Sunday, April 22, 2012

अन् साजरा झाला उत्सव


तीस वर्षापूर्वी होळीच्या उत्सवात मानपानातून झालेला वाद विकोपाला गेला आणि न्हावे गावात दोन तट पडले. तेव्हापासून या गावात होळी उत्सव बंदच होता. मात्र, शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानामुळे हा वाद संपुष्टात आणण्यात तीस वर्षानंतर यश आले आणि गेल्या दोन वर्षापासून होळी उत्सव आनंदाने साजरा होऊ लागला.याचे श्रेय तंटामुक्त योजनेला ग्रामस्थ देत आहेत.

रायगड जिल्हयातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत न्हावे हे छोटेसे गाव असून, या गावाची लोकसंख्या सुमारे ८०० आहे. या गावात १९८३ मध्ये होळी सणातील मानपानाच्या कारणावरुन आपसात मतभेद होऊन वाद पेटला. विकासच या वादांमुळे खुंटला. अनेक तरुण वर्ग मुंबईत कामानिमित्त स्थिरावले,तर हे गाव प्रत्येक सार्वजनिक उत्सवात अतिसंवेदनशील म्हणून शासनाच्या दप्तरी ओळखू लागले. सध्या तंटामुक्त अध्यक्ष शांताराम अंथेरे हे असून यंदा गावात शांततेत होळी साजरी करण्यात आली आहे. या छोटयाशा गावात १९८३ मध्ये होळी उत्सवात वाद निर्माण झाला व काही ग्रामस्थांना आपला प्राण गमवावा लागला.त्यावेळी गावात दोन तट पडले आणि सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम बंद झाले. २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राज्यात सुरु झाले.

गावातील वाद गावाच्याच पुढाकाराने समझोत्याने मिटवून गावात एकोपा निर्माण करण्यासाठी न्हावे गावातील गावकीचे अध्यक्ष कैलास सोनटक्के, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष पांडुरंग सोनटक्के, पोलीस पाटील तसेच माजी सरपंच गणपत अंथेरे, गावातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिकांबरोबरच तरुणांनी हा वाद गावातच तंटामुक्त अभियानांतर्गत बसून मिटवला आणि यंदा पुन्हा आनंदाने सर्वांनी मिळून होळीचा सण आनंदात साजरा केला. यावर्षी पोलीस संरक्षण न घेता हा उत्सव पार पाडला.

हा होळी उत्सव शांततेत गुण्यागोविंदाने सर्वांनी साजरा करावा यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एन.तांबे, तंटामुक्त अभियान योजनेचे शिलेदार पोलीस हवालदार नंदकुमार पाटील, बीट अंमलदार तसेच अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment