Thursday, April 5, 2012

कुपोषण हद्दपार.

मेळघाटसह जिल्ह्यातील कुपोषण आपण संपवु शकतो. या आत्मविश्वासाच्या बळावर राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनतर्फे सुरु असलेल्या विशेष उपक्रमाचे दृष्यपरिणाम आता दिसु लागले आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी आदिवासी गावांसह कुपोषणाचे प्रमाण असलेल्या सर्व गावांमध्ये जाणीव जागृती करुन कुपोषण मुक्तीसाठी कुपोषित बालकांच्या आईचा सहभाग वाढविल्यामुळेच मेळघाटसारख्या दुर्गम व आदिवासी भागात सुध्दा सर्वसाधारण श्रेणीतील बालकांची टक्केवारी ६८ पर्यंत गेलेली आहे.

राजमाता जिजाऊ अभियानाचे महासंचालक नंदकुमार यांनी कुपोषणमुक्त मेळघाटचा संकल्प केला असुन मेळघाटातील कुपोषण त्यावर करावयाच्या उपाययोजना तसेच बालकांच्या आरोग्याचीही काळजी घेऊन ० ते ६ वर्षे वयोगटातील बालक हा कायम कुपोषणाबाहेर राहील यासाठी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका , बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा विशेष कार्यगट तयार करुन प्रत्येक गावातील कुपोषणाची‍ स्थिती आणि करावयाच्या जनजागृती व प्रत्यक्ष कृतीबाबत प्रत्यक्ष आराखडा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. यासाठी मेळघाटातील बहुतांश गावाला त्यांनी भेटी देऊन कुपोषणमुक्त मेळघाटची संकल्पना साकारण्यासाठी विशेष कार्यक्रमाचीच आखणी केली.

जिल्ह्यातील कुपोषणमुक्त ग्राम अभियानांतर्गत कुपोषणमुक्तीसाठी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांची प्रत्यक्ष माहिती मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड यांनी मेळघाटातील अतिदुर्गम गावांना भेटी देऊन घेतली होती. कुपोषणमुक्त मेळघाट करण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करण्याच्या सुचना या भेटीत त्यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने शंभर दिवसाचा विशेष कालबध्द कार्यक्रम तयार करुन त्यादृष्टीनेच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच धारणी व चिखलदरा तालुक्यातील ४२७ अंगणवाड्यांपैकी १५२ अंगणवाड्यांमध्ये सॅम व मॅम या श्रेणीतील संपुर्ण बालके हद्दपार झाली आहेत. यामध्ये धारणी तालुक्यातील ५३ अंगणवाड्यांचा तर चिखलदरा तालुक्यातील ९९ अंगणवाडी केंद्राचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील कुपोषणामधेही मोठ्या प्रमाणात घट झाली असुन जिल्ह्यातील ६५ गावे कुपोषणमुक्त झाली आहेत. तसेच कुपोषणमुक्त अंगणवाड्यांमध्ये ५८ अंगणवाडी केंद्र तर २८ मिनी अंगणवाडी केंद्र अशा कुपोषणमुक्त अंगणवाड्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कुपोषण मुक्त अभियनाला चांगला प्रतिसाद मिळाला असुन तीव्र व मध्यम कुपोषित गावांच्या संख्येतही घट झाली असुन यामध्ये धारणी तालुक्यातील ३३ तर चिखलदरा तालुक्यातील ९१ गावांचा यामध्ये समावेश आहे. गैर आदिवासी क्षेत्रातील ७६३ गावांमध्येही तीव्र व मध्यम कुपोषित बालकांमध्ये घट झाली आहे.

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण मिशनतर्फे १४ नोव्हेंबर ते ७ एप्रिल, २०१२ या कालावधीत कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असुन अशा प्रकारचे अभियान राज्यात पाहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.

