Wednesday, April 18, 2012

बचतगटामुळे उद्योग क्षमता विकसित झाली

बचतगटामध्ये सहभागी झाल्याने महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्या अनुषंगाने काम करण्याची संधी प्राप्त होते. रमाबाई महिला बचतगटालाही यामुळेच उद्योगक्षमता विकसित करण्याची संधी प्राप्त झाली, असे गोरवोद्गार आहेत वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रमाबाई महिला बचतगटांच्या सदस्यांचेच. बचतीतून उद्योग व्यवसाय सुरु करण्यापर्यंतची त्यांची ही यशोगाथा.

लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव-२ अंतर्गत येत असलेल्या पांगरीकुटे गावामध्ये १० बचतगटांची स्थापना करण्यात आलेली आहे. २००२ पासूनच या गावातील बचतगट महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. माविमचे जिल्हा समन्वयक प्रकाश गणवीर यांनी या गावातील महिलांना बचतगट स्थापन करुन आर्थिक प्रगती साधण्याबाबत तसेच सामाजिक एकोपा जपण्याबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचाच परिणाम म्हणून या गावामध्ये बचतगटाची स्थापना व्हायला सुरूवात झाली.

सन २००२ मध्ये वंदना गायकवाड, सौ.बेबी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन रमाबाई स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केला. नियमाप्रमाणे नियमित बचत भरणे सुरु झाले. माविमतर्फे प्रशिक्षण मिळत गेले. महिला बँकेत, पंचायत समिती मध्ये स्वत: जाऊन स्वत:चे काम करु लागल्या. काम करता करता त्यांच्यामध्ये धाडस निर्माण झाले. रमाबाई गटामध्ये एकूण ११ महिला सहभागी झाल्या. यातील ८ महिला जेमतेत शिक्षित होत्या. ३ मात्र अक्षरशून्य होत्या. निरक्षर असल्याने त्यांना व्यवहाराच्या अडचणी यायच्या. या तीन महिलांना साक्षर करण्याची जबाबदारी इतर शिक्षित सदस्यांनी घेतली आणि काही काळानंतर निरक्षर महिलाही साक्षर झाल्या.

बचतगटामार्फत बचत केलेल्या रुपयांतून अंतर्गत कर्ज व्यवहार सुरू झाले. केवळ अंतर्गत कर्जावर या महिलांनी समाधान मानले नाही तर आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे, असा विचार पुढे आला. सर्वप्रथम त्यांनी माविमतर्फे उद्योग कसे करावेत, याची माहिती प्रशिक्षणाद्वारे जाणून घेतली. त्यानंतर सन २००६ मध्ये आपला स्वत:चा कापड उद्योग गावातच सुरु केला. त्यासाठी त्यांनी बँकेतर्फे स्वर्णजयंती योजनेतून कर्ज घेतले महिलांनी सुरू केलेल्या कापड व्यवसायाला सुरूवातीला गावातील महिलांनी कापड खरेदी करुन प्रतिसाद दिला. नंतर हळूहळू गावातील पुरूष मंडळीही कापड खरेदी करू लागले. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ या उक्तीचा प्रत्यय महिलांना आला. त्यांची आर्थिक प्रगती साधली गेली.

या दुकानातून बालविकास प्रकल्प अधिकारी, माविमचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी कापड खरेदी करतात. त्यामुळे उद्योग करण्यास बळ मिळते, असे या गटातील महिलांचे म्हणणे आहे. या गटातील महिलांनी कापड उद्योगाबरोबरच सहयोगिनी कु.विमल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मसाला, कुरडया, पापड, परसबागेचाही उपक्रम सुरु केला आहे. सावित्रीची लेक म्हणून त्यांनी आपले नाव सार्थ केल्याचे त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. बचतगटामुळेच महिलांमधील उद्योग क्षमता विकसित झाली असल्याचा गटातील महिलांचा विश्वास आहे.

No comments:

Post a Comment