Tuesday, April 24, 2012

गावांना मिळाला दिलासा

वरुड तालुका हा डार्कझोमध्ये असुन तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेव्दारे केलेल्या उपाययोजनांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या २१ गावातील विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

वरुड तालुक्यातील मौजा भेमडी-टेंभ्रुसोडा येथील नाला खोलीकरणाचे काम प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले असुन एकाच नाल्यावर १० बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामध्ये एकुण १ लाख २१ हजार ७८६ घनमिटर खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामावर ९० लाख रुपये खर्च झाले आहे.

भेमडी-टेंभुरखेडा येथे राज्यातील अभिनव अशा प्रायोगिक तत्वावरील नाला खोलीकरणाच्या कार्यक्रमामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असुन परिसरातील सिंचन विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वरुड तालुका डार्कझोनमधुन मुक्त करण्याच्या उपक्रमाला यामुळे निश्चितच लाभ झाला आहे. हा उपक्रम कृषी विभागातर्फे राबविण्यात आला आहे.

नाला खोलीकरणाच्या कामासाठी वरुड तालुक्यासाठी निधी उपलब्ध झाला असुन २१ गावांमधील नाला खोलीकरणामध्ये कुमुंदरा, गाडेगाव, अलोडा, पळसोना, उराड, नागझीरी, काचुर्ना, लिंगा, पिपलगड, वाई, लोहद्रा व शहापुर आदी गावांचा समावेश आहे. टेंभुरखेडा व भेमडी येथे प्रयोगिक तत्वावर खोदण्यात आलेल्या नाल्यामध्ये नागठाणा -२ धरणामधून पाणी सोडण्यात आल्यानंतर काही दिवसातच परिसरातील विहीरींच्या भुजल पातळीत वाढ झाली आहे. विहीरींना ३० फूट पाणी आले आहे.

नाला खोलीकरणाच्या कार्यक्रमामुळे वरुड व मोर्शी तालुक्यातील अतिविकसित पाणलोट क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाला गती मिळाली असुन पाण्याचे पुनर्भरण होऊन विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या गावांना यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असे या गावाचे सरपंच श्री. चरपे यांनी आवर्जून सांगितले. वरुड मोर्शी तालुक्यातील अतिविकसित पाणलोट क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी वरिष्ठ भू वैज्ञानिक अरविंद वडस्कर तसेच अधिक्षक कृषी अधिकारी किसन मुळे यांचे महत्वपुर्ण योगदान आहे.

  • अनिल गडेकर
  • No comments:

    Post a Comment