बालकांमधील असलेल्या कुपोषणाच्या कारणांचा शोध घेतानाच ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम आदिवासी भागातील रुढी, परंपरा, अंधश्रध्दा तसेच कमी वयात होणारे लग्न व दोन अपत्यां मधील कमी अंतर, आरोग्याबाबत प्रचंड दुर्लक्ष यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून आले असुन या संपूर्ण कारणांचा विशेष अभ्यास करुन कुपोषण मुक्तीसाठी लोकजागृती करतांनाच बालकांच्या आहाराविषयी पालकांमध्ये असलेले अज्ञान हे प्रमुख कारण कुपोषणामागील आहे. कुपोषण दूर करण्याकरिता मातांच्या प्रशिक्षणावरच विशेष भर देण्यात आला असुन त्यांना बालकांचे संगोपन व आहारविषयक शास्त्रशुध्द माहिती देण्यासाठी विशेष चमु प्रशिक्षित करण्यात आले आहेत

कुपोषण हद्दपार. . .

हे चमु प्रत्येक घरी जाऊन बालकांच्या आहार पध्दतीविषयी माहिती देऊन आपल्या बालकांला दोन ते तीन वेळा आहार न देता तीन ते आठ वेळा आहार देणे व दररोज घरी शिजविण्यात येणारे अन्न अधिक जीवनसत्वयुक्त व अधिक उष्मांकयुक्त करण्याबाबत मार्गदर्शन करतात.यासाठी विशेष दशपदीही तयार करण्यात आली.

दशपदी प्रभावी

कुपोषणाबद्दल पालकांमध्ये जागृती निर्माण करतांना व आपल्या बालकाची काळजी घेतांना तो हुशार निघावा व शिकुन मोठा व्हावा यासाठी महिलांमध्ये जागृती निर्माण करतांनाच ० ते ६ वर्षे वयोगटाच्या बालकांच्या संगोपनाबदृल दशपदीचा प्रभावी वापर यावर प्रत्येक गावातील महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.

दशपदी म्हणजे कुपोषणमुक्त बाळ. ही संकल्पना साकारतांना आईने घ्यावयाच्या काळजीमध्ये बाळाच्या जन्मानंतर एक तासाच्या आत मातेने दुध पाजणे, जन्माच्या सहा महिन्यापर्यंत फक्त आईचेच दुध पाजणे यावर भर देतांनाच सहा महिने झाल्यानंतर आईच्या दुधासोबत पुरक आहार सुरु करण्यावर प्रशिक्षणामध्ये विशेष भर देण्यात आला.

पोषण आहारामध्ये सर्व मुख्य व सुक्ष्म तत्वे उपलब्ध असणारे पोषण आहार दररोज तीन ते आठवेळा देणे. रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी गोळी किंवा स्प्रिंकलर देणे, मुलाची वयाची नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जीवसत्व अ दर सहा महिन्यांनी देणे, आयोडीनयुक्त मिठाचे नियमित सेवन करणे, मातांना व बाळाला लसीकरण आणि घरातील वातावरण स्वच्छ ठेवुन बाळाच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावुन बाळाला उकळलेले पाणी पाजणे यावर विशेष भर देण्यात आल. यासाठी गाव पातळीवर माता बैठका, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व प्रभातफेरी, मशाल फेरी, ग्रामसभा घेण्यात आल्यामुळेच जिल्ह्यातील ६५ गावे कुपोषणमुक्त झाली आहेत.

तीव्र व अतितीव्र श्रेणीतील एकही बालक नसलेली ८८७ गावे असुन कुपोषणमुक्त ८६ अंगणवाड्या तसेच सॅम व मॅमची मुले नसलेली १ हजार ४१८ अंगणवाड्या जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होऊन सर्वसाधारण बालकांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मेळघाटसारख्या अतिदुर्गम व आदिवासी भागात सुध्दा सर्वसाधारण श्रेणीतील बालकांची टक्केवारी ६८ टक्केपर्यंत वाढविण्यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान यशस्वीपणे ठरले आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आनंद जगताप, उपमुख्य कार्यपालन अधिकारी व महिला व बालकल्याण अधिकारी बी.जी. सोमवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे निश्चिच महत्वपुर्ण योगदान राहीले आहे. कुपोषणमुक्तीचा संकल्प याच गतीने सुरु ठेवण्याचा निश्चय हा संपुर्ण कुपोषणमुक्तीकडे नेणारा ठरणार आहे.


  • अनिल गडेकर

  • No comments:

    Post a Comment