Sunday, April 22, 2012

‘बेंबळा’ सिंचन प्रकल्पामुळे समृद्धी


भारतासारख्या कृषीप्रधान देशात सिंचनाचे महत्व अनन्‍यसाधारण आहे. बहुतांश लोकांचे जीवनमान शेतीवर आधारित असल्याने आणि या शेतातून सोने पिकावे अशी अपेक्षा असल्याने सिंचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच केंद्र व राज्य शासन सिंचनावर भर देत आहे. शासनाच्या याच धोरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याचे काम करीत आहे. याच प्रकल्पापैकी ‘बेंबळा’ हा प्रकल्प जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

बेंबळा नदीवर बांधण्यात आलेल्या बाभुळगाव तालुक्यातील या प्रकल्पातून जवळपास ५४ हजार हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेष म्हणजे मागील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास २७,५०५ इतके हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली आले आहे. हजारो शेतकऱ्यांना या ओलिताचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यातील या महत्वाकांक्षी प्रकल्पावर २१७६ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आणखी ९६५ कोटी रुपये प्रकल्पावर खर्च केले जाणार आहेत. पंतप्रधान पॅकेजमधून मिळालेल्या निधीची प्रकल्पास गती देण्यास मदत झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाची उर्वरित सिंचन क्षमता लवकरच निर्माण होऊन हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची जमेची बाजू म्हणजे, धरणाचे बांधकाम, कालवे व वितरणाची सर्व कामे पूर्ण झाली असून प्रकल्पीय पाणीसाठा क्षमतेच्या संपूर्ण म्हणजे १६९.६७ दलघमी एवढा निर्माण झाला आहे.

बेंबळा हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारताना अनेक चांगल्या बाबी निर्माण झाल्या आहेत. प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन ही एक कठीण समस्या असते. परंतु या प्रकल्पाच्या बाधितांना नवीन गावठाणात हलविताना सामाजिक दृष्टी बाळगण्यात आली आहे. प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मिटनापूर या गावातील लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन नवीन गावठाण ताब्यात घेतले व तेथे स्थलांतरित झाले. राज्यातील ही एकमेव घटना आहे. प्रकल्पबाधितांना नवीन गावठाणात स्थलांतरित करताना हागणदारीमुक्त गावठाण ही संकल्पना राबवून त्यासाठी गावकऱ्यांना शौचकूपावर खर्च होणारी रक्कम अनुदान स्वरुपात वाटण्यात आली. त्यामुळे नवीन गाव हागणदारीमुक्त करण्यास मदत झाली. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नवीन गावठाणात आल्हाददायक व प्रसन्न वातावरणासाठी वृक्ष लागवड, शोषखड्डे, जलपूनर्भरण असे उपक्रम सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत राबविण्यात आले. या संस्थांच्या माध्यमातून एकएक नवीन गावठाण दत्तक घेऊन तेथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, पुस्तके व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कोणत्याही धरणातून पुढील खालच्या बाजूची जमीन ओलिताखाली आणली जाते. परंतु बेंबळावर डेहणी उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे धरण्याच्या वरच्या बाजूची देखील अंदाजे सात हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. डेहणी उपसा सिंचन योजना ही आशिया खंडातील सर्वात मोठी ठिबक पद्धतीने सिंचन करणारी योजना असून संपूर्ण योजना स्वयंचलित असणार आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे बेंबळा प्रकल्प हा जिल्ह्याला वरदान असलेला महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.

  • अनिल आलूरकर
  • No comments:

    Post a Comment