते त्या महिल्या आपआपल्या घरीच बॅगा शिलाईचे काम करीत असल्याने त्यांचा वेळही वाचतो.

गटातील सुलोचना बिसेन व अरुणा मिलमिले या महिलांनी रेल्वे सिंधी येथे बॅग बनविण्याचे प्रशिक्षण घेतले असून गटातील इतर महिलांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. बॅगांसोबतच लोकरी स्टूल आसन, टेबल आसन, कापडी बसायचे आसन, लोकरी व कापडी बटवे, पिशव्या, लेदरच्या बॅगाही गटातील महिला उत्कृष्टपणे तयार करतात. वेलवेटच्या कापडाचा कच्चा माल नागपूरवरुन मागविला जातो. महिलांचा हा व्यवसाय चांगला नफ्यात चालल्याने केवळ एकाच वर्षात गटाने एक लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे.

बॅग उद्योगासोबतच बकरी पालनाचाही व्यवसाय गटाच्यावतीने केला जात आहे. यासाठीही गटाला खेळत्या भांडवलातून एक लाख रुपयांच्या बकऱ्या मिळाल्या आहेत. गटातील प्रत्येक महिलेला पाच बकऱ्या देण्यात आल्या असून या व्यवसायातूनही गटाला मासिक पाच हजार रुपये इतका नफा मिळतो. गटातील प्रत्येक महिला बॅग उद्योग व बकरी पालनाचा व्यवसाय स्वत:चा असल्याचे समजून काम करीत असल्याने गट नफ्यात असल्याचे सुलोचना बिसेन यांनी सांगितले. गटाच्यावतीने उत्पादीत बॅगांचा दर्जा, त्यातील आकर्षकपणा व ग्राहकांना अपेक्षित असलेल्या बॅगांचीच निर्मिती आम्ही करीत असल्याने बॅगांना चांगली मागणी असल्याचे त्या सांगतात. जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित बचतगटांच्या विक्री व प्रदर्शनीमध्ये बॅगा हातोहात विकल्या जातात, असे त्या म्हणाल्या.

  • मंगेश वरकड
  • No comments:

    Post a Comment